चालू घडामोडी आणि दिनविशेष - 08 एप्रिल 2023

Date : 8 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दहावी, बारावीसाठी सत्र परीक्षा? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात शिफारस
  • दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे स्तोम कमी करण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुद्यात करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाच्या मसुद्यात परीक्षांचे नवे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. दहावी आणि बारावी या महत्वाच्या टप्प्यांवरील मूल्यमापन हे फक्त वार्षिक परीक्षेच्या आधारे न करता सत्र पद्धत लागू करावी, तसेच बारावीच्या अंतिम निकालात अकरावीचे गुण विचारात घेण्यात यावेत, अशी शिफारस आराखडय़ात करण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाचा अंतरिम मसुदा गुरुवारी जाहीर केला. त्यामध्ये अभ्यासक्रमांतील बदलांबरोबरच अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धतीतील बदलांचाही समावेश करण्यात आला आहे. दहावी म्हणजे माध्यमिक शालान्त परीक्षा आणि बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा या दोन टप्प्यांवर पुढील प्रवेश, विद्याशाखेची निवड अशा अनेक बाबी अवलंबून आहेत. त्यामुळे या परीक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे.
  • सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) विविध राज्य मंडळांमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा वर्षांअखेरीस घेण्यात येते आणि त्या एकाच परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीनुसार अंतिम निकाल जाहीर करण्यात येतो.
  • नव्या शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखडय़ात या परीक्षा पद्धतीत बदल सुचवण्यात आला आहे. नववी ते बारावी असा एकत्रित शैक्षणिक टप्पा विचारात घेण्यात येणार आहे.
कमी खर्चात घ्या अयोध्या आणि वैष्णोदेवीचे दर्शन! रेल्वेने दिली सुवर्णसंधी, फक्त ‘एवढे’ भाडे भरा
  • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC (IRCTC) भारतातील विविध राज्ये आणि धार्मिक स्थळांसाठी अनेक प्रकारचे टूर पॅकेज घेऊन येते. तुम्हाला अयोध्या आणि वैष्णोदेवी या दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल तर IRCTC तुम्हाला एक जबरदस्त संधी देत ​आहे. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही दोन्ही ठिकाणी अतिशय कमी खर्चात प्रवास करू शकता.

११ दिवसांचे हे विशेष पॅकेज

  • अयोध्या राम मंदिर ते वैष्णो देवी पॅकेज हे संपूर्ण १० रात्री आणि ११ दिवसांचे पॅकेज आहे. आसाममधील दिब्रुगड येथून त्याची सुरुवात होईल आणि भारत गौरव टुरिस्ट ट्रेन येथून निघेल. यानंतर तुम्ही मारियानी, लुमडिंग, गुवाहाटी, न्यू कूचबिहार, न्यू जलपाईगुडी आणि कटिहार स्थानकांवरून प्रवास करू शकाल. या सर्व स्थानकांवर प्रवाशांना बोर्डिंग/डिबोर्डिंग सुविधा मिळेल.

कुठे मिळेल प्रवासाची संधी

  • या ट्रेन टूरद्वारे तुम्ही अयोध्येतील राम मंदिर आणि हनुमानगडला भेट देऊ शकाल. याशिवाय कटरा येथील श्री माता वैष्णो देवीच्या दर्शनाची संधी मिळेल. याशिवाय तुम्हाला प्रयागराजचा त्रिवेणी संगम आणि अलोपी देवाच्या मंदिराला भेट देण्याची संधी मिळेल. तुम्ही ट्रेनने बनारसच्या काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट देऊ शकाल.

