चालू घडामोडी आणि दिनविशेष - 27 जुलै 2023

Date : 27 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विजयी सलामीचे भारताचे ध्येय; भारत-विंडीज पहिला एकदिवसीय सामना आज
  • वेस्ट इंडिजविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल, तर यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी इशान किशन आणि संजू सॅमसन यांमध्ये चुरस पहायला मिळेल.भारतीय संघ आशिया चषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी या मालिकेच्या माध्यमातून खेळाडूंचे योग्य संयोजन बसवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही कसोटी सामन्यांप्रमाणेच भारताचे पारडे एकदिवसीय मालिकेतही जड राहणे अपेक्षित आहे. मात्र, मालिकेत सूर्यकुमार, इशान, सॅमसन, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिकसारख्या खेळाडूंवर विशेष लक्ष राहणार आहे.
  • ट्वेन्टी-२० प्रारूपातील आपली लय एकदिवसीय सामन्यांमध्ये कायम राखण्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमारचा प्रयत्न जायबंदी श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत चौथ्या स्थानावर आपली दावेदारी भक्कम करण्याचा राहील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलग तीन सामन्यांत पहिल्या चेंडूवर बाद झालेल्या सूर्यकुमारला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
  • केएल राहुलच्या अनुपस्थितीत इशान आणि सॅमसनकडे यांच्याकडे दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या जागेसाठी स्थान मजबूत करण्याची संधी आहे. तसेच, विश्वचषक स्पर्धेपूर्वी राहुल पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता कमीच आहे. या वेळी अधिक संधी मिळण्याची अपेक्षा सॅमसनला असेल. कसोटी मालिकेत चमक दाखवणाऱ्या इशानला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मध्यक्रमासाठी सॅमसन व सूर्यकुमार यांमध्ये चुरस पाहायला मिळेल.
मुंबई विद्यापीठानं आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नव्या तारखेबाबत दिली ‘ही’ माहिती!
  • गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह काही भागात हवामान विभागाकडून रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • काही भागांत सरकारी विभागांना व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून सर्व संलग्न विद्यापीठे व विद्यार्थ्यांच्या आज २७ जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
रेल्वे स्थानकाचे रुप पालटणार! काय आहे अमृत भारत योजना?
  • रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत देशभरातील एक हजार ३०९ स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. यात पुण्यासह लोणावळा, दौंड, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इतर स्थानकांचा समावेश आहे.
  • केंद्र सरकारने अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत देशभरात एक हजार ३०९ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यात पुण्यासह अकोला, भुसावळ, चंद्रपूर, कोल्हापूर, दादर, गुलबर्गा, जळगाव, कल्याण, कुर्ला, मलकापूर, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर, नाशिक रोड, सोलापूर, ठाणे, वर्धा, लोणावळा, मनमाड, अमरावती, मिरज, अहमदनगर, माथेरान, चाळीसगाव, देवळाली, शेगाव, कराड, सांगली, दादर, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, धरणगाव या स्थानकांचा समावेश आहे.

कशा पद्धतीने होणार विकास?

