चालू घडामोडी आणि दिनविशेष - 04 जुलै 2023

Date : 4 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधानांच्या बंगल्यावरून ड्रोनच्या घिरट्या, दिल्लीत खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दिल्लीतलं निवासस्थान असलेल्या परिसरात सोमवारी सकाळी मोठी खळबळ माजली होती. कारण पंतप्रधानांच्या बंगल्यावरून ड्रोन उडत असल्याचं सुरक्षा यंत्रणेच्या निदर्शनास आलं होतं. एसपीजीने (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) या ड्रोनची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर दिल्ली पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी पंतप्रधानांच्या निवास्थानी दाखल झाले. सकाळी साधारण ५ वाजता एसपीजीने नवी दिल्ली पोलिसांना यासबंधीची माहिती दिली होती. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. परंतु अद्याप कोणतंही ड्रोन पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
  • हे ड्रोन नेमकं कोणाचं होतं याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसेच ते ड्रोन पंतप्रधानांच्या निवास्थानापर्यंत कसं पोहचलं हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित आहे. मुळात पंतप्रधानांचं निवास्थान असलेला परिसर नो फ्लाईंग झोनमध्ये येतो. तरीदेखील या परिसरात ड्रोन फिरताना दिसल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहेत.
  • दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, एनडीडी नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली होती की, पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ एक उडणारी वस्तू दिसली आहे. त्यानंतर आसपासच्या परिसरात शोध घेण्यात आला, परंतु अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यानंतर आम्ही एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमशी (एटीसी) संपर्क साधला. त्यांनाही पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ अशी कोणतीही उडणारी वस्तू सापडली नाही.
  • पंतप्रधानांचं निवासस्थान ७, लोक कल्याण मार्गावर आहे. या रस्त्याचं आधीचं नाव ७, रेस कोर्स रोड असं होतं. तर पंतप्रधानांच्या बंगल्याचं अधिकृत नाव पंचवटी असं आहे. पंतप्रधानांच्या निवसस्थानाबाहेर कडेकोड सुरक्षा व्यवस्था असते. ही सुरक्षा व्यवस्था इतकी चोख असते की, अगदी पंतप्रधानांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी पंतप्रधानांना भेटायला जात असेल तरी त्या व्यक्तिला अनेक सुरक्षा टप्पे पार करून जावं लागतं. तसेच दररोज पंतप्रधानांना भेटणाऱ्या लोकांची एक यादी त्यांचे सचिव तयार करतात. या यादीत ज्या व्यक्तीचं नाव असेल केवळ तीच व्यक्ती पंतप्रधानांना भेटू शकते. तसेच पंतप्रधानांना भेटायला जाणाऱ्या व्यक्तिंकडे ओळखपत्र असणं आवश्यक असतं. जे अनेक सुरक्षा टप्प्यांदरम्यान दिलं जातं.
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र बुधवारी उपलब्ध
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र बुधवारी (५ जुलै) सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
  • जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी-बारावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रांची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. त्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येऊ नये. प्रवेशपत्राच्या प्रतीवर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय, माध्यम बदल असल्यास संबंधित दुरुस्त्या विभागीय मंडळात समक्ष जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाला सादर करावी.
  • प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील वाढत्या बस अपघातांमागे ‘असे’ही कारण…
  • समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या मालिकेने रस्ता सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी प्रवासी बसला आग लागून अपघात घडण्याच्या घटना वाढत आहेत. या बसमध्ये करण्यात आलेले काही तांत्रिक बदल यासाठी कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. याचबरोबर बसच्या समोरील बाजूस जास्त क्षमतेचे दिवे लावल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
  • समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात सुरू आहेत. या अपघातांच्या मालिकेमुळे परिवहन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देताना महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे. अनेक खासगी बसमध्ये प्रकाशयंत्रणेत बदल केले जातात. याकडे आरटीओकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. अशा बदलांमुळे बसला आग लागण्याच्या घटना घडूनही परिवहन विभागाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची बाब उघड झाली आहे.
  • समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे खासगी बसला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, वाहनांना जास्तीत जास्त सात वॉटचे दिवे लावता येतात. खासगी बसला जास्त क्षमतेचे २० ते २५ वॉटचे हॅलोजन दिवे लावले जातात. जास्त क्षमतेचे दिवे लावण्यासाठी आणखी वायरिंग केले जाते. ते निकृष्ट असल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात, अशी माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.
  • याबाबत पुण्यातील ‘थ्री ए रोड’ फाउंडेशनचे संचालक विजयकुमार दुग्गल यांनी २८ मार्चला परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांना पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी खासगी प्रवासी बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ आणि त्याची कारणे मांडली होती. त्यामुळे खासगी बसमध्ये करण्यात येत असलेल्या अतिरिक्त प्रकाश योजनेचा मुद्दाही उपस्थित केला होता.
वर्ल्डकप वेळापत्रकात झाला बदल, आता ‘या’ दिवशी होणार भारत वि. श्रीलंका मुकाबला; जाणून घ्या
  • रविवारी विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंकेने झिम्बाब्वेचा ९ गडी राखून पराभव केला. यासह दासुन शनाकाचा संघ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आता विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात २ नोव्हेंबरला सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकेचे संघ आमनेसामने असतील. याआधी २०११च्या विश्वचषकात भारत आणि श्रीलंकेचे संघ वानखेडे स्टेडियमवर भिडले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करत २८ वर्षांनंतर विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला.

टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे

  • मात्र, भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. रोहित शर्मा आणि कंपनी १५ ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात रोहित शर्माचा संघ बांगलादेशशी भिडणार आहे. मोहिमेतील सर्वात मोठा आणि सर्वात मनोरंजक सामना असणार आहे.
  • बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये सुरू असलेल्या सर्व नाट्यादरम्यान, आयसीसी आणि बीसीसीआय या दोघांनीही अहमदाबादमध्ये न खेळण्याची पीसीबीची योजना नाकारली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय श्रीलंका विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे, त्यामुळे त्याला भारताच्या गटात स्थान दिले जाईल आणि २ नोव्हेंबरला भारताशी सामना होईल.
  • ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान व्यतिरिक्त भारत आणखी तीन मोठ्या संघांशी भिडणार आहे. भारतीय क्रिकेट संघ २२ ऑक्टोबरला धर्मशाला येथे न्यूझीलंडशी भिडणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ लखनऊच्या एकाना स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडशी भिडणार आहे. भारताचा सामना ५ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

 

भाजपची ‘स्नेहयात्रा’! ; सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचण्याचे मोदींचे आवाहन :
  • देशाच्या राजकारणाची दिशा तुष्टीकरणाकडून तृप्तीकरणाकडे नेण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडले. हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचण्याबरोबरच देशभर ‘स्नेहयात्रा’ काढण्याची सूचना मोदींनी केली. काँग्रेस २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपचे हे मोठे पाऊल मानले जात़े

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या राजकीय प्रस्तावात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर टीका करण्यात आली. हाच धागा जोडून घेत मोदींनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात, नवी राजकीय संस्कृती निर्माण करण्याचा मुद्दा मांडला. बहुसंख्यच नव्हे तर, अन्य समाजाशीही भाजपने समन्वय साधला पाहिजे, त्यांच्याबद्दल आत्मीयता दाखवली पाहिजे. स्नेहयात्रा ही सद्भावना यात्रा असली पाहिजे, असा संदेश मोदींनी भाजपच्या कार्यकारिणीतील सदस्यांना दिला.

  • हैदराबादमधूनच सरदार पटेलांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचा पाया रचला होता. भारत एक आहे, आता श्रेष्ठ बनवण्याकडे वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी जनतेचे हित आणि सुशासन हा द्वीसूत्री कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्याद्वारे ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’चे ध्येय गाठायचे आहे म्हणजेच देशाला तृप्तीकरणाकडे घेऊन जायचे आहे, असे मोदींनी स्पष्ट केल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • काँग्रेससारखे काही पक्ष स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत पण, त्यावर भाजपने हास्य वा व्यंग करू नये. त्यांच्या चुका भाजपने करू नयेत. काँग्रेससारख्या पक्षांच्या घराणेशाहीला लोक कंटाळले आहेत. २००४ ते २०१४ हा दहा वर्षांचा धोरणलकव्याचा, भ्रष्टाचाराचा काळ भाजपने आणि देशानेही विसरू नये, असेही मोदी म्हणाले.

