चालू घडामोडी आणि दिनविशेष - 20 जून 2023

Date : 20 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्पेनला नेशन्स लीग फुटबॉलचे विजेतेपद
  • स्पेनने अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाला ५-४ अशा फरकाने पराभूत करत नेशन्स लीगचे फुटबॉलचे जेतेपद पटकावले. स्पेनने तब्बल ११ वर्षांनी कुठल्याही स्पर्धेचे जेतेपद मिळवले. तर, क्रोएशियाचा अनुभवी कर्णधार लुका मॉड्रिचच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय किताबाची प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे.
  • निर्धारित आणि अतिरिक्त वेळेतही सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर झालेल्या शूटआऊटमध्ये स्पेनचा गोलरक्षक उनाइ सिमॉनने क्रोएशियाच्या दोन पेनल्टी रोखत संघाचा विजय सुनिश्चित केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये जेव्हा लढत ३-३ अशा बरोबरीत होती. तेव्हा सिमॉनने लोवरो मायेरची पेनल्टी रोखली. यानंतर मार्कस असेनिओने गोल करत स्पेनला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. क्रोएशियाच्या इवान पेरिसिचने गोल करत सामना पुन्हा ४-४ असा बरोबरीत आणला. यानंतर सायमनने ब्रूनो पेटकोव्हिचची पेनल्टी रोखत क्रोएशियावर दबाव वाढवला. यानंतर डॅनी कार्वाहालने पेनल्टीवर गोल करत स्पेनचा विजय निश्चित केला.
  • स्पेनने यापूर्वी २०१० विश्वचषक फुटबॉलचे जेतेपद मिळवले आहेत. तर, १९६४, २००८ आणि २०१२ मध्ये त्यांनी युरोपियन अजिंक्यपद स्पधेचे अजिंक्यपद पटकावले आहे.
‘इंडिगो’चे ५०० विमानखरेदीचे उड्डाण, फ्रान्सच्या ‘एअरबस’शी करार
  • ‘इंडिगो’ या हवाई प्रवास वाहतूक कंपनीने सोमवारी ‘पॅरिस एअर शो’मध्ये ‘एअरबस’ या कंपनीकडे ‘ए३२०’ श्रेणीतल्या ५०० छोटय़ा विमानांची मागणी नोंदवली. ‘एअरबस’ या फ्रान्सच्या कंपनीकडे एवढी मोठी मागणी नोंदवणारी ‘इंडिगो’ ही पहिली कंपनी असल्याचे बोलले जाते.
  • भारतीय विमान वाहतुकीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे, अशी भावना ‘इंडिगो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी व्यक्त केली. इंडिगोच्या मागणीत ‘ए३२०एनईओ’, ‘ए३२१एनईओ’ आणि ‘ए३२१एक्सएलआर’ या विमानांचा समावेश आहे. या मागणीचे आर्थिक तपशील मात्र ‘इंडिगो’ने जाहीर केले नाहीत.
  • ‘पॅरिस एअर शो’मध्ये ‘इंडिगो’ आणि ‘एअरबस’ यांच्यात विमान खरेदी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. वाजवी दरात सेवा पुरवणाऱ्या ‘इंडिगो’ने १६ वर्षांपूर्वी प्रवासी वाहतूक सुरू केली होती. इंडिगोच्या यापूर्वीच्या ४८० विमानांच्या मागणीची अद्याप पूर्तता झालेली नाही. वर्षांच्या सुरुवातीला टाटा समूहाच्या मालकीच्या ‘एअर इंडिया’ने ‘एअरबस’ आणि ‘बोइंग’कडे ४७० विमानांची मागणी नोंदवली होती.
IPS रवि सिन्हा होणार ‘रॉ’ चे नवे प्रमुख, मोदी सरकारचा निर्णय
  • IPS अधिकारी रवि सिन्हा यांना आता रॉ चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. रवि सिन्हा हे छत्तीसगढ कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. रवि सिन्हा आत्तापर्यंत कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव या पदावर कार्यरत होते. ते आता रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख असतील. काही वेळापूर्वीच ही घोषणा करण्यात आली. सध्याच्या रॉ चीफ सामंत गोयल यांची जागा ते घेतील. सामंत गोयल हे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर रवि सिन्हा या पदावर बसतील आणि पुढची दोन वर्षे रॉचे प्रमुख म्हणून काम करतील.
  • चीन आणि भारत यांच्यात काहीसं तणावाचं वातावरण असताना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही रवि सिन्हा यांना देण्यात आली आहे. गुप्त माहिती आधुनिक तंत्राच्या मदतीने काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. रवि सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष पदावर कार्यरत आहेत. कॅबिनेटने त्यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवली आहे. १ जुलैपासून रवि सिन्हा पुढची दोन वर्षे रॉ या भारताच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून कार्यरत असतील.
