चालू घडामोडी आणि दिनविशेष - 21 नोव्हेंबर 2023

Date : 21 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कोहली बाद झाल्यावरची शांतता सर्वात समाधानकारक - पॅट कमिन्स
  • अंतिम सामन्याला ९० हजारांहून अधिक प्रेक्षकांचा पाठिंबा हा अभूतपूर्व होता. भारतीय संघाला मिळणारा पाठिंबा निश्चितच भारतीय खेळाडूंना प्रेरित करणारा होता; पण विराट कोहली बाद झाल्यावर मैदानावर पसरलेली शांतता मनाला सर्वाधिक समाधान देणारी होती, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने व्यक्त केली.
  • कमिन्स ऑस्ट्रेलियाचा पाचवा विश्वविजेता कर्णधार ठरला. या विजेतेपदाने मी पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटच्या प्रेमात पडलो आहे, असे कमिन्स म्हणाला. ‘‘माझा एक अधिक उसळलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात कोहली त्रिफळाचीत झाला. त्या वेळी जेव्हा संपूर्ण मैदानावर शांतता पसरली ती आताही मला जशीच्या तशी डोळय़ासमोर दिसत आहे. तो क्षण सर्वात सुंदर होता यात शंकाच नाही,’’ असेही कमिन्सने सांगितले.
  • या आठवणी प्रदीर्घ मनात घर करून राहतील, असे सांगून कमिन्स म्हणाला, ‘‘विश्वचषक स्पर्धेचा वारसा इतका समृद्ध आहे, की तो विसरता येणार नाही. गेल्या दोन महिन्यांत या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक उत्कंठावर्धक सामने झाले, अनेक गोष्टी घडल्या ज्या कायम मनात घर करून राहतील. ऑस्ट्रेलियासाठी हे वर्ष खूपच यशस्वी गेले. आम्ही अ‍ॅशेस जिंकली, कसोटी क्रिकेटसह आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही जागतिक विजेतेपद मिळवले. या तीनही वेगवेगळय़ा कामगिरीचा मला अभिमान वाटतो.’’ ‘‘या विजेतेपदात संघातील प्रत्येक खेळाडू आणि त्याच्या कुटुंबीयाला काही ना काही गोष्टींचा त्याग करावा लागला आहे. संघातील प्रत्येक व्यक्तीचा अभिमान वाटावा अशी त्यांची कथा आहे,’’असेही कमिन्स म्हणाला.
  • पत्रकार परिषदेत कमिन्सने उत्साही प्रेक्षकांनाही सलाम केला. त्यांच्या उत्साहाची आणि प्रेमाची दाद द्यायलाच हवी, असे सांगून कमिन्सने सांगितले, ‘‘सकाळी उठलो तेव्हा खोलीच्या खिडकीतून बाहेर डोकावले, तर सगळा रस्ता निळा झालेला दिसत होता. भारतीय संघाचा पोशाख परिधान करून अनेक चाहते सकाळपासून हॉटेलबाहेर उपस्थित होते. लांबवर नजर टाकली तर, रस्त्यावरून निळय़ा रंगाच्या जणू लहरी निघताना दिसत होत्या. या सगळय़ा वातावरणाने एक वेळ भारावून गेलो; पण दुसऱ्याच क्षणी थोडा घाबरून गेलो. याच चिंतेने मला वेगळी ऊर्जा दिली हे तितकेच खरे आहे.’’
जोकोविचला सातव्यांदा विजेतेपद
  • नोव्हाक जोकोविचने कामगिरीत सातत्य राखताना यानिक सिन्नेरला सरळ सेटमध्ये नमवत विक्रमी सातव्यांदा ‘एटीपी’ अंतिम टप्प्याच्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या जोकोविचने एक तास ४३ मिनिटे चाललेल्या सामन्यात स्थानिक खेळाडू सिन्नेरला ६-३, ६-३ अशा फरकाने पराभूत केले.
