चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ ऑक्टोबर २०२०

Date : 23 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान के.पी.ओली यांनी ‘रॉ’ चीफची भेट घेतल्याने नेपाळमध्ये मोठा वाद :
  • भारत विरोधी भूमिकेसाठी ओळखले जाणारे नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली एका नव्या वादात सापडले आहेत. के.पी.शर्मा ओली यांनी अलीकडेच रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंगचे प्रमुख सामंत कुमार गोयल यांची भेट घेतली. या भेटीची माहिती समोर आल्यानंतर, ओली यांच्यावर तीन माजी पंतप्रधान आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी बोचरी टीका केली आहे. रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग म्हणजे ‘रॉ’ ही भारताची प्रमुख गुप्तचर यंत्रणा आहे.

  • पंतप्रधानांनी दुसऱ्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना भेटणे, हे अयोग्य आणि आक्षेपार्ह आहे, अशा शब्दात पुष्पा कमाल दहल प्रचंड, झालानाथ खानाल आणि माधव कुमार नेपाळ या माजी पंतप्रधानांनी टीका केली आहे. माजी उप पंतप्रधान भीम बहादूर रावल आणि नारायण काजी श्रेष्ठा यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या तसेच काहींनी सोशल मीडियावरुन ओलींवर टीका केली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

  • ‘रॉ’ प्रमुखांसोबत दोन तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या बैठकीत काय चर्चा झाली? त्याची माहिती देण्यास या नेत्यांनी सांगितले आहे. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत ही बैठक सुरु होती. सामंत कुमार गोयल आणि टीम विशेष विमानाने काठमांडूला गेली. २४ तासाच्या या दौऱ्यात रॉ प्रमुख आणि टीमने विरोधी पक्षाचे नेते शेर बहादूर देउबा, माजी पंतप्रधान बाबूराम भट्टाराय यांची सुद्धा भेट घेतली.

परदेशी नागरिकांना भारतात येण्यास मुभा :
  • पर्यटकवगळता सर्व परदेशी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसा निर्बंध गुरुवारी शिथिल केले. करोनामुळे फक्त परदेशात राहत असलेल्या भारतीय नागरिकांना देशात येण्याची मुभा होती.

  • आता व्यापारीभेट, परिषदा, नोकरी, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय उपचार आदी कारणांसाठी व्हिसा दिले जातील.

  • विमान वा जलवाहतुकीच्या मार्गाने विदेशी नागरिक, परदेशस्थ भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना भारतात येता येईल. भारताचा अन्य देशांशी झालेला विमान करार (एअर बबल), वंदे भारत मोहीम, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मंजुरीनंतर बिगरव्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या विमानफेऱ्या याद्वारे परदेशातून प्रवाशांना भारतात येणे शक्य होणार आहे. मात्र, या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लागू केलेल्या करोनासंदर्भातील सूचनांचे पालन करणे सक्तीचे असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.

  • केंद्र सरकारने जूनमध्ये अल्पवयीन परदेशी मुला-मुलींना भारतात येण्याची मुभा दिली होती मात्र, परदेशस्थ भारतीय नागरिक वा भारतीय नागरिक असलेल्या किमान एका पालकाचे मुलांबरोबर असणे सक्तीचे होते.

स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लशीच्या तिसऱ्या फेजच्या चाचणीसाठी भारत बायोटेकला परवानगी :
  • देशात अनलॉक पाचचा टप्पा सुरु असताना नागरिकांचे लक्ष करोना व्हायरसला रोखणाऱ्या लशीकडे लागले आहे. सध्याच्या घडीला लस हाच या आजाराला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. दरम्यान ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने गुरुवारी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडला ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी करायला परवानगी दिली आहे.

  • ‘कोव्हॅक्सीन’ ही स्वदेशी लस आहे. काही किरकोळ बदल करुन, डीजीसीआयने लशीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. कंपनीने फेज एक आणि फेज दोन चाचणीचा डाटा तसेच प्राण्यांवरील चाचणीचा डाटा डीजीसीआयच्या तज्ज्ञांच्या समितीसमोर सादर केला. लशीची परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यासाठी तिसऱ्या फेजच्या चाचणीची परवानगी देण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर केला. लस मानवी शरीरासाठी सुरक्षित आहे का ? हे तपासण्यासाठी तिसऱ्या फेजमध्ये हजारो स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येते.

  • काही किरकोळ बदल सुचवून समितीने भारत बायोटेकला तिसऱ्या फेजची चाचणीसाठी परवागनी दिली. आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही) बीबीआयएलने मिळून कोव्हॅक्सीन लस विकसित केली आहे. या लस निर्मिती प्रकल्पात सहभागी असलेल्या एनआयव्हीने करोनाची लागण झालेल्या पण कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या शरीरातून करोना व्हायरसचा स्ट्रेन वेगळा काढला.

  •  त्यानंतर हा स्ट्रेन मे महिन्यात बीबीआयएलला पाठवून दिला. बीबीआयएलने त्या स्ट्रेनपासून एक निष्क्रिय लस तयार केली. त्यानंतर हा स्ट्रेन मे महिन्यात बीबीआयएलला पाठवून दिला. बीबीआयएलने त्या स्ट्रेनपासून एक निष्क्रिय लस तयार केली.

यशोमती ठाकूर यांना दिलासा, शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती :
  • कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली असून पोलिसांना नोटीस बजावली आहे.

  • काय आहे प्रकरण - एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यासह चालक व दोन कार्यकर्त्यांना अमरावती न्यायालयाने ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली होती.

  • मारहाणीची ही घटना २४ मार्च २०१२ रोजी दुपारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडली होती. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी उल्हास रौराळे यांनी तक्रार दिली होती. घटनेच्या दिवशी तत्कालीन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह चुनाभट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. त्यावेळी वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडवले. हा एकेरी मार्ग असल्याचे सांगून त्यांनी वाहन घेऊन जाण्यास मनाई केली. 

२३ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.