भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान सध्या पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्ला सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये भारताने ४ धावांनी विजय नोंदवला. या विजयात स्मृती मंधानाने महत्वाची भूमिका निभावली. त्याचबरोबर तिने एका विक्रमाला देखील गवसणी घातली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाच्या २५०० धावा पूर्ण - भारतीय महिला संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५०० हून अधिक धावा करणारी स्मृती मंधाना ही दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी हे विशेष पराक्रम फक्त हरमनप्रीत कौरच्या नावावर नोंदवला गेला होता. कौरने देशासाठी १३९ सामने खेळताना१२५ डावांत २७.३६ च्या सरासरीने २७३६ धावा केल्या. त्याचवेळी, मंधानाने तिच्या १०४ व्या सामन्यातील १०० व्या डावात ही विशेष कामगिरी केली आहे. मंधानाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५४४ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात स्मृती मंधानाची बॅट जोरदार तळपली. संघासाठी डावाची सुरुवात करताना तिने ४९ चेंडूत १६१.२२ च्या स्ट्राईक रेटने ७९ धावांची मौल्यवान खेळी खेळली. यादरम्यान तिच्या बॅटमधून ९ चौकार आणि ४ उत्कृष्ट गगनचुंबी षटकार निघाले.
केंद्र सरकार लवकरच नवीन टोल सिस्टिम आणणार आहे. सध्या फास्टटॅगवरून टोल जमा करण्याच्या सिस्टिमचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये लवकरच बदल करण्यात येत असुन एका नवी सिस्टिम अंमलात आणण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडुन कॅमेरावर आधारित टोल जमा करण्याच्या पद्धतीचा विचार सुरू आहे. या कॅमेऱ्यांना ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर’ (ANPR) म्हणून ओळखले जाईल.
कॅमेऱ्यावर आधारित या टोल जमा करण्याच्या पद्धतीचे मुख्य कारण नागरिकांचा टोल प्लाझावरील वेळ वाचवणे हा आहे. सध्या भारतातील ९७ टक्के टोल प्लाझावर फास्टटॅगचा वापर केला जातो. पण तरीही नागरिकांना या टोल प्लाझावर होणाऱ्या गर्दीला सामोरे जावे लागते. टोल प्लाझावर एएनपीआर सेट केल्याने कदाचित ही गर्दी जमा होणार नाही आणि नागरिकांचा वेळ वाचेल अशी शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.
एएनपीआर कसे काम करेल - देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरून टोल प्लाझा हटवण्यात येतील आणि त्याजागी एएनपीआर इन्स्टॉल केले जाईल. एएनपीआरद्वारे गाडीच्या नंबर प्लेटवरील नंबरची नोंद करण्यात येईल आणि त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून पैसे भरले जातील.
एएनपीआर सिस्टिममध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात - एएनपीआर सिस्टिममध्ये अनेक संभाव्य अडचणी येऊ शकतात. सर्वात मोठी अडचण म्हणजे या कॅमेऱ्यांमध्ये केवळ २०१९ नंतर बनवण्यात आलेल्या गाड्यांचेच नंबर कॅप्चर केले जातील. याचे कारण म्हणजे,२०१९ मध्ये सरकारने ओइएम असणारे नंबर प्लेट्स असावे अशी कल्पना मांडली आणि त्यानुसार नंबर प्लेट्स बनवण्यात आल्या. त्यामुळे त्या आधीच्या गाड्यांच्या नंबर प्लेट्सची नोंद होणार नाही.
‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर’मधील आणखी एक समस्या म्हणजे या कॅमेऱ्याद्वारे ९ अंकांपेक्षा अधिक अंक किंवा अक्षर असणाऱ्या गाडयांवरील नंबर कॅप्चर करता येणार नाही. बऱ्याच जणांनी एखादे नाव किंवा एखादे लकी अक्षर नंबर प्लेटमध्ये जोडलेले असते. त्यामुळे अशा नंबर प्लेटवरील नंबर एएनपीआर सिस्टिमला कॅप्चर करता येणार नाहीत.
भारतीय नौदलाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता महिलांनाही नौदलाच्या मरिन कमांडोजच्या स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल होता येणार आहे. याबाबत हिंदुस्थान टाईम्सने नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
या वृत्तानुसार, महिलांनी ठरलेले निकष पूर्ण केले तर त्यांनाही नौदलात मरिन कमांडो म्हणून भरती होता येणार आहे. असं असलं तरी कोणालाही थेट मरिन कमांडो म्हणून भरती होता येत नाही. नौदलात भरती झाल्यानंतर मरिन कमांडो होण्यासाठीचे निकष पूर्ण करून मगच ‘स्पेशल फोर्स’मध्ये भरती होता येते.