  • रवि सिन्हा हे छत्तीसगढ कॅडरचे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रवि सिन्हा हे रॉच्या ऑपरेशनल डिव्हिजनचे प्रमुख म्हणूनही काम करत आहेत. माहिती आणि गुप्त माहिती गोळा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आधुनिक पद्धतीने ती गोळा करणं हे त्यांचं वैशिष्ट्य समजलं जातं.
  • रवि सिन्हा हे लो प्रोफाईल राहून माहिती काढण्याचं त्यांचं कौशल्य पणाला लावतात. गुप्तचर विभागात त्यांची ओळख व्यापक आहे. काश्मीर, पूर्वोत्तर भाग आणि दहशतवाद्यांचं क्षेत्र यातली माहिती मिळवण्यात, तिथे काय काय चाललं आहे हे समजून घेण्यात तिथल्या घटनाक्रमांचा अर्थ लावण्यात ते माहीर आहेत.
नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’सह सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी
  • ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील संवादांमुळे वाद निर्माण झाल्यामुळे, या चित्रपटासह सर्व हिंदी चित्रपटांवर नेपाळमध्ये सोमवारी बंदी घालण्यात आली. सीतेचा उल्लेख ‘भारताची कन्या’ असा करण्यात आल्याबाबत नेपाळला आक्षेप आहे.
  • रामायण या महाकाव्याचे कथात्मक रूपांतर असलेल्या या चित्रपटावर काठमांडू व पोखरामध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर, त्याचे देशभरातील प्रदर्शन थांबवण्यात आले असल्याचे वृत्तांमध्ये म्हटले आहे. कुठलाही हिंदी चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही हे निश्चित करण्यासाठी काठमांडूतील १७ चित्रपटगृहांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
  • सीतेचा जन्म दक्षिण नेपाळमधील जनकपूरमध्ये झाला, अशी मान्यता आहे.
ब्लिंकन-जिनपिंग भेटीत काही मुद्दय़ांवर मतैक्य
  • चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली. ब्लिंकन यांच्या चीन दौऱ्याचा हा दुसरा दिवस होता. यावेळी झालेल्या विस्तृत चर्चेमध्ये दोन्ही देशांची काही विशिष्ट मुद्दय़ांदरम्यान एकमत झाल्याचे या भेटीनंतर सांगण्यात आले. मात्र, याबाबतचे अधिक तपशील दिले गेले नाहीत.
  • गेल्या पाच वर्षांमध्ये चीनला भेट देणारे ते अमेरिकेचे पहिलेच परराष्ट्रमंत्री आहेत. अमेरिकेने चीनचे हेरगिरी बलून पाडल्यापासून दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला होता.अमेरिकेने चीनवर लादलेले एकतर्फी निर्बंध उठवावेत, चीनच्या तंत्रज्ञानात्म विकासात अडथळे आणणे थांबवावे आणि चीनच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करू नये असे, आवाहन चीनच्या राजनैतिक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.चीनचे परराष्ट्र खात्याचे संचालक वांग यी आणि परराष्ट्रमंत्री चीन गांग यांनी ब्लिंकन यांच्याबरोबर मोकळेपणाने आणि सखोल चर्चा झाल्याचे क्षी जिनिपग यांनी सांगितले.
  • ब्लिंकन यांच्याशी झालेल्या चर्चादरम्यान त्यांच्यासमोर चीनची बाजू स्पष्ट करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि आपल्यादरम्यान बाली येथे झालेली सामायिक सहमती कायम ठेवली जाईल, तसेच दोन्ही देशांनी प्रगती केली आहे आणि काही विशिष्ट मुद्दय़ांवर एकमत झाले असेही जिनपिंग यांनी सरकारी वृत्तसंस्थेला सांगितले.
  • जिनपिंग यांची भेट घेण्यापूर्वी ब्लिंकन यांनी परराष्ट्र खात्याचे संचालक वांग यी यांचीही भेट घेतली. दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे वांग यांनी ब्लिंकन यांना सांगितले. तसेच अमेरिकेने चीनला वर्चस्ववादी समजू नये आणि पारंपरिक पाश्चिमात्त्य समजुतींच्या आधारे चीनविषयी गैरसमज करून घेऊ नयेत अशी विनंतीही वांग यांनी केली.

