चालू घडामोडी आणि दिनविशेष - 10 जानेवारी 2024

Date : 10 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वर्षभरात ११४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती विभागातील विदारक चित्र
  • अनियमित पावसामुळे पश्चिम विदर्भात रब्‍बी हंगाम धोक्‍यात आला, त्‍यातच शेतमालाला बाजारात योग्‍य भाव मिळत नसल्‍याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण असून वर्षभरात अमरावती विभागातील तब्बल ११४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
  • दोन वर्षांपूर्वी सोयाबीन आणि कापसाला चांगले दर मिळाल्याने यंदाच्या खरीप हंगामात विभागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कपाशीला पसंती दिली. पण, अनियमित पावसामुळे पिकांची वाढ खुंटली. उत्‍पादकतेवर परिणाम झाला. परतीच्या पावसाने नुकसान केले. पांढरे सोने असलेला कापूस अनेक तालुक्यांमध्ये काळवंडला, कपाशीची गुणवत्ता घसरली. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्‍ये निराशा आहे. शेतकरी हतबलता अनुभवत आहेत. अल्प उत्पादनाचा प्रभाव शेती अर्थकारणावरून जाणवणार असून नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.
  • सरकारी आकडेवारीनुसार १ जानेवारी २०२३ पासून डिसेंबर अखेरपर्यंत अमरावती विभागात ११४० शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शासन मदतीसाठी ५१७ प्रकरणे पात्र ठरली. याशिवाय ३१७ प्रकरणे शासन मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेली आहेत, तर ११ महिन्यांपासून तब्बल २३५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. राज्‍यात सर्वाधिक शेतकरी आत्‍महत्‍या या अमरावती विभागात झाल्‍या आहेत.
  • शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राची घोषणा सरकारने केली खरी, पण शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यात शासन कमी पडल्याचे दिसून आले आहे.
  • शेतकऱ्यांना समुपदेशनाची व प्रबोधनाची आवश्यकता विचारात घेऊन विविध उपाययोजना राबविण्यात येतात, असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. विशेष मदतीच्या कार्यक्रमाअंतर्गत ‘कृषी समृद्धी’ योजनेची अंमलबजावणी, शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा, आरोग्य सेवा, शेती विकासाचे कार्यक्रम राबविणे, मुलांना मोफत शिक्षणाची योजना, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुनर्रचना, यासारख्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शेतीमालाला हमीभाव, पीएम-किसान व इतर योजनांमार्फत शेतकऱ्यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली, असे सरकारचे म्हणणे आहे, पण शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकारला यश मिळालेले नाही.
नभांगणी पाच ग्रहांचे विलोभनीय दर्शन, वाचा कधी आणि कुठून दिसणार?
  • सूर्यमालेत आठ ग्रह असून पृथ्वीवरून बुध, शुक्र, मंगळ, गुरु व शनी हे पाच ग्रह सहजरित्या पाहता येतात. एकासोबत पाच ग्रह दर्शनाची सुवर्ण संधी नववर्षाच्या प्रारंभीच नभांगणी उपलब्ध झाली. या विलोभनीय दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
  • मंगळ व बुध ग्रहांचा नुकताच उदय झाल्याने ते पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व आकाशात दर्शन देतील. ११ जानेवारीची आकाश स्थिती, १२ ला बुध सूर्य परम इनांतरावर असल्याने बुध दर्शन सोपे होईल. १३ ला पृथ्वी व चंद्र जवळ असतील. सूर्यमालेत सर्वात तेजस्वी असलेला शुक्र ग्रह पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवत आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा गुरु ग्रह सध्या संध्याकाळी आकाश मध्याशी, तर सर्वांग सुंदर वलयांकित शनी ग्रह पश्चिम क्षितिजावर दर्शनासाठी सज्ज आहे. दुर्बिणीतून ग्रहांचे दर्शन डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही, असे प्रभाकर दोड म्हणाले.