पुढील वर्षीपासून अग्निवीर म्हणून नौदलात दाखल होणाऱ्या महिला अधिकारी किंवा सेलर यांना मरिन कमांडोच्या पात्रतांच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करून या पदावर काम करता येईल.
स्पेशल फोर्सेस काय आहे?
भारतीय सैन्य, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तिन्ही दलात स्पेशल फोर्सेस आहेत. या स्पेशल फोर्सेसमध्ये प्रतिकुल परिस्थितीतही तग राहू शकतील असे मानसिक आणि शारीरिक पातळीवरील सदृढ सैनिकांची भरती केली जाते. यासाठी त्यांना खडतर प्रशिक्षणातून जावं लागतं आणि विशेष काठिण्य पातळी पार करावी लागते. त्या निकषांवर संबंधितांनी स्वतःला सिद्ध केल्यानंतरच त्यांना या स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल केले जाते.
मरिन कमांडो कोण असतात?
भारतीय नौदलात १९८७ मध्ये मरिन कमांडोंच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सुरुवातीला या पथकाचं नाव ‘इंडियन मरिन स्पेशल फोर्सेस’ असं होतं. १९९१ नौदलाने हे नाव बदललं आणि ‘सबोटेड फोर्सेस ऑफ मरिन’ (मरिन कमांडो फोर्स) असं ठेवलं. त्याचाच शॉर्ट फॉर्म मार्कोज असा आहे.
भारतीय कलाजगतातील पहिलेच आणि जगाचे लक्ष वेधून घेणारे ‘कोची बिएनाले’ हे दृश्यकलेचे दर दोन वर्षांनी भरणारे महाप्रदर्शन यंदा कोणतेही कारण न देता लांबणीवर टाकले गेल्याचा धक्का अनेक चित्रकार व कलारसिकांना सोमवारी बसला.
या महाप्रदर्शनाचे उद्घाटन केरळचे मुख्यमंत्री पिनरायि विजयन यांनी संध्याकाळी केले खरे; पण २३ डिसेंबपर्यंत मुख्य दालने उघडणार नाहीत, हे सकाळीच जाहीर करण्यात आले. ‘‘ हे काय चालले आहे?’’, ‘‘ असे होऊच कसे शकते?’’ या प्रश्नांचा भडिमार आयोजकांनी दिवसभर पूर्णपणे टाळला! ‘ कोची बिएनाले’ चे एक संस्थापक आणि विख्यात चित्रकार बोस कृष्णम्माचारी यांनी सायंकाळच्या उद्घाटन सोहळय़ात करोनाकाळातील अडचणींचा पाढा वाचला; त्यामुळेच २०२० चे हे प्रदर्शन दोन वर्षे लांबणीवर पडून २०२२ मध्ये होत असल्याचाही उल्लेख केला आणि ‘‘गेल्या काही दिवसांत प्रचंड पाऊस पडल्यामुळे आम्ही प्रदर्शनाची मांडणीच करू शकलो नाही’’ असे कारण दिले.
केरळसाठी हे महाप्रदर्शन पर्यटनदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे आहे. राज्य सरकार यासाठी विविध स्वरूपात एकंदर सात कोटी रुपयांचा खर्चभार उचलणार आहे, असे मुख्यमंत्री पिनरायि विजयन यांनी जाहीर केले.
३५ टक्केच काम पूर्ण - युरोप – ऑस्ट्रेलिया, कॅनडा , इंग्लंड, जर्मनी , सिंगापूर , अमेरिका आदी देशांतून तसेच देशभरच्या अनेक शहरांतून ‘‘१२ डिसेंबर’’ ही या प्रदर्शनाची नेहमी ठरलेली तारीख गाठण्यासाठी प्रवास करून आलेल्या कलाप्रेमींची चीडयुक्त- हताश कुजबूज दिवसभर,सुरू होती. आम्ही जी काही अर्धीमुर्धी ‘‘बिएनाले’’ मांडून तयार आहे तीही पाहू, असा हट्टच सकाळपासून तासभर ताटकळलेल्या सुमारे दीड डझन परदेशी कलाप्रेमींनी धरला. अखेर मुख्य दालने असलेल्या ‘‘अॅस्पिनवॉल हाउस’’ च्या आतील काही दालनांमध्ये प्रवेशही मिळाला. परंतु त्यांच्यासह आत शिरलेल्या ‘‘लोकसत्ता’’ प्रतिनिधीने पाहिले की, फार तर ३५ टक्के कलाकृतीच मांडून झाल्या होत्या.
सिमला येथे झालेल्या सोहळय़ात हिमाचल प्रदेशचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुखू यांचा रविवारी शपथविधी उत्साहात झाला. मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधीनंतर सुखू यांनी सांगितले, की आम्ही पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार देऊ. राज्यातील जनतेला निवडणूक प्रचारात दहा आश्वासने दिली आहेत. त्यांची आम्ही निश्चित पूर्तता करू. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जुनी निवृत्तिवेतन योजना (ओपीएस) लागू करू.
