चालू घडामोडी आणि दिनविशेष - 06 सप्टेंबर 2023

Date : 6 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आपल्या देशाला ‘भारत’ नाव कशावरून पडले, त्याचे ‘इंडिया’ कसे झाले? वाचा
  • केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मोदी सरकार ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरूनच आता आपल्या देशाला भारत नाव कसे पडले. त्याचे ‘इंडिया’ नाव कसे झाले. याचा हा इतिहास.
  • आपल्या देशाला ‘भारत’ असे म्हणतो. हे नाव ‘भरत’ राजावरून पडले आहे, भरत हा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा सुपुत्र- याचा उल्लेख महाभारताच्या आदी पर्वात आला आहे. महाकवी कालिदासाचे शाकुंतल हे नाटक याच भरताच्या जन्म कहाणीवर आधारित आहे. राजा भरताचे मूळ नाव ‘सर्वदमन’ असे असून, महाभारतानेच त्याचे नाव भरत (तेजपुंज वा प्रभा असणारा, अंधाराचा विनाश करणारा, विद्यावान इ.) असे ठेवले.
  • हा भरत राजा कुरु आणि पंडू वंशाचा पूर्वज आहे. म्हणूनच व्यासांनी या वंशांच्या इतिहासावर आधारित महाकाव्याला नाव दिले ‘महाभारत’. थोडक्यात ‘भारत’ हे संस्कृत नाव आहे. भा म्हणजे ‘ज्ञान’ वा ‘प्रकाश’ किंवा ज्ञानाचा/विद्येचा प्रकाश आणि रत म्हणजे पसरवणारा/वाहून घेतलेला- म्हणजेच भारत. म्हणजे ‘ज्ञान प्रकाशाने अंधाराचा विनाश करणारा. इतरही अनेक भारतीय भाषांनी आणि आपल्या सन्माननीय संविधानानेसुद्धा ‘भारत’ हे नाव स्वीकारले आहे.