  • सूर्यापासून ग्रहाचे अंतर जास्त तेवढा त्याचा परिभ्रमण कालावधी अधिक या प्रमाणात गुरु ग्रह सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला अंदाजे बारा वर्षे घेतो. सध्या गुरु हा ग्रह राशीचक्रातील मेष राशीत, तर शनी ग्रह हा कुंभ राशी समूहात पाहता येईल. शनी-चंद्र युती १४ ला व गुरु चंद्र युती १८ जानेवारीला घडून येईल, असे दोड यांनी सांगितले.
  • आकाशामध्ये फिरत्या चांदणीच्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र पृथ्वीभोवती २७ हजार ५०० कि.मी. या प्रचंड वेगाने फिरते. ११ जानेवारीला सायंकाळी ७.२१ ते ७.२४ या वेळात नैऋत्येकडून उत्तरेकडे आणि १२ जानेवारीला संध्याकाळी ६.३२ ते ६.३८ वाजता दक्षिणेकडून इशान्येकडे ठळक स्वरूपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. आकाशातील ग्रहांविषयीचे गैरसमज दूर करून आकाशाशी नाते जोडावे, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले.
ओजस मिटविणार नागपूरचा २३ वर्षांचा अर्जुन पुरस्काराचा दुष्काळ
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण पदक जिंकून नागपूर शहराचे नाव करणारा युवा खेळाडू ओजस देवतळे शहराचा २३ वर्षांचा अर्जुन पुरस्काराचा दुष्काळ मिटविणार आहे. तब्बल २३ वर्षांनंतर नागपूरच्या खेळाडूला आज मंगळवारी राष्ट्रपतीच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान केला जाणार.
  • २१ वर्षीय ओजस देवतळे आपल्या कुटुंबियांसह पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. ओजसचा जन्म होण्यापूर्वी शहरातील विजय मुनीश्वर आणि जोगिंदर सिंह बेदी यांना २००० साली अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला होता. २००० सालानंतर शहरातील कुठल्याही खेळाडूला हा पुरस्कार मिळाला नाही.
  • २००० पूर्वी १९९६ साली नीता दवडे यांना कबड्डीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तब्बल २३ वर्षांनंतर शहराचा अर्जुन पुरस्काराचा दुष्काळ संपवल्यामुळे शहरातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.
एम्सच्या निवासी गाळ्यांमध्ये अयोध्या निमंत्रणाच्या अक्षतांचे वाटप! डॉक्टरच्या कृतीने आश्चर्य
  • नागपूर एम्समध्ये कार्यरत एका डॉक्टरने अयोध्येतील राम मंदिरातून आलेल्या अक्षतांचे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गाळ्यात वाटप केले. याबाबतची पोस्ट सार्वत्रिक झाल्याने खळबळ उडाली.
  • डॉ. मंदार साने असे या डॉक्टरचे नाव आहे. ते एम्सच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात कार्यरत असून त्यांच्याकडे एम्सचे असोसिएट रजिस्टार म्हणून अतिरिक्त जबाबदारी आहे. साने येथील एम्स नागपूर फॅकल्टी फोरम या संस्थेचेही महासचिव आहेत. राम मंदिराच्या २२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद आणि इतरही संस्था, कार्यकर्ते देशभरात घरोघरी निमंत्रणाच्या अक्षता देत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या सेवा शर्थी कायद्यानुसार शासकीय कार्यालय परिसरात अशा पद्धतीने अक्षतांचे वाटप करता येत नाही. त्यानंतरही करायच्याच असतील तर किमान संबंधित संस्था वा कार्यालय प्रमुखांची परवानगी घ्यावी लागते. परंतु, डॉ. साने यांनी विनापरवानगी एम्समधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गाळे परिसरात फिरून अयोध्येतून आलेल्या अक्षतांचे वाटप केले.

‘पोस्ट’मध्ये नेमके काय?

