चालू घडामोडी आणि दिनविशेष - 09 ऑक्टोबर 2023

Date : 9 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पहिल्याच सामन्यात किंग कोहलीचा ‘विराट’ धमाका, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम
  • भारतीय संघाने विश्वचषक २०२३ मधील आपल्या मोहिमेची सुरुवात रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली. या सामन्यात गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे संपूर्ण कांगारू संघ १९९ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि २ धावांवर तीन विकेट्स पडल्या होत्या. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे तिघेही खाते उघडू शकले नाहीत. यानंतर विराट कोहलीने केएल राहुलसोबत डावाची धुरा सांभाळली आणि शानदार खेळी केली. भारताने ४१.२ षटकांत ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात विराटने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रमही मोडला.
  • विराट कोहली आता मर्यादित षटकांच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. पण आता विराटने एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या बाबतीत तो आता भारताचा नंबर १ फलंदाज बनला आहे.

आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज -

  • विराट कोहली- २७५९ धावा (६५वा )
  • सचिन तेंडुलकर- २७१९ धावा (५२ डाव)
  • रोहित शर्मा- २४२२ धावा (४६ डाव)
  • युवराज सिंग- १७०७ धावा (३४ डाव)
  • सौरव गांगुली- १६७१ धावा (६२ डाव)
  • एमएस धोनी- १४९२ धावा (३६ डाव)
  • राहुल द्रविड- १४८७ धावा (५५ डाव)

एकदिवसीय विश्वचषकाती सर्वाधिक पन्नास प्लस धावसंख्या करणारे फलंदाज -

  • २१ – सचिन तेंडुलकर
  • ९ – रोहित शर्मा<br>९ – विराट कोहली<br>८ – युवराज सिंग
  • ८ – राहुल द्रविड
  • ८ – मोहम्मद अझरुद्दीन
१४ ऑक्टोंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही
  • शनिवार १४ ऑक्टोंबर रोजी जगातील उत्तर-मध्य आणि दक्षिण अमेरिका, अमेरिका, मेक्सिको, कोलंबिया आणि ब्राझील येथून हे ग्रहण कुठे कांकनाकृती किंवा खग्रास दिसणार आहे, परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी ८.३३ वा सुरू होऊन २.२६ वाजता संपेल. हे यावर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण असेल. ह्या पूर्वी २० एप्रिल रोजी आंशिक सूर्यग्रहण घडले होते.
  • २८ ऑक्टोबर रोजी रात्री घडणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारत, महाराष्ट्रातून दिसेल. ह्या पूर्वी ५ मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण झाले होते. २८ऑक्टोबर चे ग्रहण वर्षातील शेवटचे ग्रहण असेल.हे ग्रहण जगातील युरोप, आशिया, आष्ट्रेलिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतुन दिसेल. ग्रहणाची सुरवात रात्री ०१.०५ मिनिटाने सुरुवात होईल,ग्रहण मध्य ०१.४४ तर ग्रहण २.२२ वाजता संपेल. आंशिक ग्रहणाचा चंद्र केवळ १०%झाकला जाइल.

ऑक्टोंबरमध्ये उल्कावर्षाव

  • ९ ऑक्टोबरला ड्राकोनिड उल्कावर्षाव, १८ ऑक्टोबरला जेमिनिड उल्कावर्षाव, २२ ऑक्टोबरला ओरिओनीड उल्कावर्षाव, २५ ऑक्टोबरला लिओनीड उल्कावर्षाव पहावयास मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात इतक्या खगोलीय घटना पाहण्याची ही संधी अनेक वर्षांनंतर आली आहे. खगोल अभ्यासकांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच गृपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.

