चालू घडामोडी आणि दिनविशेष - 09 डिसेंबर 2023

Date : 9 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव कधी आणि कुठे विनामूल्य लाइव्ह पाहता येणार? जाणून घ्या
  • महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचा लिलाव आज म्हणजेच ९ डिसेंबर रोजी होणार आहे. पाच संघ असलेली ही स्पर्धा पहिल्या सत्रात खूप लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर आता दुसऱ्या सत्राकडे वाटचाल करत आहे. पहिल्या सत्रात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती. आता स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातसाठी एकूण १६५ महिला खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत.

हे पाच संघ लावतील बोली -

  • विशेष म्हणजे या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होत आहेत. २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रातही पाच संघ सहभागी झाले होते. आता पुन्हा एकदा पाच संघ मैदानात उतरतील, ज्यात दिल्ली कॅपिटल्स महिला, यूपी वॉरियर, रॉयल चॅलेंजर्स महिला, गुजरात जायंट्स आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स महिला संघांचा समावेश आहे.
  • तथापि, पाच संघांकडे बोली लावण्यासाठी फक्त ३० स्लॉट आहेत. १६५ पैकी १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू आहेत. एकूण खेळाडूंपैकी ५६ कॅप्ड आणि १०९ अनकॅप्ड खेळाडू आहेत, ज्यांच्यासाठी पाच फ्रँचायझींकडे एकूण १७.६५ कोटी रुपये शिल्लक आहेत. आता हा लिलाव केव्हा, कुठे आणि कसा लाइव्ह पाहता येणार याबद्दल जाणून घेऊया.

लिलाव कधी होणार?

  • महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी म्हणजेच डब्ल्यूपीएल २०२४ साठी लिलाव आज, शनिवार, ९ डिसेंबर रोजी होणार आहे.

लिलाव कुठे होणार?

  • महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव मुंबईत होणार आहे.

कधी सुरू होणार?

  • मुंबईत होणाऱ्या महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे.

टीव्हीवर लाइव्ह कुठे बघता येणार?

  • महिला प्रीमियर लीग २०२४ साठीचा लिलाव स्पोर्ट्स १८ नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर लाइव्ह प्रसारित केला जाईल.

मोफत लाइव्ह कुठे बघता येणार?

  • डब्ल्यूपीएल २०२४ चा लिलाव जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटद्वारे विनामूल्य लाइव्ह पाहता येणार आहे.
७५ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच; अनेक विभागांच्या परीक्षांचे निकाल प्रलंबित; परीक्षार्थीकडून संतापाची भावना
  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून राज्यात १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार सरळसेवेची पदभरती करण्याची सरकारने घोषणा केली असली तरी सर्व पदे अद्याप भरलेली नाहीत. डिसेंबर महिना सुरू असताना काही विभागांच्या परीक्षांचे निकालही अद्याप जाहीर झालेले नाहीत.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी करून ७५ हजार नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. त्यानुसार शासनाच्या ३२ विभागांपैकी काही विभागांनी आवश्यक  रिक्त जागांची माहिती गोळा करणे, भरती कशा रीतीने करणे, भरती प्रक्रियेचे निकष, भरतीसाठी खासगी संस्थांची निवड करणे आदीविषयी कार्यवाही राबविण्यास सुरुवात केली. त्यानुसार गृह विभागाने १८ हजार पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली.
  • सहकार विभागाने जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करून ऑगस्टमध्ये ३०९ पदांसाठी परीक्षा घेतली. पशुसंवर्धन विभागाची जुलैमध्ये जाहिरात आणि ऑगस्टमध्ये ४४९  पदांची, महसूल विभागाने जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ४७९३ पदांची ऑगस्टमध्ये परीक्षा घेतली. वन विभागाने २४१७  पदांसाठी ऑगस्टमध्ये परीक्षा, कृषी विभागाने २१८ पदासाठी सप्टेंबरमध्ये तर, अर्थ व सांख्यिकी २६० जागांसाठी ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेतल्या आहेत. मात्र, या सर्व ८४४६ जागांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत. ते कधी लागणार याकडे या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे डोळे लागले आहेत. याशिवाय ग्रामविकास विभागाने ४ ऑगस्ट रोजी १९,४६० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, काहीना काही कारणांमुळे या पदांची परीक्षा झालेली नाही. या परीक्षेचीही उमेदवार वाट पाहात असून ही परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थी लक्ष वेधत आहेत.

काही जागांच्या जाहिरातीकडे लक्ष..

