चालू घडामोडी आणि दिनविशेष - 28 नोव्हेंबर 2023

Date : 28 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हार्दिक पंड्याने IPL च्या १० वर्षात केलेली कमाई वाचून व्हाल थक्क! कसा बदलला पंड्याचा पगार, पाहा तक्ता
  • टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स (GT) कडून ऑल-कॅश ट्रेडद्वारे व्यवहार झाल्यानंतर आता त्याच्या जुन्याफ्रेंचायझी मुंबई इंडियन्स (MI) मध्ये परतला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्यासाठी गुजरात टायटन्सला १५ कोटी दिल्याचे समजतेय. प्राप्त माहितीनुसार यापूर्वी पांड्याने सात आयपीएल हंगामांसाठी मुंबई इंडियन्ससोबत करार केला होता, २०२२ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केले होते. गुजरात टायटन्सचे त्यांच्या पदार्पणाच्या वर्षातच पांड्याकडे नेतृत्वाची संधी सोपवली होती. गुजरात टायटन्सच्या निर्मितीपासून एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळवून दिल्यावर पंड्याला रिलीज करण्यात आले आहे. आयपीएलच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत हार्दिक पंड्याच्या खेळाडू ते कर्णधार भूमिकेसह त्याचा पगार सुद्धा वाढला आहे.
  • मुंबई इंडियन्सने २०१५ च्या लिलावात १० लाख रुपयांच्या मूळ किमतीत पंड्याला संघात समाविष्ट केले होते. तेथून पुढे, एमआयसाठी सुवर्णकाळात हार्दिक पंड्याची रँक सुद्धा वाढत गेली. सहा वर्षांच्या कालावधीत मुंबईच्या चार विजेतेपदांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या पंड्याने मागे वळून पाहिलेलं नाही.
  • पहिल्या दोन हंगामात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरल्यानंतर, पंड्या अखेरीस २०१७ मध्ये त्याच्या महत्त्वपूर्ण खेळींसह प्रसिद्धीच्या झोतात आला. याच हंगामात ३५.७१ च्या सरासरीने आणि १५६.२५ च्या स्ट्राइक रेटने त्याने २५० धावा केल्या. त्याने हंगामात ६ विकेट्स सुद्धा घेतल्या होत्या ज्यामुळे MI ने त्याला २०१८ च्या मेगा लिलावापूर्वी ११ कोटींच्या किमतीत रिटेन केले. पंड्याने २०१८ आणि २०१९ मध्ये त्याच्या यशस्वी हंगामात अनुक्रमे २६० आणि ४०२ धावा केल्या. त्याने दोन मोसमात ३२ विकेट्स देखील मिळवल्या ज्यामुळे संपूर्ण अष्टपैलू म्हणून त्याचा दबदबा तयार झाला.
  • तीन सीझनसाठी राखून ठेवल्यानंतर, पंड्याला मुंबई इंडियन्सद्वारे २०२१ च्या आवृत्तीपूर्वी रिलीझ केले गेले परंतु फ्रँचायझीने त्याला पुन्हा एकदा ११ कोटी रुपयांना विकत घेतले. तथापि, या अष्टपैलू खेळाडूला २०२१ मध्ये हवे तसे यश हाती आले नाही १२ सामन्यांत केवळ १२७ धावा करणाऱ्या पंड्याला, २०२२ मध्ये मेगा लिलावापूर्वी पुन्हा एकदा MI द्वारे रिलीज केले गेले पण यामुळेच पंड्याचे नशीब बदलले.
आरोग्य विभागाच्या ३५ हजार कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालूच; ३२ व्या दिवशी तोडगा नाही!
  • आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सुमारे ३५ हजार कंत्राटी डॉक्टर- कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या ३२ व्या दिवशीही संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. संपकरी कर्मचाऱ्यांनी १२ डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून या संपामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान ही योजना राज्यात २००५ पासून सुरू झाली तेव्हापासून डॉक्टर, तंत्रज्ञ तसेच आरोग्य विषयक वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने या अभियानात भरती करण्यात येत आहे. समान काम समान वेतन तसेच सेवेत कायम करण्यात यावे ही मागणी करत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या ३५ हजार कर्मचाऱ्यांनी २२ ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ग्रामीण भागातील लाखो शालेय बालकांच्या आरोग्याची तपासणी, जवळपास १०,८०० उपकेंद्रांमधील बाह्यरुग्ण तपासणी, गरोदर मातांचे व बालकांचे लसीकरण, उपकेंद्रात होणार्या प्रसुती, आरोग्य विषयक नोंदणी, कुष्ठरुग्ण व सिकलसेल रुग्णांची तपासणी व उपचार आदी ग्रामीण भागातील आरोग्य विषयक सर्व कामे या संपामुळे ठप्प झाली आहेत. आरोग्य विषयक डाटा एंट्री काम बंद झाल्यामुळे आरोग्य विषयक अचुक आकडेवारी उपलब्ध होऊ शकत नाही, असे आरोग्य संचालनालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
  • आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ३१ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात या संपकरी कर्मचाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती तसेच आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणाऱ्यांना सेवेत टप्प्या टप्प्याने कामावर घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. दहा वर्षे ज्यांची सेवा झाली आहे अशा ३० टक्के कर्मचार्यांना पहिल्या टप्प्यात सेवेत कायम केले जाईल असे आश्वासन आरोग्यमंत्री सावंत यांनी बैठकीत दिल्याचे आंदोलनाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मंत्र्यांनी दिलेले आश्वासन लिखित स्वरूपात दिल्यास संप मागे घेण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.
  • याबाबत आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना विचारले असता संपावरील कर्मचाऱ्यांबरोबर आमच्या चर्चा सुरु असल्याचे सांगितले. एकीकडे या चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे आंदोलक हिंगोली, परभणी, जालना, लातूर, नंदुरबार, गडचिरोली आदी जिल्ह्याच्या ठिकाणी रोज आंदोलन करत आहेत. कधी सफाई करून तर कधी पीपीई किट घालून आंदोलन सुरु आहे. वेगेवेगळ्या जिल्ह्यात आमदारांना निवेदन देत आहेत. २२ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिल्यावर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य आयुक्त धीरजकुमार यांना तात्काळ या संपात मार्ग काढण्यास सांगितले. नागपूर येथे आंदोलनातील १०८ महिला डॉक्टर – कर्मचार्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ओवाळून भाऊबीज म्हणून मागण्यांबाबत निवेदन दिले. एवढे करूनही संपाच्या ३२ व्या दिवशी तोडगा न निघाल्यामुळे नागपूर अधिवेशनात १२ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मारुती सुझुकीच्या मोटारी महागणार, उत्पादन खर्चात वाढ झाल्याने जानेवारीपासून किंमतवाढ
  • देशातील सर्वाधिक खपाची मोटार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीने येत्या जानेवारीपासून मोटारींच्या किंमती वाढवत असल्याचे सोमवारी जाहीर केले. उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि वाढलेली महागाई यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
  • मारूती सुझुकीने या संबंधाने सोमवारी भांडवली बाजाराला माहिती दिली. कंपनीने किंमतीतील वाढ नेमकी किती असेल हे जाहीर केले नसले तरी, मॉडेलनुसार किमतीतील वाढ वेगवेगळी असेल, असे स्पष्ट केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, जानेवारी २०२४ पासून आमच्या मोटारींच्या किमतीत वाढ करण्याची योजना आखण्यात आली आहे. एकूणच वाढलेली महागाई आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातूनच किंमत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किमती फार वाढू नयेत, यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.
  • मारूती सुझुकीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात १.९९ लाख मोटारींची विक्री केली. आतापर्यंतची ही उच्चांकी मासिक विक्री ठरली आहे. याचवेळी कंपनीचा नफा सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत ८०.३ टक्क्यांनी वाढून ३,७१६ कोटी रुपयांवर पोहोचला. विक्रीत झालेली वाढ, कच्चा मालाच्या वस्तूंच्या कमी झालेल्या किमती यामुळे उत्पादन खर्चात कपात होऊन नफ्यात वाढ झाली होती.

