चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ जुलै २०१९

Date : 21 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हिमा दासला पाचवे सुवर्णपदक :
  • भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच असून शनिवारी तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेटूजी ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ५२.०९ सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले.

  • गेल्या १५ दिवसांत २०० मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने ४०० मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या शर्यतीत भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. व्ही. के. विस्मया हिने ५२.४८ सेकंद अशी कामगिरी करत रौप्यपद पटकावले. सरिताबेन गायकवाड हिने ५३.४८ सेकंदासह कांस्यपदक तर एम. आर. पूवाम्मा हिने ५३.७४ सेकंदासह चौथा क्रमांक प्राप्त केला.

  • पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या नोह निर्मल टॉम याने ४६.०५ सेकंदासह रौप्यपदक पटकावले. कझाकस्तानच्या माझेन अल-यासिन याने ४५.९८ सेकंद अशी कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत मोहम्मद अनास याने २०.९५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ४ कोटी ४० लाखांचे उत्पन्न :
  • येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आषाढी यात्रा कालावधीत  विविध माध्यमातून विक्रमी ४  कोटी ४० लाख ३७ हजार  ७८६  रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यंदाच्या आषाढी यात्रेला विक्रमी गर्दी झाली होती. या वर्षी विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन ७ लाखाहून अधिक भाविकांनी घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत समितीच्या उत्पन्नात विR मी १ कोटी ५० लाखाची वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. विठूरायाला भाविकांनी मुक्तहस्ताने दान दिले आहे.

  • वारकरी सांप्रदायात आषाढी महत्त्वाची वारी मानली जाते. यंदाच्या वर्षी राज्यात सर्वदूर पाऊ स झाला. त्यामुळे शेतीची कामे आटोपून भाविकांनी पंढरीची वाट धरली. यंदाची आषाढी वारी विR मी झाली. यात्रा काळात म्हणजेच ३ जुलै ते १७ जुलै या १५ दिवसात समितीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. यामध्ये श्री विठ्ठलाच्या पायावर ठेवलेल्या दानातून ३९ लाख ६३ हजार ४२४ रूपये तर श्री रूक्मिणी मातेच्या पायावर ठेवलेल्या दानातून ७ लाख ७२ हजार १८०  रूपये प्राप्त झाले आहेत. तसेच देणगी पावती मधून १ कोटी ८४ लाख ५४ हजार ९१ रूपये, बुंदीलाडू प्रसाद विक्रीमधून ७२ लाख ४६८ हजार २२० रूपये तिजोरीत जमा झाले आहेत.

  • नव्याने बांधण्यात आलेला अलिशान भक्त निवास यंदाच्या आषाढीला भाविकांसाठी खुला केला होता. या भक्तनिवास मधून १८ लाख ९१ हजार ६०५ रूपये उत्पन्न मिळाले. या सह विविध माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला यंदाच्या वर्षी ४ कोटी ४० लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

  • गेल्या वर्षी म्हणजे २०१८ च्या आषाढीत  समितीला २ कोटी ९० लाख उत्पन्न मिळाल्याची माहिती सचिन ढोले यांनी दिली.गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १ कोटी ५० लाख रुपयाचे विRमी उत्पन्न समितीला मिळाले आहे. मंदिर समितीचा कारभारात पारदर्शीपणा आणि सुसूत्रता आल्याने देणगीदारांचा ओघ वाढला आहे. परिणामी समितीच्या  उत्पन्नात वाढ झाली. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना अधिक सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत.

मुकेश अंबानीना ११ वर्षांपासून एक रूपयाही नाही पगारवाढ :
  • देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सलग ११ व्या वर्षी १५ कोटी रुपये वार्षिक वेतन घेण्याचा क्रम राखला आहे. कंपनीच्या २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कंपनीतील सहकाऱ्यांचा पगार २० कोटींच्या घरात गेला आहे.

