मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सत्तांतर होत शिवसेनेचे नेते व साताऱ्याचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत. एकनाथ शिंदे दरे तांब (ता महाबळेश्वर) गावचे सामान्य कुटुंबातील सुपूत्र असल्याने सातारकरांना याचा वेगळा अभिमान आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत असल्याने दरे तर्फ तांब गावातील ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. फटाके फोडून,ढोल ताशा वाजवत या छोट्याशा गावात एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
दरे तर्फ तांब हे महाबळेश्वर तालुक्यात कोयनाकाठच्या परिसरातील एक छोटेसे गाव आहे.गावातील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत होते. ते मुख्यमंत्री होत असल्याचे वृत्त गावात,महाबळेश्वर,जावळी तालुक्यात धडकताच ग्रामदैवत उत्तरेश्वर मंदिर परिसरात बाल वृद्ध महिला युवक यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला. गावात आज आनंदमय वातावरण आहे.
एकनाथ शिंदे शिवसेना सोडतील असे वाटत नव्हते, ते कडवे शिवसैनिक असल्याने ते हिंदुत्व सोडणार नाहीत असा आशावाद गावकऱ्यांना होता. आमच्या गावच्या या पुत्राचा राजकीय प्रवास सुखकर व्हावा यासाठी गावकऱ्यांनी ग्रामदैवत उत्तरेश्वराला साकडे घातले होते.या गावाच्या लगतची तापोळा,वेळापूर येथील ग्रामस्थही दरे गावात जमा झाले आहेत. टीव्ही वर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाहण्याची तयारी पूर्ण झाली आहे. दरेचे शिवसेना शाखाप्रमुख बाबुराव शिंदे, तापोळाचे सरपंच आनंद धनावडे, वेळापूरचे सरपंच राम सपकाळ आदींकडे नेतृत्व आहे.
भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद न स्वीकारता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले. भाजपाने आपल्या धक्कातंत्रानुसार घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी खोच शब्दांमध्ये शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर टीका केलीय. मिटकरी यांनी ट्विटरवरुन दोन ट्विट करत या निर्णयावर बाष्य केलं आहे.
“फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल,” असा टोला मिटकरी यांनी पहिल्या ट्विटमध्ये लगावलाय. तर दुसऱ्या ट्विटमध्ये मिटकरी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या न्यायप्रविष्ठ असलेल्या निकालाकडे इशारा केलाय. १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनासंदर्भातील खटल्याची पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार असल्याने याच तारखेचा उल्लेख करत मिटकरींनी, “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित ३० जून २०२२ ते ११ जुलै २०२२” असं म्हटलंय. याच ट्विटमध्ये पुढे, “देवेंद्र फडणवीस यांचे मास्टर माईंड आहेत,” असंही म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये, “आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजपा आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला एक मोठा गट आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याच शपधविधी होईल,” असं सांगितलं.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही घोषणा केली. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीची अधिसूचना ५ जुलै रोजी काढली जाणार असून १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २० जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, २२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ६ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.
लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतात. या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यही सहभागी होतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
‘जी २०’ देशांशी पुढील वर्षीची बैठक जम्मू काश्मीरमध्ये घेण्याचा भारताचा मनोदय आहे, मात्र याला चीनने जोरदार विरोध केला आहे. निकटचा सहयोगी पाकिस्तानच्या स्वरात स्वर मिळवत चीनने अधोरेखित केले की संबंधित बाजूंनी या समस्येचे ‘राजकारण’ टाळले पाहिजे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, काश्मीरबाबत चीनचे धोरण स्पष्ट आहे. हा मुद्दा भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्वीपासूनच आहे. संयुक्त राष्ट्रच्या संबंधित प्रस्ताव और द्विपक्षीय सहमतीनुसार योग्य तोडगा याबाबत निघणे आवश्यक आहे.