सिमला येथे रविवारी झालेल्या एका समारंभात मुकेश अग्निहोत्री यांनी हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तथापि इतर कोणीही मंत्रिपदाची शपथ घेतली नाही. राज्यात १२ सदस्यीय मंत्रिमंडळ बनवता येते.
सुखू यांनी स्वच्छ व प्रामाणिक सरकारचे आश्वासन देताना सांगितले, की काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. ते म्हणाले, की आम्हाला केवळ सत्तेसाठी सत्ता नको होती. आम्हाला व्यवस्था बदलायची आहे. मला थोडा वेळ द्या. कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. नवीन व्यवस्था आणि नवीन विचार आणण्यासाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.
रोमन कॅथलिक चर्चचे सार्वभौम राज्य मानल्या जाणाऱ्या ‘होली सी’ने युरोप परिषदेचे सदस्य व्हावे, तसेच युरोपच्या मानवाधिकार जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करावी, अशी मागणी कॅथलिक महिलांच्या गटांचा समावेश असलेल्या संघटनेने केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार दिनानिमित्त या संघटनेने ही मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘होली सी’ हा सार्वभौम देश समजला जातो आणि आपण मानवाधिकार आणि व्यक्तिगत प्रतिष्ठेचा पुरस्कार करतो, असे ‘होली सी’चे म्हणणे आहे, असे या महिला संघटनांनी निदर्शनास आणून दिले आहे.
असे असतानाही व्हॅटिकनने युरोपच्या मानवाधिकार जाहीरनाम्याशी सुसंगत धोरण ठेवलेले नाही. युरोपचे हे मानवाधिकार धोरण जगभरात मानवी हक्कांबाबत प्रमाण मानले जाते, असे कॅथलिक महिला संघटनांचे म्हणणे आहे.
कॅथलिक महिला परिषद (कॅथलिक वुमन्स काऊन्सिल) ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेच्या युरोपमधील सदस्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, वर्षानुवर्षे ‘होली सी’ने आपल्या अधिकारांत एखाद्या देशासारखा कारभार चालविला आहे. त्यातून त्यांचे काही हक्क निर्माण झाले असले तरी, त्याचवेळी त्यांची काही कर्तव्येही बनली आहेत.
भारताने १९७१ साली पाकिस्तानविरुद्धचे थेट युद्ध जिंकले आणि सध्या पाकिस्तानच्या प्रोत्साहनाने सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धचे अप्रत्यक्ष युद्धही भारत जिंकेल. ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र होताना भारताचे धर्माच्या नावावर झालेले विभाजन ही ‘ऐतिहासिक चूक’ होती हे १९७१च्या युद्धाने दाखवून दिले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहेत.
दहशतवादाला प्रोत्साहन देऊन आणि इतर भारतविरोधी कारवाया करून पाकिस्तान भारताचे तुकडे करू इच्छितो, असे भारताने १९७१ सालच्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर्णिम विजय पर्वाच्या’ (सुवर्णमहोत्सवी समारंभ) उद्घाटन समारंभात केलेल्या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
भारताच्या सशस्त्र दलांनी १९७१च्या युद्धात पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीला मिळवले आणि सध्या ते दहशतवादाचा धोका मुळापासून नष्ट करण्यासाठी काम करत आहेत. आम्ही प्रत्यक्ष युद्ध जिंकलो आणि आम्ही अप्रत्यक्ष युद्धही जिंकू अशी मी हमी देऊ शकतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत व इतर ११ जवानांच्या अकाली मृत्यूमुळे हा कार्यक्रम साधेपणाने झाला.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि आर्थिक आघाडीवर अनेक दुष्परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा आपण रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दिल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी पत्रकारांना दिली.
अमेरिकेतील काही राज्यांना शनिवारी वादळाचा मोठा फटका बसला. त्यासंबंधी माहिती दिल्यानंतर बायडेन यांनी पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, ‘‘मी पुतिन यांना निक्षून सांगितले आहे की, रशियाने जर युक्रेनवर हल्ला केला तर, त्याचे रशियाचे अर्थव्यवस्थेवर विध्वंसकारी परिणाम होतील.
’’ रशियाने युक्रेनवरील आक्रमणाबाबत कोणतीही माहिती उघड केली नसली तरी, युक्रेनमध्ये अमेरिकेचे भूसैनिक पाठविले जाण्याची शक्यता बायडेन यांनी वर्तविली. पूर्वेतर नाटो देशांची सुरक्षा वाढविण्यासाठी तेथे आणखी सैन्य पाठविण्याचा निर्णय अमेरिका आणि नाटोला घ्यावा लागणार आहे.