असे पडले ‘इंडिया’ नाव

  • इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी इंडस व्हॅली, अर्थात सिंधू खोरे या नावावरूनच भारताचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले. याचे कारण त्यांना देशाचे नाव भारत किंवा हिंदुस्थान असे म्हणणे गैरसोयीचे होते.
नरेंद्र मोदी इंडियाचे नव्हे, भारताचे पंतप्रधान; सरकारी पुस्तिकेतही नाव बदललं!
  • दिल्लीमध्ये ‘जी-२०’ समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
  • राष्ट्रपतींच्या राजपत्रामध्ये झालेल्या या लक्षवेधी बदलामुळे मंगळवारी राजकीय वादंग माजला. प्रेसिडंट ऑफ भारत केल्यानंतर आता प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज बुधवारी निघणार आहेत. या परिषदेच्या सरकारी पुस्तिकेत प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. येथूनही इंडिया हा शब्द हटवण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज इंडोनेशिया येथे जाणार आहेत. ASEAN-India सागरी सुरक्षा सहकार्याला चालना देण्यासाठी नवीन उपक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे. ASEAN (दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना) चं अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. त्यामुळे इंडोनेशियामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश या संघटनेत सहभागी आहेत.
जी-२०च्या यशासाठी एकत्रित प्रयत्नांना तयार; चीनचे स्पष्टीकरण
  • भारतात होत असलेली या वर्षीची जी-२० शिखर परिषद यशस्वी व्हावी यासाठी सर्व पक्षांबरोबर काम करायला तयार असल्याचे चीनने मंगळवारी स्पष्ट केले. भारताने या परिषदेचे यजमानपद भूषवण्यास आपण पाठिंबा दिला होता, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
  • नवी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबरला शिखर परिषदेसाठी सर्व देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी आपापली उपस्थिती कळवली आहे. मात्र, चीनचे खरे सत्ताधारी असलेले अध्यक्ष क्षी जिनिपग या परिषदेला उपस्थित राहणार नसून कमी अधिकार असलेले पंतप्रधान ली कियांग परिषदेसाठी येणार आहेत. जी-२० समूहाला चीनने नेहमीच महत्त्व दिले आहे.आणि त्याच्याशी संबंधित उपक्रमांमध्येही सहभाग घेतला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
  • ’भारत आणि चीनदरम्यान असलेल्या सीमावादाचा उल्लेख न करता प्रवक्त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांचे संबंध एकंदरीत स्थिर आहेत आणि विविध स्तरांवर चर्चा व संवाद सुरू आहेत. भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सातत्याने सुधारणा होत राहिल्यास दोन्ही देश आणि दोन्ही देशातील लोकांच्या हिताचे आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
  • जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत कथितपणे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अकबर लोण यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यामध्ये त्यांनी भारताच्या राज्यघटनेशी एकनिष्ठ असल्याचे आणि देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मान्य केले.
  • जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये लोण यांचाही समावेश आहे. त्यांनी २०१८ मध्ये केलेल्या कथित घोषणाबाजीचा मुद्दा सोमवारी घटनापीठासमोर उपस्थित झाला. त्यानंतर घटनापीठाने त्यांना राज्यघटनेशी एकनिष्ठता दर्शवणारे आणि भारताचे सार्वभौमत्व मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते.
  • लोण यांचे वकील कपिल सिबल यांनी मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर हे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, केंद्र सरकारची बाजू मांडणारे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी या प्रतिज्ञापत्रातील मजकुरावर आक्षेप घेतला, लोण यांनी आपल्या वर्तनाबद्दल कोणताही खेद व्यक्त केलेला नाही असे ते म्हणाले.
चंद्राच्या पृष्ठभागावर लाल-निळा रंग कसला? ‘प्रज्ञान’ने टिपलेल्या ‘विक्रम’च्या फोटोत काय आहे खास?
  • भारताच्या चांद्रमोहिमेला सोमवारी (४ सप्टेंबर) छोटासा ब्रेक लागला. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गेल्या महिन्यात उतरवलेलं चाद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करत होतं. परंतु, चंद्रावर आता रात्र असल्याने म्हणजेच अंधार पडल्यामुळे इस्रोच्या संशोधनकार्याला छोटासा ब्रेक लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरद्वारे इस्रोला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, जसे की तिथलं तापमान, तिथल्या मातीत असणारे घटक, तिथले फोटो आणि व्हिडीओ मिळत होते. परंतु, चंद्रावर अंधार पडल्यामुळे या संशोधनकार्याला ब्रेक लागला आहे.
  • चंद्रावर १४ दिवस रात्र (गडद अंधार) आणि १४ दिवस उजेड असतो. आता चंद्रावर अंधार पडला आहे. त्यामुळे इस्रोचं अवकाशयान सोमवारी निष्क्रिय करण्यात आलं. इस्रोने रविवारी रात्री प्रज्ञान रोव्हरला झोपवलं (स्लीप मोड अ‍ॅक्टिव्हेट केला). त्यापाठोपाठ सोमवारी सकाळी ८ वाजता (भारतीय वेळेनुसार) विक्रम लँडर निद्रावस्थेत गेला. लँडर, रोव्हरसह चांद्रयान-३ मधील सर्व उपकरणं ही सौरऊर्जेवर चालतात. त्यामुळे हे अवकाशयान काही दिवसांसाठी निष्क्रिय करण्यात आलं आहे.
  • निद्रावस्थेत जाण्यापूर्वी प्रज्ञान आणि विक्रमने पाठवलेल्या माहितीवर इस्रोकडून संशोधन सुरू आहे. दरम्यान, प्रज्ञानने इस्रोला पाठवलेला एक फोटो नुकताच इस्रोने शेअर केला आहे. इस्रोने चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरचा एक थ्रीडी (3D) फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. खरंतर थ्रीडी चष्म्यातून हा फोटो पाहण्याची खरी मजा आहे. तुमच्याकडे जर रेड आणि सयान थ्रीडी (लाल आणि निळसर) चष्मा असेल तर तो घालून तुम्ही हा फोटो पाहा. तुम्हाला हा फोटो चंद्राची सफर घडवेल. विक्रम लँडरचा हा फोटो प्रज्ञान रोव्हरने टिपला आहे. लँडरपासून १५ मीटर दूर म्हणजेच ४० फुटांवरून हा फोटो टिपला आहे.
आपल्या देशाला कसं मिळालं INDIA नाव? हे हटवायचं असेल तर कायदेशीर प्रक्रिया काय?
  • आपल्या भारत देशाला दोन नावं आहेत. म्हणजे आपण फार मागच्या इतिहासात नको जायला कारण तिथे विविध नावांचा उल्लेख आहे. १९४७ पासून आपल्या देशाला भारत आणि इंडिया अशी दोन्ही नावं पडली. अशात आता चर्चा आहे की संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया हे नाव हटवण्याचा प्रस्ताव मोदी सरकार आणू शकतं. असं घडलं तर भारताच्या इतिहासात हा बहुदा पहिलाच प्रयोग असेल. १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं आहे. हे अधिवेशन कशासाठी बोलवण्यात आलंय ते स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र आता चर्चा रंगली आहे ती इंडिया हे देशाचं नाव हटवण्याची. इंडिया हे नाव विरोधकांनी त्यांच्या आघाडीला दिलं आहे. त्यानंतर आता मोदी सरकार आणखी एका धक्कातंत्राचा वापर करुन हे नाव हटवण्याचा प्रस्ताव आणू शकतं.

