ऑलिम्पिकविजेत्या नीरज चोप्राने रविवारी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष अॅथलेटिक्सपटू ठरला आहे. २४ वर्षीय नीरजला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी दावेदार मानले जात होते. चौथ्या प्रयत्नात नीरजने सर्वोत्तम ८८.१३ मीटर अंतरावर भाला फेकला. ही कामगिरी ग्रेनाडाच्या २०१९ मधील दोहा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या अँडरसन पीटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकाची ठरली.
गतवर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले होते. जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याने ८८.५८ मीटर अंतर गाठत एकंदर दुसऱ्या क्रमांकासह अंतिम फेरी गाठली होती. नीरजच्या रौप्यपदकामुळे तब्बल दोन दशकांच्या कालावधीनंतर भारताचे नाव प्रथमच पदकतालिकेत झळकले आहे. भारतीय संघ संयुक्तपणे २८व्या क्रमांकावर आहे. एक रौप्य आणि पाच क्रीडापटू अंतिम फेरीत ही भारताची जागतिक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
२४ वर्षीय पीटर्स हा जागतिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भालाफेकपटू ठरला आहे. पीटर्सने सहा प्रयत्नांपैकी तीनदा ९० मीटर अंतराचा टप्पा ओलांडला. त्याने पहिल्या प्रयत्नात ९०.२१ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ९०.४६ मीटर आणि सहाव्या प्रयत्नात ९०.५४ मीटर (सर्वोत्तम) अशी कामगिरी नोंदवली. नीरजसह कोणत्याही खेळाडूला त्याच्या तीन सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचता आले नाही. चेक प्रजासत्ताकच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जॅकूब व्हॅडलेचने ८८.०९ मीटर अंतरासह कांस्यपदक पटकावले.
द्रौपदी मुर्मू आज देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेणार असून संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा सुरु होईल. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. त्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाईल.
त्यानंतर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू देशाला उद्देशून पहिले भाषण करतील. या सोहळय़ाला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित राहतील.
देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली. त्यात मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती.
केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. आता दिवस-रात्र म्हणजे २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. तसेच पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे.
‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत उचलले पाऊल - ‘आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना याबाबत पत्र दिले आहे.
२० जुलै रोजी आदेश - भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरीकांच्या घरी तिरंगा फडकवता येणार आहे.
दिवस- रात्र फडकवता येणार तिरंगा - ध्वज संहिता-२००२ आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-१९७१ अंतर्गत राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम सांगण्यात आले आहेत. या ध्वज संहितेमध्ये आता बदल करण्यात आला आहे. यापूर्वी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकवण्यात येत होता. तसेच पॉलिस्टरचे आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांना परवानगी नव्हती. मात्र, आता पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करण्याची परवनागी देण्यात आली आहे. तसेच २४ तास तिरंगा फडवण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
१) द्रौपदी मुर्मू यांनी सकाळी राजघाटला भेट देत राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
२) शपथविधी सोहळ्याआधी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू संसदेत पोहोचतील.
३) याशिवाय राष्ट्रपती भवनात सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांनी एक औपचारिक कार्यक्रम पार पडेल. पण जर पाऊस असेल तर हा कार्यक्रम रद्द केला जाणार असल्याचं शपथविधीच्या वेळापत्रकात नमूद आहे.
४) उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार आणि प्रमुख नागरी व लष्करी अधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
५) रविवारी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री परिषदेतील सदस्यांसाठी राष्ट्रपती भवनात डिनरचं आयोजन केलं होतं.
६) देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक आणि दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली. त्यात मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती.
७) द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर ओडिशामधील त्यांच्या गावी गुरुवारपासूनच मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला जात आहे.
८) द्रौपदी मुर्मू २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेणार्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
९) द्रौपदी मुर्मू दोन वेळा आमदार राहिल्या असून ओडिशात भाजपाच्या पाठिंब्याने बिजू जनता दलाची सत्ता असताना नवीन पटनाईक सरकारमध्ये मंत्री होत्या.
१०) द्रौपदी मुर्मू यांना ओडिशा सरकारमध्ये वाहतूक, वाणिज्य, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन यासारखी मंत्रालयं हाताळताना प्रशासकीय कामांचा अनुभव आहे.
देशाच्या तिन्ही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांची ‘जॉईन्ट थिएटर कमांड’ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली. त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणारा देश ही ओळख पुसत भारताची वाटचाल ही सर्वाधिक शस्त्रनिर्यात करणारा देश होण्याकडे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जम्मूतील गुलशन मैदानावर जम्मू काश्मीर पीपल्स फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
संरक्षणमंत्री म्हणाले की, कारगिरमधील ऑपरेशन विजय अंतर्गत झालेल्या संयुक्त मोहिमा लक्षात घेता देशात जॉईन्ट थिएटर कमांडची संकल्पना राबविली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
२१ वे शतक हे खऱ्या अर्थाने ‘भारताचे शतक’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी आणि या शतकातील आव्हानांसाठी देश सज्ज होत असल्याचा विश्वास मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी व्यक्त केला. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, कोविंद यांनी भारताच्या ‘देदीप्यमान लोकशाही सामर्थ्यांला’ सलाम केला आणि ‘‘आपल्या मुळांना घट्ट पकडून राहणे’’ हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ असल्याचे प्रतिपादन केले.
राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना रामनाथ कोविंद यांनी भारतीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘‘पाच वर्षांपूर्वी माझ्यावर विश्वास ठेवून मला राष्ट्रपतीपदी निवडून दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींचे आभार मानतो,’’ असे कोविंद म्हणाले.
कानपूर जिल्ह्यातील एका खेडय़ातील सामान्य कुटुंबात वाढलेल्या, मातीच्या घरात राहिलेल्या एका तरुण मुलाला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची कल्पनाही नव्हती. तो रामनाथ कोविंद आज तुम्हा सर्व देशवासियांशी संवाद साधत आहे. आपल्या देशाच्या चैतन्यमय लोकशाही व्यवस्थेचे हे सामर्थ्य आहे, मी त्याला सलाम करतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कोविंद यांनी हवामान बदलाच्या संकटाकडेही लक्ष वेधले आणि येणाऱ्या पिढय़ांसाठी सर्वानी पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन केले. ‘‘निसर्गमाता अतीव दु:खात आहे. हवामानबदलाचे संकट पृथ्वीचे भविष्य धोक्यात आणू शकते. आपल्या मुलांसाठी आपण आपले पर्यावरण, जमीन, हवा आणि पाणी यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना जपले पाहिजे’’, असे कोविंद म्हणाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे पुत्र हमजा शरीफ हे पंजाब प्रांताच्या विधिमंडळात अवघ्या तीन मतांनी जिंकल्याने शनिवारी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. हमजा यांच्या विजयाच्या घोषणेनंतर देशभर त्याविरुद्ध निदर्शने झाली. विरोधी पक्षांनी याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंजाब विधानसभेत शुक्रवारी सरकार स्थापनेसाठी मतदान घेण्यात आले. त्यात हमजा यांना विजयी घोषित करण्यात आले.
वास्तविक, त्यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) पक्षास १७ जुलै रोजी झालेल्या पोटनिवडणुकीनंतर विधासभेत बहुमत नाही. विधानसभेच्या उपसभापतींनी प्रतिस्पर्धी उमेदवाराची दहा निर्णायक मते बाद ठरवली. त्यामुळे हमजा यांची निवड होऊ शकली.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.