चालू घडामोडी आणि दिनविशेष - 14 नोव्हेंबर 2023

Date : 14 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रवींद्र जडेजाने मोडला अनिल कुंबळेचा विक्रम, विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेत टाकले मागे
  • विश्वचषकाच्या ४५व्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह त्याने गट फेरी अपराजित राहिली. टीम इंडियाने सर्व सामने जिंकले. आता १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताचा उपांत्य सामना न्यूझीलंडशी होणार आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी एकूण १६ षटकार ठोकले. त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
  • २०२३ मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये भारताच्या एकूण षटकारांची संख्या २१५ वर पोहोचली आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्यांनी वेस्ट इंडिजचा विक्रम मोडला. विंडीजने २०१९ मध्ये २१५ षटकार मारले होते. या बाबतीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या खेळाडूंनी २०२३ मध्ये 203 षटकार मारले आहेत. न्यूझीलंडने २०१५ मध्ये १७९ षटकार मारले होते. ऑस्ट्रेलियाने २०२३ मध्ये १६५ षटकार मारले आहेत.

जडेजाने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला

  • नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने दोन विकेट्स घेतल्या. यासह विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स १६ घेणारा तो भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत महान गोलंदाज अनिल कुंबळेचा विक्रम मोडला. कुंबळेने १९९६च्या वर्ल्ड कपमध्ये १५ विकेट घेतल्या होत्या. युवराज सिंगने २०११ मध्ये १५ विकेट्स घेतल्या होत्या. कुलदीप यादव त्याच्या जवळ पोहोचला आहे. सध्याच्या विश्वचषकात कुलदीपने १४ विकेट्स घेतल्या आहेत. मनिंदर सिंगने १९८७ मध्ये १४ विकेट्स घेतल्या होत्या.

भारताने २००३ची कामगिरी मागे टाकली

  • या विश्वचषकात भारतीय संघाने सलग नऊ विजय मिळवले आहेत. २००३च्या कामगिरीत त्यांनी सुधारणा केली आहे. त्यांनी सलग आठ सामने जिंकण्याचा विक्रम मागे टाकला आहे. विश्वचषकात सलग सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. २००३ आणि २००७ मध्ये त्यांनी ११ सामने जिंकले होते.
लवकरच सर्व महापालिकांवर प्रशासकीय राजवट
  • ओबीसी आरक्षण, सदस्यसंख्या वाढ आणि प्रभागरचना ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याबद्दल अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम म्हणजे १ जानेवारी २०२४ रोजी राज्यात एकही महानगरपालिका लोकनियुक्त असणार नाही. सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये प्रशासकराज राहणार आहे.
  • राज्यातील २६ जिल्हा परिषदा, २८९ पंचायत समित्या आणि २५७ नगरपालिका व नगर पंचायतींच्या निवडणुकाही रखडलेल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. न्यायालयाच्याच आदेशानुसार ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी ओबीसींची शास्त्रीय सांख्यिकी माहिती जमा करण्यासाठी समर्पित मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या.
  • राज्यातील ९२ नगरपालिका व ४ नगर पंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. त्याचवेळी बांठिया मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाला, त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्यात की घेऊ नयेत, असा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावर या निवडणुकांनाच स्थगिती देण्यात आली. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे.
  • महानगरपालिका व जिल्हा परिषदांमधील सदस्य संख्या वाढीचा ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय नंतर शिंदे सरकारने बदलला. हे प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात आहे. प्रभाग रचनेचा अधिकार राज्य शासनाचा की निवडणूक आयोगाचा, हा वादही सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळे निवडणुका रखडलेल्या आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, औरंदाबाद, नागपूर या मोठ्या महानगरपालिकांची मुदत मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्येच संपलेली आहे.