इंडियाचं नाव हटवलं जाणार ही चर्चा का सुरु झाली?

  • इंडिया हे नाव हटवलं जाणार ही चर्चा सुरु झाली याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे G20 परिषदेचं निमंत्रण. विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हे निमंत्रण धाडलं आहे त्यात प्रेसिंडट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी तो उल्लेख प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा असे. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही हे नमूद केलं होतं की आपण भारतीयांनी आपल्या देशाला इंडिया न म्हणता भारत म्हटलं पाहिजे. आपल्या देशाचं नाव दीर्घ कालावधीपासून भारत असंच आहे. भाषा कुठलीही असली तरीही भारत हेच नाव आपण सगळ्यांनी उच्चारलं पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली होती.
Aditya-L1 : मध्यरात्री आदित्य एल-१ ची मोठी झेप, कुठपर्यंत पोहोचलं अंतराळयान? ISRO ने दिली महत्त्वाची माहिती
  • सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’चं आदित्य एल-१ हे अवकाशयान गेल्या आठवड्यात (२ सप्टेंबर) आकाशात झेपावलं. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी या यानामध्ये सात वेगवेगळी उपकरणं (पेलोड) बसवण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही मोहीम हाती घेतली आहे.
  • दरम्यान, आदित्य एल-१ या अवकाशयानाने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. इस्रोने याबाबतची माहिती शेअर केली आहे. लाँचिंगनंतर चार दिवसांनी म्हणजेच आज (५ सप्टेंबर) सकाळी इस्रोने एक ट्वीट करून सांगितलं की, आदित्य एल-१ ने दुसऱ्यांदा यशस्वीपणे त्याची कक्षा (ऑर्बिट) बदलली आहे. आदित्य एल-१ ची कक्षा बदलण्याच्या ऑपरेशनदरम्यान बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमधून उपग्रहांद्वारे इस्रोच्या या अवकाशयानाचा मागोवा घेण्यात आला.
  • आदित्य एल-१ हे अवकाशयान आधी २४५ किमी X २२४५९ किमी कक्षेतून जात होतं. या यानाने आता त्याची कक्षा बदलून ते २८२ किमी X ४०२२५ किमी या कक्षेतून पुढे सरसावत आहे. आदित्य एल-१ मोहिमेतलं हे इस्रोचं दुसरं यश आहे. आता १० सप्टेंबर २०२३ रोजी आदित्य एल-१ हे यान तिसऱ्यांदा त्याची कक्षा बदलेल.
  • भारताच्या सौरमोहिमेच्या आराखड्यानुसार आदित्य एल-१ ला पृथ्वीभोवती १६ दिवस फिरायचं आहे. त्यानंतर तो सूर्याच्या दिशेने जाणाऱ्या कक्षेत प्रवेश करेल आणि वेगाने सूर्याकडे झेपावेल. ‘आदित्य’ला अंतराळातील एल-१ या बिंदूपर्यंत जायचं आहे. कारण हे अवकाशयान ‘एल १’ च्या अभ्यासासाठी पाठवलं आहे. ‘एल-१’ हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधील एक बिंदू आहे. तिथपर्यंत हे यान जाणार आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे. म्हणजे आदित्य एल-१ यानाला तब्बल १५ लाख किलोमीटरपर्यंतचा प्रवास करायचा आहे. यासाठी आदित्यला चार महिने लागणार आहेत.
तलाठी भरती परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच; भूमी अभिलेख विभागाचे स्पष्टीकरण
  • मराठा संघटनांचे आंदोलन, निदर्शने, बंदमुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही किंवा रद्दही करण्यात येणार नसल्याचे भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आले. सध्या अंतिम म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहे.
  • तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यभरातून साडेअकरा लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा पार पडला असून, ४ सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोणत्याही कारणास्तव परीक्षा पुढे ढकलता येणार नाही किंवा रद्दही करता येणार नसल्याचे भूमी अभिलेखकडून सांगण्यात आले.
  • ‘तलाठी भरती परीक्षेसाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत. आतापर्यंत परीक्षेचे ४२ टप्पे पार पडले आहेत. ही परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. काही कारणांनी एखाद्या दिवशी परीक्षा रद्द झाली किंवा पुढे ढकलण्यात आल्यास पुढील तीन महिने परीक्षा घेता येणार नसल्याचे परीक्षा घेणाऱ्या कंपनीने कळविले आहे. कारण या कंपनीकडून देशभरातील विविध परीक्षा घेण्यात येतात. तसेच राज्यात कोठेही निवडणूक आचारसंहिता लागल्यास त्या ठिकाणी परीक्षा घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाकडून महसूल, जिल्हा प्रशासन, पोलीस अशा सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. तसेच एका दिवशी सुमारे ६० हजार उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन आहे. त्यामुळे या उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलणे शक्य होणार नाही,’ अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

