चालू घडामोडी आणि दिनविशेष - 09 ऑगस्ट 2023

Date : 9 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सलग तिसऱ्या सामन्यात तिलक वर्माची शानदार खेळी, गौतम गंभीरचा मोडला ‘हा’ विक्रम
  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना टीम इंडियाने ७ गडी राखून जिंकला. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सुरुवातीपासून वेस्ट इंडिज मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. तिसऱ्या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादवने ८३ तर तिलक वर्माने ४९ धावांची नाबाद खेळी केली. तिलक वर्मा या मालिकेत शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या ४९ धावांच्या खेळीच्या जोरावर एक मोठा पराक्रम केला आहे.
  • तिलक वर्माने तिसऱ्या टी-२० सामन्यात ३७ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांमध्ये ३९, ५१ आणि ४९* धावा केल्या आहेत. यानंतर, तो भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या तीन डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गौतम गंभीरला मागे टाकले आहे. त्याचबरोबर संयुक्तपणे सूर्यकुमार यादवची बरोबरी करत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. दीपक हुडा १७२ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
  • सूर्यकुमार यादवनंतर तिलक वर्मा हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. ज्याने त्याच्या पहिल्या तीन डावातील प्रत्येक डावात 30 प्लस धावा केल्या आहेत. सूर्यानेही कारकिर्दीतील पहिल्या तीन डावात १३९ धावा केल्या आहेत.

पहिल्या तीन डावात भारतासाठी सर्वाधिक T20I धावा करणारे फलंदाज -

  • १७२ धावा - दीपक हुडा
  • १३९ धावा - सूर्यकुमार यादव/तिलक वर्मा
  • १०९ धावा - गौतम गंभीर
वनविभाग पदभरतीलाही अखेर भ्रष्टाचाराचे ग्रहण‌? १९ लाखांचा दर, मोबाईल, बँकेचे चेक आणि….
  • राज्यात सुरू असलेल्या पदभरतीमध्ये गैरप्रकाराच्या तक्रारी रोज समोर येत आहेत. नोकरी लावण्याचे अमिष दाखवणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी एपीआय कार्नरजवळ सापळा रचून करिअर अकादमीच्या तीन संचालकांसह चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून फोर्ड कारसह सहा मोबाईल, विविध बँकेचे चेक आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.
  • राज्यभरात सुरू असलेल्या वन विभागाच्या परीक्षेत मोबाईलवरुन आनलाईन उत्तरे देणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी पर्दापाश केला होता. या घटनेनंतर सातारा आणि जिन्सी पोलिसांनी देखील वनरक्षक पदाच्या परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्यांना अटक केली होती. ही घटना ताजी असताना सांगली-सातारा भागातील तीन ॲकडमी संचालक हे दलालांच्या मदतीने शहरात विद्यार्थी शोधत असल्याची माहिती मिळाली.
  • यावरुन पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी एपीआय कार्नरजवळ सापळा रचून कारमध्ये आलेल्या सातारा खटाव मधील संत बाळुमामा अकादमी संचालक आण्णाजी धनाजी काकडे, मानसी अकादमीचे अनिल भरत कांबळे व नवस्वराज्य अकादमीचे संदीप भुतेकर यांच्यासह अकोला, आकोट मधील दलाल अमोल धनराज निचड या चार जणांना अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे देविदास नामदेव काळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा
  • Talathi Recruitment Exam भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.
  • राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

परीक्षा टप्पे कसे?

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
  • २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.
महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : कोलंबियाची घोडदौड कायम; प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत
  • कॅटलिन उस्मेच्या निर्णायक गोलच्या जोरावर कोलंबियाने मंगळवारी जमैकाचा १-० असा पराभव करून महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत कोलंबियासमोर युरोपीय विजेत्या आणि जेतेपदासाठी प्रमुख दावेदार इंग्लंडचे आव्हान असेल.
  • कोलंबियाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत कोलंबियाने दक्षिण कोरिया आणि जर्मनी या संघांना नमवण्याची किमया साधली होती. दुसरीकडे जमैकाने फ्रान्स आणि ब्राझील यांसारखे संघ असलेल्या गटातून आगेकूच केली होती. त्यामुळे जमैकाला नमवण्यासाठी कोलंबियाला सर्वोत्तम खेळ करावा लागणार होता आणि त्यात ते यशस्वी ठरले.
  • या सामन्यात दोन्ही संघांनी ५०-५० टक्के वेळ चेंडू आपल्याकडे राखला. मात्र, याचा अधिक चांगला वापर कोलंबियाने केला. त्यांनी गोलच्या दिशेने ११ फटके मारले. युवा खेळाडू लिंडा कैसेडोला गोलच्या संधी मिळाल्या, पण तिला चेंडू गोलजाळय़ात मारण्यात अपयश आले. मात्र, ५२व्या मिनिटाला अ‍ॅना गुझमानच्या पासवर उस्मेने गोल नोंदवत कोलंबियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यंदाच्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला प्रथमच जमैकाविरुद्ध गोल करण्यात यश आले. यानंतर जमैकाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कोलंबियाचा भक्कम बचाव भेदता आला नाही. त्यामुळे जमैकाचा पराभव झाला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.