२५ पालिकांची मुदत संपली

  • राज्यात सध्या एकूण २९ महानगरपालिका असून, त्यात इचलकरंजी व जालना या दोन नवनिर्मित महापालिकांचा समावेश आहे. २५ महानगरपालिकांची आधीच मुदत संपलेली आहे. नवीन दोन महापालिकांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. या महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या हातात आहे. आता उरल्या सुरल्या अहमदनगर व धुळे या दोन महापालिकांची मुदत पुढील महिन्यात डिसेंबर अखेरपर्यंत संपणार आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२४ ला राज्यातील एकही महापालिका लोकनियुक्त असणार नाही, सर्वच्या सर्व महापालिकांवर प्रशासक राज असणार आहे.
२०० गुणांच्या परीक्षेत २०० पेक्षा अधिक गुण! सुधारित निकाल लावण्याची ‘महाज्योती’वर नामुष्की
  • महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (महाज्योती) राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या (एमपीएससी) प्रशिक्षण प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या निकालात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. ही परिक्षा २०० गुणांची असताना अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून लवकरच सुधारित निकाल जाहीर केला जाईल, असे ‘महाज्योती’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी एमपीएससी प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण ८ सत्रांमध्ये चाळणी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण ३९ हजार ७८६ उमेदवार पात्र ठरले होते. त्यातील १९ हजार १७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल शनिवारी ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर करण्याचे काम एका संस्थेला देण्यात आले होते. मात्र निकालात गोंधळ झाल्यानंतर हा निकाल संकेतस्थळावरून  हटविण्यात आला आहे. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध केला जाईल. त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागविण्यात येतील व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाबाबत कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही, असा खुलासा ‘महाज्योती’मार्फत काढलेल्या पत्रकात केला आहे.
  • विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे निकाल विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने लावण्यासाठी निकालाची शहानिशा करून घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत प्राप्त झालेले गुण आणि गुणांचे नॉर्मलायक्षेशन केल्यानंतर येणारे प्राप्त गुण याची माहिती निकालद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर  संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल लावण्यात येईल, असे स्षष्टीकरण ‘महाज्योती’कडून देण्यात आले आहे.

नेमका दोष कुणाचा?

  • निकाल हटविल्यानंतर ‘महाज्योति’ने पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार संबंधित संस्थेने गुणांची मोजणी करताना (नॉर्मलायझेशन) रेल्वे भरती बोर्डाद्वारे वापरण्यात येणाऱ्या सूत्राचा वापर केला आहे. मात्र नॉर्मलायझेशन योग्य रीतीने केल्याचे या संस्थेने कळविले आहे. आता ‘महाज्योती’मधील तज्ज्ञांकरवी सूत्र बरोबर आहे का याची खात्री केली जात आहे.  याबाबत  अधिक भाष्य करण्यास महाज्योतीच्या अधिकाऱ्ऱ्यांनी नकार दिला.
ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचं निधन
  • ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय (पीआरएस ओबेरॉय) यांचं मंगळवारी सकाळी निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशात हॉटेल व्यावसायाचा चेहरामोहरा बदलण्याचं श्रेय पीआरएस ओबेरॉय यांना दिलं जातं.
  • ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये EIH लिमिटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे ​​अध्यक्षपद सोडले. २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.
  • EIH लिमिटेडचे माजी कार्यकारी अध्यक्ष, ओबेरॉय ग्रुप फ्लॅगशिप, भारतातील हॉटेल व्यवसायाचा चेहरामोहरा बदलणारा माणूस म्हणून पीआरएस ओबेरॉय यांना ओळखलं जातं. “अनेक देशांमधील आलिशाम हॉटेल्सच्या व्यवस्थापनासाठी नेतृत्व पुरवण्याव्यतिरिक्त, पीआरएस ओबेरॉय यांनी ‘ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स’च्या विकासात पुढाकार घेतला.
आडवाणींच्या रथयात्रेनंतर ३३ वर्षांनी सोमनाथमधून सुरु झाली ‘ही’ खास मोहीम, राम मंदिर उद्घाटनात महत्वाचं योगदान
  • ३० ऑक्टोबरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या गांधीनगरमधून ‘राम नाम मंत्र लेखन यज्ञ’ याची सुरुवात केली. या मोहिमेच्या अंतर्गत गुजरातच्या सोमनाथ मंदिर परिसरातील राम मंदिरातल्या पोथ्यांमध्ये प्रभू रामाचं नाव लिहिलं जातं आहे. या पोथ्या २०२४ मध्ये २२ जानेवारीच्या दिवशी अयोध्येत पाठवल्या जाणार आहेत. राम मंदिरासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेनंतर ३३ वर्षांनी अशा प्रकारची मोहीम राबवली जाते आहे. २३ ऑक्टोबर १९९० या दिवशी लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने लालकृष्ण आडवाणींना अटक केली होती. ज्यानंतर राम मंदिराची रथयात्रा अचानक थांबली होती. त्यानंतर राम मंदिरासाठी ही विशेष मोहीम राबवली जाते आहे.
  • सोमनाथच्या राम मंदिरात भक्तांसाठी ठेवण्यात आल्या १० पोथ्या
  • सोमनाथ मंदिर ट्रस्टने १० पोथ्यांची व्यवस्था केली आहे. या पोथ्यांमध्ये भक्तांनी राम नाम लिहायचं आहे. राम मंदिर आणि बाबरी मशिद यांच्यातला वाद जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा वाद सुरु होता तेव्हा सोमनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने सोमनाथ मंदिराच्या समोर असलेल्या त्रिवेणी संगमावर राम मंदिर बांधलं होतं. २०१७ मध्ये या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं होतं.

अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष बसची योजना

  • सोमनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष बसची योजनाही आखली आहे. सोमनाथ मंदिर ते राम मंदिर अशी बस सेवा सुरु केली जाणार आहे. ठराविक वेळाने या बस सोडल्या जाणार आहेत. या विश्वस्त मंडळाने असंही सांगितलं आहे की जे भक्त पोथ्यांमध्ये राम नाम लिहितील त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
  • गुजरातमध्ये भाजपाने या मोहिमेच्या अंतर्गत २४ जानेवारीला प्रत्येक गावात उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. वेरावलचे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी पदाधिकारी आणि राज्य भाजपा सचिव झवेरीभाई ठकरार यांनी सांगितलं की राम हे तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयतात आहेत. राम मंदिराचं उद्घाटन होणं ही ५७६ वर्षांच्या लढाईच्या विजयाचं प्रतीक आहे. हिंदुत्व काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे यासाठी राम रथ यात्रा काढण्यात आली होती. आता राम मंदिराचं उद्घाटन होताना प्रत्येक गावात उत्सव साजरा झाला पाहिजे. आम्ही त्यासाठी सर्वतोपरी तयारी करतो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

 

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा:इंग्लंडचा ऐतिहासिक विश्वविजय :
  • इंग्लंडच्या मर्यादित षटकांतील क्रिकेटच्या सुवर्णयुगाचा आणखी एक अध्याय रविवारी लिहिला गेला. डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करनचा (३/१२) भेदक मारा आणि दडपणाखाली आपला खेळ उंचावण्यासाठी ओळखला जाणाऱ्या बेन स्टोक्सच्या (४९ चेंडूंत नाबाद ५२ धावा) अर्धशतकामुळे इंग्लंडने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच गडी राखून मात करत दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तसेच या विश्वविजयासह इंग्लंडने नवा इतिहासही रचला. एकाच वेळी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक आपल्याकडे बाळगणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.

  • इंग्लंडने २०१९मध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. हा अनुभव यंदा त्यांच्या कामी आला. पाकिस्तानचा संघ १९९२च्या विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक होता. मात्र, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) झालेल्या अंतिम सामन्यात बाबर आझमचा पाकिस्तान संघ २० षटकांत ८ बाद १३७ धावाच करू शकला. त्यांच्या गोलंदाजांनी इंग्लंडला या धावा करण्यासाठी झुंजवले. मात्र, अखेरीस २०१९च्या विश्वचषकाप्रमाणे डावखुऱ्या स्टोक्सच्या निर्णायक योगदानामुळे इंग्लंडला विजय मिळवणे शक्य झाले. इंग्लंडने १३८ धावांचे लक्ष्य १९ षटकांत गाठले आणि २०१० नंतर दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले.

  • ‘एमसीजी’वर झालेल्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट होते. मात्र, पावसाने व्यत्यय आणला नाही. परंतु ढगाळ वातावरण आणि हिरवीगार खेळपट्टी लक्षात घेऊन इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी िस्वगचा चांगला वापर करत पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांना सतावले. डावाच्या पाचव्या षटकात करनने रिझवानला (१४ चेंडूंत १५) माघारी पाठवले.

‘मुंबई इंडियन्स’नंतर मुकेश अंबानींना हवीये ‘लिव्हरपूल’चीही मालकी! फुटबॉल क्लबकडे केली विचारणा :
  • जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या लिव्हरपूलला लवकरच नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. ‘द मिरर’च्या रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी लिव्हरपूल क्लब खरेदी करण्याासाठी इच्छूक असून त्यासंदर्भात त्यांनी विचारणा केली असल्याची माहिती आहे. सध्या लिव्हरपूलची मालकी फेनवे स्पोर्ट्स ग्रुपकडे असून त्यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये हा क्लब खरेदी केला होता. दरम्यान, फेनवे स्पोर्ट्स ग्रुप हा क्लब विकण्याच्या तयारीत असून त्याची किंमत ४ कोटी पौंड ठेवली असल्याची माहिती आहे.

  • मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत उद्योपतींपैकी एक असून फोर्बच्या यादीनुसार ते आठव्या क्रमांकावर आहेत. रिलायन्सने १२ वर्षांपूर्वीही लिव्हरपूल क्लबमध्ये भागीदारी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी रिलायन्स आणि सहारा ग्रुप मिळून लिव्हरपूल विकत घेण्याच्या तयारीत होते. मात्र, आता केवळ रिलायन्सकडून हा क्लब खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

  • दरम्यान, मागील काही वर्षांपासून रिलायन्स ग्रुपने खेळावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. रिलायन्सग्रुपकडे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचीही मालकी आहे. तसेच इंडियन फुटबॉल सुपर लीग स्थापन करण्यातही रिलायन्सची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

भारत-ब्रिटनला परस्परांची आता अधिक आवश्यकता - जॉन्सन :
  • ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि ब्रिटनचे संबंध अभूतपूर्व स्वरूपात पुढे जाणार आहेत, असा विश्वास ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शनिवारी व्यक्त केला. दोन्ही देशांना परस्परांची कधी नव्हती एवढी आवश्यकता आहे, असेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

  • दोन्ही देशांनी मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पुढील दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज नाही, असे जॉन्सन यांनी सांगितले.

  • एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, आपण धोकादायक आणि कठीण कालखंडातून जात आहोत. दोन्ही देशांना परस्परांची पूर्वीपेक्षा अधिक आवश्यकता आहे.

ट्विटरची आठ डॉलर्सची सबस्क्रिप्शन सेवा रद्द, बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने निर्णय :
  • ट्विटरनं या आठवड्यात लॉन्च केलेलं ट्विटर ‘ब्लू टीक’ सेवेचं आठ डॉलर्सचं सबस्क्रिप्शन रद्द केलं आहे. बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्विटरने ही सेवा तुर्तास मागे घेतली आहे, अशी माहिती कंपनीच्या सुत्राने दिली आहे. युजर्संकडून मोठ्या ब्रँडच्या नावांचा गैरवापर होत असल्याचंही पुढे आले आहे. ज्या ग्राहकांनी याआधी हे सबस्क्रिप्शन घेतलं आहे, त्यांच्या खात्यांवर ही सेवा सुरू राहणार आहे.

  • या प्रकारानंतर कंपनीने हाय प्रोफाईल खात्यांसाठी नव्याने अधिकृत बॅजेस तयार केले आहेत. कंपनीच्या अंतर्गत मंजूर यादीनुसार व्यवसाय आणि माध्यमांशी संबंधित खात्यांवर ‘ग्रे बॅज’ दिसून येत आहे. ट्विटर ब्लू सेवा स्थगित करण्याआधी कंपनीने महत्त्वाच्या खात्यांसाठी हे बॅज तयार केले होते.

  • व्हेरिफाईड ‘ब्लू टीक’चा युजर्सकडून गैरवापर - व्हेरिफाईड ‘ब्लू टीक’साठी सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर बनावट खात्यांमध्ये वाढ झाली आहे. एका युजरने त्याच्या खात्यावर सुपर मारिओचा फोटो वापरून आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने फार्मा कंपनी ‘इली लीली’ या नावाचा वापर करत इंन्सुलीन मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे. या ट्वीटमुळे कंपनीला ग्राहकांची माफी मागावी लागली आहे. ट्विटरच्या एका युजरने ‘टेस्ला’ कंपनीच्या सुरक्षा रेकॉर्डची खिल्ली उडवली आहे.

  • ‘ट्विटर ब्लू’ काय आहे - या सेवेअंतर्गत ट्विटर युजर्संना कुठल्याही पडताळणी प्रक्रियेशिवाय ‘व्हेरिफाईड बॅज’ मिळणार आहे. या सेवेचे सबस्क्रिप्शन असणाऱ्या युजर्संना ट्विटरच्या इतर सेवांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. या सेवेमुळे काही युजर्संमध्ये मतभेद आहेत. ट्विटर पैसे आकारून सर्वांना हा बॅज देत असल्यामुळे या सेवेचा गैरवापर होऊ शकतो, अशी शंका काही युजर्संना आहे. ‘रिप्लाय’, ‘मेन्शन’ आणि ‘सर्च’ या सेवांमध्ये ‘ट्विटर ब्लू’ युजर्संना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होईल. याशिवाय युजर्संना मोठे व्हिडीओ आणि ऑडिओदेखील पोस्ट करता येणार आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासूनही या सेवेचे सबस्क्रिप्शन घेतल्यास युजर्सची सुटका होणार आहे.

14 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.