 

ऋषी सुनक यांचा पराभव - ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ट्रस :
  • ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस यांनी सोमवारी भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव करून हुजूर पक्षातील आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल़े  त्यामुळे ट्रस या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे.

  • हुजूर पक्षाच्या सदस्यांनी ऑनलाइन आणि टपालाद्वारे १७२,४३७हून अधिक मतदान केले. त्यात ट्रस यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सुनक यांचा पराभव केला. मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जागी आता ४७ वर्षीय ज्येष्ठ कॅबिनेटमंत्री असलेल्या ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनतील. भारतीय वंशाची पहिली व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची ऐतिहासिक आशा सुनक यांच्यामुळे निर्माण झाली होती, मात्र ट्रस यांच्या विजयाने सुनक यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न भंगले ट्रस जिंकल्या असल्या तरी अनेकांनी बांधलेल्या आडाख्यांप्रमाणे त्यांचा विजय ऐतिहासिक नाही, अशी टिप्पणी बीबीसी वृत्तवाहिनीने केली आहे.

  • देशासमोरील आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री राहिलेल्या सुनक यांनी करवाढीच्या योजना लागू केल्या होत्या. त्या मागे घेण्याचे वचन ट्रस यांनी दिले होते. त्यांच्या विजयात या आश्वासनानेच महत्त्वाची कामगिरी बजावल्याचे मानले जाते.

बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर ; पाणीवाटप करारावर स्वाक्षऱ्या होणार : 
  • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना भारत दौऱ्यावर आल्या आहेत. मंगळवारी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा होणार असून यावेळी संरक्षण, व्यापार, जलवाटप आदी महत्त्वाच्या विषयांवर करार होण्याची शक्यता आहे.

  • आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात शेख हसिना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांचीही भेट घेतील. दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांनी हसिना यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. तसेच दिल्लीतील निझामुद्दीन औलिया दग्र्यालाही त्यांनी भेट दिली.

  • कुशियारा नदीच्या पाणीवाटपावर २५ ऑगस्ट रोजी मंत्रीस्तरीय बैठकीत करार निश्चित झाला आहे. या करारावर हसिना आणि मोदी स्वाक्षऱ्या करतील. भारत आणि बांगलादेशमध्ये तब्बल ५४ सामायिक नद्या आहेत. यातील सात नद्यांच्या पाणीवाटपाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे.

१४,५०० शाळांत ‘पंतप्रधान श्री’ योजना :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिक्षक दिनी नवी ‘पंतप्रधान श्री’ (प्राईम मिनिस्टर- स्कूल फॉर रायिझग इंडिया) योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत देशातील १४ हजार ५०० शाळा या आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग, वाचनालये आणि क्रीडा सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

  • मोदी म्हणाले की, या शाळांत नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे संपूर्ण प्रतििबब दिसेल. शिक्षक दिनानिमित्त ही घोषणा करताना आपणास अत्यंत आनंद होत आहे, असे मोदी यांनी ट्विटरवर नमूद केले आहे. या शाळांतून शिक्षणाची अत्याधुनिक, कालसुसंगत आणि सर्वागिण पद्धत अवलंबिली जाईल.  शिकविण्याची पद्धत ही मुलांची शोधात्मक आणि ज्ञानोपासनेची वृत्ती जोपासणारी असेल.

  • राष्ट्रीय शिक्षण धोरणातून शिक्षण क्षेत्राचा कायापालट झाला आहे. या शाळा लाखो विद्यार्थ्यांना लाभदायक ठरतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

परराज्यात शिकणाऱ्या ओबीसींची शिष्यवृत्ती रद्द ; राज्य सरकारचा निर्णय; मार्चमधील निर्णय ऑगस्टमध्ये रद्द :
  • परराज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय शिंदे सरकारने रद्द केला आहे. यामुळे परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्हीजे, एनटी, एसबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.

