चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ फेब्रुवारी २०२०

Date : 25 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नेमबाजी, तिरंदाजीच्या राष्ट्रकुलचे भारताला यजमानपद : 
  • भारताला जानेवारी २०२२मधील राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. तसेच त्या स्पर्धामधील पदकांचा समावेश हा २०२२मध्ये बर्मिगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत करण्यात येईल, असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या वतीने (सीजीएफ) स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थातच पदकांचा समावेश हा बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर आठ दिवसांनी करण्यात येणार आहे.

  • बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी आणि तिरंदाजी हे दोन खेळ पर्यायी खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आले. परिणामी भारताने बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवरभारताला राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद देणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. या दोन्ही स्पर्धा भारतात चंडीगड येथे जानेवारी २०२२मध्ये होतील. बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहेत.

  • ‘‘चंडीगड २०२२ आणि बर्मिगहॅम २०२२ या दोन स्पर्धाचे स्वतंत्ररीत्या आयोजन होणार आहे. बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा संपायच्या एक आठवडा आधी पदक तालिका घोषित करण्यात येईल. त्यात चंडीगड २०२२मधील पदक विजेत्यांचा समावेश करण्यात येईल. अर्थातच त्यानंतर स्पर्धेतील सहभागी देशांची क्रमवारी ठरवण्यात येईल,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यभरातील दीड हजार ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान : 
  • राज्यभरातील १९ जिल्ह्यांमधील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी ३० मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे.

  • राज्यपालांना सदस्यांधून सरपंच निवडीचा अध्यादेश फेटाळला असल्याने आता थेट सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या याचबरोबर नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रापंचायतींसाठी ही निडणूक होत आहे.

  • या निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज ६ ते १३ मार्च या कालावधीत स्वीकरले जाणार आहेत. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १८ मार्च आहे. शिवाय याच दिवशी निवडणूक चिन्हाचे देखील वाटप होणार आहे.

सरकारी कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा :
  • मुंबई : राज्य शासकीय कार्यालयांना २९ फेब्रुवारी २०२० पासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा शासन आदेश सोमवारी जारी करण्यात आला.

  • त्यानुसार शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना सर्व शनिवार व रविवार सुट्टी मिळणार आहे. शाळा, शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये, तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या आस्थापना, प्रकल्प, सफाई कामगार आदींना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही, असे या आदेशात स्पष्ट केले आहे.

  • केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी व अधिकारी संघटनांची मागणी होती.

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दर दिवशी ४५ मिनिटांचा कामाचा कालावधी वाढवून पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद कायदा लागू आहे, अशा कार्यालयांना तसेच ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून गणल्या जातात अशी कार्यालये, शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतन, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसांच्या आठवडय़ातून वगळण्यात आले आहे.

जगातील तीन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होईल - मुकेश अंबानी : 
  • ‘प्रिमिअर डिजिटल सोसायटी’ आणि जगातील तीन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होण्याची संधी भारताकडे असल्याचं मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलं. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला सोमवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.

  • यावेळी ‘फ्यूचर डिकोडेड समिट’चे आयोजन करण्यात आले होते. या समिटला संबोधित करताना अंबानी बोलत होते. “ट्रम्प २०२० मध्ये जो भारत पाहतील तो कार्टर, क्लिंटन आणि ओबामा यांनी पाहिलेल्या भारतापेक्षा वेगळा असेल,” असं अंबानी यावेळी म्हणाले.

  • “२०२० मध्ये नवा भारत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करत आहे. देशातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन आलं असून डिजिटल अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही भारत उत्तमरित्या प्रगती करत आहे,” असंही अंबानी यावेळी म्हणाले. “भारत कशाप्रकारे प्रगती करत आहे, याचं मोटेरा स्टेडिअम उत्तम उदाहरण आहे.

  • या स्टेडिअममधील डिजिटल व्यवस्था ही जगातील कोणत्याही ठिकाणापेक्षा उत्तम आहे. हा नवा भारत आहे. जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होईल याबाबत कोणतीही शंका नाही. फक्त हे पुढील पाच वर्षांमध्ये होईल की दहा वर्षांमध्ये हा चर्चेचा विषय आहे,” असं त्यांनी सांगितलं.

२५ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.