‘जी २०’चे सदस्य म्हणून चीन बैठकीत सहभागी होईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना लिजियान यांनी सांगितले की, बैठकीत सहभाग घ्यावा किंवा नाही, याबाबत विचार करण्यात येणार आहे. ‘जी २०’ची जम्मू काश्मीरमध्ये बैठक घेण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानने २५ जून रोजी विरोध केला होता.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात पंजाब विधानसभेत गुरुवारी ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा ठराव मांडला होता. भाजपचे आमदार अश्वनी शर्मा आणि जंगीलाल महाजन यांनी या ठरावाला जोरदार विरोध केला.
या ठरावावर चर्चा करताना मान म्हणाले, अग्निपथाच्या विरोधाचा मुद्दा पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे.
ही योजना देशातील तरुणांच्या विरोधातील असून योजनेला देशभरात कडाकडून विरोध होत आहे, असे मान यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा यांनीही ही योजना मागे घेण्याची मागणी केली, तर अकाली दलाचे आमदार मनप्रीत सिंग अयाली यांनी ठरावाला पाठिंबा देत योजना गुंडाळण्याची मागणी केली.
बायजूस या कंपनीने २,५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. २७ आणि २८ जून रोजी बायजूमधल्या १,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकल होतं. स्टार्टअप्सच्या फंडिंगमध्ये घट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना काढण्यात आले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तसेच भारतात दिवसेंदिवस शैक्षणिक मार्केट कमी होऊ लागल्यामुळे कंपनी तोट्यात असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
२७ आणि २८ जून रोजी टॉपर आणि व्हाईटहॅट ज्युनियरमधून १५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले. या दोन्ही कंपन्या बायजूने गेल्या दोन वर्षांत विकत घेतल्या होत्या. यासोबतच, कंपनीने २९ जून रोजी सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यासंबंधी ई-मेल पाठवला आहे. सामग्री आणि डिझाइन टीमवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. टॉपर प्लॅटफॉर्मवरुन १२०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. तर ३०० ते ३५० कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे, तर सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच कंत्राटावर घेतलेल्या ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
सेल्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स, कन्टेन्ट, डिझाईन अशा विविध विभागांमधून कर्मचारी कपात केली आहे. बायजूसने गेल्या वर्षी टॉपरला ५० दशलक्ष डॉलरमध्ये विकत घेतले होते. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी टॉपरच्या एकत्रीकरणाची सुमारे ८० टक्के कर्मचारी कायम ठेवले आहेत. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. यापूर्वी व्हाईटहॅट ज्युनियरने सुमारे ३०० पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. ऑगस्ट २०२० मध्ये, बायजूसने ३०० दशलक्ष डॉलरमध्ये व्हाईटहॅट ज्युनियर कंपनी विकत घेतली होती. यापैकी ८० जण कंपनीच्या ब्राझील कार्यालयात काम करत होते. बायजूने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ब्राझीलमध्ये पदार्पण केले होते.
देशात करोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अटोक्यात आलेला करोना आता पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १८ हजार ८१९ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. देशासोबत जागतिक करोना प्रकरणांमध्येही २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी करोनाची साथ संपली नसून ११० देशांमध्ये करोना वाढत असल्यचा धक्कादायक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केला आहे.
११० देशांमध्ये करोनाची प्रकरणे वाढत आहेत - जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, करोनाच्या रुपात बदल झाला असला तरी करोना अद्याप संपलेला नाही. ११० देशांमध्ये करोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंताही गेब्रेयसस यांनी व्यक्त केली आहे. बीए.४ आणि बीए.५ या दोन ओमिक्रोनच्या प्रकारांचा करोना वाढीमध्ये मोठा हात असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. ११० देशांमध्ये करोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत त्यांमध्ये मुख्य: बीए.४ आणि बीए.५ ओमिक्रोनचे प्रकार आढळून येत आहेत.
देशात सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाखाच्या पार - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ५५५ इतकी झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ८२७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. कालच्या तुलनेत आज करोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल (बुधवारी) १४ हजार ५०६ नवीन करोनाबाधित आढळून आले होते. तर ३० जणांचा मत्यू झाला होता.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.