चालू घडामोडी आणि दिनविशेष - 06 फेब्रुवारी 2024

Date : 6 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
  • अंडर-१९ विश्वचषक २०२४ आता शेवटच्या आणि रोमांचक वळणावर पोहोचला आहे. मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात या विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील ही चुरशीची लढत बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे होणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या.
  • अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ कोण असेल हे आजच्या सामन्यानंतर स्पष्ट होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात दोन्ही संघ आपली पूर्ण ताकद लावतील, अशी आशा आहे.

सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?

  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला उपांत्य सामना मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळवला जाईल.

सामना किती वाजता सुरू होणार?

  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. नाणेफेक सामन्याच्या ३० मिनिटे आधी म्हणजेच दुपारी १ वाजता होईल.

उपांत्य फेरीची सामना कुठे बघता येईल?

  • तुम्ही स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्टवर आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाचा उपांत्य सामना पाहू शकता. या सामन्याचे थेट प्रसारण डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील केले जाईल, जेथे तुम्ही या सामन्याचा पूर्णपणे विनामूल्य आनंद घेऊ शकता.
कर्ज काढून धनुष्य-बाण विकत घेतला पण तिरंदाजी सोडली नाही, अर्जुन पुरस्कार विजेती तिरंदाज आदितीचा प्रेरणादायी प्रवास वाचा!
  • अदिती गोपीचंद स्वामी ही महाराष्ट्रातील एक तिरंदाज आहे. २०२३ मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून ती वरिष्ठ पातळीवरील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली. त्याबरोबरच, जागतिक करंडक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती सर्वांत लहान वयाची खेळाडू ठरली. याच स्पर्धेत तिने ज्योती सुरेखा वेण्णम आणि परनीत कौर यांच्या साथीने कंपाऊंड तिरंदाजी सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. अशी कामगिरी करणारा हा पहिला भारतीय संघ ठरला. २०२३ मध्ये जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत तिने वैयक्तिक आणि सांघिक सुवर्ण पदक मिळवले. या यशानंतर ती एकदम प्रकाशझोतात आली. यानंतर तिला अर्जुन पुरस्कारही मिळाला.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते तिला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साताऱ्यात अर्जुन पुरस्कार मिळवणारी अदिती ही तिसरी खेळाडू आहे. पहिला पुरस्कार ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना मिळाला होता. तर दुसरा पुरस्कार माणदेश एक्सप्रेस म्हणून ओळख असणारी धावपटू ललिता बाबर हिला मिळाला होता.
  • आदिती स्वामीच्या कुटुंबीयांवर साताऱ्यात कौतुकाचा वर्षाव झाला. वयाच्या १७ व्या वर्षी साताऱ्याच्या शेरेवाडी गावातील आदिती स्वामीने तिरंदाजी क्रीडा प्रकारात जागतिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.