  • एम्समधील परिचारिकांच्या समूहामध्ये सामायिक झालेल्या पोस्टमध्ये डॉ. मंदार साने, परिचारिका ज्योती सिंग दिसत आहेत. त्यात लिहिले आहे की, ‘‘अयोध्येतून आलेल्या अक्षता एम्समध्ये वितरित करण्याचे सौभाग्य मिळाले. आम्ही खूप भाग्यवान आहोत. सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, अयोध्येतील मंदिराची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४’’

अधिकारी काय म्हणतात?

  • या विषयावर डॉ. मंदार साने म्हणाले, एम्स परिसरातील मंदिरात अयोध्येतील अक्षता आल्या. देशाच्या विविध भागांप्रमाणे एम्सच्या गाळ्यातही त्या वाटल्या. परिचारिका ज्योती सिंग यांनी अक्षता मिळाल्याचे सांगितले. एम्सचे प्रभारी संचालक डॉ. हनुमंत राव म्हणाले, मी मदुराईला असून मला याबाबत माहिती नाही. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठक म्हणाल्या, डॉ. साने यांना शासकीय परिसरात अक्षता वाटता येत नसल्याचे सांगितले. त्यांनी काही मित्रांना अक्षता वाटल्याचे मान्य केले. त्यावर त्यांना अक्षता वाटायच्या असल्यास मित्रांच्या खासगी निवासस्थानी जाऊन देण्यास सांगण्यात आले.
रायगड : पेणमध्ये साकारलेल्या महालक्ष्मी मूर्तीची बँकॉकच्या मंदिरात स्थापना होणार
  • पेण येथील गणेशमूर्ती कारखान्यात तयार करण्यात आलेल्या महालक्ष्मीच्या मूर्तीची थायलंडमधील मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सात फुट उंचीची अत्यंत देखणी फायबर मूर्ती यासाठी तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती आज बँकॉकसाठी रवाना होणार आहे.
  • पेण शहर हे गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी २५ ते ३० लाख गणेशमूर्ती येथून देश विदेशात पाठविल्या जातात. यातून ६० ते ६५ कोटी रुपयांची उलाढाल होते. परदेशातूनही पेणच्या गणेशमूर्तींना चांगली मागणी असेत. पण आता पेणमध्ये तयार होणाऱ्या देवीच्या मूर्तींनाही परदेशातून मागणी होऊ लागली आहे. नवरात्रीसाठी पेण आणि हमरापूर परिसरात महालक्ष्मी, शारदा, आणि कालीमातेच्या मूर्ती तयार केल्या जातात. या मूर्तींनाही मुंबई आणि राज्यातील विविध भागांतून मागणी होत असते.
  • पण आता थायलंड देशातील बँकॉक शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात पेण येथे तयार करण्यात आलेल्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी दिपक समेळ यांच्या कार्यशाळेत ७ फुट उंचीची फायबरची महालक्ष्मीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. देवीची ही मूर्ती आज थायलंडसाठी रवाना होणार आहे. बँकाक शहरातील गणेश मंदिरात यापूर्वीच पेण शहरात तयार करण्यात आलेली गणेशमूर्ती विराजमान आहे. पाच वर्षांपूर्वी पुण्याच्या दगडूशेठ गणपतीशी साधर्म्य असलेली चार फुटांची गणेशमूर्ती बँकॉक येथे पाठविण्यात आली होती.
  • दिवाळीत महालक्ष्मीची सात फुटांची फायबर मूर्ती तयार करण्याची ऑर्डर मिळाली होती. गेली चार महिने त्यावर काम सुरू होते. ही मूर्ती तयार झाली असून, उद्या बँकॉक येथे रवाना होणार आहे. महिन्याभरात ती बँकाक येथे पोहोचणे अपेक्षित आहे.
जागतिक शहरांच्या धर्तीवर अयोध्येचा विकास!
  • अयोध्या शहराला येत्या काही वर्षांमध्ये दररोज तीन लाख लोक भेट देतील अशी अपेक्षा शहराच्या पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य वास्तुविशारद दीक्षू कुकरेजा यांनी ‘पीटीआय’शी बोलताना व्यक्त केली आहे. जगभरातील धार्मिक शहरांच्या धर्तीवर अयोध्येचा पुनर्विकास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
  • व्हॅटिकन शहर, कंबोडिया, जेरुसलेम, तिरुपती आणि अमृतसर यासारख्या शहरांचा त्यासाठी अभ्यास केला जात असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले. पुनर्विकास करताना उपलब्ध जमिनीचा कार्यक्षम वापर, कमीत कमी दाटीवाटी, येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी धर्मशाळा व घरगुती राहण्याची व्यवस्था, शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्वरूप कायम ठेवून पायाभूत सुविधांचा विकास ही या आराखडय़ाची काही वैशिष्टय़े आहेत असे कुकरेजा म्हणाले.
  • ते म्हणाले की, ‘‘अयोध्या हे जागतिक पर्यटनाचे स्थळ होण्याची अपेक्षा आहे, त्यामध्ये आध्यात्मिक, सांस्कृतिक, वारसा ठेवा आणि कार्यक्रम यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यामुळे येथे आदरतिथ्य आणि संबंधित उद्योगांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे’’.पर्यटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अयोध्येत रस्ते, पूल, सांडपाणी व्यवस्था आणि इतर सोयीसुविधांची रचना करण्यात आली आहे.