इस्रायल, गाझामधील भारतीय नागरिक सुरक्षित

  • इस्रायलवर ‘हमास’ने चढवलेल्या हल्ल्यानंतर अद्याप गाझा पट्टी आणि इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. त्यांच्या संदर्भात सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. मात्र, या संघर्षांमुळे इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी तेल अवीवमधील भारतीय दूतावासाला त्यांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी विनंती केली आहे. सुमारे १८ हजार भारतीय नागरिक इस्रायलमध्ये राहतात. सुदैवाने आतापर्यंत त्यांच्याशी संबंधित कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • रविवारी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ‘हमास’च्या हल्ल्यात सैनिकांसह किमान ६०० इस्रायली नागरिक मृत्युमुखी पडले आणि एक हजार ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. हा गेल्या ५० वर्षांतील इस्रायलवरील सर्वात भीषण हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये सुमारे ३०० जण ठार झाले आहेत आणि सुमारे एक हजार ५०० जण जखमी झाले आहेत.
  • देशात अडकलेल्या भारतीय पर्यटकांनी त्यांचे स्थलांतर करण्याची भारतीय दूतावासाकडे विनंती केली आहे. बहुतांश पर्यटक गटा-गटाने प्रवास करत आहेत.  यात इस्रायलला भेट देणारे काही व्यावसायिकही आहेत जे तणावाखाली आहेत आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेल अवीवमधील भारतीय दूतावास आणि पॅलेस्टाइनमधील भारताच्या प्रतिनिधी कार्यालयाने शनिवारी भारतीय नागरिकांना या आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याचे आणि प्रसंगी कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
  • दूतावासाकडून वृत्तसंस्थेस सांगण्यात आले, की आम्ही सर्व भारतीय नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध आहोत आणि ‘हेल्पलाइन’द्वारे त्यांना सातत्याने मार्गदर्शन करत आहोत. इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांपैकी बहुसंख्य देखभालीच्या स्वरूपातील काम करतात. परंतु तेथे सुमारे एक हजार विद्यार्थी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) अनेक व्यावसायिक आणि हिरे व्यापारी आहेत. हिब्रू विद्यापीठात डॉक्टरेट करत असलेली विद्यार्थिनी बिंदूने सांगितले की, तिने शनिवारी दिवसभर दूतावासाच्या सूचनांचे पालन केल्याने तिला सुरक्षित वाटले. सर्व भारतीय विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात आहेत.
हमासने इस्रायलवर हल्ला का केला? अमेरिकेने सांगितलं मोठं कारण
  • इस्रायलच्या सीमेवर हमास ही दहशतवादी संघटना आणि इस्रायली लष्करात धुमश्चक्री सुरू आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे इस्रायलवर अचानकपणे हल्ला केला. हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागले. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. दरम्यान, इस्रायलनेही गाझा पट्टीत (हा भाग हमास आणि फिलिस्तीनच्या ताब्यात आहे) रॉकेट हल्ले केले. या युद्धात आतापर्यंत १,००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाने जगातला बलाढ्य देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्याही चिंता वाढवल्या आहेत.
  • हमासचे इस्रायलवरील हल्ले थांबावेत यासाठी अमेरिकेने यूएई, सौदी अरब आणि तुर्कीयेसारख्या राष्ट्रांशी बातचीत सुरू केली आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी या युद्धामागची कारणं स्पष्ट केली आहेत. हल्ल्यामागे हमासचा नेमका काय हेतू होता? यावर ब्लिंकन यांनी भाष्य केलं आहे.
  • एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अँटनी ब्लिंकन म्हणाले, इस्रायल आणि सौदी अरबमधील सुधारू पाहत असलेले संबंध बिघडवणं हे इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यामागचं प्रमुख कारण असू शकतं. अलिकडच्या काळात अनेक देशांशी इस्रायलचे संबंध सुधारले आहेत. परंतु, ही गोष्ट हमासला सहन होणारी नाही. तर दुसऱ्या बाजूला इराणचं समर्थन मिळू लागल्यापासून हमास मजबूत झाली आहे. फिलिस्तीन आणि इराणमधील सबंध आजघडीला खूप मजबूत झाले आहेत. या हल्ल्यामागे इराण आहे का याबाबत अद्याप आमच्याकडे ठोस पुरावे नाहीत. परंतु, उभय देशांमधील दृढ झालेले संबंध नक्कीच यामागे आहेत. या दृढ संबंधांनंतर हमास मजबूत होऊ लागली आहे.
पटसंख्या कमी म्हणून गुणवत्ता कमी समजणे चुकीचे; समूह शाळा योजनेबाबत शिक्षक, तज्ज्ञांचा विरोधाचा सूर
  • पटसंख्या कमी म्हणून शाळेची गुणवत्ता कमी किंवा तेथील विद्यार्थ्यांचे समाजिकीकरण होत नाही, असा समज चुकीचा आहे. निर्णयातील त्रुटी, विसंगती लक्षात आणून दिल्यानंतरही शासन समूह शाळांचा निर्णय पुढे करणार असेल तर भविष्यात त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील, असे मत तज्ज्ञ, शिक्षक, शिक्षण विभागातील आजी, माजी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
  • शिक्षण विकास मंचच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या शिक्षण कट्टय़ामध्ये समूह शाळा योजना या विषयावरील चर्चा शनिवारी झाली. यावेळी शिक्षण विकास मंचाच्या बसंती रॉय, दत्ता बाळसराफ, डॉ. माधव सूर्यवंशी, योगेश कुदळे यांच्यासह नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, मुंबई विभागाचे उपसंचालक संदीप संगवे, शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, शिक्षण विभागातील माजी अधिकारी भाऊ गावंडे, मुख्याध्यापक संघाचे महेंद्र गणपुले, शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे आदी उपस्थित होते.
  • समूह शाळा योजनेमागील शासनाची भूमिका नरड यांनी यावेळी मांडली. ‘‘नव्या शिक्षण धोरणाचा संदर्भ देऊन समूह शाळा योजना आखल्याचे शासन सांगत असले तरी प्रत्यक्षात ही योजना धोरणाशी विसंगत आहे. शाळा बंद झाल्यास गळती वाढेल असे धोरणातच नमूद करण्यात आले आहे’’, असे रॉय यावेळी म्हणाल्या.

छोटय़ा शाळांची स्थिती वाईट असेल तर जबाबदारी कुणाची?

  • शाळा बांधणे ही जबाबदारी शिक्षक, कंपन्या किंवा लोकसमूहाची नाही, तर ती शासनाचीच आहे. परंतु शासन त्यातून अंग काढून घेत आहे. समाजिकीकरणाचा मुद्दाही चलाखीचा – वीसपेक्षा कमी विद्यार्थी असल्यास समाजिकीकरण होत नाही हे कशावरून ठरले ? समाजिकीकरण हा सापेक्ष मुद्दा आहे, असे मत दरक यांनी व्यक्त केले.

09 ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.