अन् गवसली तिरंदाजीतील आवड

  • साताऱ्याच्या शेरेवाडी या गावात राहणाऱ्या गोपीचंद स्वामी यांची आदिती ही कन्या. गोपीचंद हे सरकारी शाळेत गणिताचे शिक्षक आहेत तर आई शैला ग्रामसेविका आहे. त्यांना स्वत:ला खेळाची अत्यंत आवड. त्या आवडीतूनच आपल्या मुलीने एकातरी खेळात प्रावीण्य मिळवावे ही त्यांची इच्छा. आदिती १२ वर्षांची असताना गोपीचंद तिला सातारा शहरातील शाहू स्टेडियममध्ये घेऊन गेले आणि तिला विविध खेळांची ओळख करून दिली. तिथे काही मुलं फुटबॉल खेळत होती, तर काही ॲथलेटिक्सचं प्रशिक्षण घेत होती. तर एका कोपऱ्यात काहीजण लक्ष्य ठरवून धनुष्य आणि बाणांची जुळवाजुळव करत लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करत होती. अदितीचे लक्ष तिकडेच होते. तिला हा खेळ आवडल्याचे गोपीचंद यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी तिला तात्काळ तेथील प्रशिक्षण कार्यक्रमात दाखल केले. अदितीला क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी आपला मुक्काम गावातून सातारा शहरात हलवला.
शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमासाठी किती पदे? जाणून घ्या सविस्तर…
  • राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीच्या जाहिराती शिक्षण विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खासगी अनुदानित शाळांतील पदांचा समावेश आहे. एकूण २१ हजार ६७८ जागांवर शिक्षक भरती केली जाणार आहे.  
  • शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यमनिहाय जागांमध्ये सर्वाधिक पदे मराठी माध्यमासाठी असल्याचे दिसून येत आहे. त्यात मराठीसाठी १८ हजार ३७३, इंग्रजीसाठी ९३१, ऊर्दूसाठी १ हजार ८५०, हिंदीसाठी ४१०, गुजरातीसाठी १२, कन्नडसाठी ८८, तमिळसाठी ८, बंगालीसाठी ४, तर तेलुगूसाठी २ जागा उपलब्ध आहेत.  
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इंग्रजीचे बळकटीकरण करण्यासाठी साधन व्यक्ती नियुक्त करण्याबाबत शासनाच्या निर्देशानुसार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शाळेस एक या प्रमाणे, परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वायूप्रदूषणामुळे २०५० पर्यंत कर्करोग रुग्णांमध्ये ७७ टक्क्यांनी वाढ
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन अंदाजानुसार २०५० पर्यंत जगभरात कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये ७७ टक्क्यांनी वाढ होईल, असा इशारा देण्यात आला आहे. हा अहवाल प्रत्येकावर सारखाच परिणाम करत नसला, तरीही कर्करोगाच्या दरात अपेक्षित वाढ करणाऱ्या घटकांपैकी एक घटक म्हणून हवा प्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे.कर्करोगावर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ ने कर्करोगाबाबत गंभीर इशारा दिला आहे. २०२२ च्या तुलनेत २०५० पर्यंत कर्करोगाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे ७७ टक्क्यांनी वाढ होईल, असे या संस्थेने म्हटले आहे.
  • २०५० मध्ये कर्करोगाची सुमारे ३.५ कोटी नवीन प्रकरणे उद्भवू शकतात. एक फेब्रुवारीला हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला. कर्करोगाच्या या वाढत्या प्रमाणामागे तंबाखू सेवन, लठ्ठपणा, मद्यपान ही प्रमुख कारणे आहेत.
  • मात्र, त्याहीपेक्षा वायू प्रदूषण हे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. या देशांमध्ये कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये सुमारे १४२ टक्के वाढ होऊ शकते. उच्च मानवी विकास निर्देशांक असलेल्या देशांमध्ये, सुमारे ४० लाख नवीन प्रकरणे नोंदवली जाऊ शकतात. त्यामुळे कर्करोगाबद्दल जनजागृती आणि त्यावर लवकर उपचार करणे किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज येतो.या अहवालानुसार, कमी मानवी विकास निर्देशांक असलेल्या देशांवर याचा सर्वाधिक परिणाम होईल, कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यूही याच देशांमध्ये होतील.
माजी पंतप्रधान नेहरूंनी खरंच भारतीयांना ‘आळशी’ म्हटलं होतं? वाचा १९५९ सालचं ‘ते’ भाषण
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. तसंच, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १९५९ सालातील एका भाषणाचाही उल्लेख केला. त्यानुसार, पंडित जवाहरलाल नेहरू भारतीयांना आळशी समजत असत, असं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत काय म्हणाले?

  • “भारतात अधिक मेहनत करण्याची सवय नाही. आम्ही इतके काम नाही करत, जेवढे युरोप, जपान, रशिया, अमेरिका किंवा चीनमधील लोक करतात. हे समजू नका त्यांचा समाज चमत्काराने विकसित झालेला नसून मेहनत आणि हुशारीच्या बळावर विकसित झाला आहे”, म्हणजे नेहरु भारतीय नागरीकांना आळशी समजत होते. भारतीय कमी अक्कल असलेले आहेत”, असे नेहरुंचे म्हणणे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून नेमकं काय म्हटलं होतं?

