चालू घडामोडी आणि दिनविशेष - 28 डिसेंबर 2023

Date : 28 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महिला सवलत योजनेमुळे एसटीचे उत्पन्न ९१५ कोटींवर
  • राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या महिला व ज्येष्ठ नागरिक या दोन्ही सवलत योजना राज्य परिवहन महामंडळाच्या पथ्यावर पडू लागल्या असून महामंडळाच्या तिजोरीत दरमहा भर पडत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या या योजनामुळे राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून उत्पन्नात वाढ झाली आहे.
  • मे २०२२ मध्ये एसटीने ९ कोटी ५० लाख (प्रवाशांच्या ये-जा करण्यावर संख्या मोजली जाते) प्रवासी प्रवास करीत होते. सवलती दिल्याने ही संख्या १६ कोटी लाख झाली असून उत्पन्न ६०० कोटी ८२ लाखांवरून थेट ९१५ कोटी ८० लाख झाले आहे. विविध ३१ प्रकारच्या सवलतींसाठी राज्य सरकार महामंडळाला १४४९ लाख रुपये देणे लागत आहे. सरकारने एसटीला बळ देण्यासाठी १,१४४ कोटी रुपये अदा केले आहेत. त्यामुळे एसटीची आर्थिक घडी सुधारण्यास मदत होणार आहे.
  • राज्यात एसटीचे मोठे जाळे विणले गेले आहे. राज्यातील प्रत्येक खेडय़ापर्यंत पोहोचणारे हक्काचे साधन म्हणून एसटीकडे पाहिले जात आहे. १५ हजार ९२२ सरकारच्या व ४६७ भाडेतत्त्वावर चालणाऱ्या एसटी दिवसाला ५० लाख किलोमीटर प्रवास करीत आहेत. या सेवेतून एसटीला दररोज २७ कोटी रुपये उत्पन्न मिळते. वर्षांला हे उत्पन्न ९ हजार ८५५ कोटी रुपयांच्या घरात जाते. मात्र ८७ हजार कर्मचारी व २५१ आगारांवर होणारा खर्च जवळपास तेवढाच असल्याने एसटी नेहमीच तोटय़ात असल्याचे चित्र आहे.

प्रवाशांच्या संख्येत वाढ

  • स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, अपंग यांच्यासह ३१ घटकांना एसटीच्या वतीने सवलतीच्या दरात तिकीट दर आकारला जात आहे. या तिकीट दरातील फरक हा शासनाच्या वतीने एसटी महामंडळाला अदा केला जात आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या मे महिन्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागिरकांना एसटी प्रवास मोफत करण्यात आला, तर महिलांसाठी महिला दिनापासून ही सवलत तिकीट दरात ५० टक्के देण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे.
विद्यापीठांनी एम.फिल.चे प्रवेश थांबवण्याचे आदेश यूजीसीने का दिले?
  • देशात एम.फिल. (मास्टर्स ऑफ फिलॉसॉफी) पदवीला मान्यता नसल्याचे नमूद करत विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी या अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले. युजीसीच्या आदेशामुळे आतापर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवलेल्या विद्यापीठांसमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे.
  • युजीसीने या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. काही विद्यापीठे एम.फिल. अभ्यासक्रमासाठी नवे अर्ज मागवत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र एम.फिल. या पदवीला देशात मान्यता नाही. युजीसी (किमान मानके आणि पीएच.डी. देण्यासाठीची प्रक्रिया) अधिनियम २०२२ तील नियम १४ मध्ये उच्च शिक्षण संस्थांनी एम.फिल. अभ्यासक्रम न राबवण्याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले आहे.
  • युजीसी अधिनियम २०२२ बाबतचे राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी एम. फिल. अभ्यासक्रमाचे प्रवेश तातडीने थांबवावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही एम.फिल. अभ्यासक्रमाला प्रवेश न घेण्याचे आवाहन युजीसीकडून करण्यात आले आहे.
‘आयबी’मध्ये तब्बल इतक्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, नोकरीची सुवर्णसंधी…
  • सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीमध्ये काम करण्याची संधी आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेडच्या भरती प्रक्रियेची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध केलीये. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत.
  • या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. mha.gov.in या वेबसाइटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. याचसाईटवरून तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया २२६ पदांची होत आहे. थेट आयबीमध्ये नोकरी करू शकतात.
  • या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १६ जानेवारी २०२४ आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया तब्बल २२६ पदांसाठी होत आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी, अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव बदललं!
  • रामलल्लाच्या स्वागती जय्यत तयारी सुरू झाली आहे. राम मंदिराच्या सजावटीला सुरुवात झाली असून हजारो भक्तगण मंदिराला भेट देत आहेत. तसंच, मंदिर प्रशासनाकडूनही नियोजन आढावा घेतला जात आहे. दरम्यान, राम मंदिराला भेट देण्याकरता येणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्येत ट्रेनमार्गे जाणाऱ्या भक्तांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण, अयोध्या जंक्शनचे आता नामबदल करण्यात आले आहे. अयोध्या जंक्शनचं आता अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलं आहे.
  • अयोध्येतील भाजप खासदार लल्लू सिंह यांनी बुधवारी (२७ डिसेंबर) फेसबूकवर पोस्ट करून ही माहिती दिली. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असतील. याआधी ३० डिसेंबरला पंतप्रधान अयोध्येतील नवीन विमानतळ आणि नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत.
  • लल्लू सिंह यांनी एक्सवर माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली , लोकभावनेच्या अपेक्षेनुसार नव्याने बांधलेल्या भव्य अयोध्या रेल्वे स्थानकाचे अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे. त्याबद्दल, आदरणीय संत, अयोध्यावासीय आणि भक्तांच्या वतीने मी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

