चालू घडामोडी आणि दिनविशेष - 04 डिसेंबर 2023

Date : 4 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रायगडमध्ये सेवा निवृत्त गुरूजी पुन्हा शाळेत, जिल्हा परिषद शाळांमध्ये १६९ सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती
  • सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा सेवेत घेतले जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी शिक्षण संघटनांच्या शिष्टमंडळाला दिली होती. मात्र तरीही रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेवर सेवा निवृत्त झालेल्या १६९ शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक संघटन आणि टिईटी पात्र उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
  • जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी पात्र शिक्षकांची तात्पुरता स्वरुपात नियुक्ती केली आहे. तात्पुरता स्वरुपात नियुक्ती केलेल्या शिक्षकांना तालुके नेमून दिले आहेत, संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी हे शाळांमधील पटसंख्या व शिक्षक संख्या विचारात घेऊन संबंधित शिक्षकांना शाळांमध्ये नियुक्ती देणार आहेत.
  • या शिक्षकांना शून्य शिक्षीकी शाळा तसेच ज्या शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे व शिक्षक कमी अशा शाळांमंध्ये नेमणूक दिली जाणार आहे. विशेष म्हणजे १६९ शिक्षकांमधील १४५ शिक्षक रायगड जिल्ह्यातील असून, २४ शिक्षक जिल्ह्याबाहेरील आहेत. या निर्णयामुळे शिक्षक संघटनामध्ये नाराजीचा सूर आहे.
  • शासनाने ज्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा ( टेट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थी ) गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांची तातडीने भरती करावी. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी बिंदू नामावली पुर्ण केलेली आहे. आज राज्यात किमान ३० हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रायगड जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांची १ हाजर २५० पदे रिक्त आहेत. ही तातडीने भरावीत अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडील परिवहन खात्यात ‘आरटीओ’ची ८० टक्के पदे रिक्त
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या परिवहन खात्यातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची (आरटीओ) राज्यातील ८० टक्के पदे रिक्त आहेत. या पदांची अतिरिक्त जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे देऊन बोळवण केली जात आहे. यामुळे एकीकडे पदोन्नतीअभावी या खात्यातील अधिकाऱ्यांत नाराजी तर दुसरीकडे कार्यालयातील विविध कामांवरही प्रभाव पडत आहे.
  • परिवहन खात्याने नुकतीच पिंपरी चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई, चंद्रपूर, अकोला, बोरीवली, सातारा या नवीन नऊ प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील ‘आरटीओ’ पदांची अतिरिक्त जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर सोपवली. त्यात काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदारी मिळाली. नवीन कार्यालयांमुळे राज्यात ‘आरटीओ’च्या पदांची संख्या २८ झाली आहे. त्यापैकी पाच पदे परिवहन आयुक्त कार्यालयातील आहेत.
  • राज्यात ‘आरटीओ’ची पदे वाढली असतानाच या पदावरील पदोन्नतीमध्ये वारंवार घोळ होत असल्याने विभागीय पदोन्नती समिती गठित होऊनही पदोन्नतीच होत नाही. त्यातच परिवहन खात्याकडून ‘आरटीओ’ पदासाठी दोन वेळा ज्येष्ठता सूचीही लावली गेली. परंतु, त्यानंतरही पदोन्नती होत नसल्याने पदोन्नतीसाठी रांगेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या अधिकाऱ्यांकडून आम्ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावरच निवृत्त व्हायचे काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्याच्या स्थितीत परिवहन आयुक्त कार्यालयातील राजेंद्र मदने आणि भरत कळसकर यांचे पद भरले आहे. त्यापैकी मदने हे वैद्यकीय रजेवर असून कळसकर यांच्याकडे परिवहन उपायुक्त (रस्ते सुरक्षा) या पदाचीही अतिरिक्त जबाबदारी आहे. राज्यातील २८ पैकी केवळ चार पदे भरली असल्याचे माहितीच्या अधिकारातून विलास भालेकर यांनी पुढे आणले. या विषयावर परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आणि अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या परिवहन खात्यात ‘आरटीओ’ची पदे रिक्त असल्याने एका अधिकाऱ्याला दोन ते तीन कार्यालयांची जबाबदारी दिली जाते. त्यामुळे सध्या धोरणात्मक निर्णय होत नसून ऑटोरिक्षा चालकांसह इतरही नागरिकांची विविध कामे रखडत आहेत. विलास भालेकर, राज्य कार्याध्यक्ष, ऑटोरिक्षा चालक- मालक संघटना, संयुक्त कृती समिती.
भारत चार डिसेंबरला ‘नौदल दिन’ का साजरा करतो? या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
  • नौदलातील युद्धनौकांची संख्या आणि नौसैनिकांची संख्या लक्षात घेतली तर जगातील चौथ्या क्रमांकाचे नौदल म्हणून भारतीय नौदलाची ओळख आहे. ३५ प्रमुख युद्धनौका आणि दोन अणुउर्जेवर कार्यरत असलेल्या पाणबुड्यांसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या १५० विविध प्रकराच्या युद्धनौका कार्यरत आहेत.
  • भारताच्या तिन्ही बाजूंना पसरलेला अथांग समुद्र, या भागातून तसंच पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत विविध ठिकाणी विशेषतः आखातांमधून सुरु असलेली जलवाहतूक, चीनचे वाढते वर्चस्व यामुळे गेल्या काही वर्षात भारतीय नौदलाने कात टाकली आहे.
  • तीन हजार वर्षांपासून इतिहासतील विविध राजे-घराणे इथपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नौदल ते पुढे सध्याचे आधुनिक नौदलाने असा भारतीय नौदलाचा दबदबा राहिला आहे. विशेषतः ४ डिसेंबर १९७१ या दिवशी नौदलाने दिलेल्या दणक्याने पाकिस्तानच्या नौदलाचे कंबरडे मोडले, भारतीय नौदलाचे नाणे जगात खणखणीत वाजले.

