चालू घडामोडी आणि दिनविशेष - 17 नोव्हेंबर 2023

Date : 17 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
IND vs AUS Final पाहण्यासाठी पीएम मोदी येऊ शकतात, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि एमएस धोनीलाही निमंत्रण
  • आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर उपांत्य फेरीतीस दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता २० वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी बीसीसीआयने काही खास लोकांना निमंत्रण पाठवले आहे.

पंतप्रदान मोदी अंतिम सामन्याला राहू शकतात उपस्थित -

  • हा सामना संस्मरणीय बनवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विशेष तयारी सुरू केली आहे. हा शानदार सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी पीएम रिचर्ड मार्ल्स देखील अंतिम सामना पाहण्यासाठी येऊ शकतात. त्याचबरोबर माजी कर्णधार एमएस धोनीही उपस्थित राहू शकतो. कारण बीसीसीआयने विश्वचषक विजेत्या सर्व कर्णधारांना अंतिम सामन्याचे निमंत्रण पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मार्चमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यासाठी पंतप्रधानांनी लावली होती हजेरी -

  • अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाहही येऊ शकतात. या सर्वांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या सर्वांचे निमंत्रण स्वीकारणे एवढेच उरले आहे. या वर्षी मार्चच्या सुरुवातीला पीएम मोदी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. हा सामना पाहण्यासाठी पीएम मोदींशिवाय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही आले होते. हा सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता.