  • वर्षांच्या सुरुवातीला विक्रम रचणाऱ्या जोकोविचने वर्षांच्या अखेरीसही नवा विक्रम केला. त्याने २०२३च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे दहाव्यांदा जेतेपद पटकावले. यानंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेत २३वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवताना राफेल नदालचा विक्रम मोडीत काढला. जोकोविचला विम्बल्डनच्या अंतिम सामन्या कार्लोस अल्कराझकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, नंतर जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले.
  • ‘‘हा हंगाम माझ्या कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ राहिला. या आठवडय़ात चांगल्या लयीत असलेला स्थानिक खेळाडू यानिक सिन्नेरविरुद्ध विजय मिळवणे ही चांगली गोष्टी राहिली,’’ असे जोकोविच म्हणाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोविचने चांगला खेळ करत सिन्नेरला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. ‘एटीपी’ अंतिम टप्प्याच्या सामन्यापूर्वी सर्वाधिक जेतेपो मिळवण्याचा विक्रम संयुक्तपणे जोकोविच व रॉजर फेडरर यांच्या नावे होता. यासोबतच १५ वर्षांत दुसऱ्यांदा कोणत्याही खेळाडूने चार ग्रँडस्लॅम व ‘एटीपी’ अंतिम टप्प्याच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. यापूर्वी, अशीच कामगिरी जोकोविचने २०१५मध्ये केली होती.
डीएड-बीएड धारकांना संधी! राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती; लवकरच राबवणार प्रक्रिया
  • शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असून डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
  • मागील काही दिवसांपासून राज्यात १३,५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरण्यात अडचण येत आहे. यामुळे दरवर्षी शिक्षक भरती झाल्यास डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी तीन हजार अर्ज, २०० लोकांची निवड, विचारले जात आहेत ‘हे’ प्रश्न
  • अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी एक दोन नाही तीन हजार अर्ज आले. त्यापैकी २०० लोकांची निवड मुलाखतीसाठी झाली आहे. त्यांना विचारले जाणारे प्रश्न चर्चेत आहे. मकर संक्रांत झाल्यानंतर २२ जानेवारी २०२४ या दिवशी रामलल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत.
  • अयोध्येच्या राम मंदिर विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी सांगितलं २०० जणांची निवड त्यांच्या योग्यतेच्या आधारे झाली आहे. आता त्यांची मुलाखत घेतली जाते आहे. या सगळ्यांच्या मुलाखतीचं केंद्र हे अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचं मुख्यालय असलेल्या कारसेवक पुरम आहे. अयोध्येतले दोन महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास आणि वृंदावनचे जयकांत मिश्रा या तिघांचं पॅनल या सगळ्यांची मुलाखत घेतं आहे.