 

आरोग्य वार्ता : बागकामामुळे कर्करोगाचा धोका कमी, मानसिक आरोग्यात सुधारणा : 
  • एखाद्या छंदात स्वत:ला गुंतवून घेतले आणि त्याचा आनंद घेत राहिला की मानसिक आरोग्य सुधारते. बागकाम हा छंद जोपासणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यात सुधारणा तर होतेच, पण त्यांना कर्करोगाचा धोका कमी असतो, असे एका संशोधनात दिसून आले.
  • अमेरिकन कर्करोग सोसायटी आणि ‘बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ’च्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. सामुदायिक बागकाम केल्याने अधिक फायबर खाल्ले जाते आणि शारीरिक हालचाली अधिक होतात, असे या संशोधकांनी केलेल्या चाचणीतून प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यामुळे कर्करोग आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो आणि मानसिक आरोग्यही सुधारते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. बागकामामुळे तणाव आणि चिंतेची पातळीही लक्षणीयरीत्या कमी होते, असे या संशोधकांनी सांगितले. ‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
  •  ‘बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ’चे संशोधक लिट म्हणाले, ‘‘बागकाम करणाऱ्या अनेकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की बागकामामध्ये असे काही तरी आहे की ज्याने बरे वाटते. बागकामामुळे मानसिक आनंद मिळतो. काही लहान निरीक्षणांमध्ये असे आढळून आले की, जे लोक बाग करतात ते अधिक फळे आणि भाज्या खातात आणि आरोग्यदृष्टय़ा ते मजबूत असतात.
उत्तर भारत गारठला! दृश्यमानता अतिशय कमी, अपघातात ४ ठार
  • उत्तर आणि ईशान्य भारत सोमवारी थंडीच्या लाटेने गारठला. धुक्याच्या दाट आवरणामुळे या भागातील दृश्यमानता कमी झाली. यातूनच उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात चार जण ठार झाले.
  • दिल्लीत सलग पाचव्या दिवशी थंडीची लाट कायम होती आणि धुक्यामुळे दृश्यमानता केवळ २५ मीटपर्यंत कमी झाली. राजधानीतील थंडीच्या लाटेची तीव्रता इतकी आहे, की सलग पाचव्या दिवशी हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमधील बहुतांश भागांपेक्षा या शहरात किमान तापमान कमी नोंदले गेले.
  • खराब हवामानामुळे एकूण २६७ रेल्वे गाडय़ा उशिराने धावत होत्या. पाच विमानांचे मार्ग बदलण्यात आले आणि ३० विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला, असे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असल्याने सोमवारी सकाळी एक बस समोरच्या मालमोटारीवर धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. ही बस गुजरातमधील राजकोट येथून नेपाळला जात होती. धुक्याची चादर पंजाब व लगतच्या वायव्य राजस्थानपासून हरयाणा, दिल्ली व उत्तर प्रदेशमार्गे बिहापर्यंत पसरली असल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसून आले.
काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ विजेते कवी रेहमान राही यांचे निधन