किती असेल शुल्क

  • अयोध्या ते वैष्णो देवी दरम्यान लक्झरी ट्रेन प्रवासाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही २७ मे २०२३ ते ५ जून २०२३ पर्यंत प्रवास करू शकता. या प्रवासाची एकूण दोन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिले इकोनॉमी आणि दुसरे स्टँडर्ड. इकोनॉमीचे भाडे प्रति व्यक्ती २०,८५० रुपये आहे. त्याच वेळी, स्टँडर्डसाठी ३१,१३५ रुपये शुल्क भरावे लागेल. या ट्रेनमध्ये बुक करण्यासाठी, तुम्हाला IRCTC वेबसाइट http://www.irctc.co.in/nget ला भेट द्यावी लागेल.
पट्टेरी वाघांच्या संख्येत वाढ;  देशात ३८००, तर महाराष्ट्रात ३७५ वाघांचा अधिवास
  • भारतामध्ये ठिकठिकाणी ३८०० पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेने अलिकडेच केलेल्या वाघ्रगणनेत आढळले असून मागील वर्षी त्यांची संख्या सुमारे ३७०० इतकी होती. कर्नाटक आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पट्टेरी वाघ आढळल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
  • ‘प्रोजेक्ट टायगर काउंट’ या मोहिमेला ५० वर्ष झाली असून या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात नवीन उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला लागून असलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात पाच पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. यामध्ये चांदोली अभयारण्य, भैरवगड, रांजणगड आणि दाजीपूर या सह्याद्रीच्या टापूंचा समावेश आहे.
  • तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेच्या अहवालात देशभरात २९५० वाघांचा अधिवास असल्याचे नमुद करण्यात आले होते. देशातील २२ राज्यांमधील जंगलांमध्ये व्याघ्रगणना करण्यात आली होती. सध्या सर्वाधिक ६०० वाघांची कर्नाटकात, तर ५५० वाघांची मध्य प्रदेशात नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात चंद्रपूरसह, बोर, नवे गाव, मेळघाट, नागझिरा, पेंच, सह्याद्री वाघ प्रकल्प, तोडोबा येथे ३७५ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतात आफ्रिकन चित्ते आणण्यात आले आहेत.
  • या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. मात्र यापैकी काही चित्ते संरक्षित जंगलातून बाहेर लोकवस्तीजवळ गेल्याने निदर्शनास आले होते. त्यामुळे नामिबीयातून आणलेल्या चित्त्यांच्या संरक्षणासाठी नवी मोहीम राबवली जाणार आहे. बाहेर गेलेला एक चित्ता पुन्हा कुनो राष्ट्रीय उद्यानातील मुक्तसंचार क्षेत्रात सोडण्यात येणार आहे.
अदाणींपेक्षा भारतासमोर ‘हे’ तीन सर्वात महत्त्वाचे मुद्दे : शरद पवार
  • अदाणी प्रकरणावर शरद पवारांनी घेतलेली भूमिका चर्चेत आहे. अशात अदाणी प्रकरणात संसदीय समिती नेमणं हे काही योग्य नाही. कारण संसदीय समिती निम्म्यापेक्षा जास्त लोक हे सत्ताधारी पक्षाचे असतात. उदाहरणार्थ २१ लोकांची समिती तयार करण्यात आली तर त्यात १५ लोक सत्ताधारी पक्षाचे असतात. असं असताना सत्य कसं बाहेर येईल असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे. तसंच देशात अदाणी यांच्या प्रश्नापेक्षा तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

  • मला असं वाटतं की आपल्या देशासमोर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. उदाहरणार्थ बेरोजगारी, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या. हे तीन प्रश्न देशासमोरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. अदाणींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं गेलं असं वाटतं आहे. हिंडेनबर्ग हे नावही मी कधी ऐकलेलं नाही. अशात अदाणी यांच्या प्रश्नांपेक्षा महत्त्वाचे मुद्दे देशात आहेत. ते सोडवण्यावर विरोधकांनी भर दिला पाहिजे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
  • सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे असं वाटतं आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार म्हणाले की येऊ देत निर्णय तसा आम्ही वाट बघतोय. तसा निर्णय आला तर योग्य भूमिका घेऊ. एवढंच नाही तर वीर सावरकर यांच्या मुद्द्यावर आमची मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं. एखाद्या प्रश्नावरून मतभेद असू शकतात त्यावर चर्चा करता येते त्यातून प्रश्न मार्गी लागतात असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
  • एक काळ असा होता की त्या काळात सत्ताधारी पक्षावर टीका करायची असेल तर आम्ही टाटा बिर्लांचं नाव घेत असू. पण आता ही नावं घेतली जात नाहीत. कारण आता देशालाही समजलं आहे की टाटा आणि बिर्लांचं देशासाठी काय योगदान आहे. त्याचप्रमाणे अंबानी आणि अदाणी यांचंही देशासाठी योगदान आहे हे विसरता येणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - हर्षद, बाला रफीक, पृथ्वीराजचे विजय :
  • महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटात बाला रफीक शेख, माऊली जमदाडे, सिकंदर शेख यांनी नेत्रदीपक विजय मिळवून तिसरी फेरी गाठली. गादी गटात हर्षवर्धन सदगीर, साताऱ्याचा दिग्विजय जाधव, कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील, कौतुक डाफळे यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

  • सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने रत्नागिरीच्या संतोष दोरवडला चीतपट करीत सर्वानाच धक्का दिला. मुंबई शहरचा विशाल बनकर आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढत रंगतदार ठरली. दुसऱ्या फेरीत बनकरने एकेरी पटाचे पकड करीत गुणफलक हलता ठेवून बलदंड ताकदीच्या मोहोळचे तगडे आव्हान परतून लावले.

  • महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखने लातूरच्या भारत कराडला सुरुवातीपासून वरचढ ठरू दिले नाही. एकेरी पट आणि दुहेरी पट यासारख्या अस्त्रांचा वापर करून तांत्रिक गुणांवर भारतला पराभूत केले. 

  • गादी गटात सुरुवातीलाच महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता आदर्श गुंड यांच्या लढतीत आदर्शने केलेले सर्व हल्ले धुडकावून लावत सदगीरने ही प्रतिष्ठेची लढत एकतर्फी जिंकली. पहिल्या फेरीत पिछाडीवर असताना आदर्शने दुसऱ्या फेरीत केलेला प्रतिकार हर्षवर्धनच्या आक्रमणापुढे फिका पडला. स्पर्धेतील ही प्रतिष्ठेची लढत हर्षवर्धनने ८-२ गुणांनी जिंकून स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले. पहिल्या फेरीतील विजयानंतर वाशिमचे प्रतिनिधित्व करणारा नैनेश निकमला दुसऱ्या फेरीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने पराभवाची धूळ चारली.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया निलंबित :
  • रशियन सैनिकांनी युक्रेनमध्ये मानवाधिकाराचे भीषण उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने गुरुवारी रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याचा ठराव पारित केला. रशियाचे हे कृत्य युद्धगुन्ह्यांसारखेच असल्याचे अमेरिका व युक्रेनने म्हटले आहे.

  • संयुक्त राष्ट्र आमसभेत या ठरावाच्या बाजूने ९३, तर विरोधात २४ मते पडली आणि ५८ सदस्य तटस्थ राहिले. युक्रेनमध्ये तत्काळ युद्धबंदी केली जावी, रशियन फौजा माघारी घेतल्या जाव्यात आणि नागरिकांचे संरक्षण व्हावे, अशी मागणी करणाऱ्या दोन ठरावांवर गेल्या महिन्यात झालेल्या मतदानापेक्षा ते बरेच कमी होते. या दोन्ही ठरावांना किमान १४० देशांनी मान्यता दिली होती.

  • २००६ साली स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वापासून वंचित केला जाणारा रशिया हा दुसरा देश आहे. २०११ साली उत्तर आफ्रिकेतील लिबियामध्ये झालेल्या उलथापालथीत त्या देशाचे दीर्घकाळापासूनचे नेते मुअम्मर गडाफी यांना पदच्युत करण्यात आले, त्या वेळी आमसभेने त्या देशाचे सदस्यत्व स्थगित केले होते.

  • रशियाविरुद्धच्या ठरावावरील मतदानात भारत तटस्थ - युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह शहराजवळील शहरांतून परत जाताना रशियन सैनिकांनी नागरिकांची हत्या केल्याच्या आरोपांवरून रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकर परिषदेतून निलंबित करण्याच्या अमेरिकेने मांडलेल्या ठरावावर संयुक्त राष्ट्र आमसभेत भारत गुरुवारी तटस्थ राहिला, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी मतदानानंतर दिली. युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून, भारताने शांतता, संवाद व कूटनीती यांचे समर्थन केले आहे. रक्तपात करून व निष्पाप जिवांची किंमत देऊन कुठलाही तोडगा काढता येत नाही, असे आमचे मत आहे. भारताने शांततेची, तसेच हिंसाचार तत्काळ थांबवण्याची बाजू घेतली आहे, असे तिरुमूर्ती म्हणाले.

जगाच्या तुलनेत भारतात एलपीजीची किंमत सर्वाधिक, नेमकं गणित काय आहे? जाणून घ्या :
  • वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य जनतेच्या खिशाला बसत आहे.

