चालू घडामोडी - २० एप्रिल २०१८

Date : 20 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एसटी तिकीटं १० ते १५ टक्क्यांनी महागणार :
  • मुंबई: एसटी प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरं जावं लागू शकतं. कारण तोटा भरुन काढण्यासाठी महामंडळाने भाडेवाढीच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

  • त्याचाच भाग म्हणून सर्व प्रकारच्या एसटी तिकीटांमध्ये 10 ते 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. लालपरी ते शिवनेरी अशा सर्व एसटीच्या भाड्यात वाढ प्रस्तावित आहे.

  • राज्य परिवहन आयोगाच्या मंजुरीनंतर ही भाडेवाढ लागू होणार आहे.

  • इंधनाचे वाढते दर, वेतन करार अशा विविध कारणांमुळे ही भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार 1 मे रोजी होणार असल्याची घोषणा केली.

  • त्यामुळे त्यासाठी प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आधीच खासगी वाहतुकीच्या तुलनेत एसटीचे दर जास्त आहेत. त्यातच सुट्ट्यांमध्ये खासगी वाहतुकीचं भाडंही अव्वाच्या सव्वा असतं. त्यानंतर आता एसटीनेही भाडेवाढ केल्याने, प्रवाशांचा खिसा कापला जाणार आहे.

ब्रिटनमध्ये निदर्शनांनी झाले पंतप्रधान मोदींचे स्वागत :
  • लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लंडनमध्ये निषेध व निदर्शनाने स्वागत झाले. भारतात होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात हजारो लोकांनी मोदी लंडनमध्ये असतानाच घोषणाबाजी केली. कास्टवॉच यूके व साउथ एशिया सॉलिडेरिटी ग्रुपच्या नागरिकांनी निदर्शने केली. या वेळी ‘मोदी तुमचे हात रक्ताने रंगले आहेत’, ‘मोदींचे स्वागत नाही’ यासारखे बॅनर पाहावयास मिळाले.

  • कास्ट वॉच यूकेचे प्रवक्ते म्हणाले, देशाच्या एकतेसाठी धोका असलेल्या तसेच हुकूमशाहीकडे जात असलेल्या देशाला रोखण्यासाठी हिंदू राष्ट्रवाद रोखावा लागेल. या वेळी अन्य आंदोलकही उपस्थित होते. त्यांच्या हातात कथुआतील बलात्कारपीडित मुलीचे तसेच पत्रकार गौरी लंकेश यांचे छायाचित्र होते. या निदर्शकांमध्ये ब्रिटनमधील भारतीय महिलांचा सहभाग होता.

  • त्यांनी पांढरे कपडे परिधान करीत मूक निदर्शने केली. दुसरीकडे डाउनिंग स्ट्रीटवर साडी परिधान केलेल्या महिलांनी ढोलच्या गजरात मोदी यांचे स्वागत केले. या वेळी नागरिकांनी ‘चक दे इंडिया’ आणि ‘जय हिंद’चे बॅनर झळकवले. 

जम्मू-काश्मीरच्या लोकांचे धैर्य अविचल - राष्ट्रपती :
  • जम्मू : अनेक कारणांनी निर्माण झालेल्या आव्हानांना जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी धाडस, अविचल धैर्य आणि लवचीकपणे तोंड दिले, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रशंसा केली. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी कोविंद यांच्या नागरी सत्कारासाठी येथील अमर महाल पॅलेसमध्ये बुधवारी रात्री आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते.

  • कोविंद म्हणाले, जम्मू आणि काश्मीरवर अनेक चढ-उतार व गोंधळाचा परिणाम झाला. परंतु, आर्थिक व शैक्षणिक संधींचा उपयोग करून घेण्याच्या या राज्यातील लोकांच्या क्षमतेचा भारतीय लोकांना अभिमान आहे. 

इतिहासानं मला नव्हे, तर माझ्या देशाला लक्षात ठेवावं- मोदी :
  • लंडन: इतिहासानं मला लक्षात ठेवावं असं वाटत नाही. सव्वाशे कोटी भारतीयांप्रमाणेच मला लक्षात ठेवलं जावं, हीच माझी इच्छा आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. लंडनमध्ये आयोजित 'भारत की बात, सबके साथ' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी गीतकार आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या प्रश्नांना मोदींनी उत्तर दिलं. 