  • सामाजिक न्याय, वित्त व लेखा कोषागार विभाग, पुरवठा निरीक्षम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगर परिषद, नगरपंचायत गट-‘क’ व  ‘ड’ यातील जागांची जाहिरात अजून प्रसिद्ध झालेली नाही. यामुळेच ७५ हजार पदे भरण्याचा मुहूर्त चुकला आहे.
रशियाच्या अध्यक्षपदासाठी पुतिन यांची पुन्हा दावेदारी! देशावरील पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न 
  • व्लादिमीर पुतिन यांनी आगामी वर्षांत मार्चमध्ये होत असलेल्या रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आपली उमेदवारी जाहीर केली. आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुतिन यांनी शुक्रवारी क्रेमलिन पुरस्कार सोहळय़ानंतर १७ मार्च रोजी होत असलेल्या रशियन अध्यक्षीय निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला.
  • युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या अनेक ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पुतिन यांना ही निवडणूक लढवण्याची विनंती केली. या अधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देताना पुतिन यांनी उत्स्फूर्तपणे होकार दिल्याचे ‘क्रेमलिन’चे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी नमूद केले.
  • यक्रेन युद्धावर रशियाचा प्रचंड खर्च होत आहे. पुतिन यांच्या जवळपास २५ वर्षांच्या कारकिर्दीनंतरही रशियात त्यांना अद्यापही व्यापक पाठिंबा असल्याचे चित्र आहे. त्यांच्या कारकीर्दीत रशियात अंतर्गत हल्ले झाले. रशियन सत्ताकेंद्र ‘क्रेमलिन’वरही हल्ला झाला. पुतिन यांचाच एके काळी निकटवर्तीय मानल्या गेलेल्या येवगेनी प्रिगोझिन याच्या भाडोत्री लष्कराने जूनमध्ये अल्पकालीन बंडखोरीनंतर पुतिन यांची रशियावरील पकड कायम आहे.
Aditya L1 चं मोठं यश, पाठवले सूर्याचे जवळून काढलेले फोटो, भास्कराचं हे रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल
  • चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सौरमोहीम हाती घेतली आहे. इस्रोने आदित्य एल-१ हे यान सूर्याच्या दिशेनं पाठवलं आहे. भारताच्या या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. आदित्य-एल१ ने सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे सूर्याचा पहिल्यांदाच फुल डिस्क फोटो काढून इस्रोला पाठवला आहे. हे सर्व फोटो २०० ते ४०० नॅनोमीटर व्हेवलेन्थमधील आहेत. याद्वारे तुम्हाला सूर्याचं ११ वेगवेगळ्या रंगांमधलं रूप पाहायला मिळेल.
  • सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आदित्य एल-१ हे अवकाशयान २ सप्टेंबर रोजी लाँच केलं. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवलं आहे. यासाठी आदित्य एल-१ मध्ये वेगवेगळी उपकरणं (पेलोड) बसवण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे.
  • दरम्यान, आदित्य-एल१ चा SUIT पेलोड २० नोव्हेंबर रोजी चालू करण्यात आला होता. या टेलिस्कोपने सूर्याच्या फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयरचे फोटो काढले आहेत. फोटोस्फेयर म्हणजेच सूर्याचा पृष्ठभाग आणि क्रोमोस्फेयर म्हणजे सूर्याच्या बाह्य वातावरणातील पातळ थर, जो पृष्ठभागापासून २००० किलोमीटर दूर आहे. आदित्य-एल१ ने याआधी ६ डिसेंबर रोजी सूर्याचे काही फोटो क्लिक केले होते. ते पहिलेच लाईट सायन्स फोटो होते. परंतु, यावेळी फुल डिस्क फोटो क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये सूर्यावरील डाग आणि त्याचं शांत रूप दिसतंय. या फोटोंच्या माध्यमातून इस्रोचे वैज्ञानिक सूर्याचा अभ्यास करू शकतील.
  • पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, मनिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्स इंडियन, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, उदयपूर सोलर ऑब्जर्व्हरी, तेजपूर युनिव्हर्सिटी आणि इस्रोच्या वैज्ञानिकांनी मिळून हा SUIT बनवला आहे.