  • जवाहरलाल नेहरू यांनी १९५९ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात लाल किल्ल्यावरून म्हटलं होतं की, “भारतीयांमध्ये कष्ट करण्याची सवय नाही. यात आपला दोष नाही, कधी कधी अशा सवयी तयार होतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण युरोप, जपान, चीन, रशिया आणि अमेरिकेतील लोकांइतके कष्ट घेत नाही. हे देश चमत्कारीतपणे एका रात्रीत विकसित झाले आहेत असं नाही. कठोर परिश्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे हे देश विकसित झाले आहेत.” इंडिया टुडेने या वि,यीचं वृत्त दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदिरा गांधींबद्दल काय म्हणाले?

  • “तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही विचारसरणी वेगळी नव्हती. त्यांनी लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट रोजी म्हटले होते की, आपली कामं पूर्णत्वास जातात तेव्हा आपण आत्मसंतुष्य असतो आणि जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण नाऊमेद होतो. कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे. आजच्या काँग्रेसकडे लोकांकडे पाहिल्यावर असे वाटते, इंदिराजींनी भलेही देशातील लोकांचे आकलन चुकीचे केले असेल. पण काँग्रेसचे अतिशय अचूक असे आकलन त्यांनी केले होते”, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

 

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का; २०० हून अधिक बळी घेणारा ‘हा’ प्रमुख गोलंदाज बाहेर

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून भारतात सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार असून त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. नागपुरात होणार्‍या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. खरे तर संघाचा अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. त्याचवेळी तो दुसरा कसोटी सामनाही खेळणे कठीण दिसत आहे.
  • पायाला झालेली दुखापत, बरे होण्यासाठी लागणारा वेळ - ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूड गेल्या महिन्यात सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात जखमी झाला होता. यामुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी तो भारतात पोहोचला असला तरी तरीही तो खेळणे अवघड आहे.
  • रविवारी बंगळुरूमध्ये सराव सुरू होण्यापूर्वी तो म्हणाला की, ”मला पहिला कसोटी सामना खेळता येईल की नाही हे माहित नाही, पण दुसऱ्या कसोटीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आम्ही सध्या वर्कलोड मॅनेजमेंट करत आहोत. मी चांगली गोलंदाजी करत होतो पण अचानक अकिलीसचा आजार हाताळू शकलो नाही.”
  • जोश हेझलवूडच्या वक्तव्यावरून तो पहिला कसोटी सामना खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर दुसरा सामनाही खेळण्याबाबत शंका आहे. जोश हेझलवूड खेळला नाही, तर त्याच्या जागी स्कॉट बोलंडला संधी मिळू शकते. हा त्याचा पहिला आशिया दौरा असेल ज्यात तो गोलंदाजी करताना दिसेल.
  • ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.

“शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बेरोजगारांना दरमाहा १००० रुपये”, त्रिपुरा निवडणुकीसाठी TMC कडून ‘बंगाल मॉडेल’चं वचन

  • ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कांग्रेस पक्षाने त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी (०५ फेब्रुवारी) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये तृणमूलने २ लाख नोकऱ्या, चौथी ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला १,००० रुपये तसेच बेरोजगार तरुणांसाठी समाजकल्याण योजनांचं आश्वासन दिलं आहे.
  • तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्यापासून (६ फेब्रुवारी) त्रिपुराच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच्या आदल्या दिवशी पक्षाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्रिपुरामध्ये १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. तृणमूल कांग्रेस पक्ष त्रिपुरातल्या २८ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
  • त्रिपुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू म्हणाले की, “आमचा पक्ष त्रिपुरात सत्तेवर आला तर आम्ही पहिल्याच वर्षी ५०,००० नवीन नोकऱ्या देऊ, पाच वर्षांत २ लाख रोजगारांची निर्मिती करू. तसेच सरकारी विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरली जातील.”
  • शाळकरी विद्यार्ध्यांना स्टायपेंड - बसू म्हणाले की, “तृणमूलकडून बेरोजगार तरुणांना दर महिन्याला १,००० रुपयांची मदत दिली जाईल. पदावरून हटवलेल्या १०,३२३ शिक्षकांनाही याचा लाभ मिळेल. त्यांच्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांना देखील दर महिन्याला १,००० रुपये दिले जातील. तृणमूल काँग्रेसने एक कौशल्य विद्यापीठ, विद्यार्थी क्रेडिट कार्ड आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ कर्ज देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक १,००० रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातील.”

