चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२१

Date : 31 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीनमध्ये मुलांच्या ‘ऑनलाइन गेमिंग’वर निर्बंध :
  • मुलांमधील ‘ऑनलाइन गेमिंग’ची वाढती ‘व्यसनाधीनता’ हा चिंतेचा विषय ठरू लागल्याने या व्यसनाला आळा घाळण्यासाठी चीनने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

  • चीनने किशोरवयीन मुलांच्या (१८ वर्षांखालील) ऑनलाइन गेमिंगवर वेळेचे निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर गेमिंग कंपन्यांनाही नियम आणि निर्बंधांच्या कक्षेत आणले आहे. चीन सरकारच्या नव्या नियमांमुळे मुलांना आता आठवडय़ातले तीन दिवस फक्त एक तास ऑनलाइन खेळ खेळता येतील. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुले रात्री ८ ते ९ या वेळेतच ऑनलाइन खेळ खेळू शकतील, असे चीनच्या ‘व्हिडीओ गेम’ नियामकांनी ‘क्षिनुआ’ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेला सांगितले. ऑनलाइन गेिमगचे नवे नियम लागू करण्याआधी चीनमधील मुलांना प्रतिदिन ९० मिनिटे आणि सुटीच्या दिवशी तीन तास ऑनलाइन खेळ खेळण्याची मुभा होती.

  • ऑनलाइन गेमिंगवरील निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना गेमिंग कंपन्यांनाही देण्यात आल्या आहेत. निश्चित केलेल्या कालावधीहून अधिक वेळ मुले ऑनलाइन खेळताना आढळली तर त्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांवर टाकण्यात येणार आहे. निर्धारित वेळेआधी किंवा नंतर ऑनलाइन खेळ खेळण्यापासून मुलांना रोखा, असे आदेशही कंपन्यांना देण्यात आले आहेत. ‘ऑनलाइन गेमिंग’ची निश्चित केलेली वेळ आणि कालावधी कंपन्या पाळतात की टाळतात, यावरही नियामक नजर ठेवणार आहेत.  विशेष म्हणजे चीन सरकारने अलीकडेच ‘स्पीरिच्युअल ओपिअम’ हा ऑनलाइन खेळ सादर केला. तो किशोरवयीन मुलांमध्ये लगेचच लोकप्रिय झाला. मुले या खेळात तासन्तास व्यतीत करतात, त्यांना त्याचे व्यसन लागत असल्याच्या तक्रारीही मोठय़ा प्रमाणावर करण्यात आल्या होत्या.

सुप्रसिद्ध बंगाली लेखक बुद्धदेव गुहा यांचे निधन :
  • प्रसिद्ध बंगाली लेखक बुद्धदेव गुहा यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.‘मधुकरी’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले होते.  गुहा हे कोविड नंतरच्या गुंतागुंतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावले.

  • त्यांच्या कादंबऱ्यांतून निसर्गाशी सान्निध्य जाणवत असे. पूर्व भारतातील जंगलांवर त्यांचे विशेष प्रेम होते. कोविड नंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच रविवारी ११.२५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना एप्रिलमध्ये करोना झाला होता. त्यावेळी ते ३३ दिवस रुग्णालयात होते.

  • गुहा यांच्या पश्चात दोन मुली असून त्यांच्या पत्नी रितू गुहा या रबींद्र संगीतातील तज्ज्ञ होत्या. त्यांचे २००१ मध्ये निधन झाले होते. गुहा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे बालपण रंगपूर व बारीसाल या पूर्व बंगालमधील भागात गेले. बालपणीच्या आठवणींचा त्यांच्यावर ठसा होता.

  • त्यांना आनंद पुरस्कारासह शिरोमण पुरस्कार, शरत पुरस्कार मिळाले होते. त्यांनी मधुकरी, कोएलर कच्छे, सोबीनॉय निबेदॉन  ही त्यांची पुस्तके गाजली. बाबा होवा व स्वामी होवा या त्यांच्या दोन कादंबऱ्यांवर ‘डिक्शनरी’ हा चित्रपट काढण्यात आला होता. मुलांसाठीही त्यांनी लेखन केले. त्यात रिजुदा हे त्यांचे पात्र जास्त भावले. पुस्तक मेळ्यात ते येत असत तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलरच्या यादीत आहेत.

