चालू घडामोडी आणि दिनविशेष - 06 डिसेंबर 2023

Date : 6 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कोण आहे मल्लिका सागर? आयपीएल लिलावात साकारणार लिलावकर्त्याची भूमिका, जाणून घ्या
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मल्लिका सागरची इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या खेळाडूंच्या लिलावासाठी लिलावकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल २०२४चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईतील कोकाकोला एरिना येथे होणार आहे. यंदाच्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात मलिष्का सागरचाही मोठा वाटा होता. यापूर्वी बीसीसीआय आयपीएल लिलावासाठी चारू शर्मा, रिचर्ड मॅडले किंवा ह्यू अॅडम्स हे लिलावकर्त्याची भूमिका बजावत होते.
  • या वर्षाच्या सुरुवातीला महिला प्रीमियर लीग लिलावाच्या उद्घाटन सत्रादरम्यान मल्लिकाही आली होती. आयपीएल लिलावासाठी बीसीसीआय सहसा रिचर्ड मॅडली किंवा ह्यू अ‍ॅडम्स यांना सांगते. परंतु, २०२२ मध्ये मेगा-लिलावादरम्यान अ‍ॅडम्स “पोस्चरल हायपोटेन्शन” मुळे बेशुद्ध झाल्यामुळे, बीसीसीआय कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही.