  • स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा
  • स्थानक परिसराचे सुशोभीकरण
  • स्थानक प्रवेशद्वारांचा विकास
  • स्थानकावर प्रतीक्षागृहांची उभारणी
  • स्वयंचलित जिन्यांची उभारणी
  • स्थानकातील अंतर्गत रचनेत सुधारणा
  • स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा
  • एक देश, उत्पादन योजनेंतर्गत विक्री केंद्र
  • मोफत वाय-फाय किऑस्क
शाळांमध्ये स्मार्टफोन बंदी आणाच, युनेस्कोची शिफारस; ‘डिजिटल क्रांती’बाबत व्यक्त केली चिंता!
  • कोविड २०१९ नंतर अनेक क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले आहेत. या काळात ऑनलाईन जगण्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. शिक्षण क्षेत्रातही डिजिटल क्रांती घडून आली. परंतु, शिक्षण क्षेत्रातील ही डिजिटल क्रांती विद्यार्थ्यांसाठी चिंताजनक असल्याचं मत युनेस्कोच्या अहवालातून नोंदवण्यात आलं आहे. अभ्यासातील व्यत्यय टाळणे, शिकण्यात सुधारणा करण्यासाठी आणि मुलांचे साबयर बुलिंगपासून संरक्षण करण्याकरता शाळांमध्ये स्मार्टफोनमध्ये बंदी घालावी, अशी शिफारस यूनेस्कोने (The United Nations Educational, Scientific and Cultural Organization) त्यांच्या अहवालातून केली आहे. दि गार्डियन या वृत्तसंकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
  • “मोबाईलचा अतिरिक्त वापर झाल्याने शैक्षणिक कामगिरी मंदावते. स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांच्या भावनिक स्थिरतेवर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी मुलं चिडचिडी आणि रागिट बनतात”, असंही युनस्कोने म्हटलं आहे. अनेक शाळांमधून आज ऑनलाईन शिक्षण दिलं जातं. अनेक विद्यापीठातही ऑनलाईन शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. मात्र, या सोयीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याकडे युनेस्कोने लक्ष वेधले आहे. “विकासाच्या दृष्टीने केलेले नवे प्रयोग चांगलेच असतात असं नाही. प्रत्येक बदलाने प्रगतीच साधली जाते असे नाही. काहीतरी नवे करणे गरजेचे असले तरी ते केलेच पाहिजे असे नाही”, असा निष्कर्षही युनेस्काने काढला आहे.

शिक्षक प्रथम असले पाहिजेत

  • “ऑनलाईन शिक्षण देताना शिक्षणाच्या सामाजिक परिणामांकडे दुर्लक्ष करून नये”, असे आवाहनही करण्यात आले आहे. “डिजिटल क्रांतीमध्ये अतुलनीय क्षमता आहे. परंतु, समाजात त्याचे नियमन केले जात नाही. तसंच, शिक्षणक्षेत्रात या डिजिटल क्रांतीचा कसा वापर केला जातोय, याकडे लक्ष देणे गरजेचं आहे”, असं युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझौले म्हणाल्या. “शिक्षणातील डिजिटल क्रांती ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झाली पाहिजे. हा बदल विद्यार्थ्यांसाठी धोका ठरू नये. विद्यार्थ्यांच्या गरजा प्रथम ठेवा. ऑनलाईन सुविधा हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादासाठी पर्याय असू नये. शिक्षक प्रथम असले पाहिजेत”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

 

मास्टरकार्ड घेणार पेटीएमची जागा! बीसीसीआयने केला शीर्षक प्रायोजकत्वासाठी करार :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मास्टरकार्डसोबत शीर्षक प्रायोजकत्वासाठी करार केला आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून भारतीय संघाचा शीर्षक प्रायोजक पेटीएमऐवजी मास्टरकार्ड असेल. विशेष म्हणजे, पेटीएमने स्वत: आपले सर्व अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंती बीसीसीआय केली होती होती. पेटीएमची ही विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे.

  • २०१९ मध्ये, बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी पेटीएमचे शीर्षक प्रायोजकत्व चार वर्षांसाठी वाढवले होते. त्यासाठी पेटीएमला २०१९ ते २०१३ या काळासाठी ३२६.८० कोटी रुपये बीसीसीआयला देणे होते. २०१९ पासून प्रत्येक सामन्यासाठी पेटीएम ३.८० कोटी रुपये खर्च करत होते. मात्र, आर्थिक अचडणीपोटी पेटीएमने शीर्षक प्रायोजकत्व सोडण्याचा निर्णय घेतला. यासोबतच आपले अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंतीही बीसीसीआयकडे केली होती.

  • बायजूकडे ८६.२१ कोटी रुपयांची थकबाकी - भारतीय संघाच्या जर्सीचे प्रायोजक असलेल्या बायजूचे बीसीसीआयची ८६.२१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या वर्षी एप्रिलमध्ये एज्युटेक कंपनी असलेल्या बायजुने २०२३ मध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत आपला करार वाढवून घेतला आहे. बीसीसीआयने कराराच्या रकमेत १० टक्के वाढ करून मुदत वाढवली होती.

माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे श्रीलंकेत परतण्याची शक्यता :
  • श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोताबया राजपक्षे हे लपलेले नसून ते सिंगापूरहून मायदेशी परतण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचे प्रवक्ते बंदुला गुणवर्धने यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

  • राजपक्षे यांनी ९ जुलै रोजी झालेल्या जनआंदोलनाच्या उद्रेकानंतर श्रीलंकेतून पलायन केले होते. १९४८ पासून प्रथमच श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अर्थव्यवस्थेबाबत अपयशी ठरल्याबद्दल राजपक्षे यांच्या विरोधात अनेक महिन्यांच्या निदर्शने-आंदोलनानंतर नागरिकांनी राष्ट्रपती निवासस्थान ताब्यात घेतले होते. त्यानंतर १३ जुलैला राजपक्षे मालदीवला गेले व दुसऱ्या दिवशी ते सिंगापूरला रवाना झाले होते.

  • मंगळवारी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकारांनी राजपक्षे यांच्याबद्दल विचारले असता, मंत्रिमंडळाचे प्रवक्ते व परिवहन, महामार्ग आणि जनसंपर्क मंत्री गुणवर्धने यांनी सांगितले, की माजी अध्यक्ष हे सिंगापूरमध्ये लपलेले नाहीत. ते सिंगापूरहून परत येण्याची शक्यता आहे. गोताबया देशातून

  • पळून जाऊन लपले आहेत, यावर माझा विश्वास नाही. मात्र, त्यांनी राजपक्षेंच्या संभाव्य पुनरागमनाबाबत इतर कोणताही तपशील सांगितला नाही.

  • सिंगापूरने १४ जुलै रोजी श्रीलंकेच्या गोताबया यांना खासगी भेटीसाठी सिंगापूरमध्ये १४ दिवसांचा अल्प मुदतीचा प्रवासी पास मंजूर केला आहे. सिंगापूरमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने यापूर्वी सांगितले होते की राजपक्षे यांनी सिंगापूरमध्ये आश्रय घेतला नाही किंवा त्यांना आश्रय दिला गेलेला नाही.

ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासासाठी ६०,००० कोटी देणार, गौतम अदानींची घोषणा :
  • अदानी समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानींनी मंगळवारी (२६ जुलै) ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासासाठी ६० हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. ते वार्षिक सर्वसाधारण सभेतील भाषणात बोलत होते. यावेळी त्यांनी २०२२ हे वर्ष वैयक्तिक दृष्टीने महत्त्व सांगायचे असल्याचंही सांगितलं. वाढती महागाई, विस्कळीत अन्नधान्य पुरवठा, लोकांचे वाढते विस्थापन, आरोग्य सेवांचा फोलपणा, शिक्षण क्षेत्रात आलेले साचलेपण, चलन बाजारातील अस्थिरता आणि अडखळती रोजगार निर्मिती या प्रश्नांचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.

  • गौतम अदानी म्हणाले, “मला २०२२ या वर्षाचे माझ्या वैयक्तिक दृष्टीने असलेले महत्त्व सांगायचे आहे. या वर्षी माझे वडील आणि आदर्श शांतीलाल अदानी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि माझ्याही षष्ट्यब्दीपूर्तीचे वर्ष आहे. यानिमित्ताने अदानी कुटुंबाने एकत्रितपणे मुख्यतः ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास यासाठी ६०,००० कोटी रुपयांची रक्कम स्वयंसेवी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे.”

  • “या तिन्ही क्षेत्रांचा स्वतंत्र विचार न करता एकत्रितपणे केला पाहिजे. कारण संतुलित आणि भविष्याला सामोरे जाण्याला सिद्ध समाज निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कोट्यवधी भारतीयांना कायमचे वर आणण्याची आपल्याला संधी आहे. हे आपले आपल्याला तसेच देशासाठीचे दायित्व आहे. मोठ्या प्रकल्प उभारणीचा आमचा अनुभव आणि अदानी न्यासाने हाती घेतलेली विविध कामे यातून मिळालेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ आम्हाला मिळेल आणि समाजाच्या सर्वात गरजू घटकांपर्यंत आमच्या कामाचा फायदा पोचेल,” असं गौतम अदानी यांनी सांगितलं.

देशातील सर्वच मेट्रो प्रकल्प तोटय़ात, प्रवासीही कमी ; संसदीय समितीच्या अहवालात चिंता :
  • देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय म्हणून मोठय़ा शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणण्यावर केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी भर दिला असला तरी गेल्या सहा-सात वर्षांत सुरू झालेले सर्वच मेट्रो प्रकल्प हे आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात आहेत. प्रकल्प अहवाल तयार करताना अपेक्षित धरण्यात आलेली प्रवासी संख्या आणि प्रत्यक्ष प्रवासी यात मोठी तफावत आढळली आहे. 