  • काश्मीरचे प्रसिद्ध कवी व काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. रेहमान राही यांचे सोमवारी येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. येथील नौशेरा भागातील आपल्या राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाले.
  • ६ मे १९२५ रोजी जन्मलेल्या प्रा. राही यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. इतर भाषांतील काही नामांकित कवींच्या कवितांनाही त्यांनी काश्मिरी भाषेत अनुवादित केले. २००७ मध्ये त्यांना ‘सियाह रूद ज़रीन मंज़’ (इन ब्लॅक ड्रिझल) या काव्यसंग्रहासाठी देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान- ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना २००० मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
  • प्रा. राही यांना १९६१ मध्ये त्यांच्या ‘नवरोज़-ए-सबा’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी बाबा फरीद यांच्या रचनांचा काश्मिरी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांच्या प्रारंभीच्या रचनांवर दीनानाथ नदीम यांचा प्रभाव होता. त्यांना राज्यातील विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात आली.
  • नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी  ‘ट्वीट’संदेशात नमूद केले, की काश्मिरी भाषेतील विद्यमान सर्वात प्रभावशाली कवींपैकी एक असलेले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. रेहमान राही यांचे निधन झाल्याबद्दल खूप दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला.
प्रवासी भारतीय हे देशाचे दूतच : मोदी
  • ‘‘परदेशस्थ प्रवासी भारतीय हे भारताचे विदेशातील ‘सदिच्छा दूत’ (ब्रँड अ‍ॅम्बेसेडर) आहेत,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काढले.
  • मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये १७ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले, की  प्रवासी भारतीयांची भूमिका वैविध्यपूर्ण आहे. तुम्ही योग, आयुर्वेद, कुटीरोद्योग, हस्तकला आणि तृणधान्यांचे ‘सदिच्छा दूत’ आहात. परदेशातील भारतीयांची नवी पिढीही आपल्या पालकांच्या मूळ देशाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
  •  परदेशस्थ भारतीयांनी संबंधित देशांत दिलेल्या योगदानाचे विद्यार्थी-अभ्यासकांसाठी दस्तऐवजीकरण करावे, असे  आवाहन  त्यांनी विद्यापीठांना केले.
  • प्रमुख पाहुणे गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांनी सांगितले, की जागतिकीकरण महासाथीत अपयशी झाले असे वाटत असतानाच मोदींनी ते अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. विविध देशांना करोना  लस आणि औषधे प्रदान करण्यासाठी भारताने भरीव मदत दिली.
  • ‘भारत जागतिक स्तरावर विश्वासार्ह साथीदार’ - या संमेलनाचे विशेष पाहुणे सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी म्हणाले, की, प्रादेशिक व जागतिक स्तरावर विश्वासार्ह साथीदार असल्याचे भारताने सिद्ध केले आहे. सूरीनामने हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी संस्था स्थापन केली आहे.  विविध क्षेत्रात भारताशी भागीदारी वाढवण्याची सुरीनामची इच्छा आहे.
