चालू घडामोडी आणि दिनविशेष - 31 ऑक्टोबर 2023

Date : 31 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे उद्या अनावरण
  • भारत आणि मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकरने एकापेक्षा एक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. विक्रमांच्या राशी रचणाऱ्या या महान खेळाडूकडून कायम नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण बुधवार १ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
  • वानखेडे स्टेडियमच्या ‘एमसीए’ लाउंजमध्ये होणाऱ्या या सोहळय़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते या पुतळय़ाचे अनावरण होईल.या सोहळय़ासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह, कोषाध्यक्ष आशीष शेलार आदी उपस्थित असतील.
  • या सोहळय़ासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वत: उपस्थित राहणार आहे. सचिन आणि वानखेडे यांचे नाते वादातीत आहे. या स्टेडियमवर त्यांनी धावांच्या राशी उभारल्या आहेत. भारताने २०११ मध्ये याच ठिकाणी विश्वचषक उंचावला. त्यामुळे सचिनच्या पुतळय़ासाठी यापेक्षा चांगली जागा कोणती असेल, अशी प्रतिक्रिया मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांनी दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र थंड; मुंबई व कोकण विभागात तापमानात वाढ
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात घट होत असताना मुंबई तसेच कोकण विभागात कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ होत आहे. हे तापमान किमान पाच दिवस तरी असेच चढते राहील.
  • कोकण विभागात अनेक ठिकाणी कमाल तापमानात ३५ अंशाच्या वर वाढ झाली आहे. तर मुंबईत देखील सांताक्रूझ, कुलाबा, डहाणू आणि रत्नागिरी येथेही तापमान ३५ अंशाच्या वर नोंदवण्यात आले आहे. कमालच नाही तर किमान तापमानातही वाढ होत आहे. गेला आठवडाभर राज्यात इतर ठिकाणी किमान तापमान उतरले असताना तसेच थंडीची जाणीव वाढलेली असताना मुंबई व कोकण विभागात मात्र दिलासा मिळताना दिसत नाही. गुजरातवर प्रत्यावर्तीय चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे.
  • हे वारे समुद्रावरून हवा घेऊन मध्य भारताजवळ आदळतात. त्यातच कोरड्या वाऱ्यांची भर पडते. त्यामुळे २५ ऑक्टोबरनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये गारवा निर्माण झाला आहे. परिणामी जळगावचे किमान तापमान १० ते ११ अंशांपर्यंत खाली उतरले आहे. कोकण आणि मुंबईत मात्र उच्च दाबाचे हवेचे क्षेत्र आहे. ही हवा उष्णता धारण केलेली आहे. त्यामुळे मुंबईचे कमाल तापमान सातत्याने चढत आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांची २० हजारांहून अधिक पदे रिक्त, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली
  • राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये विविध स्तरांवरील डॉक्टरांच्या मंजूर ५७ हजार ७१४ पदांपैकी २० हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची कबुली राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. त्यात विशेष अभ्यासक्रमाच्या (सुपर स्पेशालिटी) एक हजार ७०७ मंजूर पदांपैकी ८९३ पदे रिक्त असल्याचेही सरकारने म्हटले आहे.
  • ही रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याचा दावाही सरकारने प्रतिज्ञापत्रात केला आहे. राज्याच्या आरोग्य क्षेत्राच्या बळकटीकरणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यात, विभागाला अतिरिक्त अर्थसंकल्पीय वाटप आणि पूरक तरतूद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावाही सरकारने केला आहे. औषधे आणि उपकरणांच्या खरेदीकरिता २०२३-२४ या वर्षासाठी ८६७४.८५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचेही सरकारने म्हटले आहे.
  • या महिन्याच्या सुरुवातीला उघडकीस आलेल्या नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील मृत्युसत्राची उच्च न्यायलयाने स्वतःहून दखल घेतली होती. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची, आरोग्यासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची आणि या रुग्णालयांत किती तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत याची प्राथमिक माहिती सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण या चार विभागांनी सरकारी वकील पी. पी. काकडे यांच्यामार्फत सोमवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.
रद्दबातल सिंगूर नॅनो प्रकल्प : टाटा मोटर्सला पश्चिम बंगाल सरकारकडून ७६६ कोटींची भरपाई
  • बंद पडलेल्या सिंगूर प्रकल्पातील भांडवली गुंतवणुकीची भरपाई म्हणून पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाकडून ७६५.७८ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा निवाडा आपल्या बाजूने आल्याचे टाटा मोटर्सने सोमवारी स्पष्ट केले. तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या आंदोलनाने प्रकल्पासाठी जबरदस्तीने शेतजमीन ताब्यात घेतल्याचा आरोप केल्यानंतर, टाटा मोटर्सने २००८ मध्ये महत्त्वाकांक्षी ‘नॅनो’ कार तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या सिंगूर प्रकल्पामधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.
  • नियामकांकडे दाखल निवेदनांत, टाटा मोटर्सने स्पष्ट केले आहे की, ‘तीन सदस्यीय लवादाच्या न्यायाधिकरणासमोरील प्रलंबित लवादाच्या कार्यवाहीचा निकाल आता देण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी आलेल्या या निवाड्यानुसार, कंपनीला पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाकडून नुकसानभरपाईपोटी ७६५.७८ कोटी रुपये अधिक ११ टक्के दराने व्याज देण्यात येईल. न्यायाधिकरणाच्या अंतिम निवाड्यासह, लवादाची ही कार्यवाही संपुष्टात आली आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
स्थिर सरकारने केलेल्या विकासाने देशाची जगात प्रशंसा; पंतप्रधान
  • ‘‘स्थिर सरकार देणाऱ्या जनतेच्या सामर्थ्यांमुळेच देशाचा वेगाने विकास होत आहे. त्यामुळे भारताची जगभरात प्रशंसा होत आहे,’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला. गुजरातमधील महेसाणा जिल्ह्यातील खेरालू येथे पाच हजार ९५० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते.राज्यात दीर्घ काळ स्थिर सरकार राहिल्याने एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास कशी मदत झाली आणि त्याचा कसा फायदा झाला, हे गुजरातने अनुभवले आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की आपण एखादा संकल्प केला की त्याची पूर्तता करतोच.
  • देशात होत असलेल्या गतिमान विकासामुळे जगात भारत प्रशंसेस पात्र ठरत आहे. त्या विकासामागे व्यापक जनशक्तीचा लाभलेला पाठिंबा आहे. या जनतेनेच देशासाठी स्थिर सरकारची निवड केली आहे. मोदी म्हणाले की, जनतेला हे चांगले ठाऊक आहे, की मोठय़ा विकास प्रकल्पांमागे घेतलेले धाडसी निर्णय आणि गुजरातचा झपाटय़ाने होणारा विकास हा गेल्या अनेक वर्षांमध्ये रचलेला मजबूत पाया आहे.
  • तुम्ही आपल्या नरेंद्रभाईंना चांगले ओळखताच. पंतप्रधानपदापेक्षाही तुम्ही मला आपल्यातला नरेंद्र भाई म्हणून पाहता आणि तुमचा नरेंद्रभाई  कोणताही संकल्प केल्यानंतर त्याची पूर्तता करतोच.