२०० पैकी २० पुजारी निवडले जाणार

  • तीन हजार अर्जांमधून जे २०० अर्ज निवडले गेले आहेत त्यांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यातले २० जण पुजारी म्हणून निवडले जाणार आहेत. गोविंद देवगिरी यांनी सांगितलं की ज्यांची निवड होईल त्यापैकी २० जण पुजारी आणि इतर पदांवर कार्यरत असतील. तसंच या सगळ्यांना सहा महिन्यांचं विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ते झाल्यानंतरच नियुक्ती केली जाणार आहे. ज्यांची निवड होणार नाही त्यांनाही प्रशिक्षणात सहभाग घेता येईल. त्यांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाईल. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र असेल त्यांना भविष्यात संधी मिळू शकते. प्रशिक्षणाच्या दरम्यान मोफत भोजन, राहण्याची मोफत व्यवस्था आणि दोन हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे.

पुजारी होण्यासाठी मुलाखतीत काय प्रश्न विचारले जात आहेत?

  • संध्या वंदन काय आहे?
  • संध्या वंदनाचा धार्मिक विधी काय आहे?
  • संध्या वंदनाचा मंत्र काय आहे?
  • भगवान रामाची पूजा करण्यासाठी कुठला मंत्र म्हणायचा?
  • भगवान रामाची पूजा करण्यासाठी कुठला धार्मिक विधी करायचा?
  • हे आणि या प्रकारचे प्रश्न मुलाखतींच्या दरम्यान विचारले जात आहेत. २०० पैकी वीस जणांची निवड केली जाणा आहे.
  • अयोध्येत जे राम मंदिर उभं राहतं आहे तिथली पूजा ही रामानंदीय संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे असणार आहे. या पूजेसाठी खास अर्चक असणार आहेत. भगवान रामालला नैवैद्य दाखवणं, नवी वस्त्र घालणं त्यानंतर पूजा आणि आरती यांसह पंचोपचारांनी पूजा केली जाते आहे. मात्र २२ जानेवारीपासून पूजा पद्धती बदलणार आहे. रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर रामानंदीय परंपरेनुसार पूजा केली जाणार आहे. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
चार ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे वृत्त खोटे! चर्चेत राहण्याचा भाजपचा प्रयत्न, काँग्रेसची टीका
  • भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाने (जीडीपी) चार हजार अब्ज डॉलरचा (चार ट्रिलियन) टप्पा ओलांडल्याच्या दावा केल्याबद्दल काँग्रेसने सोमवारी भाजपला टीकेचे लक्ष्य केले. केवळ बातम्यांचे मथळे निर्माण करून चर्चेत राहण्यासाठी भाजप अशा खोटय़ा बातम्या पसरवत आहे अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली.
  • काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की काही केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा खोटा दावा केला आहे. काल दुपारी दोन वाजून ४५ मिनिटे ते सहा वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान जेव्हा अवघा देश विश्वकरंडक क्रिकेटचा अंतिम सामना पाहत होता तेव्हा राजस्थान आणि तेलंगणशी संबंधित वरिष्ठ केंद्रीय मंत्री, मोदी सरकारचे अनेक समर्थक, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योजकांनी कालच भारताच्या ‘जीडीपी’ने चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडल्याबद्दल अभिनंदनपर ‘ट्वीट’ केले.
  • त्यांनी आरोप केला, की ही निखालस खोटी बातमी वातावरण निर्मितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. खुशामतखोरीतून आणि चर्चेत राहण्यासाठी प्रतिमा उजळवण्यासाठीचा हा एक निराशाजनक प्रयत्न होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मंत्री किशन रेड्डी, उद्योगपती गौतम अदानी यांनी ‘एक्स’वर भारताच्या या कथित कामगिरीची प्रशंसा केली होती.
अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत हावीर मिली यांनी मारली बाजी, नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
  • दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक तसेच अतिउजव्या आघाडीचे नेते हावीर मिली यांनी बाजी मारली आहे. रविवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. मध्यम-डाव्या विचारसरणीचे विद्यमान अर्थमंत्री सर्जिओ मास्सा आणि मिली यांच्यात लढत होती. मात्र मास्सा या लढतीत पराभूत झाले.

मिली यांना मिळाली ५६ टक्के मते

  • अर्जेंटिना येथील अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निवडणुकीत मिली यांना साधारण ५६ टक्के मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले पेरोनिस्ट पक्षाचे नेते सर्जिओ मास्सा यांना साधारण ४४ टक्के मते मिळाली. निकाल स्पष्ट झाल्यानंतर मिस्सी यांनी आपला पराभव स्वीकारला. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जेंटिनामध्ये महागाई, बेरोजगारी यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता होती. याच कारणामुळे येथे आता सत्तांतर झाले आहे.

हावीर मिली कोण आहेत?

  • हावीर मिली हे उजव्या विचारसरणीचे समर्थक आहेत. ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात. सत्तेत आल्यास सध्याचे चलन पेसो बंद करून डॉलर आणू, देशाच्या मध्यवर्ती बँकेला टाळे ठोकू अशी आर्थिक आश्वासने त्यांनी दिली आहेत. याखेरीज वातावरण बदल हे थोतांड आहे, लैंगिक शिक्षण कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास करण्यासाठी रचलेला कट आहे, मानवी अवयवांची खरेदी-विक्री कायदेशीर असावी अशी जहाल मते ते मांडत असतात.
  • दरम्यान, या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हावीर मिली यांचे अभिनंदन केले. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील संबंध वृद्धिंगत व्हावे यासाठी तुमच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे मोदी म्हणाले. अर्जेंटिनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उजव्या आणि डाव्या विचारांच्या आघाड्यांची आलटून-पालटून सत्ता राहिली आहे. आता मात्र उजव्या विचारसरणीचे हावीर मिली हे अर्जेंटिनाच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाले आहेत.
विश्वचषक जिंकण्यासाठी पॅट कमिन्सने आयपीएलचा करार मोडला होता, वर्षभरापूर्वीचे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल
  • आयुष्यात अशी अनेक वळणे येतात जेव्हा तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागतात, मोठे मन दाखवावे लागते. हा निर्णय त्यावेळी अवघड वाटू शकतो पण भविष्यात तुमचे आयुष्य बदलू शकते. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सबाबत घडला आहे. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी कमिन्सने एक कठीण निर्णय घेतला. त्याला ३७० दिवसांनी त्याचा लाभ मिळाला. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०२३चा विश्वचषक जिंकला आहे.