  • महाराष्ट्रातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या व्हीजेएनटी, एसबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मागील सरकारने २५ मार्च २०२२ ला घेण्यात आला होता. तर शिंदे सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व सामाजिक न्याय विभागाचे प्रचलित धोरण विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत धोरण निश्चित करण्याची बाब विचाराधीन असल्याचे सांगत २५ मार्च २०२२ रोजीचा निर्णय रद्द केला आहे. त्यासंदर्भातील आदेश २ ऑगस्ट २०२२ रोजी काढला आहे.

  • महाराष्ट्रातील रहिवासी असणारे विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच इतर मागास व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी जे राज्याबाहेर परराज्यात खासगी विनाअनुदानित व कायम अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑफलाईन पद्धतीने अदा करण्याचा निर्णय २५ मार्च २०२२ रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार परराज्यात शिकणाऱ्या महाराष्ट्रातील २०१७-१८ या वर्षांपासून भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, निर्वाह भत्ता दिला जाणार होता.

  • इतर मागास बहुजन कल्याण विभाग ९ मार्च २०१७ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामधून वेगळा झाला. सामाजिक न्याय विभाग अशाप्रकारची शिष्यवृत्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देते. परंतु इतर मागास बहुजन खाते परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्यांना शिष्यवृत्ती देत नाही. यात समानता यावी म्हणून मागील सरकारने त्यासंदर्भातील निर्णय घेतला होता. आता शिंदे सरकारने तो निर्णय मागे घेतला आहे.

राजपथ आता कर्तव्यपथ :
  • राजधानी नवी दिल्लीमधील प्रसिद्ध राजपथाचे नाव बदलले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजपथाचे नाव आता ‘कर्तव्यपथ’ केले जाऊ शकते.

  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबरला नवी दिल्ली महापालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये राजपथ आणि सेंट्रल विस्टा लॉन्स या भागाला ‘कर्तव्यपथ’ असे नाव दिले जाऊ शकते. इंडिया गेटवरील नेताजींचा पुतळा ते राष्ट्रपती भवन हा रस्ता राजपथ या नावाने ओळखला जातो. दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन संचलन याच रस्त्यावर होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात या मार्गाचे नाव ‘किंग्जवे’ असे होते. स्वातंत्र्यानंतर त्याचाच अनुवाद करून राजपथ करण्यात आले.

  • मोदी सरकारने यापूर्वी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ‘रेस कोर्स रोड’चे नाव बदलून ‘लोक कल्याण मार्ग’ असे केले होते. याखेरीज राजधानीतील प्रतिष्ठित भाग असलेल्या ल्यूटन्समधील ५ रस्त्यांची नावे बदलण्याची मागणी भाजपने दिल्ली महापालिकेकडे केली आहे. अकबर रोड, तुघलक रोड ही नावे गुलामगिरीचे प्रतिक असून ती बदलण्याची मागणी भाजपकडून केली जाते.

‘पेटीएम’च्या जागी ‘मास्टरकार्ड’ ‘बीसीसीआय’चे मुख्य प्रायोजक :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांसाठी मुख्य प्रायोजक म्हणून ‘पेटीएम’ची जागा ‘मास्टरकार्ड’ घेणार आहे. ‘बीसीसीआय’ने सोमवारी आपल्या संकेतस्थळावर याबाबतची घोषणा केली.

  • ‘पेटीएम’ २०१५ सालापासून ‘बीसीसीआय’चे मुख्य प्रायोजक होते. २०१९ मध्ये त्यांच्याशी पुन्हा नव्याने करारही करण्यात आला होता. मात्र काही काळापूर्वी ‘पेटीएम’ने या करारातून मुक्त होण्याची विनंती केली होती. ‘बीसीसीआय’ने त्यांची ही विनंती मान्य केली असून आता ‘मास्टरकार्ड’शी २०२२-२३ हंगामासाठी करार केला आहे.  

  • मुख्य प्रायोजकत्व मिळवण्यासाठी २०१५ मध्ये ‘पेटीएम’ने ‘बीसीसीआय’शी चार वर्षांकरता एकूण २०३ कोटी रुपयांचा (२.४ कोटी प्रति सामना) करार केला होता. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये पुन्हा नव्याने करार करण्यात आला. ‘पेटीएम’ने २०२३ सालापर्यंत ‘बीसीसीआय’चे मुख्य प्रायोजकत्व मिळवण्यासाठी प्रति सामना ३.८० कोटी रुपयांची विजयी बोली लावली होती. आता ‘मास्टरकार्ड’ने ‘पेटीएम’ची जागा घेतली असली, तरी करारातील रकमेमध्ये बदल होणार नाही.

06 सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.