 

कनिष्ठ जागतिक बॅडिमटन स्पर्धा - शंकर मुथूस्वामीला रौप्यपदक :
  • भारताच्या शंकर मुथूस्वामीने ‘बीडब्ल्यूएफ’ कनिष्ठ जागतिक अजिंक्तपद  बॅडिमटन स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शंकरला चायनीज तैपेईच्या कुओ कुआन लिनकडून पराभूत व्हावे लागले.

  • तमिळनाडूच्या शंकरने ४८ मिनिटे चाललेल्या लढतीत लिनकडून १४-२१, २०-२२ अशी हार पत्करली. यापूर्वी अपर्णा पोपट (१९९६), सायना नेहवाल (२००६) आणि सिरिल वर्मा (२०१५) यांनी प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा शंकर दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला.

  • अंतिम सामन्याच्या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. एकवेळ गेम १३-१३ असा बरोबरीत होता. मात्र लिनने आपला खेळ उंचावत गेम जिंकला आणि सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये लिनने ४-० अशी आघाडी घेतली. यानंतरही लिनने शंकरपेक्षा दर्जेदार खेळ करत गेमसह सामना जिंकला.

अंतराळ, सौर क्षेत्रात भारताची विस्मयजनक कामगिरी : मोदी ; ‘मन की बात’मध्ये ‘इस्रो’च्या यशाची प्रशंसा :
  • ‘‘भारत सौर आणि अंतराळ क्षेत्रात विस्मयजनक कामगिरी करत आहे. या यशामुळे अवघे जग चकित झाले आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आपल्या आकाशवाणीवरील मासिक संवाद सत्रात काढले.

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नुकतेच ३६ उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची मोहीम यशस्वी केली. शास्त्रज्ञ युवकांनी ही देशाला दिलेली विशेष दिवाळी भेट ठरली, असे सांगून मोदी म्हणाले, की या मोहिमेच्या यशामुळे संपूर्ण देशातील संपर्कयंत्रणा अत्याधुनिक आणि वेगवान होण्यास मदत होईल. अतिदुर्गम भागही उर्वरित देशाशी या संपर्कमाध्यमांद्वारे जोडले जातील.

  • आपल्या सरकारने प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मिळालेल्या यशाचे हे बोलके उदाहण आहे. जर देश स्वावलंबी झाला, तर उत्तुंग यशोशिखरे कशी गाठतो, याचेही हे उत्तम उदाहरण आहे. एके काळी भारताला ‘क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञान’ देणे विदेशांनी नाकारले होते. मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून, या यशाला गवसणी घातली.