भारताने चौथ्यांदा, तर ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक -

  • टीम इंडिया चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. याआधी २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावले होते. त्याआधी २००३ आणि १९८३ मध्ये भारताने विश्वचषकाची अंतिम फेरी खेळली होती. टीम इंडियाला २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. १९८३ मध्ये भारत प्रथमच विश्वविजेता ठरला होता.
ईशा अंबानीकडे मोठी जबाबदारी, ‘या’ पदावर नियुक्तीला RBI ची मंजुरी
  • आशियातले सर्वात श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनांशियल सर्व्हिसेसच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) Jio Financial Services च्या संचालक पदावर मुकेश अंबानींची मुलगी आणि रिलायन्स रिटेलची संचालक ईशा अंबानी यांच्या नियुक्तीवर मंजुरीची मोहोर लावली आहे. ईशा अंबानीसह संचालक म्हणून अंशुमन ठाकूर आणि हितेश कुमार सेठिया यांच्याही नावाला मंजुरी दिली आहे.
  • भारतात Jio ची संकल्पना आणण्यात ईशा अंबानीचा खूप मोठा वाटा आहे. मुकेश अंबानींची मुलगी ईशा रिलायन्स रिटेलची जबाबदारी सांभाळते आहे आणि त्याचा विस्तारही करते आहे. ईशाने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमध्ये पदवीही घेतली आहे. त्याचप्रमाणे स्टँडफोर्ड विद्यापीठातून MBA ची पदवीही तिने घेतली आहे.
  • मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर्स ऑगस्ट २०२३ या महिन्यात लिस्ट झाले होते. लिस्टिंगनंतर शेअर्स काही प्रमाणात घसरले होते. मात्र ईशा अंबानी यांच्या संचालक पदी नियुक्तीला आरबीआयने मंजुरी दिल्यानंतर Jio Financial च्या शेअर्समध्ये १.३२ टक्के वाढ झाली आहे. आज हा शेअर २२७.१० रुपयांच्या लेव्हलवर बंद झाला. इकॉनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
  • Jio Financial Services चं मार्केट कॅपिटलायझेशन १.४४ लाख कोटी रुपये आहे. कंपनीचा शेअर ५२ व्या आठवड्यातला हाय लेव्हल २६६.९५ रुपये इतका होता. तर लो लेव्हलला तो २०२.८० रुपये इतका गेला होता. ईशा अंबानीला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात नुकतंच सहभागी करण्यात आलं. याबाबतची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली होती. रिलायन्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या नावाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
असुरक्षित आदिवासी समूहाच्या ७५ जमातींसाठी २४ हजार कोटींची तरतूद; निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारण
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “विशेषतः असुरक्षित आदिवासी समूह” (Particularly Vulnerable Tribal Groups – PVTGs) या आदिवासी जमातींच्या गटाच्या विकासासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेले अभियान अखेर मार्गी लावले आहे. क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी झारखंड येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत जनजातीय गौरव दिवस (आदिवासी गौरव दिन) साजरा करण्यात आला. सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचीही चाहूल लागलेली असताना आदिवासी समाजातील क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान मोदी यांनी विशेषतः असुरक्षित आदिवासी समूहाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीचे अभियान जाहीर केले.
  • सरकारतर्फे दिलेल्या निवेदनानुसार, PVTGs गटातील आदिवासी जमातींच्या कुटुंबांना आणि त्यांच्या वस्त्यांना मूलभूत सुविधा पुरविणे. जसे की सुरक्षित घरे, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता, शिक्षण घेण्यास मदत, आरोग्य आणि पोषण, रस्ते आणि दूरसंचार कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी प्रदान करणे; हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे या अभियानाद्वारे नऊ मंत्रालये, ११ योजनांना एकाच छत्राखाली आणणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि जल जीवन मिशन आणि इतर योजनांचा समावेश आहे.
  • खर्चाच्या अनुषंगाने PVTG कार्यक्रम हे केंद्रीय योजनांचे सर्वात मोठे अभियान आहे. तसेच एका मोठ्या आदिवासी समूहाला या अभियानाने व्यापले आहे. या अभियानासाठी सुरुवातीची तरतूद १५ हजार कोटींची होती. याची तुलना इतर मोठ्या योजनांशी केली तर २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ६० हजार कोटी, जल जीवन मिशन योजनेसाठी ७० हजार कोटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ७९,५९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • अल्पसंख्याक, असुरक्षित गट, अनुसूचित जमाती (एसटी) आणि अनुसूचित जाती (एससी) यांच्या विकासासाठीही सरकारने एकछत्री कार्यक्रम आखलेले आहेत. ज्यासाठी यावर्षीच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने अनुक्रमे ६१० कोटी, २,१९४ कोटी, ४,२९५ आणि ९,४०९ कोटींची तरतूद केली आहे.
सचिनचा १०० शतकांचा विक्रमही मोडण्याची कोहलीमध्ये क्षमता! भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत
  • भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने आपला आदर्श सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम तर मोडलाच, पण तो इतक्यातच थांबणार नाही. सचिनचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडण्याचीही कोहलीमध्ये क्षमता असल्याचे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
  • कोहलीने बुधवारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ११७ धावांची खेळी केली. हे त्याचे ५०वे एकदिवसीय शतक ठरले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला. यासह कोहलीने कसोटीत २९ आणि ट्वेन्टी-२०मध्ये एक शतक केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता त्याच्या नावे एकूण ८० शतके आहेत.
  • ‘‘सचिन तेंडुलकरने १०० शतके केली, तेव्हा त्याच्या या विक्रमाच्या आसपासही एखादा फलंदाज पोहोचेल असा कोणी विचारही केला नसेल. मात्र, कोहलीच्या नावे आता ८० शतके आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वाधिक ५० शतके झाली आहेत. हे अविश्वसनीय आहे,’’ असे शास्त्री म्हणाले.
  • ‘‘कोहलीसारख्या खेळाडूसाठी अशक्य असे काहीच नाही. त्याच्यासारखे महान फलंदाज जेव्हा लयीत असतात आणि शतके करत असतात, तेव्हा ते सहजासहजी थांबत नाहीत. त्यांचा शतकांचा आकडा झटपट वाढत जातो. कोहलीने पुढील १० डावांमध्ये पाच शतके केली, तर आश्चर्य वाटायला नको. कोहली क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत खेळतो. तो आणखी तीन-चार वर्षे तरी खेळेल. या काळात तो किती मोठी मजल मारू शकतो याचा अंदाज बांधणेही अवघड आहे,’’ असेही शास्त्री म्हणाले.
  • शास्त्री यांनी बराच काळ भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. या काळात त्यांना कोहलीला जवळून पाहता आले. कडक डाएट, शिस्त आणि तंदुरुस्ती या गोष्टी कोहलीला इतरांपेक्षा वेगळे बनवतात असे शास्त्री यांनी नमूद केले.
आगामी दोन वर्षात ६ ते ७.१ टक्के दराने विकास शक्य
  • भारतीय अर्थव्यवस्थेची आगेकूच कायम राहणार असून, आगामी २०२४ ते २०२६ आर्थिक वर्षांदरम्यान विकासदर वार्षिक ६ ते ७.१ टक्के राहील, असा अंदाज जागतिक पतमानांकन संस्था ‘एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने गुरुवारी वर्तविला.
  • भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास पथ भक्कम आहे. देशांतर्गत आघाडीवर सरकारने वाढवलेला भांडवली खर्च, भारतीय कंपन्यांची सुधारलेली मिळकत कामगिरी आणि बँकांची सुदृढ ताळेबंद स्थिती यांसारख्या सकारात्मक घडामोडींमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चालू आर्थिक वर्षासह २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये ७.१ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा ‘एस ॲण्ड पी’चा अंदाज आहे. बँकांच्या सुधारित जोखीम-व्यवस्थापनामुळे ३१ मार्च २०२५ पर्यंत बँकिंग क्षेत्राची बुडीत कर्जे ३ ते ३.५ टक्क्यांपर्यंत खाली येतील, असा कयासही तिच्या ’ग्लोबल बँक्स कंट्री-बाय-कंट्री आऊटलूक २०२४’ या अहवालाने व्यक्त केला आहे. भारतातील व्याजदर भौतिकदृष्ट्या वाढण्याची शक्यता नाही आणि यामुळे बँकिंग उद्योगासाठी जोखीम मर्यादित राहील, असेही अहवालाने नमूद केले आहे.
  • मंदावलेली जागतिक वाढ आणि बाह्य मागणी यातून आर्थिक क्रियाकलापांवर अतिरिक्त ताण येईल. मात्र देशांतर्गत मागणी मजबूत राहिल्याने भारताची आर्थिक प्रगती चमकदार राहील, अशी या जागतिक संस्थेने आशा व्यक्त केली आहे. शिवाय जागतिक अनिश्चिततेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम राहील, असे तिने म्हटले आहे.
समान नागरी कायदा लागू झाल्यास खरंच आरक्षण संपणार का? दोन्ही कायद्यात नेमका फरक काय?
  • ‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’ अर्थात समान नागरी कायद्याची सध्या देशात जोरदार चर्चा चालू आहे. भारतीय संविधान लागू झाल्यानंतर देशात लवकरात लवकर समान नागरी कायदा लागू करावा, अशी भूमिका स्वत: संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती. गेल्या ७०-७५ वर्षांच्या काळात विविध सरकारांनी समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पूर्णत्वास गेला नाही. विविधतेतून एकता हे आपले ब्रीद. त्यामुळे या कायद्यामुळे धार्मिक विविधतेवर घाला येईल की काय, असं काही लोकांना वाटतं. पण आता केंद्रातील भाजपा सरकार देशात समान नागरी कायदा आणू पाहत आहे. भाजपाची नेहमी या कायद्याच्या समर्थनार्थ भूमिका राहिलेली आहे. काही महिन्यांपूर्वी समान नागरी संहितेची पडताळणी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी विधि आयोगाने सर्व सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडून सूचनाही मागवल्या होत्या.
  • केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा आणण्यासाठी चाचपणी केली जात असताना या कायद्याबाबत लोकांमध्ये विविध प्रकारचे संभ्रम आहेत. यातील महत्त्वाचा संभ्रम म्हणजे समान नागरी कायदा लागू झाल्यास देशातील आरक्षणाची तरतूद संपुष्टात येईल. सर्व लोकांना समान पातळीवर आणलं जाईल. पण हा संभ्रम पूर्णपणे चुकीचा आहे. कारण समान नागरी कायदा आणि आरक्षणाची तरतूद याचा दूरपर्यंत कसलाही संबंध नाही. समान नागरी कायदा हा धर्माशी संबंधित आहे, तर आरक्षण हे जातीशी संबंधित आहे, हा सूक्ष्म फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. या लेखातून आपण हे दोन्ही कायदे कसे वेगवेगळे आहेत, हे जाणून घेणार आहोत.