“२०२४ पर्यंत ईशान्य भारतातील सर्व प्रश्न सोडवणार”; अमित शाहांचं वक्तव्य :
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ पर्यंत ईशान्य भारतातील सर्व प्रश्न सोडवणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. ते हैदराबादमधील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत राजकीय विषयांवर बोलत होते. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. अमित शाह यांनी ईशान्य भारतात आता आगामी काळात कोणतेही प्रश्न राहणार नाहीत, असंही सांगितल्याचं शर्मा यांनी नमूद केलं. ते रविवारी (३ जुलै) हैदराबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

  • हिमंता बिस्वा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह म्हणाले, “२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर ईशान्य भारतात विकास कामांना गती मिळाली आहे. ईशान्य भारतातील ६० टक्के भागातून अफ्स्पा कायदा (AFSPA Act) हटवण्यात आला आहे. केंद्र सरकारने नागालँडमधील ७ जिल्ह्यांमधील १५ पोलीस स्टेशनच्या परिसरातून अफ्स्पा कायदा हटवला आहे. मणिपूरच्या ६ जिल्ह्यातील १५ पोलीस स्टेशनच्या भागातूनही अफ्स्पा हटवला आहे. याशिवाय आसाममधील २३ जिल्ह्यांमधून पूर्णपणे आणि एका जिल्ह्यातून काही प्रमाणात हा कायदा हटवला. आगामी काळात या भागात कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही.”

  • “मोदींविरोधात केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं” - अमित शाह यांनी गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं मत व्यक्त केलं. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं या निर्णयाने सिद्ध केलं. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते, असाही आरोप अमित शाह यांनी केला.

जगप्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक पीटर ब्रुक यांचे देहावसान ; रुक्ष जागांवर रंगमंचीय आविष्कार घडवणारा रंगकर्मी :
  • व्यायामशाळा, निर्जन कारखाने, खाणी, शाळा, जुने वायुनिर्मिती प्रकल्प अशा विचित्र ठिकाणांनाच रंगमंच करून तेथे नाटक सादर करण्याची किमया साध्य केलेले आणि जगातील सर्वात प्रयोगशील नाटय़दिग्दर्शकांपैकी एक असलेले पीटर ब्रुक यांचे शनिवारी पॅरीस येथे देहावसान झाले. ते ९७ वर्षांचे होते.  

  • ब्रुक यांनी शेक्सपियरच्या आव्हानात्मक नाटकांपासून ते महाभारताच्या नाटय़रूपांतरापर्यंतच्या प्रयोगांसाठी ‘रिकाम्या जागां’चा रंगमंच म्हणून वापर करण्याचा अफलातून आविष्कार घडवला. त्यांनी शहरांतील व्यायामशाळा, विद्यालये, कारखाने, खाणी, इतकेच नाही तर जुने वायुनिर्मिती प्रकल्प या ठिकाणांचा वापर रंगमंच म्हणून केला. 

  • १९७० मध्ये शेक्सपियरच्या ‘ए मिडसमर नाईटस् ड्रीम’च्या प्रयोगात संपूर्ण पांढऱ्या रंगाचे नेपथ्य आणि चमकदार रेशमी वेशभूषेतील कलावंतांनी सर्कशीतील

  • प्लेट-स्पिनिंग कौशल्याचा वापर करून घडवलेला अफलातून नाटय़ाविष्कारामुळे ब्रुक यांचे नाटय़ेतिहासातील स्थान निश्चित झाले. या नाटकाचे नेपथ्य सॅली जेकब्स यांनी केले होते. सुंदर जंगल आणि अथेनियन कोर्टच्या पारंपरिक ‘ड्रीम सेट’ची जागा ब्रुक यांच्या कल्पनेतून आलेल्या पांढऱ्या रंगातील नेपथ्याने घेतली. 