फ्रान्सची मोरोक्कोवर मात

  • फ्रान्सने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठला आहे. मंगळवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोवर ४-० अशी मात केली. विश्वचषकातील बाद फेरीत फ्रान्स महिला संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला. फ्रान्सकडून ले सोमेरने (२३ व ७०व्या मिनिटाला) दोन, तर कादिदिआतू दियानी (१५व्या मि.) आणि केन्झा डाली (२०व्या मि.) यांनी एकेक गोल केला.
यंदाचा जुलै आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना! युरोपीयन हवामान निरीक्षण संस्थेची माहिती
  • यंदा जुलैने मागील सर्व उन्हाळय़ातील उष्णतेच्या उच्चांकाचे विक्रम मोडले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरला आहे, असे युरोपीयन हवामान निरीक्षण संस्थेने जाहीर केले. युरोपीयन महासंघाच्या ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सव्‍‌र्हिस’ अवकाश मोहीम प्रकल्पाच्या शाखेने मंगळवारी जाहीर केले की जुलैत सरासरी जागतिक तापमान १६.९५ अंश (६२.५१ अंश फॅरेनहाइट) सेल्सिअस नोंदवले गेले. जे २०१९ मध्ये नोंदवलेल्या सर्वोच्च सरासरी तापमानापेक्षा एक तृतीयांश (०.३३) अंश सेल्सियसने जास्त (अंश फारेनहाइटचा सहा दशांश) आहे.
  • शास्त्रज्ञांनी सांगितले की जागतिक तापमानाचा विक्रम सर्वसामान्यपणे एका अंशाच्या १०० व्या ते दहाव्या भागाच्या फरकाने मोडले जातात, या तुलनेत हा फरक असामान्य आहे. ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सव्‍‌र्हिस’च्या उपसंचालिक समंथा बर्गेस यांनी सांगितले की, उष्णतेच्या या विक्रमामुळे मानवजीवन आणि ग्रह दोघांवरही गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे वारंवार हवामानात टोकाचे प्रतिकूल बदल घडतात.
  • अमेरिकेच्या नैऋत्य भागात आणि मेक्सिकोत उष्णतेची प्राणघातक लाट पसरली आहे. कोळसा, तेल आणि नैसर्गिक जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे वातावरणात हे टोकाचे बदल झाल्याचा ठपका शास्त्रज्ञांनी ठेवला आहे. २ जुलैपासून दिवसाचे कमाल तापमान पूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात होते. तापमानातील फरक इतका मोठा होता की ‘कोपर्निकस’ आणि जागतिक हवामान संघटनेने जुलै महिन्याच्या अखेरीसच घोषित केले होते, की हा कदाचित आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना असू शकतो. त्याला आता अधिकृतपणे पुष्टी मिळाली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जुलै २०२३ मध्ये, औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तुलनेत सरासरी १.५ डिग्री सेल्सियस अधिक तापमानाची नोंद झाली.
  • ‘कोपर्निकस’ संस्थेने सांगितले, की जुलै महिना खूप उष्ण होता आणि जुलै २०२३ मध्ये जुलै १९९१ ते जुलै २०२० पर्यंतच्या सरासरी तापमानापेक्षा ०.७ अंश जास्त तापमान नोंदवले गेले.

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची शानदार सांगता; ६१ पदकांसह भारत चौथ्या स्थानी :
  • गेल्या ११ दिवसांपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा खेळवली जात होती. २८ जुलैला सुरू झालेल्या या स्पर्धेची आज (८ ऑगस्ट) सांगता झाली. यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. यावेळी संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये पहिले पदक मिळवले होते. तर, मीराबाई चानूने पहिले सुवर्णपदक पटकावले होते. हॉकीमधील रौप्यपदकाने भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रवास संपला असून खेळाडू मायदेशी परतत आहेत.

  • अलेक्झांडर स्टेडियमवर या स्पर्धेचा भव्य समारोप सोहळा पार पडला. यावेळी सर्व सहभागी देशांतील चमूने हजेरी लावली. समारोप समारंभात टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल आणि बॉक्सर निखत झरीन हे भारताचे ध्वजवाहक होते. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग यांनी भारतीय चमूचे नेतृत्व केले होते.