कमिन्सने आयपीएल सोडले होते

  • पॅट कमिन्स आयपीएल २०२२मध्ये केकेआरचा भाग होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याने अप्रतिम कामगिरी केली. पण १५ नोव्हेंबर २०२२ रोजी कमिन्सने ट्वीट केले की, “तो आयपीएल २०२३मध्ये खेळणार नाही.” कमिन्सला आयपीएलच्या एक हंगाम खेळण्यासाठी ७.२५ कोटी रुपये मिळतात. कमिन्सने लिहिले होते की, ‘पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये मी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा करार सोडण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. माझे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पुढील १२ महिन्यांसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनी भरलेले आहे, त्यामुळे अ‍ॅशेस मालिका आणि विश्वचषकापूर्वी थोडी विश्रांती घेतली जाईल.”

आयपीएल नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनला

  • आयपीएलनंतर लगेचच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेतेपदाचा सामना खेळला गेला. यामध्येही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा होती. लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेला तो सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तिथेही कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. यानंतर अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये जाऊन २-२ अशी बरोबरी साधून ट्रॉफी परत केली.

आता विश्वचषक विजेतेपद

  • ऑस्ट्रेलियाने आता पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली विश्वचषक २०२३चे विजेतेपद पटकावले आहे. कमिन्सने फलंदाजी आणि चेंडूने महत्त्वपूर्ण योगदान दिले. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन आणि उपांत्य फेरीत भारताविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याने अवघ्या १४ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या कठीण परिस्थितीत ६८ चेंडू खेळून त्याने ग्लेन मॅक्सवेलला साथ दिली होती. तो खेळपट्टीवर एक बाजू लावून उभा होता. उपांत्य फेरीतही त्याने नाबाद १४ धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.

 

इक्वेडोरने कतारला हरवून ९२ वर्षांनंतर मोडला ‘हा’ मोठा विक्रम; घ्या जाणून :
  • इक्वेडोर संघाने फिफा विश्वचषक २०२२ चा पहिला सामना जिंकला आहे. अ गटात यजमान कतारविरुद्ध २-० असा विजय मिळवून दक्षिण अमेरिकन राष्ट्राने स्पर्धेतील पहिले गुण मिळवले. इक्वेडोरचा फॉरवर्ड एनर व्हॅलेन्सियाने सामन्यातील दोन्ही गोल केले. यासह कतार हा यजमान म्हणून पहिला सामना गमावणारा फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला देश ठरला आहे. स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान देशाला सलामीचा सामना गमवावा लागला आहे.

  • सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला इक्वेडोरने कतारच्या पोस्टमध्ये गोल केला, पण व्हीएआरने तो फेटाळला. यानंतर १६व्या मिनिटाला एनर व्हॅलेन्सियाने पेनल्टीद्वारे स्पर्धेतील पहिला गोल केला. ३१व्या मिनिटाला व्हॅलेन्सियाने आणखी एक गोल करून इक्वेडोरला विजय मिळवून दिला. अ गटात नेदरलँड आणि सेनेगल या संघांचाही समावेश आहे. या विजयासह इक्वेडोरला अंतिम १६ मध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे.