स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १४३ अब्ज डॉलर्सचा तोटा; ११५ वर्षांच्या इतिहासातला सर्वात मोठा धक्का
  • स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १३२ स्विस फ्रँक म्हणजेच १४३ अब्ज डॉलर्सचा वार्षिक तोटा झाला आहे. सोमवारी ही बाब सांगण्यात आली. या बँकेच्या ११५ वर्षांच्या इतिहासात हा सर्वात मोठा तोटा आहे. शेअर आणि बॉण्ड पोर्टफोलिओच्या मूल्यात घट झाल्याने हा तोटा झाला आहे. या घटनेमुळे बाजारात तेजीत असलेल्या स्विस फ्रँकचाही नकारात्मक परिणाम झाला.
  • स्विस नॅशनल बँक या प्रकरणात ६ मार्चला तपशीलवार आकडेवारी जाहीर करणार आहे. स्विस फ्रँक कमकुवत झाला याची विविविध कारणं आहेत. स्विस बँकेने ८०० अब्ज किंमतीचे स्टॉक्स आणि बॉण्ड्स यामध्येच १३१ अब्ज फ्रँकचं नुकसान झालं. जागतिक शेअर बाजारात मंदी आली. त्यामुळे रोखीच्या किंमती गेल्या वर्षी घसरल्या. यामुळे स्विस नॅशनल बँकेसह सगळ्यात बँकांनी महागाईचा सामना करण्यासाठी व्याजदर वाढवले. मात्र हे देखील तोट्याच्या दिशेने घेऊन जाणारं कारण ठरलं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
  • या सगळ्या घटनेत एकच सकारात्मक बाब ही ठरली की स्विस नॅशनल बँकेचं सोनं २०२१ च्या शेवटी १०४० टन इतकं होतं आणि २०२२ मध्ये बँकेचे ४०० दशलक्ष फ्रँक वाढले. २०२२ मध्ये जो तोटा बँकेला झाला आहे त्यामुळे आता ही बँक केंद्र आणि राज्य सरकारांना नेहमीचं पे आऊट करणार नाही. गेल्यावर्षी स्विस नॅशनल बँकेने ६ अब्ज फ्रँक दिले होते.
  • इतकं प्रचंड नुकसान झालं असलं तरीही त्याचा बँकेच्या धोरणांवर काहीही परिणाम होणार नाही. २०२२ मध्ये चेअरमन थॉम जॉर्डन यांनी स्विस चलनवाढ रोखण्यासाठी व्याजदरांमध्ये तीनदा वाढ केली होती असं विश्लेषकांनी म्हटलं आहे.
तिरुपती मंदिरात दर्शनासाठी मिळणार स्पेशल तिकीट; जाणून घ्या किंमत
  • जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दर्शनासाठी स्पेशल तिकीटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हे तिकीट बूक करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. या दर्शनाच्या एका तिकिटाची किंमत ३०० रुपये असणार आहे.
  • तिरुमला तिरुपती देवस्थान भारतातील प्रसिद्ध देवस्थान आहे. इथे भगवान वेंकटेश्वर स्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक दूरचा प्रवास करून येतात. अशावेळी दर्शनासाठी आधीच बूकिंग उपलब्ध असेल, तर त्यांच्यासाठी अधिक सोयीचे होते. यासाठी ही स्पेशल तिकीटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
  • दरम्यान तिरूमला येथे वैकुंठद्वाराचे दर्शन सूरु आहे. २ ते ११ जानेवारी असा १० दिवसांचा वैकुंठ एकादशीचा कालावधी आहे. श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दररोज ५०,००० हून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यासाठीचे बुकिंग ऑनलाईन सुरू करण्यात आल्याने, त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा अशी माहिती देण्यात आली आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० जानेवारी २०२२