बायडेन यांनी गेल्या आठवड्यात पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून दोन तास चर्चा केली होती. युक्रेनवर चाल केल्यास रशियाचे जागतिक क्रमवारीतील स्थान धोक्यात येईल, याची आपण पुतिन यांना जाणीव करून दिली, असे बायडेन म्हणाले.
सातव्या वेतन आयोगांतर्गत मोदी सरकार नवीन वर्ष २०२२ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट देऊ शकते. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ करू शकते. यावेळी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ मिळणार आहे. त्यामुळे, नवीन वर्षाच्या सुरुवातीला महागाई भत्त्यात (डीए) वाढ झाल्यास सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.
माध्यमांच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात २०,००० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. सामान्यतः, सरकार केंद्र सरकारच्या कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात दरवर्षी दोनदा वाढ करते, म्हणजे जानेवारी ते जुलै दरम्यान. यापूर्वी जुलैमध्ये, सरकारने दीर्घकालीन स्थगितीनंतर महागाई भत्ता (डीए) आणि महागाई मदत (डीआर) पुनर्संचयित केले होते आणि भत्त्यांचा दर १७ टक्क्यांवरून २८ टक्के केला होता.
केंद्र सरकारने संभाव्य वाढीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही आणि या बातम्या केवळ काही अहवालांवर आधारित आहेत. या डीए वाढीबाबत केंद्राकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, की त्याची अंमलबजावणी कधी होणार याचीही घोषणा करण्यात आलेली नाही.
दोन ऑलिम्पिपक पदकविजेती पी. व्ही. सिंधूपुढे रविवारपासून सुरू होणाऱ्या ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत आपले जगज्जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
दोन वर्षांपूर्वी बॅसेल (स्वित्झर्लंड) येथे सिंधूने प्रथमच जागतिक अजिंक्यपदावर नाव कोरले होते. गेल्या काही महिन्यांत फ्रेंच खुल्या, इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया खुल्या या स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीचा अडथळा ओलांडू न शकलेल्या सिंधूने हंगामाची अखेर करणाऱ्या जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्यात रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली. कामगिरीतील हेच सातत्य ती कायम राखण्याचा प्रयत्न करील.
जागतिक स्पर्धेतून इंडोनेशियाच्या संपूर्ण चमू आणि जपानचा दोन वेळा विश्वविजेत्या केंटो मोमोटासह अनेक नामांकित खेळाडूंनी माघार घेतली आहे. महिला एकेरीत तीन वेळा विश्वविजेती कॅरोलिना मरिन आणि नोझोमी ओकुहारासुद्धा यंदा सहभागी झालेले नाहीत. दुखापतींमुळे लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि २०१५मधील जागतिक उपविजेती सायना नेहवालसुद्धा कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेत खेळणार नाही.
सिंधूला जेतेपद टिकवण्यासाठी नववी मानांकित थायलंडची पोर्नपावी चोचूवाँग, तैपेईची अग्रमानांकित ताय यिंग आणि कोरियाची युवा अॅन से-यंग या महत्त्वाच्या खेळाडूंचे अडथळे ओलांडावे लागतील. इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अॅन से-यंगला जेतेपदाची प्रमुख दावेदार मानली जाते.
अनुभवी फलंदाज अंकित बावणेने साकारलेल्या झुंजार शतकामुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रविवारी उत्तराखंडचा चार गडी आणि एक चेंडू राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या उत्तराखंडने ५० षटकांत ६ बाद २५१ अशी धावसंख्या उभारली. मग चौथ्या क्रमांकावरील बावणेने १३२ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकारानिशी नाबाद ११३ धावांची खेळी करत एलिट ड-गटात महाराष्ट्राला चार सामन्यांत तिसरा विजय मिळवून दिला. उत्तराखंडने दिलेले २५२ धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने ४९.५ षटकांत गाठले. कर्णधार ऋतुराज गायकवाड केवळ २१ धावा करून बाद झाला. महाराष्ट्राची ४ बाद ७५ अशी अवस्था असताना बावणेने नौशाद शेखच्या (४७) साथीने शतकी भागीदारी रचली. मग त्याने जगदीश झोपेसोबत (२२) सहाव्या गड्यासाठी ६२ धावांची भर घातली.
उत्तराखंड : ५० षटकांत ६ बाद २५१ (स्वप्निल सिंह ६६, तनुष गुसेन ५५; जगदीश झोपे २/४५) पराभूत वि. महाराष्ट्र : ४९.५ षटकांत ६ बाद २५२ (अंकित बावणे नाबाद ११३, नौशाद शेख ४७; स्वप्निल सिंह २/२०).
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.