  • समारोप सोहळ्यात अपाचे इंडियन, बेव्हर्ली नाइट, डेक्सिस, रॅम्बर्ट गोल्डी, जेकब बँक्स, जायके, जोर्जा स्मिथ लॉरा मुव्हुला, अॅश, महालिया, म्युझिकल युथ नीलम गिल, पंजाबी मॅक, रझा हुसेन, तालुलाह, इव्ह द सिलेक्टर यांनी आपली कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

  • २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकली असली तरी मागील स्पर्धेपेक्षा ही पदक संख्या कमी आहे. २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६४ पदकांची कमाई केली होती. त्यामध्ये २६ सुवर्ण, १९ रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश होता. यावर्षी कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग आणि बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी अद्भुत कामगिरी केली. अॅथलेटिक्स आणि लॉन बॉलमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगला खेळ केला. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या महिला टी २० क्रिकेटमध्येही भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. याशिवाय पॅरा (दिव्यांग) खेळाडूंनीही अनेक पदके जिंकली. याच कारणामुळे नेमबाजांची अनुपस्थिती असतानाही भारताला ६१ पदके मिळवता आली.

मंत्रिमंडळाचा आज विस्तार ; पहिल्या टप्प्यात भाजप-शिंदे गटातील २० ते २२ जणांना संधी :
  • राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार अखेर आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता राजभवनावर होत आह़े  पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आह़े  त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, बच्चू कडू आदींना संधी मिळण्याची शक्यता आहे.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ३० जून रोजी झाला होता. तेव्हापासून गेले सव्वा-दीड महिना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. शिंदे सरकारची वैधता, अध्यक्षांची निवड आणि आमदार अपात्रतेच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिका प्रलंबित आहेत. दुसरीकडे, खरी शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे प्रलंबित आहे. त्यामुळे हा विस्तार रखडल्याची चर्चा सुरू होती.

  • मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवार-रविवारी दिल्ली दौऱ्यावर असताना भाजप पक्षेश्रेष्ठींशी याबाबत सविस्तर चर्चा केली. न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यास काही कालावधी लागणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव आणि विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लक्षात घेता विस्तार फार काळ लांबणीवर टाकणे उचित नव्हते. त्यामुळे छोटेखानी विस्तार करण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मंत्र्यांची यादी निश्चित केली असून, या नेत्यांना दूरध्वनीवरुन निरोप देण्याचे काम दिवसभर सुरू होते. भाजपकडून अतुल सावे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश करण्याबाबत विचारविनिमय सुरू होता. मुंबई-ठाण्यातील नेत्यांना सोमवारी रात्री उशिरा निरोप देण्यात येत होते. अ‍ॅड. आशिष शेलार यांना पुढील काळात भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार की त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

श्रीलंकेने जहाजास विरोध केल्याने चीन भारतावर संतप्त :
  • उच्च तंत्रज्ञानयुक्त संशोधन कार्य करणारे चीनचे जहाज ‘युआन वँग ५’ची हंबन्टोटा बंदरातील संभाव्य भेट स्थगित करावी, अशी विनंती श्रीलंकेने चीनला केली आहे. भारताच्या दबावामुळे श्रीलंकेने असे केल्याने चीन संतप्त झाला आहे. या प्रकरणी सुरक्षाविषयक चिंता व्यक्त करून भारताने श्रीलंकेवर विनाकारण आणलेला दबाव निरर्थक असल्याची टीका चीनने सोमवारी केली आहे.

  • रविवारी या प्रकरणी चीनच्या दूतावासाने श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेऊन चर्चेची मागणी केली होती. हे जहाज श्रीलंकेच्या हंबन्टोटा बंदरात ११ ते १७ ऑगस्टदरम्यान येणार होते.

  • यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी बीजिंग येथे प्रसारमाध्यमांना सांगितले, की चीनने यासंदर्भातील सर्व घडामोडींची दखल घेतली आहे. चीन आणि श्रीलंकेने स्वतंत्रपणे परस्परहिताच्या जपणुकीसाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तिसऱ्या देशाच्या हितसंबंधास हानी किंवा बाधा पोहोचतच नाही. त्यामुळे या जहाजासंबंधी सुरक्षेचे प्रश्न निर्माण करून, श्रीलंकेवर दबाव आणणे निरर्थकपणाची कृती आहे.