नौदलाची आगेकूच

  • १९७१ या वर्षाच्या सुरुवातीपासून भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. तीन डिसेंबरच्या संध्याकाळी पाकिस्तानने पश्चिमेकडील भारताच्या हद्दीत वायू दलाच्या विविध तळांवर हल्ले केले आणि युद्धाला सुरुवात केली.
  • चार डिसेंबरच्या रात्री भारताच्या युद्धनौकांचा समूह पाकिस्तानच्या युद्दनौकांना, रडार यंत्रणांना चकवत कराची बंदरापासून सुमारे ४६० किलोमीटर अंतरावर येऊन स्थिरावला. या समुहात तीन विद्युत वर्गातील क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका ( Vidyut-class missile boat – INS Nipat, INS Nirghat and INS Veer ), दोन कॉर्वेट (Corvette) प्रकारातील युद्धनौका (INS Kiltan and INS Katchall) आणि इंधनवाहू टँकर (INS Poshak ) यांचा समावेश होता.
ऋतुराज गायकवाडने मोडला मार्टिन गप्टिलचा विक्रम, इशान किशनलाही ‘या’ बाबतीत टाकले मागे
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. त्याचबरोबर ४-१ अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली. या सामन्यात सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी खेळण्यात यश आले नाही आणि तो केवळ १० धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने २ चौकारही मारले आणि न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऋतुराज गायकवाडने मोडला मार्टिन गप्टिलचा विक्रम -

  • ऋतुराज गायकवाडने या सामन्यात १० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिला आला. ऋतुराज गायकवाडने या मालिकेत कांगारू संघाविरुद्ध ५ सामन्यात २२३ धावा केल्या आणि मार्टिन गप्टिलला मागे टाकले. याआधी, गुप्टिलने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत एकूण २१८ धावा केल्या होत्या, पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या यादीत विराट कोहली १९९ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज -

२२३ धावा - ऋतुराज गायकवाड (२०२३)

२१८ धावा - मार्टिन गुप्टिल (२०२१)

१९९ धावा - विराट कोहली (२०१६)

  • ऋतुराज गायकवाडने टी-२० द्विपक्षीय मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत आपले नाव कोरले. इंग्लंडविरुद्ध विराट कोहली २३१ धावांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध २२४ धावांसह केएल राहुल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचाही या यादीत समावेश आहे.

टी-२० द्विपक्षीय मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज -

  • २३१ - विराट कोहली विरुद्ध इंग्लंड
  • २२४ - केएल राहुल विरुद्ध न्यूझीलंड
  • २२३ - ऋतुराज गायकवाड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
  • २०६ - इशान किशन विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • २०४ - श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका
जगभरात दरवर्षी २०० कोटी टन धूळ वातावरणात!
  • दरवर्षी जगभरात २०० कोटी टन धूळ आणि रेतीचा वातावरणात प्रवेश होत आहे. धूळ आणि रेतीच्या एकूण घटनांपैकी २५ टक्के घटना मानवाच्या पर्यावरणातील अतिरेकी हस्तक्षेपामुळे होत आहेत. त्यामुळे शेतजमिनी मोठय़ा प्रमाणावर नापीक होण्याचा धोका वाढला आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) म्हटले आहे.
  • दिल्लीसह पुणे, मुंबईतील वायुप्रदूषणाच्या प्रश्नात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागल्याची घटना ताजी असतानाच एफएओने संयुक्त राष्ट्राच्या कन्वेंशन टू कॉम्बैक्ट डेजर्टिफिकेशन (यूएनसीसीडी) या संस्थेच्या हवाल्याने धूळ आणि रेतीची वादळे, (सॅण्ड अ‍ॅण्ड डस्ट स्टॉर्म) हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालात धूळ आणि रेतीच्या वादळांकडे जगाचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
  • अहवालात म्हटले आहे, खाण उद्योग, पाळीव पशूची अतिरेकी चराई, शेती जमिनीचा अति वापर, अनियंत्रित शेती, जंगलांचा नाश, भूजलाचा अति उपसा आदी कारणांमुळे धूळ आणि रेतीच्या वादळांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्तर आणि मध्य आशिया आणि आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या परिसरात मोठे नुकसान होत आहे. धूळ आणि रेतीचे हवेतील प्रमाण वाढल्यामुळे श्वसनासंबंधी विकार वाढले आहेत. अस्थमा सारखे आजार बळावले आहेत. त्या शिवाय धुळीच्या वादळांमुळे जगभरात दरवर्षी दहा लाख चौरस किलोमीटर इतकी सुपीक जमीन नापीक होत आहे. त्याचा थेट परिणाम अन्न सुरक्षेवर होत आहे. २०१५ ते २०१९ या काळात ४२ लाख चौरस किलोमीटर इतक्या सुपीक जमिनीचे वाळवंटीकरण झाले आहे. आखाती देशांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. आफ्रिकेतील धुळीच्या वादळांमुळे अमेरिकेसह अन्य देशांतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर जात आहे.
  • आशिया-पॉसिपिक क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोगाने ऑगस्ट २०२१ मध्ये जाहीर केलेल्या अहवालात भारतातील ५० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला आणि तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, ताजाकिस्तान आणि इरानमधील सुमारे ८० टक्के लोकसंख्येला धूळ आणि रेतीच्या वादळांचा आणि त्यामुळे घसरलेल्या हवेच्या गुणवत्तेचा सामना करावा लागतो, असे म्हटले आहे.

04 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.