छोट्या मोटारींकडे पुन्हा ग्राहकांचे वळण

  • नागरिकांचे उत्पन्न वाढत असून, अर्थव्यवस्थेची वाढही वेगाने होत आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन वर्षांत छोट्या मोटारी परवडणाऱ्या दरात पुन्हा मिळू शकतील. मागील काही काळात छोट्या मोटारींची विक्री कमी झाली असून, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल अर्थात एसयूव्हींना ग्राहकांची सर्वाधिक पसंती दिसून येत आहे. तथापि पुढील काळातवाढत्या अर्थव्यवस्थेसह, वाढत्या आकांक्षांसह पुढे येणाऱ्या नव-मध्यमवर्गानुरूप छोट्या मोटारींना पुन्हा मागणी वाढेल, असा कंपनीचा अंदाज आहे.
विकास दराबाबत ६.४ टक्क्यांचा अंदाज , ‘एस अँड पी’चे ०.४ टक्क्यांच्या अधिक वाढीचे सुधारीत अनुमान
  • भारताच्या विकास दराचा चालू आर्थिक वर्षासाठीचे अनुमान एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने सहा टक्क्यांवरून वाढवून ६.४ टक्क्यांवर नेले आहे. मात्र, पुढील आर्थिक वर्षातील विकास दराचा अंदाज तिने अर्धा टक्क्यांनी घटवून ६.४ टक्क्यांवर खाली आणला आहे.
  • एस अँड पी ग्लोबलने आशिया प्रशांत विभागाचा आर्थिक पाहणी अहवाल सोमवारी जाहीर केला. या अहवालानुसार, भारताच्या विकास दराचा म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाढीचा चालू आर्थिक वर्षातील अंदाज वाढवून ६.४ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. आधी हा अंदाज ६ टक्के वर्तविण्यात आला होता. खाद्यवस्तूंची महागाई आणि कमी झालेली निर्यात या प्रतिकूल गोष्टी असतानाही देशांतर्गत मागणी वाढत असल्याने विकास दराच्या अंदाजात सुधारणा करण्यात आली आहे.

पुढील वर्षाच्या अनुमानांत कपात का?

  • जागतिक पातळीवरील मंदीचे वारे आणि उच्च व्याजदराचा परिणाम यामुळे चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी विकास दराचा अंदाज ६.९ टक्क्यांवरून कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. मात्र, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचा विकास दराचा अंदाज ६.९ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

महागाई दर ५.५ टक्के राहणार!

  • जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कांदा, टॉमेटो यासह खाद्यवस्तूंची तीव्र स्वरूपाची किंमतवाढ भारताने अनुभवली आहे. त्याचा एकूण महागाई दरावर लक्षणीय परिणाम झाला नसला तरी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारीत किरकोळ महागाईचा दर हा रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा अधिक आहे. आगामी काळातही तो या उद्दिष्टापेक्षा अधिक राहण्याचीच चिन्हे आहेत. भारतातील किरकोळ महागाईचा दर चालू आर्थिक वर्षात सरासरी ५.५ टक्क्यांवर राहील, असा ‘एस अँड पी’चा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेने जरी महागाई दरासंबंधाने ४ टक्क्यांचे लक्ष्य निर्धारीत केले असल्याचे म्हटले असले तरी, ‘एस अँड पी’च्या अनुमानाप्रमाणे तो ६ टक्के या उच्चतम स्तर मर्यादेच्या आत राहणे अपेक्षित आहे. पुढील आर्थिक वर्षात महागाईचा दर कमी होणार असला तरी तो ४.५ टक्क्यांच्या मर्यादेपर्यंतच घसरेल, असेही तिने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; फलंदाजांकडून सातत्याची आस, विजयी आघाडीचे भारताचे लक्ष्य!
  • पहिल्या दोन सामन्यांतील विजयानंतर भारतीय संघाचे आज, मंगळवारी गुवाहाटी येथे होणारा तिसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकून पाच सामन्यांच्या या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे लक्ष्य असेल. तसेच फलंदाज आपल्या कामगिरीतील सातत्य टिकवतील अशीही संघ व्यवस्थापनाला आशा असेल.सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यांत उत्तम खेळ केला. पहिल्या सामन्यात भारताने २०९ धावांचा यशस्वी पाठलाग केला, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर भारताने २३५ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा, विशेषत: फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.
  • भारतीय संघातील युवा फलंदाज निडरपणे आणि कोणत्याही दडपणाविना खेळताना दिसत आहेत. डावखुऱ्या इशान किशनने सलग दोन सामन्यांत अर्धशतके साकारताना भारताच्या विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वालने २५ चेंडूंत ५३ धावांची खेळी करताना भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याचा सलामीचा साथीदार ऋतुराज गायकवाड पहिल्या सामन्यात खातेही न उघडता धावचीत झाला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करताना ४३ चेंडूंत ५८ धावांची खेळी साकारली. तसेच डावखुऱ्या रिंकू सिंहने पुन्हा विजयवीराची भूमिका चोख बजावताना ९ चेंडूंतच नाबाद ३१ धावा फटकावल्या. आता गुवाहाटीच्या ४० हजार आसनक्षमता असलेल्या स्टेडियमवरही चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यासाठी भारतीय फलंदाज उत्सुक असतील.
  • दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अनिवार्य आहे. स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस आणि अॅडम झॅम्पा यांसारखे ऑस्ट्रेलियाचे अनुभवी खेळाडू नऊ आठवड्यांपासून भारतात आहेत. त्यामुळे या खेळाडूंमध्ये थकवा जाणवत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाला विजय मिळवायचा झाल्यास या खेळाडूंनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.
  • वेळ : सायं. ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा

 

पी. टी. उषा ‘आयओए’ची पहिली महिला अध्यक्ष :
  • भारताची माजी अव्वल धावपटू ‘पायोली एक्सप्रेस’ पी. टी. उषा  भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए)पहिली महिला अध्यक्ष होणार आहे. ‘आयओए’च्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी केवळ पी.टी. उषाचा अर्जच दाखल झाला आहे.

  • ‘आयओए’ची निवडणूक १० डिसेंबरला होणार आहे. अर्ज भरण्याची अखेरची मुदत संपल्यानंतर अध्यक्षपदासाठी केवळ उषाचाच अर्ज आल्यामुळे तिची बिनविरोध निवड निश्चित असून, त्यावर केवळ शिक्कामोर्तब बाकी आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी २५ ते २७ नोव्हेंबर अशी तीन दिवसांची मुदत होती. मात्र, पहिल्या दोन्ही दिवशी कुणीच अर्ज केला नाही. अखेरच्या दिवशी विविध पदासाठी २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.   

  • अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष (१ जागा), दोन उपाध्यक्ष (एक पुरुष, एक महिला), कोषाध्यक्ष (१ जागा), सह सचिव (एक पुरुष, एक महिला), कार्यकारी परिषद (६ जागा, यातील दोन जागा सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंसाठी राखवी, एक पुरुष-एक महिला), कार्यकारी परिषदेमध्ये दोन सदस्य खेळाडू समितीमधील असतील.

राज्यातील १० टक्क्यांपेक्षा कमी अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर :
  • राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) एकूण अधिकाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत किमान ४० टक्के अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असावेत, अशी तरतूद असली तरी सध्या १० टक्क्यांपेक्षा कमी अधिकारी हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

  • राज्यांमधून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याचे प्रमाण फारच अल्प आहे. यामुळेच गेल्या वर्षी केंद्र सरकारने नियमात बदल करण्याचे जाहीर करताच त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. केंद्र सरकारने प्रतिनियुक्ती नियम १९५४ मधील कलम ६ मध्ये दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे प्रतिनियुक्तीत केंद्र सरकारचे वर्चस्व राहणार असा राज्यांचा सूर आहे. विशेषत: विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांनी या बदलाला विरोध दर्शविला होता, कारण कोणत्याही अधिकाऱ्याची केंद्रात प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्याचे अधिकार केंद्राला मिळणार आहेत.

