दिल्ली पोलिसांनी ‘द वायर’ या वृत्तलेख संकेतस्थळाचे (पोर्टल) कार्यालय आणि संपादकीय विभागावर टाकलेल्या छापे, ही चिंताजनक व अस्वस्थ करणारे आहे. तसेच पोलिसांनी ‘द वायर’च्या संपादकांच्या घरांवरही छापे टाकून तेथे घेतलेली झडती व जप्तीची पद्धत अनावश्यक असल्याचे ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संपादकांच्या संघटनेने नमूद केले. भाजप नेते अमित मालवीय यांनी ‘द वायर’विरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली होती.
संघटनेतर्फे प्रसृत निवेदनात नमूद केले, की ज्या पद्धतीने पोलिसांनी अगदी घाईघाईत ‘द वायर’शी संबंधित विविध ठिकाणी छापे टाकले, ते चौकटीबाहेरचे व अयोग्य होते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारींची वस्तुनिष्ठ व नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याचे आवाहन करून संघटनेने म्हंटले आहे, की अशी कारवाई करताना लोकशाही मूल्यांचा अवमान करून दडपशाहीचे डावपेच खेळू नका.
‘गिल्ड’ने म्हटले आहे, की ‘द वायर’च्या निवेदनातील माहितीनुसार पोलिसांनी या संस्थेच्या पत्रकारांच्या घरातून व कार्यालयातून दूरध्वनी, संगणक, ‘आय पॅड’ जप्त केले. तसेच संबंधितांनी या जप्त केलेल्या उपकरणांचा तपशील देण्याची व ते परत देण्याची केलेली विनंती मान्य करण्यात आली नाही. तपास प्रक्रियेच्या नियमांचे हे गंभीर उल्लंघन आहे.
‘द वायर’चे वृत्त निषेधार्हच; तपास नियमानुसार करावा’ - ‘द वायर’ने ‘मेटा’ या समाजमाध्यम संस्थेशी संबंधित मालवीय यांचा संदर्भ असलेल्या वृत्तांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे मान्य केल्याचे नमूद करून ‘गिल्ड’ने या निवेदनात म्हटले आहे, की या त्रुटी या निषेधार्हच आहेत.
ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी नोकरकपातीचे संकेत दिले होते. याबाबत नवी माहिती समोर येत आहे. कामावरुन काढण्यात आलं आहे की नाही, याबाबत ट्विटरकडून ईमेलद्वारे आज कर्मचाऱ्यांना कळवण्यात येणार आहे, असं वृत्त ‘सीएनएन’नं दिलं आहे.
“ट्विटरला भक्कम स्थितीत आणण्यासाठी आम्ही नोकरकपातीच्या कठिण प्रक्रिेयेतून आज जात आहोत”, असा ईमेल कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवल्याचं वृत्त ‘रॉयटर्स’नं दिलं आहे. या प्रक्रियेदरम्यान कार्यालयं तात्पुरती बंद राहणार आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांचे बॅजही काही काळासाठी निलंबित करण्यात येणार आहे, असाही उल्लेख या ईमेलमध्ये आहे. कर्मचारी, ट्विटरच्या यंत्रणांसह ग्राहकांच्या मजकुराच्या सुरक्षेसाठी हे करण्यात येत असल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटरमधून तीन हजार ७०० नोकऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे, असे वृत्त गुरुवारी ‘ब्लुमबर्ग’नं दिलं होतं. या कंपनीतून काढल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या पगाराएवढा ‘सेवरन्स पे’ दिला जाऊ शकतो, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. दरम्यान, कुठूनही काम करण्याची (Work from Anywhere) कंपनीची योजनाही बंद करण्याच्या तयारीत मस्क असल्याचे बोलले जात आहे.
गुजरात निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेवरून काँग्रेसने आक्षेप घेतला असल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोग शंभर टक्के निष्पक्ष असल्याचा दावा मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी केला.
मोरबी पूल दुर्घटनेच्या मृतांच्या कुटुंबीयांना, तसेच जखमींना बुधवारी राज्य सरकारकडून भरपाई देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. या कुटुंबांसाठी सरकारला आश्वासने देता यावीत, यासाठी गुजरात निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेला विलंब केला गेला, अशी टीका प्रदेश काँग्रेसने केली आहे. मात्र हा आक्षेप राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत पूर्णपणे फेटाळला.
‘क्रिकेट सामन्यात पराभूत झालेला संघ तिसऱ्या पंचाला दोष देतो. निवडणूक आयोगाकडे तिसरा पंचही नाही. आम्ही पूर्णपणे निष्पक्ष प्रक्रिया राबवतो. ही प्रक्रिया निष्पक्ष नसल्याची तक्रार कोणी केली तर तक्रारीसंदर्भात तातडीने कारवाई केली जाईल, असे राजीव कुमार म्हणाले.
निवडणुकीची घोषणा केली की, राजकीय पक्ष वा उमेदवार विनाकारण नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा निवडणूक मतदान यंत्रांवर आक्षेप घेतात, मतदान होईपर्यंत अशा आक्षेपांची शेकडो पत्रे आयोगाला पाठवली जातात. पण मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यावर आक्षेप घेणारा राजकीय पक्ष जिंकतो, तेव्हा मात्र आक्षेप बंद होतात. ‘आक्षेपार्ह’ निवडणूक मतदार यंत्रेच त्यांना जिंकून देतात, असा युक्तिवाद राजीव कुमार यांनी केला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. राज्यात १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, हिमाचल प्रदेशसह गुजरातमध्येही ८ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी ८९ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तर, ९३ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. गुजरातमध्ये ४.९ कोटी मतदार असून, ५१ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ३४ हजार केंद्रे ग्रामीण भागांमध्ये असतील. विद्यमान विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपुष्टात येत असून, ११० दिवस आधी विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे ५ आणि १० नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख अनुक्रमे १४ आणि १७ नोव्हेंबर असेल. १७ आणि २१ नोव्हेंबपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.