समान नागरी कायदा म्हणजे काय?

  • प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात लग्न, घटस्फोट आणि संपत्तीचे मुलांमध्ये होणारे विभाजन अशा गोष्टी होतच असतात. लग्नाचं वय, किती लग्ने करावीत, संपत्तीचे विभाजन मुलगे, मुली किंवा विधवा पत्नी यांच्यामध्ये नेमके कसे व्हावे, याविषयी सर्व धर्मियांसाठी एकच नियम लागू करणं, हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. पण वरील बाबी ठरवण्यासाठी आपल्या देशात विविध प्रकारचे धार्मिक कायदे, रुढी, परंपरा आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा लागू केल्यास सरकारकडून धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ केली जाऊ शकते, असं काहींना वाटतं.

 

आशियाई एअरगन स्पर्धा - भारतीयांचा सुवर्ण चौकार :
  • कोरियात दाएगू येथे सुरू असलेल्या १५व्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत भारतीयांनी सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण चौकार लगावला. स्पर्धेचे अजून दोन दिवस शिल्लक असून, भारताने आतापर्यंत २१ सुवर्णपदके मिळविली आहेत.

  • स्पर्धेत बुधवारी भारताला पहिले सुवर्णपद महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रिदम सांगवानने मिळवून दिले. याच वर्षी कैरो येथील विश्वचषक स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणाऱ्या रिदमने अंतिम फेरीत भारताच्याच पलकचा १६-८ असा पराभव केला. कुमार गटातही मुलींच्या विभागात सुवर्ण लढत भारतीय नेमबाजांमध्येच झाली. मनू भाकरने आपली सहकारी ईशा सिंगचा चुरशीच्या लढतीत १७-१५ असा पराभव केला.

  • भारताच्या पुरुष संघाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कोरियाचा १६-१४ असा पराभव करून तिसरे सुवर्णपदक मिळविले. भारतीय संघात शिवा नरवाल, नवीन, वियवीर सिद्धूचा समावेश होता. कुमार गटात सागर डांगी, सम्राट राणा, वरुण तोमर या भारतीय चमूने उझबेकिस्तानवर एकतर्फी लढतीत १६-२ असा विजय नोंदवला.

अमेरिका अध्यक्षपदाच्या शर्यतीत ट्रम्प यांची पुन्हा उडी :
  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाच्या शर्यतीत तिसऱ्यांदा सहभागी होण्यास सिद्ध झाले आहेत. मंगळवारी याबाबत गोषणा करताना त्यांनी अमेरिकेतील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्जही दाखल केला.

  • मात्र डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराविरोधात दोन हात करण्यापूर्वी त्यांना आपल्या रिपब्लिकन पक्षातून निवडून यावे लागेल. पाम बीच येथील मार-ए-लागो क्लबमध्ये ३० अमेरिकन राष्ट्रध्वज आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणांफलकांच्या पार्श्वभूमीवर उभे राहून, ७६ वर्षीय ट्रम्प यांनी त्यांचे हजारो समर्थक, क्लब सदस्यांना संबोधित केले. त्यानंतर निवडणूक आयोगात कागदपत्रे दिली.

  • अमेरिकेला तिचे महानपद पुन्हा मिळवून देण्यासाठी मी पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी जाहीर करत आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन २०२४ मध्ये पुन्हा निवडून येणार नाहीत हे मी निश्चित करेन.