कोण आहे मल्लिका सागर? पीकेएल लिलावातही दिसली होती

  • स्पोर्ट्स लीगमधील खेळाडूंच्या लिलावासाठी मल्लिका अनोळखी नाही, तिने २०२१ मध्ये प्रो कबड्डीचा लिलावा दरम्यान लिलावकर्त्याची भूमिका पार पाडली होती. मुंबईत राहून ती सल्लागार म्हणून काम करते. तिंच लिलावातील प्रवास २००१ मध्ये क्रिस्टीज या प्रसिद्ध ब्रिटिश लिलावामधून सुरू झाला होता. या वर्षाच्या सुरुवातीला डब्ल्यूपीएल लिलावापूर्वी एका मुलाखतीत, मल्लिकाने बीसीसीआयला लिलावाची जबाबदारी सोपवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, “भारतीय महिलांना अखेरीस आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे हक्क मिळतील, त्यांच्याकडे क्षमता असेल. उच्च स्तरावर खेळण्यासाठी ही लीग खूप अनुभव देऊन जाईल.”
  • आयपीएल २०२४च्या लिलावाची प्रक्रियेला फार कमी दिवस शिल्लक आहेत. यासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या बलाढ्य संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे आक्रमक खेळाडू असूनही एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळी, आरसीबीची लिलावात दोन खेळाडूंवर नजर आहे. यावेळी ते विजेतेपदाचा दुष्काळ संपवतील अशी आशा त्यांना वाटते.
जय शाहा ‘स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित; BCCIने केले ट्वीट, “त्यांचे नेतृत्त्व हे…”
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी आपल्या नावावर एक मोठी कामगिरी केली आहे. शाह यांना २०२३ क्रीडा व्यवसाय क्षेत्रातील विभागात ‘स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बीसीसीआयने शाह यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटवर पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन केले, की “त्यांनी क्रिकेट जगतावर अमिट छाप सोडली आहे.”
  • बीसीसीआयने ट्वीट करून लिहिले, “बीसीसीआयचे मानद सचिव जय शाह यांना CII स्पोर्ट्स बिझनेस अवॉर्ड्स २०२३ मध्ये ‘स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अभिनंदन. भारतीय क्रीडा प्रशासनातील कोणत्याही नेत्यासाठी हा पहिलाच सन्मान असून तो योग्य व्यक्तीला दिला आहे! त्यांचे हे नेतृत्व बीसीसीआयला जगात पुढे नेत आहे.”
  • बीसीसीआयने पुढे म्हटले आहे की, “ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करणे यासारख्या मोठ्या उपक्रमांनी क्रिकेट खेळ कायमचा बदलला आहे.” जय शाह यांनी क्रिकेट जगतात एक महत्त्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांचा क्रिकेट प्रशासनातील प्रवास गुजरात क्रिकेट असोसिएशनपासून सुरू झाला. गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, शाह यांनी वयाच्या ३१व्या वर्षी बीसीसीआयच्या मानद सचिवाची भूमिका स्वीकारली.
  • जय शाह यांनी २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी चाहत्यांना आणि खेळाडूंना खूप चांगल्या सुविधा दिल्या. विश्वचषक २०२३मध्ये भारत अनेक मोठे विक्रम रचण्यात यशस्वी ठरला. यामुळेच ही स्पर्धा आयसीसीची सर्वात यशस्वी स्पर्धा ठरली. कोविड-१९च्या महामारीतही त्यांनी बीसीसीआयचे नुकसान होऊ दिले नाही आणि बायो बबलमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
  • जय शाह यांनी केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील लोकांना क्रिकेट खेळ पाहण्यात कशी आवड निर्माण होईल यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. यामुळेच एकूण विश्वचषक २०२३ सामने पाहण्याचा आकडा हा ५२ कोटींच्या पार गेला. हा विश्वचषक जवळपास ४२२ अब्ज मिनिटे पाहिला गेला, जे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च वेळ आहे. जवळपास १३ कोटी लोकांनी टीव्हीवर एकाच वेळी अंतिम सामना पाहिला आणि त्याच वेळी हॉट स्टारवर ५.९ कोटी लोक सक्रिय होते.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केव्हा पूर्ण होणार? फडणवीसांनी दिले महत्त्वाचे संकेत
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र येतात. यानिमित्ताने विशेष शासकीय कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते. आज (६ डिसेंबर) चैत्यभूमीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी आणि अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक अधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी माहिती दिली.
  • देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुता ही जी भगवान गौतम बुद्धांनी सांगितेलली तत्वे आहेत, या तत्त्वांच्या आधारे संविधान तयार केलं. म्हणूनच जगामध्ये आपली आगळी वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. आंबेडकरांनी आपल्या जीवनात अर्थतज्ज्ञ, मजूर मंत्री, पाटबंधारे मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांचं प्रत्येक काम हे भारताच्या निर्मितीचं पहिलं पाऊल ठरलं आहे. म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो. तज्ज्ञांचे विचार जिथे संपतात तिथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सुरू व्हायचे. म्हणूनच आज देशाच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