विमानतळाचंही होणार उद्घाटन

  • प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी अयोध्येत उत्साह संचारला आहे. त्याआधी, ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन विमानतळ आणि नव्याने बांधलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि अयोध्येला हजारो कोटी रुपयांचे प्रकल्पही भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी जवळपासच्या जिल्ह्यातील लोकही अयोध्येत येणार आहेत.
दक्षिण कोरियाचा अभिनेता ली-सून-क्यूनचा मृत्यू 
  • ऑस्कर विजेता चित्रपट ‘पॅरासाइट’मधील दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध अभिनेता ली-सून-क्यून (वय ४८) याचा मृत्यू झाला आहे. सोल येथे एका कारमध्ये ली-सून-क्यून बुधवारी मृतावस्थेत आढळून आला.  धक्कादायक बाब म्हणजे लीची कथित ड्रग्सच्या वापराबद्दल चौकशी सुरू आहे.
  • उत्तर सोलमधील रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये पोलीस आणि आपत्कालीन अधिकाऱ्यांना ली बेशुद्ध अवस्थेत सापडला. तो मरण पावला असल्याचे आपत्कालीन अधिकाऱ्यांनी नंतर जाहीर केले. तत्पूर्वी ली बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेणे सुरू होते, असे  सेओंगबक पोलिसांनी सांगितले. लीचा मृतदेह नंतर जवळच्या सोल रुग्णालयात नेण्यात आला.
  • लीने एका बार होस्टेसच्या निवासस्थानी बेकायदा ड्रग्ज घेतल्याच्या आरोपांबाबत त्याची पोलीस चौकशी सुरू होती. त्याला ड्रग्ज प्रकरणात अडकविण्यात आले आहे. तो काय ड्रग घेत आहे हे त्याला माहीत नव्हते, असे लीने आपल्या बचावात म्हटले होते, असे योनहॅप वृत्तसंस्थेने म्हटले आहे.२०२० मध्ये ‘पॅरासाइट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अन्य तीन विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटात लीने एका श्रीमंत कुटुंब प्रमुखाची भूमिका साकारली होती.

 

टीम इंडियात होणार मोठा बदल! विराट नव्हे, तर ‘या’ युवा खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत मिळणार संधी :
  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात टी२० मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका संघ तीन सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. उभय संघांतील टी२० मालिका ३ जानेवारी रोजी सुरू होणार असून यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल उपस्थित नसतील, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते. विराटऐवजी ३१ वर्षीय खेळाडूला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. या वयातही हा खेळाडू पदार्पणाच्या सामन्याची वाट पाहत आहे.