 

२१ जून सर्वांत मोठा दिवस, मंगळवारी सूर्य कर्कवृत्तावर; दिवस सव्वातेरा, तर रात्र पावणे अकरा तासांची :
  • २१ जूनला सूर्य अधिकाधिक उत्तरेस असून त्याचे दक्षिणेकडे जाणे अर्थात उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. २१ जूनला उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो व रात्र सर्वात लहान असते. मंगळवारी दिवस सव्वातेरा, तर रात्र पावणेअकरा तासांची असेल, अशी माहिती विश्वभारती विज्ञान केंद्राचे प्रभाकर दोड यांनी दिली.

  • दररोज पूर्वेकडे उगवणारा सूर्य काहीसा दक्षिणोत्तर सरकल्याचा अनुभव येत आहे, याचे कारण पृथ्वीच्या अक्षाने तिच्या परिभ्रमण प्रतलाशी केलेला २३.५ अंशाचा कोन हे आहे. त्यामुळे सूर्य कर्कवृत्त ते मकरवृत्तापर्यंत फिरत असल्याचा भास होत असून यालाच उत्तरायण/दक्षिणायन म्हणतात. २१ जूनपासून सूर्य दक्षिणेकडे सरकून २२ सप्टेंबर या शरद संपातदिनी पुन्हा विषुववृत्तावर व त्यानंतर २२ डिसेंबरला अयनदिनी सूर्य मकरवृत्तावर आल्याने हा दिवस सर्वात लहान तर रात्र सर्वात मोठी असते.

  • उत्तरायणात सूर्य उत्तर गोलार्धात व दक्षिणायनात सूर्य दक्षिण गोलार्धात झुकलेला दिसतो. २१ जून या सर्वात मोठ्या दिवशी आपल्या भागात दिवस सव्वातेरा तासांपेक्षा अधिक व रात्र मात्र पावणेअकरा तासांची असते. याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. मानवी शरीर व मनाचे संबंध अधिक दृढ करून निसर्गाच्या संवर्धनासाठी एकत्र यावे, असे आवाहन विश्वभारती विज्ञान केंद्रच्यावतीने करण्यात आले आहे.

अग्निवीरांना’ चार वर्षाच्या सेवेनंतर नोकरीची संधी; आनंद महिंद्रांनी जाहीर केली भरती :
  • महिंद्रा उद्योग समूहाने लष्करात चार वर्षांच्या सेवेनंतर ‘अग्निवीरांच्या’ भरतीची घोषणा केली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ‘अग्निपथ’ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. यासोबतच त्यांनी अग्निवीरांना मिळालेले प्रशिक्षण विशेष असल्याचे सांगितले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये या योजनेच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, अनेक संघटनांनी सोमवारी भारत बंदची घोषणा केली आहे.

  • “अग्निपथ योजनेवर सुरू असलेल्या विरोधामुळे दुःखी आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो आणि मी पुनरुच्चार केला होता की अग्निवीर जी शिस्त आणि कौशल्ये शिकेल ते त्याला विशेषतः रोजगारक्षम बनवेल. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना नियुक्त करण्याच्या या संधीचे स्वागत करतो, असे आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • अनेक आंदोलकांनी अग्निवीरांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवीन योजनेनुसार, अग्निपथद्वारे भरती झालेल्या अग्निवीरांना चार वर्षांसाठी सैन्यात सेवा करण्याची संधी मिळेल. मात्र, या कालावधीनंतर २५ टक्के सैनिकांच्या सेवेचा विस्तार करण्याची चर्चा लष्कराने केली आहे. पूर्वी सैनिक २० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करायचे.

  • देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. लष्कराने सांगितले की, ‘अग्नवीर’ ही भारतीय सैन्यात एक वेगळी श्रेणी असेल आणि ते कोणत्याही रेजिमेंटमध्ये भरती केले जाऊ शकतात. लष्कराने सांगितले की, अधिकृत गुप्तता कायदा, १९२३ अंतर्गत, अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेदरम्यान मिळालेली गोपनीय माहिती कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा स्त्रोताकडे उघड करण्यास मनाई असेल.

कोकण रेल्वे विद्युतीकरणाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण :
  • कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा राष्ट्रार्पण सोहळा आज, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे होणार आह़े

  • या रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, मडगाव आणि उडपी या तीन स्थानकांवर दुपारी २.४५ वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे.

  • ‘भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण मिशन – शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल’ या योजनेअंतर्गत लोकांना पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी देशातील संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोकण रेल्वेच्या ७४१ किलोमीटर लांबीच्या मार्गाचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील मार्ग ३८२ किलोमीटर, गोवा १६३ किमी, तर कर्नाटकातील मार्ग २९४ किलोमीटर आहे.