न्यूझीलंडमध्ये करोना लशीमुळे पहिल्या मृ्त्यूची नोंद :
  • न्यूझीलंडमध्ये करोनाप्रतिबंधक लशीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, मायोकार्डिटिस हा विकार असलेल्या महिलेने फायझरची लस घेतली होती. तिला हा आजार आधी होती की लशीनंतर झाला हे समजू शकलेले नाही.

  • वैद्यकीय मंडळाने म्हटले आहे की, लशीमुळे तिच्या शरीरात प्रतिक्रिया उमटली असावी. तिला इतरही अनेक आजार होते. तेसुद्धा कारणीभूत ठरले असावेत. महासंचालक अ‍ॅशले ब्लूमफिल्ड यांनी सांगितले की, मायोकार्डिटिस हा लशीचा दुर्मिळ असा दुष्परिणाम आहे. असे असले तरी लस घेऊ नये असा त्याचा अर्थ नाही.

  • न्यूझीलंडमध्ये वीस लाख लोकांना ही लस देण्यात आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी या मृत्यूचे स्पष्टीकरण देण्यासा नकार दिला आहे. मृत्यूची तारीख, महिलेचे वय, वैद्यकीय तपासणीचे निष्कर्ष याबाबत काही सांगण्यास नकार देण्यात आला आहे.

  • सोमवारी न्यूझीलंच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डन यांनी सांगितले की, ऑकलंडमध्ये तीव्र टाळेबंदी लागू राहणार असून ती दोन आठवडे चालणार आहे. संपूर्ण देशातही एक आठवडय़ाची टाळेबंदी जारी करण्यात आली आहे.  पण तेथे असलेले निर्बंध ऑकलंडमधील निर्बंधांच्या तुलनेत कमी आहेत. न्यूझीलंडमध्ये डेल्टा विषाणूचा प्रसार वाढला आहे.

पुढील महिन्यात सात दिवस बँका बंद; १० ते १२ सप्टेंबर सलग तीन दिवस टाळं :
  • सप्टेंबर महिना सुरु व्हायला अवघे २ दिवस शिल्लक आहेत. विशेषतः बँकेच्या कामांसाठी तुम्हाला हा महिना महत्त्वाचा ठरेल. तुमची बँकेची कोणती काम खोळंबली असतील तर येत्या म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला तुमची ही कामं पूर्ण करता येणार आहे. कारण ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यामध्ये बँकांना कमी दिवस सुट्ट्या असतील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, सप्टेंबरमध्ये बँकेना एकूण ७ दिवस सुट्टी असणार आहे. यानुसार, सप्टेंबर महिन्यात बँकांना शनिवार आणि रविवार मिळून एकूण ७ दिवसांची सुट्टी असणार आहे.

  • सप्टेंबर महिन्यात बँकांना असणाऱ्या या ७ सात दिवसांच्या सुट्यापैकी ३ सुट्ट्या सलग असणार आहेत. १० सप्टेंबर, ११ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर असं सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे, अत्यंत महत्त्वाची काही कामं असतील तर ती शक्यतो १० तारखेच्या आधीच करा. कारण, १० तारखेला गणेश चतुर्थी, ११ सप्टेंबर रोजी दुसरा शनिवार तर १२ सप्टेंबरला रविवार आल्यानं बँकांना ३ दिवसांची सुट्टी मिळाली आहे.

  • RBI कडून राज्यनिहाय पारंपरिक सण उत्सव, धार्मिक तसेच अन्य महत्त्वाच्या दिवशी या सुट्ट्या जाहीर केल्या जातात. त्याप्रमाणे, सप्टेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या ‘Holiday under Negotiable Instruments Act’ अंतर्गत ठरवण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशभरातील बँकांना त्या-त्या राज्यांच्या सणावारांनुसार सुट्ट्या दिल्या जातात. म्हणजेच, आठवड्याच्या सुट्ट्या वगळता (शनिवार, रविवार) RBI ने दिलेल्या अन्य सुट्ट्या देशातील सगळ्याच बँकांना लागू असतील असं नाही.

माजी क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचे निधन
  • नामांकित प्रशिक्षक वासू परांजपे यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुली आणि मुलगा जतीन असा परिवार आहे.

