चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ सप्टेंबर २०२१

Date : 23 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आता फलंदाजाला बॅट्समनऐवजी ‘बॅटर’ म्हटलं जाणार! MCC नं घेतला निर्णय :
  • क्रिकेट खेळात अनेक बदल होत असतात. कसोटीनंतर एकदिवसीय सामने आले. त्यानंतर त्यात टी २० ची भर पडली. कसोटीही दिवस-रात्र झाली. लाल, पांढऱ्या चेंडूनंतर गुलाबी चेंडूची भर पडली. खेळाडूसाठी डीआरएस सिस्टम आली. आता मेरिलेबॉन क्रिकेट क्लबने (एमसीसीने) एक मोठी घोषणा केली आहे.

  • क्रिकेट नियमात बदल करत बॅट्समन ऐवजी जेंडर न्यूट्रल टर्मनुसार बॅटर किंवा बॅटर्स संबोधलं जाणार आहे. या बदलला एमसीसीने मान्यता दिली आहे. यापूर्वी क्लबच्या विशेष लॉ सब कमिटीने यावर निर्णय घेतला होता. बॅटर हा शब्द सर्वसमावेशक असल्याने क्रिकेटची स्थिती बदलेल, असं एमसीसीकडून सांगण्यात आलं आहे.

  • “एमसीसीला वाटतं की जेंडर न्यूट्रल शब्दाचा वापर केल्याने क्रिकेट सर्वसमावेशक होईल. हे पाऊल त्या दिशेनं आहे. यामुळे खेळाप्रती क्रीडारसिकांची भावना आणखी जोडली जाईल.”, असं एमसीसीचे सहाय्यक सचिव एमी कॉक्स यांनी सांगितलं. तर फिल्डर आणि बॉलर या शब्दावर कोणतीच आपत्ती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  • मान्यतेनंतर lords.org/laws यावर हा बदल प्रकाशित करण्यात आला आहे. काही सरकारी संस्था आणि मीडिया संस्था आधीच वृत्तांकन करताना बॅटर हा शब्द वापरत आहेत.

प्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस :
  • जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशाफ्ट्सचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योगसमूहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील ही अत्यंत ऐतिहासिक घटना आहे. वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रिसिजन उद्योगसमूहाने सकारात्मक पाऊल टाकले आहे.

  • प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि. चे कार्यकारी संचालक करण शहा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी कंपनीचे अध्यक्ष यतीन शहा उपस्थित होते. प्रिसिजनने डिझेलवर धावणाऱ्या २३ आसन क्षमतेच्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केले आहे. मध्यम आकाराची प्रवासी बस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. ही वातानुकूलित बस एका चार्जिंगमध्ये १८० किलोमीटर धावेल. प्रिसिजनचे इलेक्ट्रिक वाहन पथक वर्षभर या प्रकल्पावर पुण्यात काम करीत होते. पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संस्थेने या बसची चाचणी केली आहे. या बसचे लवकरच शासनासमोर सादरीकरणही केले जाणार आहे.

  • प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढे येत आहे. मात्र संपूर्ण नवे इलेक्ट्रिक वाहन बनविण्याचा खर्च मोठा असतो. त्यामुळे जुन्या वाहनाचे ‘रेट्रोफिटिंग’ ही संकल्पना पुढे आली. यामध्ये वाहनाचे इंजिन काढून त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन बसविली जाते. अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुरुवातीची गुंतवणूक मोठी असली तरी ऑपरेटिंग खर्च खूप कमी असणार आहे.

पीएम केअर्स फंड हा भारत सरकारचा फंड नाही- दिल्ली हायकोर्ट :
  • पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थिती निवारण निधी (पीएम-केअर्स फंड) या कायद्यांतर्गत धर्मादाय ट्रस्टने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले आहे की या ट्रस्टचा निधी हा भारत सरकारचा निधी नाही आणि त्याची रक्कम भारताच्या एकत्रित निधीमध्ये जात नाही. संविधानाच्या कलम १२ अंतर्गत पीएम केअर्स फंडाला ‘राज्य’ म्हणून घोषित करण्याच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिले होते.