 

अ‍ॅडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा - बोपण्णा-रामनाथन जोडीला जेतेपद :

‘एटीपी’ दौऱ्यात पहिल्यांदाच एकत्रित खेळणाऱ्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीने अ‍ॅडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. बोपण्णाचे हे वैयक्तिक २०वे, तर रामनाथनचे पहिलेच एटीपी दुहेरी जेतेपद ठरले.

बोपण्णा आणि रामनाथन जोडीने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इव्हान डोडिग आणि मार्सेलो मेलो या अग्रमानांकित जोडीला ७-६ (६), ६-१ असा पराभवाचा धक्का दिला.

एक तास आणि २१ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात बोपण्णाने प्रतिस्पर्धी जोडीच्या सव्‍‌र्हिसवर प्रतिहल्ले केले, तर रामनाथनने परिपूर्ण खेळ करत त्याला तोलामोलाची साथ दिली. त्यामुळे बोपण्णाने सामन्यानंतर त्याच्या साथीदाराचे कौतुक केले. ‘‘तुमच्याकडून रामनाथन सव्‍‌र्हिस करत असताना तुम्हाला सुरुवातीपासून गुण जिंकण्याची संधी मिळत,’’ असे बोपण्णा म्हणाला.

या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली आणि सेटचा विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकर खेळवण्यात आला. यातही ६-६ अशी बरोबरी असताना मेलोच्या सव्‍‌र्हिसवर बोपण्णाने गुण मिळवला, मग दमदार सव्‍‌र्हिस करत टायब्रेकरमध्ये ८-६ अशी बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये डोडिग-मेलो जोडीला फारसा प्रतिकार करता आला नाही. बोपण्णा-रामनाथन जोडीला या कामगिरीमुळे १ लाख ८७ हजार अमेरिकन डॉलरचे रोख बक्षीस आणि प्रत्येकी २५० क्रमवारी गुण मिळाले.

मुंबई मॅरेथॉनवर यंदाही अनिश्चिततेचे सावट :

राज्यासह मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत असून राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून विविध निर्बंध घालण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेवर यंदाही अनिश्चिततेचे सावट आहे.

२००४ सालापासून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मुंबई मॅरेथॉनचे मोठय़ा जल्लोषात आयोजन केले जाते. जगभरातील आघाडीचे मॅरेथॉनपटू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मायानगरी गाठतात. मागील वर्षी करोनामुळे ही मॅरेथॉन स्पर्धा रद्द करणे भाग पडले होते. यंदा मुंबईतील करोनाचा धोका कमी होईल आणि मॅरेथॉनचे नियमितपणे आयोजन करता येईल, अशी संयोजकांना आशा होती. मात्र, करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनमुळे दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून परदेशी नागरिकांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

यंदा जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी (१६ जानेवारी) मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर संयोजकांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ही स्पर्धा घेण्याचा त्यांचा मानस असून त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्जदेखील पाठवल्याचे समजते. मात्र, मुंबईतील सध्याची करोनाची स्थिती लक्षात घेता, त्यांना परवानगी मिळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आगामी दिवसांत या स्पर्धेबाबत काय निर्णय घेतले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

ओमायक्रॉन नंतर, आता येत आहे डेल्टाक्रॉन! करोनाच्या नवीन प्रकाराचे आढळले २५ रुग्ण :

करोना व्हायरसच्या एकामागून एक येणाऱ्या प्रकाराने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. दुसऱ्या लाटेत भारतासह जगावर वाईट परिणाम करणाऱ्या डेल्टा प्रकारातून सावरल्यानंतर, ओमायक्रॉनमुळे सध्या धोका वाढत आहे. पण आता या दरम्यान आणखी एक प्रकार समोर आला आहे, ज्याचे नाव आहे ‘डेल्टाक्रॉन’.

माध्यमांच्या वृत्तानुसार, सायप्रसमध्ये डेल्टाक्रॉन हा नवीन करोना व्हायरस प्रकार समोर आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की ‘डेल्टाक्रॉन’ ची अनुवांशिक पार्श्वभूमी डेल्टा प्रकारासारखीच आहे, तसेच काही ओमायक्रॉन सारखी उत्परिवर्तन आहे. त्यामुळे याला डेल्टाक्रॉन नाव देण्यात आले आहे.