  • “मला या गोष्टीचं समाधान आहे की अनेक वर्ष इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं अशी मागणी चालली होती. यासाठी अनेक आंदोलने झाली. मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी, पंतप्रधान मोदींना विनंती केली की इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली आहे. आता भव्य स्मारकाचं निर्माण तिथं होत आहे. आमचा प्रयत्न तरी असा आहे की पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला आपण इथे येऊ तेव्हा त्या स्मारकालाही आपल्याला अभिवादन करता आलं पाहिजे या दृष्टीने पंतप्रधानांच्या नेतृत्त्वात वेगाने काम सुरू आहे”, असं म्हणत फडणवीसांनी स्मारकाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे काम वेगाने होत असल्याचं सांगितलं.
  • “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्याठिकाणी दीक्षा घेतली, त्या दीक्षा भूमीवर २०० कोटींची विकासाची कामे सुरू केली आहेत. पवित्र दीक्षा भूमी ही जागतिक दर्जाची वास्तू तयार झाली पाहिजे. कारण दीक्षा भूमी भारतासाठीच महत्त्वाची नसून जगभरातील बौद्ध अभ्यासक या दीक्षा भूमीवर येत असतात. त्याकरता काम सुरू केलं आहे. आज लंडनमधलं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं घर महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं. तिथेही आपण त्यांच्या अतिशय मौल्यवान वस्तू ठेवल्या आहेत”, अशीही माहिती फडणवीसांनी दिली.
‘वॉक टू वर्क’ला प्रोत्साहन देणारे नवे गृहनिर्माण धोरण लवकरच! वयोवृद्ध, विद्यार्थ्यांसाठीही विशेष गृहयोजना!
  • वांद्रे कुर्ला संकुल तसेच अंधेरीसारख्या औद्योगिक कार्यालये अधिक असलेल्या परिसरांसह मुंबई महानगर क्षेत्र तसेच चाकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी शहरात ‘वॉक टू वर्क’ म्हणजेच एकाच ठिकाणी घर आणि कार्यालय या संकल्पनेला चालना देणारे राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण आणले जाणार आहे. याबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात असून तो हरकती व सूचनांसाठी उपलब्ध केला जाणार आहे.
  • या आधी २००७ मध्ये तत्कालीन शासनाने गृहनिर्माण धोरण जाहीर केले होते. त्यानंतर २०१५ आणि २०२१ मध्येही गृहनिर्माण धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. परंतु हा मसुदा मंत्रिमंडळापुढे सादर झालाच नाही. त्यामुळे नवे गृहनिर्माण धोरण अमलात आले नाही. आता विद्यमान गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मसुदा अंतिम टप्प्यात असून तो लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
  • या नव्या धोरणात बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक कुशल कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय अकुशल कामगारांसाठी भाडेतत्त्वावरील घरे उपलब्ध करून देणे व त्या बदल्यात विकासकांना चटईक्षेत्रफळ उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. वयोवृद्ध नागरिक तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना राबविणाऱ्या विकासकांना प्रोत्साहन देण्याचाही शासनाचा विचार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक परवडणाऱ्या घरांची निर्मिती व्हावी, असा शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी नव्या धोरणात आकर्षक सवलती देण्याचे प्रस्तावात करण्यात आले आहे. कामकरी महिलांसाठी वसतिगृह उपलब्ध करून देणाऱ्या विकासकांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा विचार असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
  • याआधी मंजूर झालेल्या धोरणात विकासकांना अधिकाधिक चटईक्षेत्रफळ, टीडीआर देण्याचा उल्लेख होता. नव्या धोरणात त्यापलीकडे विचार करण्यात आला आहे. विकासकांना अधिकाधिक भूखंड कसा उपलब्ध होईल आणि या भूखंडावर जलद इमारत परवानग्या देण्यावर भर असेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन जलदगतीने पूर्ण होणारे गृहप्रकल्प ही काळाची गरज असून त्यावर भर देण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
 ‘ग्रीन कार्ड’ अनुशेष कमी करण्यासाठी विधेयक
  • अमेरिकेत ‘ग्रीन कार्ड’ वितरणातील अनुशेष कमी करण्यासाठी आणि रोजगाराधारित ‘व्हिसा’साठी देशनिहाय भेदभाव समाप्त व्हावा, यासाठी अमेरिकेतील तीन प्रभावशाली ‘काँग्रेस’ सदस्यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहात द्विपक्षीय विधेयक मांडले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास हजारो भारतीय वंशाच्या अमेरिकनांना त्याचा फायदा होईल.
  • भारतीय वंशाचे अमेरिकन ‘काँग्रेस’ सदस्य राजा कृष्णमूर्ती आणि प्रमिला जयपाल यांच्यासह रिच मॅककॉर्मिक हेही सोमवारी हे विधेयक सादर करण्यात सहभागी झाले. अमेरिकेतील हजारो भारतीय वंशांचे रहिवासी ‘ग्रीन कार्ड’ किंवा अमेरिकेत कायमस्वरूपी निवासासाठी मुभा मिळण्याची अनेक दशकांपासून प्रतीक्षा करत आहेत. ‘एचआर ६५४२, द बायपार्टिझन इमिग्रेशन व्हिसा इफिशियन्सी अँड सिक्युरिटी अ‍ॅक्ट ऑफ २०२३’ असे या विधेयकाचे नाव आहे. या प्रस्तावित कायद्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. तसेच यामुळे ‘ग्रीन कार्ड’ अनुशेष कमी होईल. अमेरिकन कंपन्या, उद्योग व्यवस्थापनांना, रोजगार-सेवा प्रदात्यांना स्थलांतरितांना त्यांच्या जन्मस्थानावर नव्हे तर त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर नियुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मुभा या प्रस्तावित कायद्यामुळे मिळेल.
  • त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची स्पर्धात्मक गुणवत्ता निश्चित वाढेल, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. ‘ग्रीन कार्ड’ कार्ड बाळगणाऱ्यास अमेरिकेत कायमस्वरूपी निवासाचा विशेषाधिकार देण्यात आला आहे.