  • कतार आपला पहिला विश्वचषक खेळत असताना दुसरीकडे इक्वेडोरचा संघही विश्वचषकात फारसा जुना नाही. संघाने मागील फुटबॉल विश्वचषकासाठी प्रथमच पात्रता मिळवली आणि मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले आणि नंतर गट टप्प्यातच बाहेर पडले. २००६ च्या विश्वचषकात, संघ केवळ पात्र ठरला नाही तर गट टप्प्यात पोलंड आणि कोस्टा रिकासारख्या संघांना पराभूत करून बाद फेरीत प्रवेश केला. विश्वचषकाच्या इतिहासात इक्वेडोरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यानंतर इंग्लंडकडून १-० ने पराभूत झाल्यानंतर इक्वेडोरला राऊंड ऑफ १६ मधून बाहेर केले.

“पैसे जपून खर्च करा”, जेफ बेझोस यांचा सल्ला, आर्थिक मंदीचा दिला इशारा :
  • मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा यांच्यासारख्या काही जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे. त्यानंतर अ‍ॅमेझॉन ही कंपनीदेखील वेगवेगळ्या विभागांतून तब्बल १० हजार कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे.

  • उलाढाल मंदावल्यामुळे तसेच महसुलात घट होत असल्यामुळे कंपन्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच अ‍ॅमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष तसेच जगतील अब्जाधीशांच्या यादीत समावेश असलेले जेफ बेझोस यांनी लोकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. लवकरच आर्थिक मंदी येण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच बेझोस यांनी केले आहे. आपल्या खिशात सध्या पैसे राखून ठेवा. मोठ्या वस्तुंची घरेदी करण्याचे टाळा, असे बेझोस म्हणाले आहेत.

  • सीएनएन या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना बेझोस यांनी वरील विधान केले आहे. “सध्या कोणतीही जोखीम पत्करू नका. तुमच्याकडील पैसे राखून ठेवा. थोडीजरी जोखीम टळली तरी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही सध्या मोठ्या स्क्रीनचा टीव्ही, शितकपाट, किंवा नवे महागडे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आणखी थोडी वाट पाहा. तुमचे पैसे सध्यातरी राखून ठेवा. सध्या अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत नाही. सध्या अनेक क्षेत्रांमधील कंपन्या नोकरपात करत आहे. उलाढाल मंदावली आहे,” असे सूचक विधान जेफ बेझोस यांनी केले आहे.

  • याच मुलाखतीत बोलताना काही संपत्ती दान करणार असल्याचे बेझोस यांनी सांगितले. जे लोक मानवतेसाठी काम करत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी माझ्या संपत्तीतील काही भाग दान करणार आहे, असे बेझोस म्हणाले आहेत.

भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका: सूर्यकुमारच्या शतकामुळे भारताचा विजय :
  • सूर्यकुमार यादवचे (५१ चेंडूंत नाबाद १११ धावा) आक्रमक शतक आणि दीपक हुडाच्या (१० धावांत ४ बळी) प्रभावी फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर ६५ धावांनी मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

  • सूर्यकुमारने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध करताना आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १९१ अशी धावसंख्या केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १८.५ षटकांत १२६ धावांत आटोपला. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर फिन अॅलन दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर डेव्हॉन कॉन्वे (२५) आणि कर्णधार केन विल्यम्सनने (६१) यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. हे दोघे माघारी परतल्यानंतर इतर फलंदाजाना चमक दाखवता आली नाही. भारताकडून मोहम्मद सिराज (२/२४) आणि यजुर्वेद्र चहल (२/२६) यांनीही चांगली गोलंदाजी केली.

  • त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ऋषभ पंतला सलामीला पाठवले. मात्र त्याला केवळ ७ धावाच करता आल्या. त्यानंतर सलामीवीर इशान किशन (३१ चेंडूंत ३६) आणि लयीत असलेल्या सूर्यकुमारने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दडपण टाकले. विशेषत: सूर्यकुमारने चौफेर फटकेबाजी करत सर्वाचे लक्ष वेधले. त्याने आपल्या या शतकी खेळीत ११ चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे काही काळ सामना थांबला होता, पण याचा सूर्यकुमारच्या फलंदाजीवर परिणाम झाला नाही. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने (३/३४) हॅटट्रिक नोंदवली.