  • ३१ वर्षीय फलंदाज राहुल त्रिपाठीचा संघात समावेश - कदाचित असे दिसत आहे की, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र काही फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंचा देखील विचार केला जात आहे. त्यात अशा स्थितीत मधल्या फळीत फलंदाजीसाठी ३१ वर्षीय फलंदाज राहुल त्रिपाठीचा संघात समावेश केला जाऊ शकतो. राहुल त्रिपाठी अलीकडेच बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय संघाचा भाग बनला होता, परंतु त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले नव्हते.

  • राहुल त्रिपाठीने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामने खेळून ४१४ धावा केल्या होत्या. या चमकदार कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात येत होते. सलामीशिवाय राहुल त्रिपाठी मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी आणि त्याआधी इंग्लंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये संघासोबत गेला होता.

‘कोवीन अ‍ॅप’वर नेजल व्हॅक्सिन उपलब्ध; कशी करायची नोंदणी जाणून घ्या :
  • चीनमध्ये करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या भीतीदायक आकडयांमुळे पुन्हा लॉकडाउनची परिस्थिती उद्भवणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कोरोनाच्या नव्या BF7 व्हेरीयंटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आता अनेकजण बुस्टर डोसकडे वळत आहेत. बुस्टर डोसमध्ये आता नेजल व्हॅक्सिन म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचा समावेश करण्यात आला आहे. ही लस ‘कोवीन अ‍ॅप’वर उपलब्ध झाली आहे. ही लस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची जाणून घ्या.

नेजल व्हॅक्सिनचा स्लॉट बूक करण्यासाठी वापरा या स्टेप्स

  • cowin.gov.in/ या कोविनच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • तुमच्या रेजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईलवरून लॉगइन करा.
  • ओटीपी शेअर करा.
  • लॉगइन झाल्यानंतर व्हॅक्सिन स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर उपलब्ध बुस्टर डोस या पर्यायावर क्लिक करा.
  • पिनकोड, जिल्ह्याचे नाव टाकून जवळचे व्हॅक्सिन सेंटर शोधा.
  • तुम्हाला सोयीचे असेल ते सेंटर निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला हवी ती तारीख आणि दिवस निवडा.
  • तुमचा स्लॉट कन्फर्म करा. बुस्टर डोस घेतल्यानंतर वेबसाईटवरून त्याचे सर्टीफिकेट डाउनलोड करा.

बुस्टर डोस घेण्याआधी त्या व्यक्तीने करोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. या दोन लस घेतल्यानंतर ९ महिन्यांनी एखादी व्यक्ती बुस्टर डोस घेऊ शकते.

बुस्टर डोसची किंमत - भारत बायोटेकने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या लसीची किंमत खाजगी रुग्णालयासाठी ८०० रुपये ठरली असून त्यावर ५ टक्के जीएसटी आकारू शकतात. तसेच सरकारी रुग्णालयात या लसीेसाठी ३२५ आकारण्यात येणार आहेत.

देशभरात करोना उपचारांची सज्जता; विविध राज्यांतील रुग्णालयांत सराव :
  • करोना प्रादुर्भावात वाढ होण्याच्या कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी व त्यासाठीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी मंगळवारी देशभरातील अनेक रुग्णालयांत सराव प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) करण्यात आले. यासाठी मनुष्यबळ व साधनांची सज्जता ठेवणे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले.

  • मंडाविया यांनी मंगळवारी केंद्र सरकार संचालित सफदरजंग रुग्णालयाने आयोजित केलेल्या सराव प्रात्यक्षिकांची पाहणी केली. चीनसह काही देशांत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कोविड रुग्णालयांत सराव प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेण्याची सूचना केली आहे.