  • या विद्युतीकरण योजनेची पायाभरणी नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली आणि यंदाच्या मार्च महिन्यात ती पूर्ण झाली. योजनेचा एकूण खर्च १ हजार २८७ कोटी रुपये आहे. ठोकुर-बिजूर, बिजूर ते कारवार, कारवार ते थिविम, थिविम ते रत्नागिरी आणि रत्नागिरी-रोहा अशा पाच टप्प्यांत हे काम पूर्ण करण्यात आले. करोनाकाळातही ते चालू होत़े  त्यामुळे सात वर्षांमध्ये विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले.

  • कोकण रेल्वेचा अवघड भूभाग आणि प्रतिकूल वातावरणामुळे हे काम आव्हानात्मक होते. मात्र, या परिस्थितीवर मात करत रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण केले. पावसाळय़ात पडणाऱ्या तीव्र पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली. गोव्याकडील भागांतील टप्प्याचे काम सर्वात प्रथम पूर्ण झाले. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी या टप्प्याचे काम करण्यात आले.

  • सर्वात शेवटी रत्नागिरी ते थिविम या ९० किलोमीटर भागाचे विद्युतीकरण झाले. करबुडेसारखे मोठे बोगदे या मार्गावर असल्यामुळे त्यामध्ये विद्युतीकरणाची यंत्रणा बसवण्याचे सर्वाधिक आव्हान प्रशासनापुढे होते. ते लिलया पार पाडले आहे. सध्या मालगाडय़ा आणि दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी विजेवर चालवली जात आहे. गोव्याकडील कामातील त्रुटी पूर्ण केल्यानंतर लवकरच सर्वच गाडय़ा विजेवर चालवण्यात येणार आहेत.

हिंसक आंदोलकांना ‘अग्निपथ’ची दारे बंद ; भरती प्रक्रियेबाबत तिन्ही दलांची घोषणा, वेळापत्रकही जाहीर :
  • देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील, असा इशाराही दिला.

  • ‘अग्निपथ’मध्ये भरती होताना अर्जदार तरुणांना, या योजनेच्या विरोधातील जाळपोळीत सामील नसल्याचे किंवा आंदोलनात भाग घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले, ‘‘शिस्त हा भारतीय संरक्षण दलाचा पाया आहे. येथे जाळपोळ-तोडफोड आणि निदर्शनांना थारा नाही.

  • ’’ अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराला या योजनेविरोधातील कोणत्याही स्वरूपाच्या आंदोलनात सामील न झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. तसेच प्रत्येक उमेदवाराची पोलीस पडताळणी करण्यात येईल. एखाद्याविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल असेल, तर त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असेही लेफ्टनंट जनरल पुरी यांनी नमूद केले.

  • तिन्ही सशस्त्र दलांनी रविवारी अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी एक व्यापक कार्यक्रम जाहीर केला. संरक्षण दलातील जवानांचे सरासरी वय कमी करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तिन्ही दलांनी भरती प्रक्रियेचा तपशील जाहीर केला.

कनिष्ठ आशियाई स्क्वॉश स्पर्धा - अनाहत सिंगची सुवर्णकमाई :
  • भारताची उदयोन्मुख स्क्वॉशपटू अनाहत सिंगने रविवारी कनिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेतील मुलींच्या १५ वर्षांखालील गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.

  • थायलंडमधील पटाया येथे झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षीय अनाहतने हाँगकाँगच्या क्वोंग एनावर अंतिम सामन्यात ३-० अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच अनाहतने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही व सामना ११-७, १२-१०, ११-५ असा सरळ तीन गेममध्ये जिंकला. तिने अंतिम फेरीपर्यंतच्या आपल्या प्रवासात एकही गेम गमावला नाही. अनाहतने उपांत्य लढतीत मलेशियाच्या अग्रमानांकित इसाबेल विल्सनला ३-० असा पराभवाचा धक्का दिला होता.

  • अनाहतने आतापर्यंत ४६ राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या असून दोन राष्ट्रीय अजिंक्यपदे आणि दोन आंतरराष्ट्रीय जेतेपदेही तिने पटकावली आहेत. अमेरिकन आणि ब्रिटिश या कनिष्ठ गटांतील दोन स्पर्धा जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. आगामी काळात फ्रान्सच्या नॅन्सी येथे होणाऱ्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती सर्वात युवा खेळाडू ठरेल.

20 जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.