भारत-ब्रिटन सुरक्षा चर्चेत ऋषी सुनक सहभागी; व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञानविषयक संबंध अधिक दृढ  करण्याची ग्वाही

  • भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि ब्रिटिश सुरक्षा सल्लागार टिम बारो यांच्यातील चर्चेदरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक उपस्थित राहिले. याद्वारे त्यांनी उभय पक्षीय संबंधांना महत्त्व देत असल्याचे संकेत दिले. यावेळी सुनक यांनी सांगितले, की व्यापार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये उभयपक्षीय धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावर ब्रिटनचा भर आहे.
  • अमेरिका दौऱ्यानंतर अजित डोवाल ब्रिटनसोबत वार्षिक द्विपक्षीय धोरणात्मक वाटाघाटींसाठी ब्रिटन दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी अमेरिकेत त्यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्याशी चर्चा केली होती.
  • लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शनिवारी उशिरा यासंदर्भात ‘ट्वीट’ केले. त्यात या बैठकीचा संदर्भ देत नमूद केले आहे, की टिम बारो व डोवाल यांच्यातील भारत-ब्रिटनदरम्यानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारस्तरीय संवादात सहभागी होऊन, पंतप्रधान ऋषी सुनक यांनी विशेष संकेत दिले आहेत. पंतप्रधान सुनक यांनी भारतासोबत व्यापार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या आश्वासनाला महत्त्व आहे. सर टीम बारो यांच्या भारतदौऱ्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.
  • ‘बीबीसी’चा वादग्रस्त वृत्तपट ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’च्या पार्श्वभूमीवर भारत व ब्रिटनमध्ये हा संवाद झाला. भारत सरकारने पक्षपाती प्रचार अशी टीका करून या वृत्तपटावर बंदी घातली आहे.

दिल्ली : महापौर निवडीसाठी आज तिसरी सभा

  • महापौर निवडीसाठी सोमवारी दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) सभागृहाची सभा बोलावण्यात आली आहे. यापूर्वी महापौर निवडीसाठीचे दोन प्रयत्न फसले आहेत. ‘दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन’ (डीएमसी) कायद्यातील तरतुदीनुसार (१९५७) महापौर व उपमहापौरांची निवडणूक महापालिकेच्या पहिल्या सभेतच व्हायला हवी. दिल्ली महापालिका निवडणुकीला दोन महिने उलटले तरी अद्याप शहराला नवा महापौर मिळालेला नाही.
  • यापूर्वी, दिल्ली महापालिका सभागृहाची सभा ६ आणि २४ जानेवारीला दोनदा आयोजित केली होती. परंतु भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी केलेल्या गदारोळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी महापौर निवडणूक न घेताच कामकाज तहकूब केले. गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीनंतर २५० सदस्यीय महापालिका सभागृहाचे पहिले सत्र कामकाजाविना पूर्ण वाया गेले. दुसऱ्या सत्रात नामनिर्देशित सदस्यांनी शपथ घेतल्यावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी शपथ घेतली होती. शपथविधीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर पीठासीन अधिकारी व भाजपचे नगरसेवक सत्य शर्मा यांनी सभागृहाचे दुसरे अधिवेशन पुढील तारखेसाठी तहकूब केले होते. भाजपच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर ‘आप विरोधात घोषणा दिल्या होत्या. ‘आप’च्या सदस्यांनी सभागृहात  पाच तास  निदर्शने केली होती.
  • दिल्ली महापालिका निवडणुकीत, ‘आप’ १३४ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर भाजपने १०४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या आहेत. महापौरपदासाठी भाजपकडून रेखा गुप्ता व ‘आप’च्या शेली ओबेरॉय शर्यतीत आहेत. उपमहापौरपदासाठी ‘आप’ने आले मोहम्मद इक्बाल आणि भाजप कमल बागरी यांना उमेदवारी दिली आहे.

टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही; मार्चमध्ये स्थळ ठरणार, यजमानपदाच्या शर्यतीत यूएई आघाडीवर

  • शनिवारी बहरीनमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात बैठक पार पडली. या पहिल्या औपचारिक बैठकीनंतर एक निर्णय घेण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) मार्चमध्ये आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पर्यायी स्थळाचा निर्णय घेईल, असे ठरले आहे.
  • आशिया कपच्या यजमानपदाचे अधिकार सुरुवातीला पाकिस्तानला देण्यात आले. त्याचे आयोजन सप्टेंबर २०२३ मध्ये होणार होते, परंतु एसीसीसीचे प्रमुख शाह यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले की, भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएईची तीन ठिकाणे – दुबई, अबू धाबी आणि शारजाह हे या स्पर्धेचे यजमानपदासाठी प्रबळ दावेदार आहेत, परंतु निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.
  • एसीसीद्वारे खंडीय संस्थेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पीसीबी चेअरमन सेठी यांच्या आदेशानुसार बोलावण्यात आली होती. या बैठकीला एसीसी सदस्य राष्ट्रांचे सर्व प्रमुख उपस्थित होते, ज्यामध्ये पाकिस्तानचे यजमान म्हणून नाव दिले नाही.
  • याबाबत माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “एसीसी सदस्यांची आज बैठक झाली आणि खूप सकारात्मक चर्चा झाली. मात्र स्थळ स्थलांतराचा निर्णय मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला. पण खात्री बाळगा की भारत पाकिस्तानात जाणार नाही, स्पर्धाच दुसरीकडे हलवली जाईल. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या खेळाडूंशिवाय प्रायोजक स्पर्धेतून माघार घेतील.”
चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ फेब्रुवारी २०२२
नॅशनल कॉन्फरन्सला सीमांकन अहवाल अमान्य :

जम्मू-काश्मीरमध्ये काही नव्या मतदारसंघांची निर्मिती आणि काही मतदारसंघांची फेररचना सुचवणारा सीमांकन आयोगाचा दुसरा मसुदा अहवाल नॅशनल कॉन्फरन्सने शनिवारी नाकारला.

 नव्या अहवालात या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा, तसेच जम्मू भागात सहा व काश्मीरमध्ये एक मतदारसंघ वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

‘सीमांकन आयोगाने सहयोगी सदस्यांना ४ फेब्रुवारीला उपलब्ध करून दिलेला मसुदा अहवाल नॅशनल कॉन्फरन्स तत्काळ नाकारत आहे,’ असे पक्षाचे प्रवक्ते इम्रान नबी दार म्हणाले. आयोगाने अहवालात काही प्रस्तावित केले आहे, याच्या परिणामांबाबत चर्चा केल्यानंतर पक्ष आपली सविस्तर प्रतिक्रिया देईल, असे ते म्हणाले.

रविवार विशेष - सहस्रावलोकन :

कसोटी म्हणजे कादंबरी, एकदिवसीय प्रकार म्हणजे कथा, तर ट्वेन्टी-२० क्रिकेट ही लघुकथा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहुदिनांचे पारंपरिक क्रिकेट पाच दिवसांचे झाले. मग कालौघात सत्तरीच्या दशकात ६० षटकांचे मर्यादित षटकांचे क्रिकेट रुजले. ते ५० षटकांचे एकदिवसीय क्रिकेट म्हणून लोकप्रिय झाले आणि नंतर २०००च्या दशकात ट्वेन्टी-२० हे लघुरूप अधिक लोकाभिमुख झाले.

आता टेन-१० या अतिलघुरूपाकडे क्रिकेटची वाटचाल सुरू असताना भारतीय क्रिकेट संघ रविवारी एक हजार एकदिवसीय सामन्यांचा ऐतिहासिक टप्पा गाठणारा पहिला संघ ठरत आहे.

१९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला. पण १३ जुलै, १९७४ या दिवशी भारतीय संघ हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध पहिलावहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या ४८ वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासात भारतीय संघाने आणि खेळाडूंनी कमकुवत संघ ते बलाढय़ संघ अशी प्रगती केली आहे.

१९८३ आणि २०११ असे एकदिवसीय क्रिकेटचे दोन विश्वचषक तसेच एक चॅम्पियन्स करंडक (२०१३) भारताच्या यशाची ग्वाही देतात. कपिलदेव, मोहिंदूर अमरनाथ, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या असंख्य शिलेदारांमुळे भारताला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही यशोगाथा लिहिता आली.

इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणामुळे सरकारी वाहनखर्च मर्यादेत वाढ :

सरकारी विभागांसाठी १ एप्रिलपासून खरेदी करावयाची सर्व नवी वाहने ही  विजेवर चालणारी असावीत, या  धोरणानुसार राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्यासाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. यासाठी वाहन खरेदीसाठीच्या  सध्याच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

सरकारी सेवेत किती रक्कमेपर्यंतची वाहने खरेदी करता येतील याची मर्यादा जुलै २०२० मध्ये निश्चित करण्यात आली होती.  या मर्यादेत इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी शक्य नसल्यानेच नवीन मर्यादा  निश्चित केली आहे. सरकारी सेवेत आता  भाडेतत्त्वावरील वाहनेही इलेक्ट्रिक असतील.  

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती  यांच्या वाहनांसाठी खर्चाची मर्यादा नाही. मंत्री, राज्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  यांच्यासाठी २५ लाख, तर  मुख्य सचिव, महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त, माहिती आयुक्त यांच्यासाठी २० लाख, आणि मंत्रालयातील सर्व सचिवांच्या वाहनांसाठी १७ लाख रुपयांची मर्यादा आहे. 

१९९३ च्या मुंबई स्फोटांतील संशयित ‘यूएई’मध्ये ताब्यात :

मुंबईत १९९३ मध्ये घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार दहशतवादी अबू बकर यास संयुक्त अरब अमिरातीमध्ये  (यूएई)  ताब्यात घेण्यात आले. तब्बल २९ वर्षांनंतर तो तपास यंत्रणांच्या ताब्यात आल्यामुळे याप्रकरणात आणखी महत्त्वाचे पुरावे भारतीय यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

भारतीय यंत्रणांचे हे मोठे यश मानले जात आहे.  मुंबईत १९९३ मध्ये वेगवेगळय़ा  १२ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. त्यात तब्बल २५७ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ७०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अबू बकर शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देत असल्याचा संशय आहे.

मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्स मुंबईत आणणे व दाऊदसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्याचा संशय आहे. तो यूएई आणि पाकिस्तानात राहत होता. यापूर्वीही २०१९ मध्ये त्याला यूएईमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. पण कागदोपत्री त्रुटी असल्याने त्याची सुटका झाली होती.

इराणवरील काही निर्बंध अमेरिकेकडून मागे; दिलासा पुरेसा नसल्याचे इराणचे मत :

इराणने २०१५च्या अणुकराराच्या पालनासाठी राजी व्हावे, या उद्देशाने अमेरिकेने शिथिल केलेल्या र्निबधांचे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वागत केले आहे. मात्र हा दिलासा पुरेसा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

२०१५च्या रखडलेल्या अणुकरारातून बाजूला होण्याबाबत इराण आणि जागतिक महासत्तांमध्ये चर्चा सुरू आहे. अशा वेळी शुक्रवारी अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाने इराणच्या अणुकार्यक्रमावरील काही निर्बंध मागे घेतले. याबाबत इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अब्दोल्लाहियन म्हणाले की, अमेरिकेने खरोखरच काही निर्बंध मागे घेतले असतील तर ते आमच्याबद्दल ते व्यक्त करीत असलेल्या सद्भावनेचे प्रतीक मानता येईल. 

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी इराणच्या नागरी अणुकार्यक्रमावरील अनेक निर्बंध मागे घेण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. हे निर्बंध यापूर्वीच्या काळातही मागे घेतले होते. पण तो निर्णय नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने मागे घेतला होता. आता पुन्हा निर्बंध मागे घेण्याचा उद्देश हा इराणला २०१५च्या करारास राजी करणे हा आहे.

२०१८ मध्ये ट्रम्प यांनी या करारातून माघार घेत इराणवर निर्बंध लागू केल्याने इराणसुद्धा या कराराच्या तरतुदींचे पालन करीत नाही. २०१५च्या करारानुसार, इराणच्या अणुकार्यक्रमात सहभागी झालेले देश आणि परदेशी कंपन्यांना अमेरिकेच्या दंडात्मक कारवाईतून सुट देण्यात आली होती. मे २०२० पासून ट्म्र्प यांनी या तरतुदीचे पालन थांबविले होते.  अमेरिका या करारातून बाहेर पडताच इराणसुद्धा त्यापासून दूर जात आहे.

०६ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.