  • या प्रात्यक्षिकांत संबंधित रुग्णालयांत खाटांची उपलब्धता, वैद्यकीय कर्मचारीसंख्या, संदर्भ संसाधने, चाचणी क्षमता, वैद्यकीय उपकरणे आणि पुरवठा, टेलि मेडिसिन (दूरसंचार आणि डिजिटल माध्यमांच्या मदतीने वैद्यकीय सेवा) सेवा व प्राणवायू (वैद्यकीय ऑक्सिजन) उपलब्धता यासह इतर पैलूंचा आढावा घेतला जात आहे. मांडविया म्हणाले की, रुग्णालयांची तयारी तपासण्यासाठी हा उपक्रम गरजेचा होता. जगभर करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

  • भारतातही हा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे वैद्यकीय उपकरणे, कार्यपद्धती व मनुष्यबळाच्या दृष्टीने संपूर्ण पायाभूत सुविधा सज्ज असणे आवश्यक आहे. रुग्णालयांत सज्जता महत्त्वाची असून, त्यासाठी सरकारी व खासगी रुग्णालयांत सराव प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. राज्यांचे आरोग्य मंत्री आपापल्या भागातील प्रात्यक्षिकांचा आढावा घेत आहेत. सर्वानी कोविड प्रतिबंधक खबरदारीच्या उपाययोजना, सुसंगत वर्तन, अनधिकृत माहितीची प्रसार, अफवा पसरवणे टाळावे व सज्ज-सतर्क रहावे, असे आवाहनही मंडाविया यांनी नागरिकांना केले.

राज्यातील ३६ टक्के क्षेत्रात जमिनीमध्ये जस्ताची कमतरता; दुय्यम अन्नद्रव्यांचे प्रमाणही कमीच :
  • महाराष्ट्रातील ३६ टक्के क्षेत्रात जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्ताची कमतरता दिसून आलेली आहे. लोह व ‘बोरॉन’ आणि दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये प्रामुख्याने गंधकाचीसुद्धा कमतरता काही प्रमाणात दिसून आलेली आहे. राज्यात नुकताच केलेल्या कृषी विभागाच्या सर्वेक्षण व माती परीक्षणानुसार सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता वाढत असल्याचे आढळून आले. पिकांच्या वाढीवर त्याचा दुष्परिणाम होण्याचा धोका आहे.

  • शेतात पेरणीपूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षणाद्वारे मातीतील उपलब्ध अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद, पालाश त्याचप्रमाणे सामू, विद्युत वाहकता, चुनखडीचे प्रमाण समोर येते. त्यावरून पिकासाठी रासायनिक खताच्या मात्रा ठरवता येतात. पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सोबतच सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची गरज असते. सध्याच्या शेती पद्धतीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा वाढता वापर, पीक फेरपालट न होणे, सेंद्रिय खतांच्या वापराचा अभाव, असंतुलित खत वापर आदींमुळे जमिनीत सूक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता दिसून येते. पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे असून त्याच्या योग्य वापरातून पीक उत्पादनात वाढ होऊन दर्जा सुधारतो, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञांनी दिली.

  • मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा आवश्यकतेनुसार वापर केल्यास पिकांच्या उत्पादनात अधिक वाढ दिसून येते. त्यामुळे मुख्य अन्नद्रव्यांचे पिकांद्वारे शोषण वाढून मुख्य अन्नद्रव्येयुक्त खतांची कार्यक्षमता वाढते. मात्र, महाराष्ट्रातील तब्बल ३६ टक्के जमिनीत जस्ताची कमतरता आढळून आली आहे. दुय्यम अन्नद्रव्यांचीसुद्धा कमी आहे. जस्ताच्या कमतरतेमुळे पाने लहान व अरूंद व निमुळती होतात. पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी गळतात व पानगळ होते. पिकांची वाढ खुंटून पीक फुलावर येण्यास व परिपक्व होण्यास उशीर होतो. पीक वाढीसाठी प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य ठरलेले असते. प्रकाश संश्लेषण आणि हरितद्रव्ये निर्मिती सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरच अवलंबून असते. पीक पोषणासाठी एकूण १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यातील जस्त व दुय्यम अन्नद्रव्याचे प्रमाण पीक वाढीसाठी धोकादायक ठरत आहे.

नोटाबंदीची काही कारणे रिझव्‍‌र्ह बँकेला अमान्य; केंद्र सरकार, बँकेच्या प्रतिज्ञापत्रांत मात्र उल्लेख वगळला :
  • नोटाबंदीविरोधात दाखल याचिकांवर झालेल्या सुनावणीवेळी केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले असले तरी त्यामध्ये नसलेले काही मुद्दे आता उघडकीस आले आहेत. ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यासाठी सरकारने दिलेली सर्वच कारणे रिझव्‍‌र्ह बँकेला मान्य नव्हती, मात्र दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये याचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे.

