सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ जुलैपर्यंत लागणार आहे. सीबीएसई आणि आयसीएसईने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. बोर्डांना गुणांबाबत निकष ठरवण्याचा अधिकार असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सीबीएसईला दहावी आणि बारावीच्या उर्वरित बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्याचं परिपत्रक काढण्याची संमती दिली आहे.
परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सर्वोच्च न्यायलयात सीबीएसई दहावी आणि बारावीचा बोर्ड निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सीबीएसईला रद्द झालेल्या परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी मूल्यांकन योजनेची अमलबजावणी करण्यास परवानगी दिली आहे. संयम भारद्वाज यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या विद्यार्थ्यांना आपले गुण वाढवण्यासाठी पर्यायी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल असं सांगितलं।
सीबीएसई मूल्यांकन योजनेत बोर्ड परीक्षेतील शेवटच्या तीन पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण गृहित धरणार आहे. संयम भारद्धाज यांनी जर विद्यार्थ्यांनी पर्यायी परीक्षा देण्याचा पर्याय निवडला तर त्याआधारे अंतिम गुण ठरवले जातील असं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.
भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार असं वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेला अनपेक्षित असा फटका बसला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था दोन वर्षे धीम्या गतीने प्रगती करेल तसंच भारताचा जीडीपी पुढची दोन वर्षे अवघा एक टक्क्याने वाढेल असं त्यांनी म्हटलं आहे.
सध्याच्या करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत असाही एक सल्ला गीता गोपीनाथ यांनी दिला आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेत सुधारणा आणायच्या असतील तर लघू आणि मध्यम उद्योग करणाऱ्यांना आणखी आर्थिक उभारी द्यावी लागेल असंही त्यांनी सुचवलं आहे.
डेबिट कार्ड वापरुन ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ जुलैपासून ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन एप्रिल, मे, जून हे तीन महिने काही नियम शिथील करण्यात आले होते. मात्र १ जुलैपासून हे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे १ जुलैपासून तुमचं एटीएममधून पैसे काढणं महाग होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्रालयाने करोना काळात ATM मधून पैसे काढण्याच्या शुल्कावर सूट दिली होती. एप्रिल, मे, जून हे तीन महिने ही सूट होती. त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता ३० जूनला ही सूट संपते आहे. त्यामुळे पूर्वीचे जे नियम होते तेच १ जुलैपासून लागू होणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यावरच्या चार्जेसचा समावेश आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या बँकेच्या ATM मधूनच पैसे काढणं सोयीचं ठरणार आहे. उदा. तुमचं अकाऊंट HDFC बँकेत आहे आणि तुम्ही एसबीआय किंवा इतर बँकेतून पैसे काढले तर तो व्यवहार सशुल्क असू शकतो.
देशांतर्गत प्रवासी विमानसेवा टप्याटप्याने सुरु करण्यात येत असताना आंतरराष्ट्रीय विमानसेवा मात्र अद्यापही सुरु झालेली नाही. जगावर असलेलं करोनाचं संकट अद्यापही कमी झालेलं नाही.
यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १५ जुलैपर्यंत प्रस्तावित असणारी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची उड्डाणं रद्द असणार आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केला आहे.
आदेशात देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा आदेश आंतरराष्ट्रीय कार्गो ऑपररेशन तसंच नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून संमती मिळालेल्या विमानांना लागू असणार नाही.
योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने बनवलेले करोनिल औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या औषधावरुन आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
करोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.