“भारतातच करा डेस्टिनेशन वेडिंग”, पंतप्रधानांचं धनाढ्यांना आवाहन; म्हणाले, “जोड्या देव बनवतो, मग तुम्ही…”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (८ डिसेंबर) उत्तराखंडमध्ये आयोजित दोन दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारतासह जगभरातील गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या परदेशी गुंतवणुकीवर भाष्य केल. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, आम्ही या परिषदेसाठी आलेल्या गुंतवणूकदारांबरोबर २.५ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आतापर्यंत ४४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर यशस्वी बोलणी झाली आहे.
  • दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देवभूमी उत्तराखंड तुम्हा सर्वांसाठी नवे दरवाजे उघडत आहे. भारताचा प्रगतीचा मंत्र घेऊन उत्तराखंड पुढे सरकत आहे. या महत्त्वकांक्षी भारताला स्थिर सरकार हवं आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आपण तेच पाहिलं आहे. लोकांनाही स्थिर आणि मजबूत सरकर हवं आहे. हीच गोष्ट उत्तराखंडच्या जनतेने आधीच दाखवून दिली आहे.
  • रम्यान, नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडला परफेक्ट वेडिंग डेस्टिनेशन (विवाह करण्यासाठीचं उत्तम ठिकाण) म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी या देशातल्या धनाढ्य लोकांना सांगू इच्छितो की, लोकांची लग्न होतात, तेव्हा त्यांच्या जोड्या ईश्वराने बनवलेल्या असतात, असा आपला समज आहे. परंतु, मला एक गोष्ट कळत नाही की, देव लोकांच्या जोड्या बनवतो तर मग या जोड्या त्यांच्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी (डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी) परदेशात का जातात? ते इथे देवभूमीवर लग्न का करत नाहीत? देवाच्या दारात लग्न करण्याऐवजी परदेशात का जातात?
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मला असं वाटतं की, आपल्या देशांमधील तरुणांसाठी ‘मेक इन इंडिया’ योजना आहे. त्याचप्रमाणे ‘वेड इन इंडिया’ ही चळवळ सुरू व्हायला हवी. आपल्या देशातले धनाढ्य तरुण जगभरातल्या इतर देशांमध्ये जाऊन लग्न का करतात? आपल्या देशातल्या धनाढ्य लोकांमध्ये परदेशात जाऊन लग्न करण्याची फॅशन सुरू झाली आहे.
कोणावर सर्वाधिक बोली? ‘डब्ल्यूपीएल’साठी आज १६५ क्रिकेटपटूंचा लिलाव
  • महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी शनिवारी मुंबईत क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. या वेळी एकूण १६५ महिला क्रिकेटपटू लिलावात सहभाग नोंदवणार असून, सर्वाधिक बोली कोणावर लागणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.
  • क्रिकेटपटूंच्या लिलावाबरोबरच या वेळी लीग विविध शहरांत खेळवली जाणार की पुन्हा एकदा एकाच केंद्रावर पार पडणार या विषयीचा निर्णयदेखील घेतला जाणार आहे. पहिल्या हंगामात गेल्या वर्षी केवळ मुंबईत ब्रेबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर सामने पार पडले होते. या वेळी विविध शहरांत सामने खेळविण्याचा विचार असून, यासाठी प्रामुख्याने मुंबई आणि बंगळूरु या शहरांची नावे चर्चेत आहेत. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या पाच संघांमध्ये क्रिकेटपटूंसाठी रस्सीखेच चालेल.   या रकमेतून संघांना १८ खेळाडूंची निवड करायची असून, संघात ६ परदेशी खेळाडू अनिवार्य असतील.
  • पहिल्या पर्वात भारताची स्मृती मनधाना सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली होती. बंगळूरुने तेव्हा मुंबई इंडियन्सला टक्कर देत ३.४ कोटी रुपयांची बोली मनधानावर लावली होती. या वेळी नव्या लिलावासाठी वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन आणि ऑस्ट्रेलियाची किम गार्थ या खेळाडूंसाठी सर्वाधिक ५० लाख रुपये मूळ  किंमत निश्चित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल, इंग्लंडची एमी जोन्स यांच्यासाठी ४० लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. भारताकडून वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, सुषमा वर्मा, एकता बिश्त, गौहर सुलताना, मोना मेश्राम यांच्यासाठी ३० लाख आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे.

