टेबल टेनिसमधील भारताचा आघाडीचा खेळाडू अंचता शरथ कमलला बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये बुधवारी सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळय़ात स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे, बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, बॅडिमटनपटू लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांच्यासह २५ क्रीडापटूंना ‘अर्जुन’ क्रीडा पुरस्कार बहाल करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडादिनी होणारा हा कार्यक्रम सलग दुसऱ्या वर्षी निवड प्रक्रिया लांबल्यामुळे पुढे ढकलावा लागला होता.
टेबल टेनिसमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या शरथला वयाच्या ४०व्या वर्षी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा कमलचे नाव पुकारण्यात आले, तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळय़ा वाजवल्या. कमलने कारकीर्दीत राष्ट्रकुल स्पर्धेत १३ पदके, आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन कांस्यपदके मिळविली असून, पॅरिस ऑलिम्पिकसाठी तो पात्रता सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘अर्जुन’ पुरस्कार विजेत्यांना अर्जुनाचा कांस्यधातूचा पुतळा, मानपत्र आणि रोख १५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सोहळय़ात प्रथम खेलरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यानंतर द्रोणाचार्य आणि अखेरीस अर्जुन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार सोहळय़ास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते.
अर्थव्यवस्थेने सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये ६.३ टक्क्यांचा वृद्धिदर नोंदविल्याचे बुधवारी सायंकाळी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) अर्थव्यवस्था १३.५ टक्क्यांनी विस्तारली होती. गतवर्षी दुसऱ्या तिमाहीचा वृद्धिदर ८.४ टक्के राहिला होता. प्रामुख्याने निर्मिती आणि खाण क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे विकासदराला खीळ बसली आहे.
जागतिक पातळीसह देशांतर्गत पातळीवर उसळलेली महागाई आणि ती कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून सुरू असलेल्या व्याज दरवाढीचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याने सरलेल्या तिमाहीत विकासदर खालावल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. पहिल्या तिमाहीपेक्षा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये वाढीचा दर निम्मा राहील, असा अंदाज विश्लेषकांनी आधीपासूनच वर्तविला होता.
केंद्र सरकारने रस्ते, रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांवर खर्च वाढवल्यामुळे सरकारी भांडवली खर्चात सुमारे ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. तरीही निर्मिती क्षेत्राच्या सकल मूल्यवर्धनातील योगदान उणे ४.३ टक्क्यांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत ५.६ टक्के राहिले होते. कृषी क्षेत्रात आश्चर्यकारक वाढ निदर्शनास आली आहे. सरलेल्या तिमाहीत कृषी क्षेत्राचे ४.६ टक्क्यांचे योगदान राहिले आहे. जे त्याआधीच्या म्हणजेच एप्रिल ते जून तिमाहीत ४.५ टक्के तर गेल्या वर्षी याच तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०२१) ३.२ टक्के नोंदवले गेले होते. बांधकाम क्षेत्राचे ६.६ टक्के, तर व्यापार, हॉटेल आणि वाहतूक क्षेत्राचे तब्बल १४.७ टक्के वाढीचे योगदान राहिले. मात्र निर्मिती क्षेत्राबरोबरच खाणकाम क्षेत्राची कामगिरी सुमार राहिली असून ते उणे २.८ टक्के राहिल्यामुळे विकासदराला खीळ बसली.
रिझव्र्ह बँकेने आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ६.१ ते ६.३ राहण्याचा अदांज वर्तविला होता. पतमानांकन संस्था इक्रानेदेखील दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचा दर ६.५ टक्के, तर स्टेट बँकेने त्यांच्या अहवालात विकास दर ५.८ टक्के वृद्धिदराचे भाकीत केले होते.