  • त्यावर “भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १२च्या अर्थामध्ये ट्रस्ट राज्य किंवा इतर प्राधिकरण आहे किंवा माहिती अधिकार कायद्याच्या कलम २ (एच) च्या अर्थामध्ये सार्वजनिक प्राधिकरण आहे की नाही याची पर्वा न करता, सर्वसाधारणपणे कलम ८ आणि उपविभाग (ई) आणि (जे) मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदी, विशेषतः, माहिती अधिकार कायद्यामध्ये, तिसऱ्या व्यक्तीची माहिती उघड करण्याची परवानगी नाही,” असे प्रदीप कुमार श्रीवास्तव, पंतप्रधान कार्यालय सचिवांनी म्हटले आहे.

  • संविधानाच्या अनुच्छेद १२ अंतर्गत पीएम-केअर्स फंडाला ‘राज्य’ म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या मागणीवर हे निवेदन सादर करण्यात आले. या याचिकेत देशातील नागरिक व्यथित आहेत की, पंतप्रधान आणि गृहमंत्री, संरक्षण आणि अर्थमंत्र्यांसारख्या विश्वस्तांनी स्थापन केलेला हा एक फंड असल्याचे घोषित केले गेले आहे ज्यावर कोणतेही सरकारी नियंत्रण नाही असे म्हटले होते.

भारतात २०२२ पर्यंत १०० कोटी कोरोना लसीच्या डोसचं उत्पादन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन :
  • मेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी भारतातील कोविड लसीसंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, क्वाड (Quad पार्टनरशिप अंतर्गत २०२२ पर्यंत भारतात किमान १०० कोटी कोविड लस (Covid Vaccine) डोसचं उत्पादन केलं जाणार असून हे काम सध्या ट्रॅकवर आहे.

  • जो बायडेन म्हणाले की, यावेळी कोविड -19 ला रोखण्यासाठी एकत्र काम करण्यापेक्षा आणखी काही महत्त्वाचं नाही. त्यामुळे भविष्यात या साथीला सामोरे जाण्यासाठी जग अधिक चांगले तयार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी डिजिटल माध्यमातून आयोजित केलेल्या ग्लोबल समिट टू एंड कोविड -19 कॉन्फरन्समध्ये सांगितलं की, अमेरिका आणि त्याचे आंतरराष्ट्रीय भागीदार जगातील इतर देशांमध्ये लसीचे उत्पादन वेगाने वाढवण्यासाठी काम करत आहेत.

  • यावेळी बायडेन म्हणाले की, उदाहरणार्थ, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासह आमची क्वाड भागीदारी जागतिक पुरवठा वाढवण्यासाठी २०२२ च्या अखेरीस भारतात किमान १०० कोटी लस डोस तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेत लस उत्पादनासाठी निधी प्रदान करत असून उत्पादन बळकट करण्यास मदत करत आहोत.

  • पुढच्या वर्षापर्यत दक्षिण आफ्रिका आणि आफ्रिकेसाठी जॉन्सन अँड जॉन्सनचे ५०० मिलियनहून अधिक डोसचं उत्पादन होण्याची शक्यता आहे. या क्वाडमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे, अशी माहितीही बायडेन यांनी दिली.

लसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना :
  • करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात करोना लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, काल राज्यात काल २१ सप्टेंबर रोजी सुमारे ३६ लाख कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस शिल्लक होते. त्यामुळे ज्या जिल्ह्यांत कमी डोसेस दिले असतील त्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत.

  • लसीकरणामुळे संसर्ग होऊन देखील रोगाची तीव्रता कमी असते शिवाय मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे हे लक्षात घेऊन लसीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण करावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी रुग्ण संख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी, नको असे स्पष्ट केले.

  • राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे. राज्यात काल दिवसभरात ४ हजार २१ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ३ हजार १३१ नवीन करोनाबाधित आढळून आले. याचबरोबर, ७० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

  • राज्यात आजपर्यंत एकूण ६३,४४,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२ टक्के एवढे झाले आहे.

२३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.