 

विजयी सलामीचे लक्ष्य!; भारत-ऑस्ट्रेलिया महिला ट्वेन्टी-२० मालिका आजपासून :
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचे विजयी सलामीचे लक्ष्य असेल. पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

  • दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला आता दोन महिन्यांचा कालावधी आहे. या स्पर्धेसाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कितपत सज्ज आहे याचा अंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेअंती येईल. या मालिकेला सुरुवात होण्याच्या तीन दिवसांपूर्वीच मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारची ‘एनसीए’मध्ये बदली करण्यात आली आणि ऋषिकेश कानिटकरकडे फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

  •  शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेत भारताला सलामीवीर स्मृती मानधनाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तिची सलामीची साथीदार शफाली वर्मा उसळी घेणाऱ्या चेंडूंविरुद्ध अडचणीत सापडते. याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज घेऊ शकतील.  संघात पुनरागमन झाल्यापासून जेमिमा रॉड्रिग्जने उत्तम खेळ केला असून कर्णधार हरमनप्रीतच्या कामगिरीतही सातत्य आहे. हरलीन देओल व यास्तिका भाटिया यांनी चॅलेंजर चषकातील कामगिरीच्या बळावर संघात पुनरागमन केले आहे.

  • अष्टपैलू देविका वैद्यला आठ वर्षांनंतर ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळाले आहे. भारताच्या गोलंदाजीची भिस्त रेणुका सिंह ठाकूर व दीप्ती शर्मावर असेल. दुसरीकडे, एलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघात  नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. फलंदाज फोबी लिचफील्डकडून संघाला दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाज किम गार्थ व हीथर ग्राहमही संघाकडून पदार्पण करण्याची शक्यता आहे.

२१ वर्षांत १८ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या : 
  • पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गेल्या २१ वर्षांत तब्बल १८ हजार ५९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सरकार दप्तरी शेतकरी आत्महत्यांची नोंद २००१ पासून ठेवली जाते. २००६ मध्ये सर्वाधिक १२९५ आत्महत्या निदर्शनास आल्या होत्या. चालू वर्षांत ऑक्टोंबर अखेर ९३० शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

  • यंदा अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाच्या उत्पादनात घट झाली. शेतीचा वाढलेला खर्च, शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची चिंता, खते व कीटकनाशकांसाठी येणारा अतिरिक्त खर्च, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, मुलांचे शिक्षण इत्यादी कारणांमुळे यामुळे शेतकरी तणावात आहेत. गेल्यावर्षी अमरावती विभागात ११७९ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. यंदाचा आकडा त्यापेक्षा अधिक असेल, असे स्वयंसेवी संस्थांचे म्हणणे आहे.

  • २००१ पासून ऑक्टोंबर २०२२ अखेपर्यंत विभागात १८ हजार ५९५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असली, तरी त्यापैकी निम्म्याहून कमी म्हणजे ८ हजार ५७६ शेतकरी कुटुंबांनाच सरकारची मदत मिळू शकली. तब्बल ९ हजार ८२० प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आली आहेत. महसूल विभागाच्या २००५ च्या शासन निर्णयानुसार नापिकी, राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँक, मान्यताप्राप्त सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे होणारा कर्जबाजारीपणा आणि कर्ज परतफेडीचा तगादा हे तीन निकष आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत देण्यासाठी ठरवण्यात आले आहेत. या तीन कारणांमुळे आत्महत्या घडली असल्यास जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या प्रकरणांत संबंधित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपयांची मदत दिली जाते. निकषांमध्ये आणि मदतीच्या रकमेमध्ये गेल्या १६ वर्षांत बदल करण्यात आलेला नाही.

  • आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन, प्रबोधन, कृषी समृद्धी योजनेअंतर्गत उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा, आरोग्य सेवा, शेती विकासाचे कार्यक्रम, मुलांना मोफत शिक्षण, अशा उपायांमधून दिलासा देण्याचा दावा सरकारने केला असला, तरी शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. अमरावती विभागात २००१ मध्ये ४९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती.

पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा : 
  • नोटबंदीची घोषणा करताना पंतप्रधानांनी जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मुदत वाढवण्याची घोषणा केली असली तरी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ते पाळणे सरकार किंवा रिझव्‍‌र्ह बँकेसाठी बंधनकारक नाही, असा दावा वरिष्ठ विधिज्ञ जयदीप गुप्ता यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला. 

  • ‘‘कायदेशीर निर्देशांचे पालन नागरिकांनी केले तर त्यांचे पैसे त्यांच्याकडेच राहतील, असे नोटबंदी जाहीर करण्यापूर्वी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी म्हटले होते. त्यांनी भाषणात नोटा बदलण्यासाठी ५० दिवसांच्या मुदतीचाही उल्लेख केला होता, परंतु त्यांनी आणखी मुदत देण्यात येईल, असे जाहीर केले नव्हते. परंतु त्यांनी जरी तसे म्हटले असते तरी, वचनपूर्तीच्या कारणास्तव मुदत वाढविता येत नाही आणि अधिसुचनेनुसार ते बंधनकारकही नाही,’’ असे अ‍ॅड. गुप्ता यांनी घटनापीठापुढे सांगितले.  

