सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभरात सुरू असलेल्या विरोधादरम्यानच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळविताना पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील गैर-मुस्लिम निर्वासितांनादेखील आपल्या धर्माचा पुरावा सादर करावा लागणार आहे. हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारसी धर्मिय अर्जदारांना आपण ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आल्याचा पुरावा द्यावा लागणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
सुधारित नागरिकत्व कायद्याअंतर्गत ज्यांना भारतीय नागरिकत्व हवे असेल, त्यांना आपल्या धर्माचा पुरावा द्यावा लागे. याचा उल्लेख सुधारित नागरिकत्व कायद्याच्या नियमावलीत करण्यात येईल, असं एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं.
धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सुमारे ६० हजार कोटींच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेली प्रमुख सरकारी विमान कंपनी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांच्या संपूर्ण खासगीकरणाची नवी योजना केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केली. एअर इंडियाच्या विक्रीची ही नवी योजना गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ आणि आकर्षकरीत्या सादर करण्यात आली आहे.
या योजनेनुसार एअर इंडिया कंपनीतील सर्वच्या सर्व सरकारी भागीदारी खासगी कंपनीला विकली जाईल. या १०० टक्केनिर्गुतवणुकीसाठी केंद्र सरकारने खासगी क्षेत्राकडून निविदा मागवल्या आहेत. निविदा भरण्याची अंतिम तारीख १७ मार्च आहे.
वास्तविक, २०१८ मध्ये खासगी क्षेत्राकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. पण दोन वर्षांपूर्वी सरकारच्या निर्गुतवणुकीच्या प्रक्रियेला एकाही खासगी कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एअर इंडियाच्या विक्रीची योजना लांबणीवर पडली होती.
झपाटय़ाने पसरत असलेल्या करोना विषाणूंचे केंद्र असलेल्या चीनच्या वुहान शहरातून २५० भारतीयांना हलवण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला.
चीनसह इतर अनेक देशांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, कॅबिनेट सचिव राजीव गऊबा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही परिस्थिती हाताळण्याबाबत भारताच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
चीनमधून प्रवासी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर, तसेच नेपाळ सीमेवरील एकात्मिक तपासणी नाक्यांवर लोकांची तपासणी करण्यासह खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबतचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वुहान शहरात अडकून पडलेल्या खासकरून विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना हलवण्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालय चीनच्या अधिकाऱ्यांना विनंती करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी गव्हर्निंग काऊन्सिलने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या नवीन नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला सामन्यादरम्यान दुखापत झाली तर तो मैदानाबाहेर जाऊ शकतो, आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते. या नियमाला CONCUSION SUBSTITUTE असं म्हटलं जातं. आयपीएलच्या आगामी हंगामााठीही हा नियम लागू करण्यात येणार आहे. सोमवारी गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी याबद्दल माहिती दिली.
दरम्यान, आयपीएलच्या अंतिम सामन्याबद्दलही सोमवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. २९ मार्चपासून तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असून, अंतिम सामना २४ मे तारखेला मुंबईत खेळवला जाईल. याचसोबत सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, रात्री ८ वाजता सामने खेळवले जाणार आहेत.
काही संघमालकांनी सामने रात्री साडेसात वाजता सुरु करावे अशी मागणी केली होती, मात्र बैठकीत वेळेत कोणताही बदल न करण्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. याचसोबत यंदाच्या हंगामात Double Header सामन्यांची संख्याही कमी करण्यात आलेली असून यंदा केवळ ५ Double Header सामने खेळवले जाणार आहेत.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.