  • आपल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने हा अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने फेब्रुवारी २०१६मध्ये, ९ महिने आधी यावर काम सुरू केल्याचाही यात उल्लेख आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रतिज्ञापत्रातही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती आणि आपणच नोटाबंदीची शिफारस केली होती, असे म्हटले आहे. मात्र यामध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने केलेली ही शिफासर केंद्राच्या काही कारणांवर बोट ठेवल्यानंतर करण्यात आल्याचा उल्लेख या दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये नाही. बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या इतिवृत्तामध्ये घोषणेच्या काही तास आधी याचा उल्लेख करण्यात आल्याचे समोर आले आहे.

  • वापारातील रोख रक्कम आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त असल्याचे कारण नोटाबंदीसाठी देण्यात आले होते. निर्णय घेतला सलग पाच वर्षे हे प्रमाण ११ टक्क्यांच्या वर असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र नोटाबंदीनंतरच्या वर्षांमध्ये हे प्रमाण वाढल्याचा उल्लेख त्यात नाही. २०१९-२०मध्ये १२ टक्के, २०२०-२१मध्ये १३.७ टक्के, २०२१-२२मध्ये हे प्रमाण १३.७ टक्के होते. याखेरीज ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटांचे चलनातील प्रमाण वाढल्याचे कारण प्रतिज्ञापत्रा देण्यात आले आहे.

  • मात्र रिझव्‍‌र्ह बँकेने याबाबत सरकारने केलेल्या विश्लेषणातील त्रृटी लक्षात आणून दिल्याचा उल्लेख मात्र प्रतिज्ञापत्रात करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे चलनात असलेल्या बनावट नोटांच्या कारणाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने वेगळे मत मांडल्याचे समोर आले आहे. चलनात असलेल्या १७ लाख कोटी रुपयांपैकी ४०० कोटींच्या बनावट नोटा हे प्रमाण फार जास्त नसल्याचे निरीक्षण रिझव्‍‌र्ह बँकेने नोंदविले होते. अन्य काही मुद्दय़ांवरही रिझव्‍‌र्ह बँकेने नोंदविलेल्या भिन्न मतांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आलेला नाही.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ डिसेंबर २०२१

 

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा - भरतकोटीने पराव्यानला रोखले :
  • भारताचा ग्रँडमास्टर हर्षां भरतकोटीने ‘फिडे’ जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत त्याच्यापेक्षा वरच्या स्थानावर असलेला रशियाचा ग्रँडमास्टर डेव्हिड पराव्यानला बरोबरीत रोखले.

  • खुल्या गटातील सहाव्या फेरीत २१ वर्षीय भरतकोटी आणि पराव्यान यांच्यातील लढत ४२ चालींनंतर बरोबरीत सुटली. त्याआधी भरतकोटीने रौफ मामेदोव्ह, व्लादिस्लाव्ह कोव्हालेव्ह आणि व्होल्दोमेर यांच्यावर विजयांची नोंद केली होती. तसेच त्याने सर्गे मोवेसीनला बरोबरीत रोखले होते.

  • भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरथीला मात्र पराभव पत्करावा लागला. त्याला अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाने पराभूत केले, तर निहाल सरिनवर अलेक्सी ड्रीव्हने मात केली.

२०२२ मध्ये सर्वात अगोदर ‘या’ मोठ्या शहरांमध्ये सुरू होणार ‘5G’ सेवा :
  • दूरसंचार विभागाकडून (DOT) एका अधिकृत सांगण्यात आले आहे की, गुरूग्राम, बेंगळुरू, कोलकाता, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणेसह काही मेट्रो आणि मोठी शहरं पुढील वर्षी 5G सेवा मिळवणारे पहिली ठिकाणं असतील.

  • मार्च-एप्रिल २०२२ मध्ये 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याची सरकारची योजना आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, दूरसंचार क्षेत्रातील नियामक TRAI कडून राखीव किंमत, बँड योजना, ब्लॉक आकार, स्पेक्ट्रमचे प्रमाण या संदर्भात स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी शिफारसी मागवल्या. तसेच ट्रायने तिच्या बाजूने उद्योग भागधारकांशी या विषयावर सल्लामसलत सुरू केली आहे.