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशाला उद्देशून भाषण केले. त्यात ते म्हणाले होते की, जे लोक ३० डिसेंबर रोजी कोणत्याही कारणास्तव जुन्या नोटा जमा करू शकणार नाहीत, त्यांना नियुक्त केलेल्या बँकांमध्ये नोटा बदलण्याची परवानगी दिली जाईल आणि ते पुढल्यावर्षी (२०१७) ३१ मार्चपर्यंत नोटा जमा करू शकतात.

  • २०१६ च्या नोव्हेंबरमध्ये ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ५८ याचिकांवर न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा, न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न यांच्या घटनापीठात सुनावणी झाली.  बुधवारी सहा दिवसांच्या दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

मोदी महिमा कायम : 
  • गुजरात विधानसभा निवडणूक सलग सातव्यांदा जिंकून भाजपने गुरुवारी ऐतिहासिक विजय नोंदवला. १८२ सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपने १५६ जागा जिंकत नवा विक्रम नोंदवला आहे. तर गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. तर यंदा जोरदार प्रचाराने वातावरण निर्मिती केलेल्या आम आदमी पक्षाने पाच जागा जिंकत काँग्रेसच्या मतपेढीला खिंडार पाडले आहे. 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे भाजपने गुजरातमध्ये आजपर्यंतचे सर्वात मोठे यश मिळवल्याचे मानले जाते. भाजपच्या या झंझावातात काँग्रेसने जेमतेम आपले अस्तित्व राखले, तर ‘आप’ने गुजरातमधील मतांच्या आधारे राष्ट्रीय पक्ष अशी ओळख मिळवली. भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी सुमारे ५२.५० एवढी आहे.

  • २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या आणि त्याला मिळालेल्या मतांची टक्केवारी ४९.१ एवढी होती. काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी २७.२९ एवढी आहे, गेल्या वेळी काँग्रेसला ४० टक्क्यांवर मते होती. तर पदार्पण करणाऱ्या ‘आप’ने १२.९१ टक्के मते मिळवली आहेत.

उपान्त्यपूर्व फेरीचा थरार आजपासून!; चार माजी विजेते, दोन माजी उपविजेते, दोन नवोदित! : 
  • विश्वचषक फुटबॉल कतार २०२२मध्ये शुक्रवारपासून उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. साखळी टप्पा आणि दुसऱ्या फेरीतील काही धक्कादायक निकालानंतर फुटबॉलमधील नेहमीच्या महासत्तांमध्येच चुरस दिसून येते. मात्र मोरोक्कोसारखा नवोदित संघ आणखी किती धक्के देतो, हे पाहणेही रंजक ठरेल.

  • ब्राझील-क्रोएशिया, अर्जेटिना-नेदरलँड्स, पोर्तुगाल-मोरोक्को आणि इंग्लंड-फ्रान्स अशा उपान्त्यपूर्व फेरीच्या लढती होत आहेत. ब्राझील, अर्जेटिना, फ्रान्स आणि इंग्लंड या माजी विजेत्यांकडून मोठय़ा अपेक्षा आहेत अर्जेटिना वगळता बाकीच्या संघांचा खेळ बऱ्यापैकी लौकीकास साजेसा झाला. अर्जेटिनाने लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखाली थोडी उशिरा मुसंडी मारली. नेदरलँड्सचा संघ यंदा भरात आहे. तर क्रोएशियाच्या संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा असल्यामुळे या संघास कमी लेखता येत नाही. परंतु या मांदियाळीत नवोदित मोरोक्को संघ लक्षवेधी ठरतो, कारण या टप्प्यापर्यंत पोहोचलेला तो पहिला अरब आणि चौथा आफ्रिकी संघ ठरला.

  • याशिवाय धक्कादायक निकालांच्या या स्पर्धेतले शिल्लक प्रकरण म्हणूनही या संघाकडे पाहता येईल. रोनाल्डोशिवाय पोर्तुगाल नुसताच नव्हे, तर दिमाखात जिंकू शकतो हे दिसून आले आहे. शिवाय ब्राझीलप्रमाणेच पोर्तुगालचा खेळही आधीच्या फेरीमध्ये प्रवाही आणि आकर्षक होता. परंतु या टप्प्यावर निव्वळ कौशल्यापेक्षा अनुभवही निर्णायक ठरत असतो. त्यामुळेच माजी विजेत्या संघांना अधिक संधी आहे, असे म्हणता येईल.

कोण जिंकू शकेल?

  • ब्राझील-क्रोएशिया (ब्राझील?)
  • अर्जेटिना-नेदरलँड्स (अर्जेटिना?)
  • मोरोक्को-पोर्तुगाल (पोर्तुगाल?)
  • फ्रान्स-इंग्लंड (फ्रान्स?)

०९ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.