  • गेली सहा दशके भारतीय आणि विशेषत: मुंबईच्या क्रिकेटसाठी परांजपे यांनी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका पार पाडल्या. वासूसरांप्रमाणे मुंबईच्या क्रिकेटची नाडी कुणालाच ठाऊक नाही, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते. महान क्रिकेटपटू सुनील गावस्करला ‘सनी’ हे टोपणनाव त्यांनीच दिले.

  • २९ प्रथम श्रेणी सामन्यांत दोन शतकांसह ७८५ धावा अशी परांजपे यांची आकडेवारी फारशी लक्षवेधी नव्हती. पण खेळाची जाण आणि खेळाडूंच्या दृष्टिकोनावर मेहनत घेणे, हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांना हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजरात अशा चार भाषा अवगत होत्या.

  • माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती सदस्य मुलगा जतीनने क्रीडा पत्रकार आनंद वासू यांच्यासह परांजपे यांच्या जीवनावरील ‘क्रिकेट द्रोणा’ हे पुस्तक लिहिले होते. यात भारतामधील अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी त्यांची कारकीर्द घडवण्यात परांजपे यांचे कसे योगदान होते, हे नमूद केले आहे. ऐंशीच्या दशकात ते खेळाडूंना जीवनाकडे पाहण्याचा धडा द्यायचे. परांजपे यांच्या पत्नी ललिता या रुईया महाविद्यालयात त्या वेळी इंग्रजी वाङ्मय विभागाच्या प्रमुख होत्या. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने आपल्या पुस्तकात परांजपे दाम्पत्याचे अनुभव मांडले आहेत. दादर युनियनमध्ये परांजपे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ललिता यांच्या शैक्षणिक तासिकांना मुकावे लागल्याचे त्याने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींची सर्व विजेत्यांशी फोन पे चर्चा :
  • टोक्यो पॅरालिम्पिक २०२० स्पर्धेत भारताच्या अवनी लखेरा हीनं नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. पॅरालिम्पिक इतिहासातील भारताचं नेमबाजीतील पहिलं पदक आहे. या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एक एक करून त्यांनी विजेत्यांशी संवाद साधला. भारताला सोमवारी १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळालं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या ७ वर पोहोचली आहे.

  • अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

  • १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ गुण मिळवत सुवर्ण पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवनी लेखरा हिला फोन करत शुभेच्छा दिल्या. हा विजयाचा आम्हाला अभिमान वाटत आहे, असं त्यांनी अवनीला सांगितलं.

माजी क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचे निधन :
  • नामांकित प्रशिक्षक वासू परांजपे यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुली आणि मुलगा जतीन असा परिवार आहे.

  • गेली सहा दशके भारतीय आणि विशेषत: मुंबईच्या क्रिकेटसाठी परांजपे यांनी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका पार पाडल्या. वासूसरांप्रमाणे मुंबईच्या क्रिकेटची नाडी कुणालाच ठाऊक नाही, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते. महान क्रिकेटपटू सुनील गावस्करला ‘सनी’ हे टोपणनाव त्यांनीच दिले.

  • २९ प्रथम श्रेणी सामन्यांत दोन शतकांसह ७८५ धावा अशी परांजपे यांची आकडेवारी फारशी लक्षवेधी नव्हती. पण खेळाची जाण आणि खेळाडूंच्या दृष्टिकोनावर मेहनत घेणे, हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांना हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजरात अशा चार भाषा अवगत होत्या.

  • माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती सदस्य मुलगा जतीनने क्रीडा पत्रकार आनंद वासू यांच्यासह परांजपे यांच्या जीवनावरील ‘क्रिकेट द्रोणा’ हे पुस्तक लिहिले होते. यात भारतामधील अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी त्यांची कारकीर्द घडवण्यात परांजपे यांचे कसे योगदान होते, हे नमूद केले आहे. ऐंशीच्या दशकात ते खेळाडूंना जीवनाकडे पाहण्याचा धडा द्यायचे. परांजपे यांच्या पत्नी ललिता या रुईया महाविद्यालयात त्या वेळी इंग्रजी वाङ्मय विभागाच्या प्रमुख होत्या. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने आपल्या पुस्तकात परांजपे दाम्पत्याचे अनुभव मांडले आहेत. दादर युनियनमध्ये परांजपे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ललिता यांच्या शैक्षणिक तासिकांना मुकावे लागल्याचे त्याने म्हटले आहे.

३१ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.