‘‘विसाव्या शतकात महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल हे गुजरातच्या अस्मिता-अभिमानाचे प्रतीक होते. आता एकविसाव्या शतकात गुजरातचा सन्मान व अस्मितेचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उदयास आले आहेत,’’ असे गौरवोद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे बुधवारी काढले. १ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सिंह म्हणाले, की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून केलेले ‘रावण’ संबोधन ही अवघ्या काँग्रेस नेतृत्वाची मानसिकता दर्शवते. मोदी हे गुजरातचा सन्मान-अभिमान आहेत. मात्र त्यांच्यासाठी काँग्रेसकडून अशी वाईट भाषा वापरली जात आहे. पंतप्रधानांसाठी असे अपमानास्पद (पान ४ वर) (पान १ वरून) शब्द वापरणाऱ्यांना गुजरातची जनता चोख प्रत्युत्तर देईल.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना ‘मौनीबाबा’ हा शब्द भाजप नेते वापरतात, याबद्दल विचारले असता राजनाथ म्हणाले, की हा अपशब्द नाही. मात्र पंतप्रधानांसाठी ‘रावण’ आणि ‘नीच’ असे आक्षेपार्ह अपशब्द विरोधकांनी वापरले आहेत.
रशियामधील एका संशोधनादरम्यान फ्रेंच वैज्ञानिकांना ४८ हजार वर्षांपूर्वीचा एक विषाणू सापडला आहे. रशियामधील एका गोठलेल्या तळ्यामध्ये हा विषाणू सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. ‘न्यू यॉर्क पोस्ट’च्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार या विषाणूला ‘झोम्बी व्हायरस’ असं म्हटलं आहे. या विषाणूमुळे पुन्हा एकदा करोनापेक्षाही अधिक भयंकर आणि मोठी साथ पसरण्याची भीतीही या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरामधून प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राने ज्या अभ्यासाचा आधारे ही बातमी दिली आहे त्या अभ्यासासंदर्भातील सविस्तर संशोधन अद्याप प्रकाशित झालेलं नाही. प्रकाशनापूर्वीचं काम सुरु असून लवकरच हे संशोधन सार्वजनिक केलं जाणार आहे.
“हा पुरातन विषाणू सापडल्याने भविष्यात वनस्पती, प्राणी आणि मानवासाठी परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते,” असं या ‘व्हायरल’ माहितीमध्ये म्हटलं आहे. प्रथामिक अहवालांनुसार वातावरण बदलांमुळे बर्फाच्या खाली असलेली उत्तर गोलार्धामधील अनेक ठिकाणी पहिल्यांदाच मानवाला संशोधनानिमित्त पोहोचता आलं आहे.
पहिल्यांदाच या गोठलेल्या अवस्थेत असलेल्या विषाणूंशी मानवाशी संबंध आला आहे. मात्र वातावरण बदलांमुळे ‘मागील हजारो वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेल्या या विषाणूंच्या माध्यमातून काही जैविक पदार्थांचं उत्सर्जन होण्याची शक्यता आहे,’ असा अंदाज व्यक्त केला जातोय. यामध्ये प्राणघातक विषाणूंचाही समावेश असू शकतो.
उत्तरार्धात मध्यरक्षक मॅथ्यू लेकीने केलेल्या गोलच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ड-गटाच्या अखेरच्या साखळी सामन्यात डेन्मार्कला १-० असा पराभवाचा धक्का दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने केवळ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला.
स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा होता. त्यामुळे दोन्ही संघांनी बचावावर अधिक भर दिला. डेन्मार्कला
चेंडूवर अधिक वेळ नियंत्रण मिळवण्यात यश आले. तसेच त्यांनी गोलच्या दिशेने १३ फटकेही मारले. मात्र, त्यांना एकही गोल करता आला नाही. याऊलट ऑस्ट्रेलियाचा भक्कम बचाव करतानाच चेंडू मिळताच प्रतिआक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अखेर त्यांना ६०व्या मिनिटाला गोल करण्यात यश आले. लेकीने अप्रतिम वैयक्तिक गोल करत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. अखेर ही आघाडी निर्णायक ठरली.
ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच्या सामन्यात टय़ुनिशियाचा पराभव केला होता. विश्वचषकात सलग दोन सामने जिंकण्याची ही त्यांची दुसरीच वेळ ठरली. या कामगिरीमुळे त्यांना १६ वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषकाची बाद फेरी गाठण्यात यश आले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.
Made with ❤ in India.