  • “5G सेवांच्या रोलआउटच्या संदर्भात, दूरसंचार सेवा प्रदाते (टीएसपी) – भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया यांनी गुरुग्राम, बंगळुरू, कोलकाता, मुंबई, चंदीगड येथे 5G चाचणी साइट्स स्थापन केल्या आहेत. दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, पुणे, गांधीनगर शहर आणि मेट्रोवाली मोठी शहरं, पुढील वर्षी देशात 5G सेवा सुरू करणारी पहिली ठिकाणे असतील,” असे निवेदनात म्हटले आहे.

  • एरिक्सन येथील एशिया पॅसिफिकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मॅग्नस एवरब्रिंग यांनी अलीकडेच एका मुलाखतीत इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “ तज्ञांनी 5G रोलआउटच्या संदर्भात नियामक आघाडीवर स्पष्टतेची आवश्यकता दर्शविली आहे. ते स्पेक्ट्रम उपलब्ध करून देणे आणि ते वाजवी अटींवर उपलब्ध करून देण्यासाठी परवाना देत आहेत.

‘केंद्र-राज्यात एकाच विचाराचे सरकार लाभदायी’ :
  • हिमाचल प्रदेश तसेच केंद्रात एकाच विचाराचे सरकार असल्याने राज्याला त्याचा लाभ झाल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. विकासाची प्रक्रिया यामुळे गतिमान झाल्याचे पंतप्रधानांनी येथील सभेत नमूद केले.

  • हिमाचल प्रदेशमधील जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्राने आयुष्यमान भारत ही योजना आणली तर हिमाचल सरकारने हिमकेअर ही योजना आणत अधिकाधिक नागरिकांना याअंतर्गत मोफत उपचार मिळाले. जनतेचे जीवनमान सुखकर करणे याला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे.

  • वीज प्रकल्पांमुळे  राज्यात मोठय़ा प्रमाणात वीजनिमिर्ती होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगत मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे कौतुक केले. सभेला आलेला जनसमुदाय पाहाता लोक राज्य सरकारच्या कारभारावर समाधानी आहेत, असे मतही पंतप्रधानांनी व्यक्त केले. या वेळी ११ हजार ५८१ कोटींच्या योजनांचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. काही विकासकामांचे लोकार्पणही करण्यात आले.

देशात दिवसभरात ओमायक्रॉनचे १५६ रुग्ण ; एकूण रुग्णांची संख्या ५७८ :
  • ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या २४ तासांत १५६ नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती सोमवारी केंद्रीय आरोग्य विभागाने  दिली. देशभरातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ५७८ झाली आहे. १५१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत, अशी माहितीही आरोग्य विभागाने  दिली.

  • सर्वाधिक रुग्ण दिल्लीमध्ये असून या राज्यात १४२ रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात १४१, केरळमध्ये ५७, गुजरात ४९, राजस्थान ४३ आणि तेलंगणामध्ये ४१ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ६,५३१ रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत.

  • त्यामुळे देशभरातील एकूण करोनाबाधितांची संख्या तीन कोटी ४७ लाख ९३,३३३ झाली आहे. सध्या ७५,८४१ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांत ३१५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ४,७९,९९७ झाली आहे.

१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘अशी’ करा नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया :
  • १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती. याबाबतील आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली आहे.

लस नोंदणी प्रक्रिया

स्टेप १ – सर्व प्रथम Covin App वर जा. तुमचा मोबाईल नंबर टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.

स्टेप २ – आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.

स्टेप ३ – तुम्ही निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर जेंडर आणि जन्मतारीख निवडा.

स्टेप ४ – मेंबर एॅड झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.

स्टेप ५ – आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.

स्टेप ६ – लसीकरण केंद्रावर, तुम्हाला संदर्भ आयडी आणि सीक्रेट कोड प्रदान करावा लागेल. जे तुम्ही नोंदणी केल्यावर तुम्हाला मिळेल.

स्टेप ७ – त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.

२८ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.