भारत आता मोठे उत्पादन केंद्र ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन :
  • भारतात नवी मानसिकता आणि कार्यसंस्कृती तयार झाली असून, त्या बळावर देश जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून उदयास आला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ‘टाटा-एअरबस’च्या ‘सी-२९५’ मालवाहू विमाननिर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळय़ात ते बोलत होत़े

  • ‘‘सरकारच्या स्थिर, विश्वासार्ह आणि भविष्यवेधी धोरणांमुळे देश आर्थिक प्रगतीच्या वाटेवर आहे. मेक-इन-इंडिया आणि मेक-फॉर-वल्र्ड या दृष्टिकोनामुळे आपली ताकद अधिक वाढली,’’ असे  पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

  • भारत विमाननिर्मितीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे केंद्र होईल. त्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल आज टाकण्यात आले आहे. सुटय़ा भागांपासून संपूर्ण विमाननिर्मिती, असा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. ‘सी-२९५’ विमानांचे उत्पादन बडोद्यात होत असल्यामुळे केवळ लष्करालाच फायदा होईल असे नव्हे, तर त्यामुळे देशात विमाननिर्मितीचे क्षेत्र विकसित होणार असल्याचे मोदी म्हणाले.

  • या सोहळय़ाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, एअरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिलूम फुरी आदी उपस्थित होते.

१४ हजार ९५६ जागांसाठी होणारी पोलीस भरती पुढे ढकलली, नवीन जाहिरात कधी :
  • करोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे. असं असताना अलीकडेच सरकारने नोव्हेंबरपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर सरकारने लगेच यू-टर्न घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही भरती पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे.

  • खरं तर, राज्य पोलीस मुख्यालयाकडून एकूण १४ हजार ९५६ जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. पण प्रशासकीय कारणास्तव ही भरती पुढे ढकलण्यात आली. ही भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संबंधित भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पोलीस भरतीबरोबर राज्य राखीव दलातील पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

  • खरं तर, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ३ नोव्हेंबरला अर्ज भरायला सुरुवात होणार होती. पण या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांचा पुन्हा हिरमोड झाला. आज पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक प्रसिद्धपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलीस भरतीची नवी जाहिरात लवकर जाहीर करण्यात येईल, असंही प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

Indian Cricket महिला क्रिकेटपटूंनाही समान मानधन… पण :
  • बीसीसीआयने गेल्या आठवड्यात देशातील महिला क्रिकेटपटूंसाठी एक उत्साहवर्धक घोषणा केली.त्यानुसार आता भारतातर्फे कसोटी, एकदिवसीय आणि टी२० या तिन्हींपैकी कोणत्याही प्रकारामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूस पुरुष क्रिकेटपटू एवढेच म्हणजे कसोटीसाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख तर टी२० साठी तीन लाख रुपये एवढे मानधन देण्यात येईल .या आधी महिला क्रिकेटपटूंना अनुक्रमे कसोटीसाठी अडीचलाख तर टी२० साठी एक लाख रुपये एवढीच रक्कम मिळत होती! हे आकडे पाहाता भारतीय महिला क्रिकेटमध्ये आता येऊ घातलेल्या मोठया स्थित्यंतराची ही नांदी आहे असे म्हणावे लागेल.

  • २०१७ मध्ये तत्कालीन प्रशिक्षक डब्लू. व्ही. रामन यांच्या कारकिर्दीत भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली,यंदा तर कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सिल्व्हर मेडल नंतर इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये ३/० असा ‘वन डे’ मालिकेतील विजय, बांगलादेशमध्ये आशिया चषक स्पर्धेत जेतेपद असा प्रगतीचा चढता आलेख क्रिकेट रसिक अनुभवत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने उचललेले पाऊल समयोचित म्हणावे लागेल. पुढील वर्षापासून महिला क्रिकेटच्या आयपीएलला देखील सुरुवात होत आहे.

  • बीसीसीआयच्या या ‘गेम चेजिंग’ निर्णयाचे भारतीय कर्णधार हरमनप्रित कौर ने ‘रेड लेटर डे’ अशा शब्दात स्वागत केले आहे. माजी कर्णधार शांता रंगास्वामी म्हणतात,” १९७३ ते १९९४ या माझ्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत मी क्रिकेट खेळून काहीही अर्थप्राप्ती केली नाही” . १९७६ ते १९९३ या दरम्यान भारतासाठी २०कसोटी व ३४ ‘एकदिवसीय’ सामने खेळलेल्या डायना एदुलजी म्हणतात, “ही बातमी म्हणजे खेळाडूंसाठी एक चांगली दिवाळी भेट आहे!” त्यानी स्वतः २०१७ पासून तीन वर्षे बीसीसीआय वर प्रशासक म्हणून काम पाहिले आहे.

31 ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.