  • संसदेच्या स्थायी समितीने दिल्ली, मुंबई, बेंगळुरूसह सर्वच शहरांमधील मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत अहवाल संसदेला सादर केला. या अहवालात मेट्रो प्रकल्प तोटय़ात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.  २००६ मध्ये राजधानी दिल्लीत मेट्रो प्रत्यक्ष सुरू झाली आणि मेट्रोने आतापर्यंत सुमारे ४०० किमीचे जाळे विणले आहे. २०११ पासून आतापर्यंत मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होऊनही दिल्लीतील मेट्रो प्रकल्प कार्यात्मकदृष्टय़ा  (ऑपरेशनल ) फायद्यात असला तरी सुरुवातीपासूनच हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात आहे. मुंबईत २०१४ मध्ये घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा हा पहिला मेट्रो मार्ग सुरू झाला. प्रवासी संख्येत वाढ झाली तरी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या वतीने चालविण्यात येणारा हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात आहे. यातूनच मध्यंतरी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आला होता.

  • ‘नम्मा बंगळूरू’ मेट्रो २०१७ मध्ये सुरू झाली तेव्हापासूनच तोटय़ात आहे. केरळातील कोची शहरात पाच वर्षांपूर्वी सुरू झालेली मेट्रोही तोटय़ात आहे. प्रतिदिन साडेतीन लाख प्रवासी अपेक्षित असताना फक्त ६० ते ६५ हजारच प्रवासी या सेवेचा वापर  करतात. चेन्नई किंवा हैदराबाद शहरांमधील मेट्रो प्रकल्पाची रडकथा वेगळी नाही. लखनौ शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम नियोजित वेळेपेक्षा ३६ दिवस आधी पूर्ण झाले होते. पण, अपेक्षित प्रवासी संख्या नसल्याने हा प्रकल्प तोटय़ात सुरू आहे. कोलकाता मेट्रोचे चित्र फारसे वेगळे नाही.

श्रीलंकेत स्थैर्यासाठी भारताचा पाठिंबा ; पंतप्रधान मोदी यांचे रानिल विक्रमसिंघे यांना अभिनंदनाचे पत्र :
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे या पदावरील निवडीबद्दल अभिनंदन केले. श्रीलंकेत स्थैर्य, आर्थिक सुधारणा करण्यासाठी श्रीलंकावासीयांच्या लोकशाही मार्गानी सुरू असलेल्या प्रयत्नांना भारताचा कायम पाठिंबा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

  • कोलंबोतील भारतीय दूतावासाने एका ट्वीटद्वारे सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या निवडीबद्दल पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले.

  • दूतावासातर्फे सांगण्यात आले, की भारत-श्रीलंकेदरम्यान शतकांपासून असलेल्या पुरातन घनिष्ठ मैत्रीचे संबंध दृढ करण्यासाठी व उभय देशांच्या नागरिकांच्या हितसंवर्धनासाठी श्रीलंकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांसमवेत समन्वयाने काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगून मोदींनी श्रीलंकेत घटनात्मक मार्गाने स्थैर्य पुनप्र्रस्थापित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विक्रमसिंघेंशी भारताशी व भारतीय नेत्यांशी निकटचे संबंध आहेत. त्यांना मेमध्ये श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले होते. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे देश सोडून गेल्यानंतर १३ जुलैला त्यांना काळजीवाहू राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. विक्रमसिंघे यांनी २२ जुलै रोजी दिनेश गुणवर्धने यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती.

  • दरम्यान, कोलंबोतील भारतीय उच्चायुक्त गोपाळ बागळे यांनी मंगळवारी नवनियुक्त पंतप्रधान गुणवर्धने यांची राजकीय शिष्टाचारानुसार भेट घेऊन भारत सरकार आणि भारतीय नागरिकांतर्फे त्यांचे अभिनंदन केले. भारतीय उच्चायुक्तालयाने ट्वीट केले, की उच्चायुक्तांनी भारत-श्रीलंकादरम्यानचे दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले. 

27 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.