चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 मार्च 2022
रशिया-युक्रेन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर रशियाबाहेर हलवण्यात आलेल्या ४४व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान भारताला लाभणार आहे. यंदा ही प्रतिष्ठेची स्पर्धा जुलै-ऑगस्ट या कालावधीत चेन्नईमध्ये रंगणार असल्याची घोषणा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली.
‘‘भारतातील बुद्धिबळाची राजधानी (चेन्नई) यंदा ४४व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असल्याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. तमिळनाडूसाठी ही अभिमानाची बाब आहे. जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंचे चेन्नईत स्वागत,’’ असे स्टॅलिन यांनी ‘ट्वीट’ केले. त्यांच्या या विधानाला अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघानेही (एआयसीएफ) दुजोरा दिला.
‘एआयसीएफ’ने ऑलिम्पियाड स्पर्धेच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ ‘फिडे’ला १० मिलियन अमेरिकन डॉलर (साधारण ७० कोटी रुपये) देऊ करण्याची तयारी दर्शवली. ऑलिम्पियाड या दर दोन वर्षांनी होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत जवळपास १९० देशांचे संघ सहभागी होतात. यंदा ही स्पर्धा २६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात येणार होती. मात्र, युक्रेनवरील हल्ल्यांनंतर ऑलिम्पियाडसह सर्वच बुद्धिबळ स्पर्धा रशियाबाहेर खेळवण्याचा ‘फिडे’ने निर्णय घेतला.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी चेन्नईसह दिल्ली आणि गुजरात या शहरांची नावेही चर्चेत होती. मात्र मार्चच्या सुरुवातीला ‘एआयसीएफ’चे सरचिटणीस भरत सिंह चौहान यांनी भारताचे प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन यांच्यासोबत स्टॅलिन यांची भेट घेतली. त्यांच्या पाठिंब्यानंतर ‘एआयसीएफ’ने यजमानपदासाठी चेन्नईचे नाव निश्चित केले. ऑलिम्पियाड ही भारतात होणारी दुसरी सर्वात मोठी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ठरेल. याआधी २०१३ मध्ये विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन या तारांकित खेळाडूंमधील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत भारतामध्ये झाली होती.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंडिया सीमेंट्सने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल संभाषणात तो ७ नंबरची जर्सी का घालतो, याचे रहस्य उघड केले. चेन्नई सुपर किंग्जची मालकी इंडिया सिमेंट्सची आहे. धोनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच फ्रँचायझी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर T20 असो, खेळाच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये ७ नंबरची जर्सी परिधान करत आला आहे.
क्रिकेटमध्ये सात नंबरची जर्सी घालणारं कोणी नव्हतं. त्यामुळे सात नंबरची जर्सी म्हटलं की डोळ्यासमोर एकच नाव समोर येतं, ते म्हणजे महेंद्र सिंह धोनी. याआधी ७ नंबरची जर्सी फुटबॉलमध्ये खूप महत्त्वाची असायची. कारण ही जर्सी डेव्हिड बेकहॅम, राऊल आणि क्रिस्टियानो रोनाल्डो सारख्या दिग्गज खेळाडूंनी परिधान केली होती.
व्हर्च्युअल संभाषणादरम्यान धोनी म्हणाला, ‘बर्याच लोकांना सुरुवातीला वाटले की सात हा माझ्यासाठी लकी नंबर आहे. मात्र, त्यामागे एक अतिशय साधे कारण होते. माझा जन्म जुलै महिन्याच्या सातव्या तारखेला झाला. सातव्या महिन्याचा सातवा दिवस. त्यामुळेच कोणता नंबर चांगला आहे, याकडे जाण्याऐवजी मी माझी जन्मतारीख जर्सीचा नंबर म्हणून निवडली.’
एमएस धोनी म्हणाला, ‘मग लोक मला याबद्दल विचारत राहिले. म्हणून, मी त्या उत्तरात भर घालत राहिलो. ७/७ आणि नंतर आणि जन्मवर्ष ८१ आहे. आठ मधून १ वजा केल्यास ७ येते. हा एक नॅचरल नंबर होता. लोक मला जे म्हणत होते ते मी ऐकू लागलो. जेव्हा लोक मला विचारतात तेव्हा मी त्यानुसार उत्तर देतो. सात ही नैसर्गिक संख्या आहे. ती तुमच्या विरोधात जात नाही. म्हणून मी माझ्या उत्तरात ते देखील जोडले. मी याबद्दल खूप अंधश्रद्धाळू नाही, परंतु हा माझ्या मनाच्या जवळचा नंबर आहे. म्हणून, मी माझ्याजवळ ठेवतो,’ असं धोनीने सांगितलं.
करोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने अखेर हे निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली होती. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही नियमावली पाठवत या काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला होते. दरम्यान राज्य सरकारने अनेक निर्बंध मागे घेतले असून त्यासंबंधीची नियमावली नव्याने जाहीर करण्यात आले आहेत.
गृह विभागाने करोनाच्या नियमांचं पालन करावं तसंच कमीत कमी गर्दी करुन होळी सण साजरा करावा असं आवाहन केलं आहे. रंग लावणं टाळावं असंही सांगण्यात आलं आहे. शिमगा साजरा करत असताना पालखीची मिरवणूक घरोघरी न नेता मंदिरात नेली जावी अशी सूचना देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं बंधन काढून टाकण्यात आलं आहे. नियमात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचं स्पष्टीकरणही गृह विभागाने दिलं आहे.
भाजपा आमदार राम कदम यांनी या निर्बंधांवरुन संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्र सरकारचा हिंदू सणांना इतका टोकाचा विरोध का? अशी विचारणा त्यांनी केली होती. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच असा इशाराही यावेळी त्यांनी दिली होता. दरम्यान सरकारने निर्बंध मागे घेतल्यानंतर त्यांनी स्वागत केलं असून इतक्या उशीरा शहाणपण सुचलं असा टोलाही लगावला आहे.
पंजाबमध्ये २३ मार्चपासून भ्रष्टाचारविरोधात एक हेल्पलाईन सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी केली. या हेल्पलाईनवर लाच मागणाऱ्या किंवा गैरव्यवहार करणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांची चित्रफीत अपलोड करता येईल.
राज्यात भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यात येईल, असे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मान यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे.
केजरीवाल म्हणाले, आप सरकारने देशाच्या राजघानीला भ्रष्टाचारमुक्त केले आहे. आता मान आणि त्यांचे मंत्री पंजाबमध्ये प्रामाणिक सरकार देतील, असा विश्वास आहे.
पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत भगवद् गीतेचे धडे शिकायला मिळणार आहेत. गुजरात सरकारने यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे बदल करण्यात आल्याची माहिती जितू वाघानी यांनी यावेळी दिली आहे. ६वी ते १२वीपर्यंतच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्यात आल्याचं ते म्हणाले.
“भारतीय संस्कृती आणि ज्ञान व्यवस्थेचा शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करण्यात येणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हा बदल होईल. भगवद् गीतेतील मूल्य आणि तत्व प्राथमिक स्तरावर इयत्ता ६वी ते १२वीच्या वर्गांमध्ये शिकवले जातील”, अशी माहिती जितू वाघानी यांनी सभागृहात दिली.
६वी ते ८वीच्या अभ्यासक्रमांमध्ये भगवद् गीतेतील पाठ सर्वांगी शिक्षण पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक भाषेमधून गोष्टीच्या स्वरूपात भगवद् गीता समाविष्ट करण्यात येईल, असं देखील वाघानी म्हणाले.
यासोबतच, शाळांमध्ये प्रार्थना, श्लोक पठन, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धांच्या माध्यमातून देखील भगवद् गीतेचं शिक्षण दिलं जाईल, असं गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
असनी हे २०२२ मधलं पहिलं चक्रीवादळ चारच दिवसात अंदमान निकोबारला धडकण्याची शक्यता आहे. अंदमानला धडकल्यानंतर ते बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने सरकेल. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र २१ मार्चपर्यंत चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे.
दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावरील कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-ईशान्य दिशेने सरकले आणि आज सकाळी ८.३० वाजता दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागरावर मध्यभागी आले. ते पूर्व-ईशान्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारपर्यंत ते बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिणी भागात पसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते अंदमान आणि निकोबार बेटांच्या बाजूने आणि त्याच्या बाहेर जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.
२० मार्चच्या सकाळपर्यंत हे वादळ तीव्र होईल आणि २१ मार्च रोजी चक्री वादळात रूपांतरित होईल.त्यानंतर, ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची आणि २२ मार्चच्या सकाळच्या सुमारास बांगलादेश-उत्तर म्यानमार किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.
सध्या समुद्राची स्थिती मध्यम ते उग्र आहे. मात्र १८ मार्चपासून ती अत्यंत उग्र होण्याची शक्यता आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.