नवी दिल्ली - निधीचे भारताकडून स्वागत :
  • इजिप्तमधील संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेचे (कॉप २७) वर्णन ऐतिहासिक परिषद असे भारताने रविवारी केले. कारण या परिषदेत हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींमुळे विविध राष्ट्रांत होणाऱ्या मोठय़ा नुकसानाची भरपाई करण्यासाठी निधी उभारण्याचा करार करण्यात आला. जगाने यासाठी खूप प्रतीक्षा केली, अशी प्रतिक्रियाही भारताने दिली आहे.

  • ‘कॉप २७’च्या समारोप सोहळय़ात भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, की, जगाने शेतकऱ्यांवर हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याच्या (शमन) जबाबदारीचा भार टाकू नये. यजमान इजिप्तला संबोधित करताना यादव यांनी सांगितले, की आपण एका ऐतिहासिक हवामान बदल परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहात. या परिषदेतील करारात नुकसान भरपाई निधीच्या स्थापनेचा अंतर्भाव करण्याचा निर्णय झाला आहे.

  • आता या नव्या निधीची स्थापना झाली आहे. जगाने यासाठी खूप प्रतीक्षा केली. या मुद्दय़ावर सर्वसहमती विकसित करण्याच्या तुमच्या अथक प्रयत्नांबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो. हवामान बदलामुळे होणाऱ्या विनाशकारी नैसर्गिक आपत्तींच्या नुकसान भरपाई निधीची भारतासह गरीब आणि विकसनशील देशांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी होती. यंदाच्या या परिषदेतील हा महत्त्वाचा मुद्दा होता.

युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पाची रशियाकडून मोठी हानी :
  • रशियाच्या लष्कराने रविवारी युक्रेनमधील झ्ॉपोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर तोफांचे हल्ले चढवले. यापैकी किमान बारा वेळा या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले, असा दावा युक्रेनची अणुऊर्जा कंपनी एनर्गोअॅटमने केला आहे.

  • या कंपनीने टेलिग्रामवरील संदेशात म्हटले आहे की, हल्ल्यात ज्या सुविधांचे नुकसान झाले आहे, ते पाहता या प्रकल्पाचे युनिट पाच आणि सहा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांनाच लक्ष्य केले गेल्याचे स्पष्ट होत आहे. हे युनिट सुरू झाल्यास युक्रेनला आवश्यक तो वीजपुरवठा करणे शक्य होणार होते.

  • आयएईएचा इशारा - सध्या रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या झ्ॉपोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर रविवारी हल्ले झाल्याची गंभीर दखल संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) घेतली असून अशा हल्ल्यांमुळे मोठी आण्विक दुर्घटना होऊ शकते, असा इशारा या संस्थेने दिला आहे. या हल्ल्यांबाबत युक्रेन आणि रशियाने परस्परांवर दोषारोपण केले आहे.

जी-२०’ जाहीरनाम्यात भारताची महत्त्वाची भूमिका; अमेरिकेचे प्रतिपादन :
  • ‘जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षांवर ‘आजचे युग युद्धाचे नसावे’ या संदेशाचा समावेश होता. या जाहीरनाम्यासाठीच्या वाटाघाटीत भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली,’ अशी प्रशंसा अमेरिकेने केली आहे.जी-२० शिखर परिषदेचा बुधवारी समारोप झाला.

  • या परिषदेच्या जाहीरनाम्यात रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात या गटाच्या सदस्यांत मतभेद असल्याचे मान्य करण्यात आले. मात्र, या संघर्षांची झळ पोहोचत असलेल्या नागरिकांच्या संरक्षणासह आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे या आवश्यकतेवर भर देण्यात आला आहे.

  • सप्टेंबरमध्ये समरकंद येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान मोदींनी यांनी पुतिन यांना उद्देशून ‘आजचे युग युद्धाचे नाही’ हे वक्तव्य केले होते. तेच या जाहीरनाम्याच्या मसुद्यातही समाविष्ट करण्यात आले आहे.

21 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.