  • महाराष्ट्रात सध्या ३४० आय.ए.एस. अधिकारी सेवेत आहेत. यापैकी किमान ८० अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असावेत, अशी केंद्राची अपेक्षा असते; पण मुंबई किंवा राज्याच्या विविध भागांमध्ये काम करणारे अधिकारी नवी दिल्लीत जाण्यास फारसे उत्सुक नसतात. सध्या फक्त २१ अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

  • केंद्र सरकारची दिल्लीस्थित कार्यालये अथवा केंद्रीय मंत्र्यांची अस्थापना याऐवजी राज्यातच विविध विभागांचे प्रमुख, महानगरपालिका आयुक्त, मंत्रालयात विविध खात्यांचे सचिव, प्रधान सचिव अथवा अपर मुख्य सचिव म्हणून कर्तव्य बजावण्यात धन्यता मानतात.

प्रजासत्ताक दिन सोहळय़ासाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे :
  • यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल-सीसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात इजिप्तला दिलेल्या भेटीदरम्यान अब्देल फतेह अल -सीसी यांना भारताकडून औपचारिक आमंत्रण दिले होते. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला पहिल्यांदाच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • करोना संसर्गामुळे २०२१ आणि २०२२ या दोन वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ासाठी भारताकडून कोणत्याही देशाच्या नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले नव्हते.

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद :
  • इंडियन प्रिमीअर लीग ( आयपीएल ) २०२२ मधील अखेरचा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्याने आता मोठा विश्वविक्रम केला आहे. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या संख्येची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. बीसीसीआय आणि सचिव जय शाह यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

  • बीसीसीआयने सांगितलं की, “आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भारताने आपलं नाव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवलं गेलं आहे. चाहत्यांच्या समर्थनामुळे हे शक्य झालं,” असे बीसीसीआयने म्हटलं.

  • जय शाह म्हणाले की, “२९ मे २०२२ साली नरेंद्र मोदी स्टेडियमवर १०१,५६६ प्रेक्षकांनी अंतिम सामना पाहिला. ट्वेन्टी-२० सामन्यात सर्वाधिक उपस्थितीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला, अभिमान वाटला. सर्व चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन,” असे जय शाह यांनी म्हटलं.

  • अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना पार पडला. २९ मे २०२२ साली झालेल्या या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात १०१,५६६ प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती.

आरोग्य वार्ता - स्वच्छतागृहात मोबाइलचा वापर धोकादायक :
  • मोबाइल फोन लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अनेक जण सकाळी उठल्यानंतर लगेचच मोबाइल हातात घेतात आणि रात्री मोबाइल पाहतच झोपतात. एवढेच नव्हे, काहींना तर त्याची एवढी सवय झाली आहे की, ते स्वच्छतागृहातही मोबाइल घेऊन जातात; पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे, हे संशोधनात स्पष्ट झाले आहे.

  • पचनासंबंधी समस्येमुळे मूळव्याध होते; परंतु स्वच्छतागृहात मोबाइलचा वापर हेसुद्धा या व्याधीचे एक प्रमुख कारण ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्यानंतरही त्यामध्ये किटाणू कसे असू शकतात, असे अनेकांना वाटते; पण, मोबाइलमुळे स्वच्छतागृहात अधिक वेळ जातो. या दरम्यान किटाणू मोबाइलला चिकटतात. त्यांचा संसर्ग झाल्यानंतर पोटदुखी आणि युरिनल ट्रक्स इन्फेक्शन  यांसारखे आजार होतात.

  • विशेष म्हणजे मोबाइल घेऊन स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्याच्यासोबत असंख्य किटाणू आणि जिवाणू येतात आणि ते घरात पसरतात. हे संपूर्ण कुटुंबासाठी धोकादायक ठरते.

  • स्वच्छतागृहातील वस्तूंवर ई-कोली हे जिवाणू असतात. ते फक्त आतडय़ांसंबधी आजारांचेच कारण ठरत नसून ते अतिसारासारख्या आजारालाही आमंत्रण देणारे ठरतात, असेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

28 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.