  • तुम्हाला इतिहासानं नेमकं कसं लक्षात ठेवावं असं वाटतं, असा प्रश्न प्रसून जोशी यांनी मोदींवा विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी वेदांचं उदाहरण दिलं. 'वेद कोणी लिहिले होते हे कोणाला माहित आहे का? जगातल्या इतक्या प्राचीन ग्रंथाची रचना करणाऱ्या व्यक्तीचं नाव कोणाला माहित नसेल, तर मग मोदी कोण आहे? मी खूपच लहान व्यक्ती आहे.

  • इतिहासात स्थान मिळवण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. मला सव्वाशे कोटी भारतीयांप्रमाणेच लक्षात ठेवलं जावं. जगानं माझ्या देशाला लक्षात ठेवावं. माझा देशच जगाला समृद्धतेचा मार्ग दाखवेल,' असं मोदींनी म्हटलं. 

'टाइम'च्या जगभरातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण व नडेला :
  • मुंबई :  'टाइम' मॅगझिनने जाहीर केलेल्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, अभिनेत्री दीपिका पादुकोण, ओला कंपनीचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल, भारतात जन्मलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांचा समावेश आहे. 

  • टाइम मॅगझिनने जाहीर केलेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टॅम्प, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन, जपानचे पंतप्रधान शिंजो अबे, बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, यंदाही या यादीतून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव वगळण्यात आले आहे. नरेंद्र मोदींचे नाव 2015 च्या यादीत होते.  

  • दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'टाइम'मध्ये आपला अभिप्राय नोंदवला असून त्यात विराट कोहलीचे भरभरून कौतुक केले आहे. 2008 मध्ये 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना मी विराटला पाहिले.

  • त्याच्यामध्ये असलेली धावांची भूक आणि खेळातले सातत्य यामुळे त्याने आपली एक स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आज विराट प्रत्येक घरात पोहोचला आहे. क्रिकेटमधील तो एक चॅम्पियन खेळाडू बनला आहे, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

संगीतशिक्षणाचे धोरण ठरविले पाहिजे, डॉ. प्रभा अत्रे यांची अपेक्षा :
  • पुणे : आज संगीतशास्त्र आणि कलाविष्कार यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. काळानुसार संगीत कलाविष्काराचे सादरीकरण बदलत आहे. मात्र, शास्त्र हे प्राचीन ग्रंथातच अडकून पडले आहे. कोणत्याही कलेला वर्तमानाचा संबंध लावता आला पाहिजे, तर ती परंपरा टिकते आणि सशक्त बनते.

  • मात्र, आपल्याकडे संगीताचा सर्वांगीण विचारच झालेला नाही, अशी खंत व्यक्त करून ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी शिक्षण, सांस्कृतिक संस्था आणि शासन यांनी एकत्र येऊन संगीतशिक्षणाचे धोरण ठरविले पाहिजे, शिक्षण हे उपजीविकेचे साधन बनले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

  • पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ या दिग्गजांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला.

  • एक लाख रुपये रोख आणि बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्रामदेवतांसह असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थी प्रभा अत्रे यांना गौरविण्यात आले. या पुरस्काराबरोबर ६ स्वातंत्र्यसैनिकांना, कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या सैनिकांना आणि वीरपत्नींना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७७०: प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

  • १९३९: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.

  • १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.

  • २००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जीकणाऱ्या पहिल्या महिला चालक झाल्या.

जन्म

  • १९१८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचे निधन. (जन्म: ६ जून१८५०)

  • १९३८: न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१)

  • १९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन. (जन्म: २४ जुलै १९११)

  • १९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ – बदायूँ, उत्तर प्रदेश)

  • १९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)

मृत्यू

  • १९१८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचे निधन. (जन्म: ६ जून१८५०)

  • १९३८: न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१)

  • १९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन. (जन्म: २४ जुलै १९११)

  • १९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ – बदायूँ, उत्तर प्रदेश)

  • १९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.