  • फोर्बसच्या यादीत नेहमीच आघाडीचा क्रम राखणारे अंबानी हे देशातील निवडक श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. अंबानी यांनी २००८-९ या वर्षापासून आपले वेतन, इतर लाभ, भत्ते आणि कमिशनपोटी १५ कोटी रुपये इतकीच रक्कम कायम ठेवली आहे. तत्पूर्वी त्यांचे वार्षिक वेतन २४ कोटी रुपये इतके होते.

  • मुकेश अंबानी यांचे जवळचे नातेवाईक आणि सहकारी निखील मेसवानी आणि हितल मेसवानी यांच्यासह अन्य पूर्णवेळ संचालकांना मोठी पगारवाढ देण्यात आली आहे. निखील आणि हितल मेसवानी यांचा वार्षिक पगार २० कोटी ५७ लाख झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या वेतनामध्ये चार कोटी ४९ लाख पगार भत्ता, ९ कोटी ५७ लाखांचे कमिशन आणि अन्य सुविधांसाठी २७ लाख रूपयांचा समावेश असल्याचे बैठकीत सांगितले.

चांद्रयान-२ मोहिमेची सर्व तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण :
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रक्षेपणाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. रविवारी संध्याकाळपासून याच्या काऊंटडाऊनला सुरुवात होणार आहे, त्यानंतर नव्या वेळेप्रमाणे, सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होणार आहे.

  •  

  • इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन यांनी सांगितले की, १५ जुलै रोजी चांद्रयान-२च्या प्रक्षेपणात आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. गेल्या शनिवारी इस्रोने चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठीचे यान जीएसएलव्ही मार्क ३ एम१ ची तालीमही पूर्ण केली आहे. यावेळी त्याच्या कामगिरीत कुठलीच अडचण आढळून आली नाही. त्यामुळे आता सोमवारी दुपारी २.४३ वाजता चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होणार आहे.

  • यापूर्वी चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तारीख १५ जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्र, आयत्या वेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शेवटच्या क्षणी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते, असा निर्णय घेणेही महत्वाचे होते. या मोहिमेत काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितले की, मोठी दुर्घटना होण्याऐवजी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले यासाठी इस्रोचे कौतुक करायला हवे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचा प्रदीर्घ काळापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता :
  • मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबादप्रमाणे कोल्हापुरातही हायकोर्टाचं सर्किट बेंच असावं या मागणीसह कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग यांची भेट घेतली.

  • तेव्हा, यावर त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन कृती समितीला दिले आहे. लवकरच अन्य न्यायमूर्तीशी याविषयी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले. याप्रक्रियेत काही अडचणी, समस्या असल्या तरी पक्षकारांची सोय आणि खटले लवकरात लवकर निकाली लागणं हाही मुद्दा महत्वाचा आहे.

  • त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करता या खंडपीठाबाबत गांर्भियाने विचार करण्यात येईल, अशी भावना व्यक्त करत मुख्य न्यायामूर्तींनी व्यक्त केली. त्यांच्या या सकारत्मक भूमिकेमुळे आता कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद आणि नागपूरप्रमाणे कोल्हापूर खंडपीठही व्हावे या मागणीसाठी मागील 35 वर्षांहून अधिक काळ कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यांचा संघर्ष सुरू आहे. त्या अनुषंगाने शनिवारी कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदरजोग यांच्यात जवळपास  बैठक पार पडली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८३१: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.

  • १९४४: २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.

  • १९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.

  • १९७६: आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या.

  • १९८३: अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.

  • २००२: जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

जन्म 

  • १८५३: ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)

  • १८९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९६१)

  • १९१०: स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९९०)

  • १९११: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)

  • १९२०: गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च २००२)

  • १९३०: भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा जन्म.

  • १९३४: क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा जन्म.

  • १९४५: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.

  • १९४७: सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा जन्म.

  • १९६०: पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८८)

मृत्यू 

  • १९७२: भूतानचे राजे जिग्मेदोरजी वांगचूक यांचे निधन. (जन्म: २ मे १९२९)

  • १९९४: मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन.

  • १९९५: संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन.

  • १९९७: साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९३६)

  • १९९८: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन.

  • २००१: दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९२८)

  • २००२: मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.

  • २००९: किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१३)

  • २०१३: भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९८१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.