  • श्रीलंका हे सार्वभौम राष्ट्र आहे. त्याच्या विकासासाठी आणि हितसंबंधांसाठी दुसऱ्या राष्ट्राशी संबध वाढवण्याचा, दृढ करण्याचा श्रीलंकेस अधिकार आहे. यासंदर्भात या जहाजाद्वारे चीनच्या संशोधनात्मक मोहिमेकडे त्याच पद्धतीने पाहण्यात यावे. त्याचा इतर कोणत्याही गोष्टींशी संबंध जोडून चीन आणि श्रीलंकेतील सामान्य संबंधांमध्ये अडथळे आणू नयेत. हिंदू महासागरातील श्रीलंका हे दळणवळणाचे मोक्याचे स्थान आहे. येथे संशोधनकार्य करणारी अनेक जहाजे इंधनासाठी थांबत असतात. चीनचे जहाजही त्यासाठीच येथे थांबणार होते. चीनतर्फे नेहमीच वैज्ञानिक शोधकार्यासाठी खोल समुद्रात विविध मोहिमा हाती घेतल्या जातात. असे करताना चीनने किनारपट्टीवरील देशांच्या सागरी हद्दीचा व अधिकारक्षेत्राचा नेहमीच पूर्ण आदर केला आहे, असा दावा त्यांनी केला.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये भागीदारीचा सरकारचा निर्णय :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सुमारे एक लाख कोटींहून अधिक खर्चाच्या मुंबई- अहमदाबाद अति जलद रेल्वे प्रकल्पात (बुलेट ट्रेन) २५ टक्के भागीदार होण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळ लि. या विशेष कंपनीमध्ये (एसपीव्ही) सरकार पाच हजार कोटींची गुंतवणूक करम्णार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात सहा कोटींचा निधी गुंतविण्यात आला आहे.  

  • सुमारे ५०८ किमी लांबीचा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई- अहमदाबाद मार्गावर राबविण्यात येत आहे. यातील १५५ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्रात असून वांद्रे-कुर्ला संकुलातून ही बुलेट ट्रेन धावणार आहे. एक लाख कोटीहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळ लि. ही विशेष उपयोजिता वाहन कंपनी स्थापन करण्यात आली असून त्यात केंद्र सरकार ५० टक्के म्हणजेच १० हजार कोटींची गंतवणूक करणार आहे, तर महाराष्ट्र आणि गुजराज राज्य सरकार अनुक्रमे २५ टक्के याप्रमाणे पाच- पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. तर जपान इंटरनॅशनल को-ऑप.एजन्सी (जायका) ही वित्तीय संस्था या प्रकल्पासाठी ८८ हजार कोटींचे कर्ज देणार आहे.  

  • सन २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करम्ण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असली तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतल्याने गेली दोन- अडीच वर्षे राज्यात हा प्रकल्प रखडला होता.

नायडूंचे ‘वन-लाइनर’ हजरजबाबीचा नमुना! ; राज्यसभेच्या सभापतींना निरोप देताना पंतप्रधान मोदींचे कौतुकोद्गार :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यंकय्या नायडू यांच्या ‘वन-लाइनर’चे कौतुक केले. नायडूंचे ‘वन-लाइनर’ म्हणजे हजरजबाबीपणाचा उत्तम नमुना होते. हे ‘वन-लाइनर’ समोरच्या व्यक्तीला उत्स्फूर्तपणे जिंकून घेण्याचे कसब म्हटले पाहिजे, असेही मोदी म्हणाले. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना सोमवारी वरिष्ठ सभागृहातील सदस्यांनी निरोप दिला. नायडूंचा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ बुधवारी संपुष्टात येत आहे.

  • नायडूंच्या ‘वन-लाइनर’ने सभागृहात खासदारांना अनेकदा गप्प केले आहे. त्यामुळे मोदींनी कटाक्षाने त्याचा उल्लेख केला. ‘नायडूंची प्रशंसनीय गोष्ट म्हणजे त्यांची भारतीय भाषांबद्दल असलेली आवड. सभापती म्हणून त्यांनी खासदारांना मातृभाषेत बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले’, असे मोदी म्हणाले.

  • नायडूंनी राज्यसभेच्या कामकाजाचा दर्जा उंचावला, कामकाजातील ७० टक्के वाढ झाली. नायडूंनी नेहमीच सभागृहामध्ये संवादाला प्रोत्साहन दिले. कामकाजाचा दर्जा टिकून राहावा यांसाठी मानके निश्चित केली. त्यांचे हे योगदान उत्तराधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन करत राहील, असे मोदी म्हणाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक कामकाजात सातत्याने व्यत्यय आणत असल्याचा संदर्भ देत मोदी यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. कामकाजात व्यत्यय आणणे हा सभागृहाचा अवमान असल्याचे नायडूंचे मत आहे. सरकारने प्रस्ताव आणावेत, त्याला विरोधकांनी विरोध करावा आणि सभागृहाने तो मोडून काढावा, या तत्त्वावर नायडूंनी काम केले, असे मोदी म्हणाले.

  • ‘‘संसदेचे वरिष्ठ सभागृह या नात्याने आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे.  भारत वेगाने पुढे जात आहे. मी राज्यसभेतील खासदारांना आवाहन करतो की, या सभागृहाची प्रतिमा आणि सन्मान राखला जावा यासाठी सभ्यता, प्रतिष्ठा आणि शिष्टाचार पाळावा’’, अशी राज्यसभेचे सभापती म्हणून व्यंकय्या नायडू यांनी अखेरची टिप्पणी केली. 

०९ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.