जगावरील करोनाचे संकट कमी होत नसून करोना व्हायरसचा आणखी एक प्रकार समोर आला आहे, ज्याला ‘डेल्टाक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. सायप्रसमध्ये सापडलेल्या या नवीन प्रकाराची आतापर्यंत २५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

तज्ञ्जांच्या म्हणण्यानुसार हे चिंतेचे कारण नाही. जेरुसलेम पोस्टने सायप्रस मेलचा हवाला देत अहवाल दिला की ११ नमुने व्हायरसमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचे होते, तर १४ सामान्य लोकसंख्येतील होते. सायप्रस विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी आणि आण्विक विषाणूशास्त्र प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. लिओनडिओस कोस्ट्रियाकिस म्हणाले की, रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांमध्ये उत्परिवर्तन वारंवारता जास्त होती, ज्यामध्ये नवीन प्रकार आणि रुग्णालयात दाखल होणे यांच्यातील संबंध दर्शवते.

‘नीट-पीजी’ प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून ; केंद्रीय आरोग्यमंत्री मंडाविया यांची घोषणा :

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया (नीट-पीजी) येत्या बुधवारपासून (१२ जानेवारी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी रविवारी केली.  

सन २०२१-२२वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. या प्रवेशात इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बल गटातील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांसाठी १० टक्के आरक्षणही कायम ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ही प्रवेशप्रक्रिया आता १२ जानेवारीपासून सुरू होईल.

आरोग्य मंत्रालयाने निवासी डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १२ जानेवारी २०२२ पासून वैद्यकीय समुपदेशन समितीद्वारे (एमसीसी) प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यामुळे करोनाविरोधातील लढाईला आणखी बळ मिळेल, असे ट्वीट आरोग्यमंत्री मंडाविया यांनी केले.

 ‘नीट-पीजी’ प्रवेश परीक्षा ११ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर करण्यात आला. त्यानंतर सुमारे ४५ हजार पदव्युत्तर जागांसाठीच्या प्रवेशांची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना होती. गेल्या महिन्यात देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवासी डॉक्टरांनी त्यासाठी आंदोलन केले होते.

चिनी यानाकडून चंद्रावरील पाण्याचा थेट पुरावा :

चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी होते, याचा पहिला प्रत्यक्ष पुरावा चीनच्या चँग-५ यानास आढळला आहे. यातून पृथ्वीचा हा उपग्रह शुष्क कसा बनला, हे समजून घेणे शक्य होणार आहे.

याबाबतचा अभ्यास शनिवारी सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार चीनचे हे चांद्रयान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले, तेथील पृष्ठभागावरील मातीमध्ये १२० पीपीएमपेक्षा कमी पाणी आहे. हे प्रमाण एक टन मातीमध्ये १२० ग्रॅम पाणी इतके आहे. त्याचप्रमाणे तेथील हलक्या सच्छिद्र खडकामध्ये १८० पीपीएमपेक्षा कमी पाणी दिसून आले आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांच्या तुलनेत चंद्राचा पृष्ठभाग फारच शुष्क आहे.  चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे अस्तित्व हे दूरवरून निरीक्षणातून निश्चित करण्यात आले असले तरी, या यानाने आता चांद्रभूमीवरील खडक आणि मातीमध्ये पाणी असल्याच्या खुणा शोधून काढल्या आहेत. या यानावरील एका साधनाद्वारे पृष्ठभागावरील माती आणि खडकांची स्पेक्ट्रल रिफ्लेक्टन्स तपासणी करून त्याच वेळी पाण्याचे अस्तित्व शोधून काढले. हे प्रथमच घडले आहे.

काही विशिष्ट काळात चंद्राच्या बाह्य आवरणातील पाणीसाठे हे वाफेच्या स्वरूपात उडून गेल्याने चांद्रभूमी ही कोरडी होत गेली असावी, असे या अभ्यासातून पुढे येत आहे.

१० जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.