‘नासा’ची पुन्हा चंद्रावर स्वारी; अजस्त्र प्रक्षेपणास्त्र ‘अर्टेमिस’चे यशस्वी उड्डाण :
  • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था, नासाने ‘अपोलो’ मोहिमेच्या यशानंतर ५० वर्षांनी पुन्हा चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून मानवरहित मोहीम बुधवारपासून सुरू झाली. ‘अर्टेमिस’ हे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रक्षेपणास्त्र मानवी कुपी (कॅप्सूल) घेऊन चंद्राकडे झेपावले.

  • तांत्रिक बिघाड, वादळे यामुळे या मोहिमेला अनेक वर्षांचा विलंब झाला आहे. त्यामुळे खर्च काही अब्ज डॉलरनी वाढला असला तरी ‘नासा’ने ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. अर्टेमिस प्रक्षेपणास्त्रावर ‘ओरिऑन’ हे अंतराळ यान असून त्यामध्ये पृथ्वीवर सुरक्षितरित्या परतण्यासाठी कुपी बसवण्यात आली आहे.

  • हे अंतराळ यान चंद्राभोवती प्रदक्षिणा करेल आणि कुपी पृथ्वीकडे परत पाठवेल. अर्थात, यामध्ये सध्या अंतराळवीर नसून तीन पुतळे चंद्राकडे पाठवण्यात आले आहेत. साधारणत: तीन आठवडय़ांनंतर ही कुपी प्रशांत महासागरामध्ये उतरण्याचे नियोजन आहे. ही कुपी आणि आतमध्ये असलेले पुतळे सुरक्षितरित्या पृथ्वीवर आल्यास भविष्यात मानवी मोहीम आखली जाणार आहे.

  • पुन्हा ‘अपोलो’ - ‘अपोलो ११’ मोहिमेंतर्गत निल आर्मस्ट्राँगने २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर आतापर्यंत एकही मानव चंद्रावर गेलेला नाही. आता तब्बल ५० वर्षांनी ‘नासा’ने पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आगामी काळात चंद्रावर आणि त्यानंतर मंगळावर मानव पाठवून तिथे मानवी वसाहती उभारण्याची योजना नासाने आखली आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! फोन आल्यावर आता Unknown Number नाही थेट फोन करणाऱ्याचं नाव दिसणार :
  • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून (TRAI) आता लवकरच एक महत्वाची सेवा सुरु केली जाणार आहे. त्याद्वारे तुमची अनोळखी मोबाईल नंबरपासून सुटका होणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक वेळा अनोळखी नंबरवरुन आलेले कॉल उचलण्याचा कंटाळा येतो.

  • तर काहीना अनोळखी नंबरची भीती देखील वाटते. मात्र, आता सरकारकडून एक अशी सुविधा अमंलात आणली जाणार आहे. त्यामुळे तुमची अनोळखी नंबरपासून सुटका होणार आहे. कारण, आता जो व्यक्ती तुम्हाला कॉल करेल त्याचं नाव मोबाईल फोनमध्ये सेव केलेलं नसले तरीही ते तुम्हाला दिसणार आहे.

  • या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी (KYC) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.

आयओए’च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर :
  • भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या चर्चेत राहिलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी उमेश सिन्हांनी अधिकृतरीत्या जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्देश आणि मंजूर करण्यात आलेल्या ‘आयओए’च्या नव्या घटनेनुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

  • ‘आयओए’च्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या अर्जाची छाननी २९ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. कार्यक्रमात अर्ज माघार घेण्यासाठी या वेळी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नव्या घटनेतील तरतुदीनुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

  • अर्ज माघार घेण्यासाठी १, २ आणि ३ डिसेंबर असे तीन दिवस देण्यात आले आहेत. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर निवडणुकीच्या शर्यतीत राहिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर १० डिसेंबरला निवडणूक पार पडेल आणि त्याच दिवशी निवडणुकीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

१७ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.