ब्रिटन सरकारच्या व्हिसासंबंधी निर्णयावर चिंता

  • लंडन : ब्रिटनने परदेशी व्यावसायिकांवर घातलेल्या व्हिसा निर्बंधांमुळे भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या गटाने चिंता केली आहे. हे निर्बंध अन्याय्य असल्याचे मत भारतीय व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. ब्रिटन सरकारच्या नवीन नियमानुसार, परदेशातील कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्यांना आपल्याबरोबर आणण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे तसेच कुशल व्यावसायिकांना किमान ३८ हजार ७०० पौंड वार्षिक वेतन असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इस्त्रोचं आणखी एक मोठं यश, चंद्राकडे पाठवलेलं यान पृथ्वीपर्यंत परत आणलं, आता अंतराळवीर…
  • सतत नवनवी यशाची शिखरं सर करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने एक मोठं यश मिळवलं आहे. इस्रोने अलिकडेच भारताचं अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून मोठा पराक्रम गाजवला. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला. इस्रोची चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी ठरली. चांद्रयान-३ मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरने चंद्रावरील तापमानापासून ते पृष्ठभागाबाबतची माहिती इस्रोला दिली. तिथे काढलेले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओदेखील इस्रोला पाठवले. परंतु, चंद्रावर रात्र झाल्यानंतर इस्रोचं चंद्रावरील संशोधनकार्य संपलं. दरम्यान, चांद्रयान मोहिमेच्या उत्तरार्धात इस्रोला आणखी एक यश मिळालं आहे.
  • इस्रोने काही वेळापूर्वी माहिती दिली आहे की, “चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश मिळालं आहे.” चांद्रमोहिमेतल्या या मोठ्या टप्प्याची माहिती देताना इस्रोने म्हटलं आहे की, “आता चंद्रावरून पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया सोपी असणार आहे. आम्ही आता अशा प्रकारच्या मोहिमांवर काम करत आहोत. यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं जात आहे.” चांद्रयान मोहीम पूर्ण करून चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत परतलं आहे. हे केवळ चांद्रयान मोहिमेसाठीचं मर्यादित यश नव्हे तर कोणतंही यान अथवा अंतराळवीरास अवकाश मोहीम पर्ण करून पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता सिद्ध करणारी कामगिरी आहे. त्यामुळे इस्रोला आता अंतराळात किंवा चंद्रावर अंतराळवीरास पाठवून सुखरूप परत पृथ्वीवर आणणं शक्य होईल.
  • चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल सध्या पृथ्वीची प्रदक्षिणा घालत आहे. २२ नोव्हेंबर रोजी त्याने १.५४ लाख किलोमीटर अंतर पार केलं. प्रोपल्शन मॉड्यूलच्या उर्वरित प्रवासास १३ दिवस लागू शकतात. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. आता या मॉड्यूलचा पृथ्वीपर्यंतचा प्रवास तुलनेने सोपा असेल. या मॉड्यूलसाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं जात आहे. जे सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

 

पाकिस्तानमध्ये २२ वर्षांनी इंग्लंडने नोंदवला विजय; यजमानांवर ७४ धावांनी केली मात :
  • पाकिस्तान आणि इंग्लंड संघातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज रावळपिंडी येथे पार पडला. यासामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर इंग्लंडने २२ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकण्याचा कारनामा केला आहे. इंग्लंडने कसोटी सघांने तसेच बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली अजेय राहण्याची मालिका कायम ठेवली आहे.

  • प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ५७९ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने सात गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लिश संघाला एकूण ३४२ धावांची आघाडी मिळाली आणि संघाने पाकिस्तानसमोर ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पाचव्या दिवशी २६८ धावांवर गारद झाला. त्यामुळे इंग्लंड संघानी ७४ धावांनी विजय मिळवला.

  • पहिल्या डावात इंग्लंडडून चार फलंदाजांनी शतके झळकावली. यामध्ये जॅक क्रोली (१२२), बेन डकेट (१०७), ऑली पोप (१०८) आणि हॅरी ब्रूक (१५३) यांचा समावेश आहे. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ५७९ धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ११४, इमाम-उल-हकने १२१ धावा आणि कर्णधार बाबर आझमने १३६ धावा केल्या. अशाप्रकारे दुसऱ्या डावात इंग्लंड ७८ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला.

मुक्त आणि आणि दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी श्रेणीबद्ध विद्यापीठांनाही पूर्वपरवानगी बंधनकारक :
  • देशभरातील श्रेणीबद्ध स्वायत्तता (ग्रेडेड ऑटॉनॉमी) प्राप्त विद्यापीठांना मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यूजीसीने २०१८ मधील नियमावलीमध्ये दुरुस्ती करून श्रेणीबद्ध विद्यापीठांनी मान्यता घेण्याचा नियम समाविष्ट केला असून, त्याबाबतचे राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

  • उच्च शिक्षणासंदर्भात यूजीसीकडून अलीकडे काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यात आता श्रेणीबद्ध विद्यापीठांच्या मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रमांबाबतही महत्त्वपूर्ण बदलाचीही भर पडली आहे. श्रेणीबद्ध विद्यापीठांनी मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत यूजीसीने २०१८मध्ये नियमावली केली होती. त्या नियमावलीनुसार श्रेणीबद्ध विद्यापीठांना यूजीसीच्या मान्यतेशिवाय मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम थेट सुरू करण्याची मुभा होती.