  • ब्रुक यांचा नाटय़वर्तुळात दरारा होता, मात्र त्यांनी व्यावसायिकता नाकारल्यामुळे ते या क्षेत्रात लौकिकार्थाने कमी प्रसिद्ध होते. सतत नवकल्पनांच्या शोधात असलेल्या ब्रुक यांनी आणखी काहीतरी वेगळे करण्यासाठी देश सोडला. १९७० मध्ये ब्रिटन सोडून ते पॅरिसमध्ये दाखल झाले. तेव्हापासून ते तेथेच होते. ‘ल मॉँद’ या फ्रेन्च वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ब्रुक १९७४ पासून फ्रान्समध्ये होते आणि शनिवारी पॅरिसमध्ये ते निवर्तले. ते नव्वदीतही सक्रिय होते.

  • प्रकाश, शब्द, इम्प्रोव्हायझेशन आणि अभिनय यांच्या संपूर्ण हुकूमतीवर रिकाम्या जागांचे रूपांतर रंगमंचात करता येऊ शकते, या विश्वासातून ब्रुक यांनी अनेकदा पारंपरिक रंगमंचांपासून अंतर राखले. ‘‘मी कोणत्याही रिकाम्या जागेला रंगमंच म्हणू शकतो,’’ असे ब्रुक यांनी १९६८ मध्ये लिहिलेल्या ‘द एम्प्टी स्पेस’ या अफलातून पुस्तकात लिहून ठेवले आहे. 

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर :
  • विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली. या निवडणुकीत नार्वेकर यांना १६४ मते मिळाल्याने राज्यातील सत्तानाटय़ात शिवसेनाअंतर्गत सुरू असलेल्या  सत्तासंघर्षांत भाजप व शिंदे गटाने बाजी मारीत पहिला अंक जिंकला. यामुळे सोमवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा फक्त औपचारिकता शिल्लक राहिली.

  • आवाजी मतदानाने झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांना १६४, तर शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. तीन आमदार तटस्थ राहिले. निवडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी नेते अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले व शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी सन्मानपूर्वक नार्वेकर यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान केले. आतापर्यंत विधानसभा अध्यक्षपद भूषविलेल्यांमध्ये नार्वेकर हे सर्वात तरुण आहेत.  राज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षपदी निवड होणारे नार्वेकर हे १६वे अध्यक्ष आहेत.

  • अध्यक्षपदी निवड झाल्यावर नार्वेकर यांनी सर्वाचे आभार मानले व सर्वाना समान न्याय देण्याची ग्वाही दिली. संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्टय़पूर्ण स्थान असलेल्या महाराष्ट्र विधानसभा या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्द्दल सर्वाचे आभार मानताना, सभागृहातील कामकाजाचा क्षण आणि क्षण शोषित, वंचितांच्या कल्याणासाठी खर्च करू, असेही त्यांनी सांगितले. विधानमंडळ हे राज्यातील तेरा कोटी जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक आहे. लोकप्रतिनिधींमार्फत या इच्छा-आकांक्षा विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहात मांडल्या जाणे आणि त्यानुसार निर्णयप्रक्रियेचे चक्र गतिमान राहणे आवश्यक आहे. मात्र सभागृहात विधेयके चर्चेविना संमत होणे अयोग्य असून सभागृहात दर्जेदार चर्चा व्हावी, परिणामकारक वैधानिक कामकाज होण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक िनबाळकर हे नार्वेकर यांचे सासरे. यामुळेच राज्यातील उभय सभागृहांच्या पीठासीन अधिकारीपदी सासरे व जावयाची जोडी काम करणार आहे. सासरे-जावई जोडीचा अनेकांनी उल्लेख केला.

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा - भारत-इंग्लंड सामना बरोबरीत :
  • पिछाडीवरुन पुनरागमन करत भारतीय संघाने महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी इंग्लंडविरुद्धचा ब-गटातील सलामीचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. इंग्लंडकडून इसाबेला पीटरने नवव्या मिनिटाला, तर भारताकडून वंदना कटारियाने २८व्या मिनिटाला गोल केला.

  • भारताला पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरला मिळाला; पण त्यांना गोल करता आला नाही. यानंतर पीटरने भारताच्या बचाव फळीला चकवत चेंडू गोल जाळय़ात मारला आणि इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. मग २८व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी कटारियाने संधीचा फायदा घेत गोल करताना भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

  • भारताने अखेरच्या सत्रात गोल करण्याचे प्रयत्न वाढवले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. आता भारताचा पुढील सामना मंगळवारी चीनशी होणार आहे.

०४ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.