  • देशांतर्गत बाजारपेठेतील चलनांच्या खरेदीनुसार भारतातील एलपीजीची प्रति लिटर किंमत जगात सर्वाधिक आहे. देशातील किंमत ३.५ आंतरराष्ट्रीय डॉलर प्रति लिटर आहे. भारतानंतर तुर्की, फिजी, मोल्दोव्हा आणि युक्रेनमध्ये एलपीजीची सर्वाधिक किंमत आहे. दुसरीकडे, स्वित्झर्लंड, फ्रान्स, कॅनडा आणि यूकेमध्ये एलपीजीची किंमत आंतरराष्ट्रीय डॉलरपेक्षा कमी आहे.

  • पेट्रोलची किंमत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय डॉलरच्या दृष्टीने पेट्रोलच्या किमतीवर नजर टाकली, तर भारतात ती प्रति लिटर ५.२ आंतरराष्ट्रीय डॉलरवर बसते. ही किंमत अमेरिकेत १.२ आंतरराष्ट्रीय डॉलर, जपानमध्ये १.५, जर्मनीमध्ये २.५ आणि स्पेनमध्ये २.७ आंतरराष्ट्रीय डॉलर इतकी आहे. म्हणजेच या देशांमध्ये पेट्रोलचे दर भारताच्या तुलनेत खूपच कमी आहेत.

  • डिझेलची किंमत जगाच्या तुलनेत आठव्या क्रमांकावर आहे. भारतात किंमत ४.६ आंतरराष्ट्रीय डॉलर आहे. जगातील सर्वात महाग डिझेल सुदानमध्ये आहे. तेथे त्याची प्रति लिटर किंमत ७.७ आंतरराष्ट्रीय डॉलर आहे. त्यानंतर अल्बानिया, तुर्की, म्यानमार, जॉर्जिया, भूतान आणि लाओस यांचा क्रमांक लागतो. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेच्या तुलनेत पाश्चात्य देशांमध्ये डिझेल खूपच स्वस्त आहे.

देशात निर्माण होणाऱ्या लष्करी यंत्रणा,शस्त्रांची यादी जाहीर :
  • भारताच्या युद्धसाहित्य उद्योगाला नव्याने प्रेरणा देताना, पाच वर्षांत निर्यातबंदीखाली येणाऱ्या आणि देशातच विकसित केल्या जाणाऱ्या १०१ हून अधिक लष्करी यंत्रणा व शस्त्रांची यादी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जारी केली.

  • या यादीत सेंसर्स, शस्त्रे व दारूगोळा, नौदलाच्या उपयोगाची हेलिकॉप्टर्स, गस्ती वाहने, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि किरणोत्सर्गविरोधी क्षेपणास्त्रे इत्यादी सामग्रीचा समावेश असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी एका कार्यक्रमात ही यादी जारी करताना सांगितले.

  • ही यादी जारी करण्यातून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची जलद गती दिसून येते, असे ते म्हणाले. आर्टिलरी गन्स, कमी पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे व गस्ती वाहने यांचा समावेश असलेली १०१ वस्तूंची पहिली यादी ऑगस्ट २०२० मध्ये जारी करण्यात आली होती.

एअर इंडियाचा दिल्ली-मॉस्को विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय :
  • रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतावरही होऊ लागला आहे. एअर इंडियाने दिल्ली ते मॉस्कोचे विमानसेवा रद्द केली आहे. एअर इंडियाची विमाने आठवड्यातून दोनदा दिल्लीहून मॉस्कोला जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमा संरक्षण न मिळाल्याने एअर इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

  • याशिवाय, ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट काढलेलं आहे त्यांना पूर्ण परतावा दिला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे रशियाकडे उड्डाण करणाऱ्या विमानांना जास्त धोका आहे, त्यामुळे विमानांना विमा संरक्षण मिळत नाही.

  • एअर इंडियाने तिकीट विक्री केली बंद - रशियन दूतावासाने सांगितले की, प्रिय नागरिकांनो, भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने दिल्ली-मॉस्को-दिल्ली मार्गावरील तिकिटांची विक्री बंद केली आहे, याकडे आम्ही आपले लक्ष वेधतो. या विमान कंपनीची रशियाला उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता सध्या अनिश्चित आहे. एअर इंडियाच्या कार्यालयानुसार प्रवाशांना रद्द केलेल्या विमानांसाठीचा पूर्ण परतावा मिळण्याचा हक्क आहे.

  • तथापि, रशियन दूतावासाने सांगितले की ताश्कंद, इस्तंबूल, दुबई, अबू धाबी, दोहा आणि इतर प मार्गांद्वारे दिल्ली ते मॉस्कोपर्यंत उड्डाण करणे अद्याप शक्य आहे.

०८ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.