  • केवळ संबंधित अभ्यासक्रमासाठी आवश्यक बाबींची पूर्तता विद्यापीठांनी करणे आवश्यक होते. आता या नियमात यूजीसीकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. आता श्रेणीबद्ध विद्यापीठांनाही मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यूजीसीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेणीबद्ध स्वायत्ततेअंतर्गत २०१९पासून दूरशिक्षण अभ्यासक्रम थेट सुरू केले आहे.

  • श्रेणीबद्ध विद्यापीठांना मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीच्या खुल्या मान्यतेमुळे यूजीसीकडे काही अभ्यासक्रमांची नोंदणी झालेली नसल्याचा प्रकार घडलेला असू शकतो. त्यामुळे हा बदल यूजीसीकडून करण्यात आल्याची शक्यता आहे. दूरशिक्षण अभ्यासक्रमांच्या नियमनासाठी हा बदल स्वागतार्ह असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी नव्या नियमाबाबत मांडले.

अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची ट्रम्प यांची मागणी :
  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठा गैरप्रकार व फसवणूक झाल्याच्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र, या आरोपांकडे वारंवार दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांच्या या मागणीमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या ‘ट्रुथ’ या एका समाजमाध्यमावर या संदर्भात मजकूर प्रसृत केला आहे.

  • ‘ट्विटर’चे नवे मालक व अब्जाधीश उद्योगपती इयॉन मस्क यांनी तत्कालीन अध्यक्षीय निवडणुकीचे उमेदवार जो बायडेन यांचा पुत्र हंटर बायडेन याच्या अनिर्बंध वर्तणुकीसंदर्भात पूर्वीच्या ‘ट्विटर’ व्यवस्थापनाने गाळलेल्या माहितीसंदर्भातील कंपनीचे अंतर्गत ‘ई मेल’च्या छाननीसाठी एका पत्रकाराची नियुक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही वादग्रस्त मागणी केली. 

  • मस्क, ट्रम्प व त्यांच्या समर्थकांनी वारंवार आरोप केले आहेत की, हंटर बायडेन यांच्याविषयी अडचणीत आणणारी माहिती व आक्षेपार्ह छायाचित्रे दडवून ठेवून ‘ट्विटर’ने डेमॉक्रॅटिक पक्षाच्या विजयाला मदत केली. हंटर बायडेन याची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे व त्याविषयीची माहिती ही ट्रम्प समर्थक प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली होती.

‘जी-२०’च्या सोहळय़ात देशवासींना सहभागी करून घ्या :
  • ‘जी-२०’ देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून सर्व देशवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. भारतीय संस्कृती अवघ्या जगाला दाखवून देण्याची हीच वेळ आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्या. ‘जी-२०’च्या अध्यक्षपदाच्या सोहळय़ात देशवासीयांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात दिला.

  • गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत असताना, भाजपने दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. २०२४ मधील लोकसभा निवडणूक तसेच, २०२३ मधील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित केली आहे. दोन दिवसांच्या चिंतन बैठकीनंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रीय महासचिवांशीही स्वतंत्रपणे चर्चा करू शकतात, असे समजते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय सचिव, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, राज्य प्रभारींनी आपापल्या राज्यांतील संघटनात्मक बांधणीचा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सादर केला.

  • ‘मिशन १४४’वर सखोल चर्चा.. भाजपने ‘मिशन १४४’चा यापूर्वीही आढावा घेतला होता. मात्र या बैठकीत केंद्रीय मंत्रीही विविध लोकसभा मतदारसंघांबाबत भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा अहवाल मांडणार आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले असून केंद्रीय मंत्र्यांकडे या मतदारसंघांची जबाबदारी दिली होती. या बैठकीमध्ये ‘मिशन १४४’वर सखोल चर्चा केली जाणार असल्याचे समजते.

06 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.