चालू घडामोडी आणि दिनविशेष - 23 नोव्हेंबर 2023

Date : 23 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘एसटी’ स्थानकावर ‘आपला दवाखाना’ ; ताफ्यात लवकरच ३४९५ नवीन गाडया
  • राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकावर ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी राज्य परिवहन महामंडळाला दिले.
  • प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षांत ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार असून बस स्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात ३४९५ नवीन गाडया खरेदी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
  • महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल शिंदे यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. या वेळी २२०० साध्या बस घेण्यास मंजुरी दिली. या २२०० परिवर्तन साध्या बस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळय़ा विभागांसाठी १२९५ साध्या बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली. 
  • राज्यातील एकूण बस स्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या पत्नींना  स्टॉल देण्याच्या निर्णयाला मंजुरी देतानाच मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बस स्थानकावर एक स्टॉल देण्याचे आदेश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवेकरिता सामान्यांना परवडेल असेच तिकीट दर ठेवण्याचे आदेश या वेळी दिले.  सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात सुरू करण्यात आलेले ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मोठया आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बस स्थानकांवर सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
‘स्वआधार’ला शासनाचा बालस्नेही पुरस्कार; बालकांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल
  • अत्याचारपीडित, मतिमंद मुलींच्या शिक्षण, पालनपोषणाची जबाबदारी घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसेच अत्याचारपीडितांच्या पालकांना येणार्‍या अडचणीत मदत करणार्‍या आळणी येथील तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहाला राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास आयुक्तालय आणि युनिसेफ यांच्यावतीने राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • बालकांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात महिला व बालविकासमंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुसिबेन शहा, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने सचिव शहाजी चव्हाण, प्रकल्प संचालक गुरूनाथ थोडसरे, मानसोपचारतज्ञ रूपाली कांबळे, शिक्षिका वैशाली पोफळे यांनी राज्य शासनाचा बालस्नेही पुरस्कार स्वीकारला.

या कामांची सरकारकडून दखल

  • लैंगिक शोषणास बळी पडलेल्या अत्याचापीडितग्रस्त मतिमंद मुलींसाठी तुळजाई प्रतिष्ठान पानगाव संचलित स्वआधार मतिमंद मुलीचे बालगृह ही संस्था कार्य करते. समाजातील एचआयव्हीबाधीत मुला-मुलींना देखील त्यांचे आयुष्य इतरांप्रमाणेच चांगले जगता यावे, हा विचार करून संस्थेने एचआयव्ही बाधीत मुलींचे लग्न करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत केली. पाणीटंचाई काळात झाडे जगविण्यासाठी पाण्याची बचत हाच पर्याय हा संदेश समोर ठेवून विदयार्थ्यांनी प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ अंघोळ करून झाडे जगविण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी संस्थेतील मुकबधीर विदयार्थ्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. मतिमंद मुलींसाठी रोपवाटीकेचा प्रकल्प, त्यामध्ये औषधी वनस्पतींची लागवड, बियांपासून रोपे तयार करणे, कलम करणे यांचे प्रशिक्षण मुलींना दिले जाते.
कॅनेडियन नागरिकांना भारताचा दिलासा, पंतप्रधान मोदी - जस्टिन ट्रुडोंमधील बैठकीआधी भारताचा मोठा निर्णय
  • खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. या आरोपानंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत. जस्टिन ट्रुडो सातत्याने भारतावर आरोप करत आहेत, तसेच त्यांच्याकडे भारताविरोधातले पुरावे असल्याचा दावा करत आहेत. भारताने ट्रुडो यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, भारताने २१ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ही सेवा बंद आहे. दरम्यान, भारताने आता कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
  • कॅनडातील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना ‘सुरक्षाविषयक धोका’ असल्यामुळे कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र खात्याने २१ सप्टेंबर रोजी जाहीर केले होते. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालय कार्यालयाच्या संकेतस्थळावरही याबाबतची माहिती देण्यात आली होती. याच्या एक दिवस आधी म्हणजेच २० सप्टेंबर रोजी भारताने कॅनडात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते. भारतविरोधी वाढत्या कारवाया, तसेच राजनैतिक तणाव लक्षात घेता भारताने हा इशारा दिला होता. त्यानंतर कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा देणे बंद केले होते. परंतु, तब्बल दोन महिन्यानंतर भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा सुरू केली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो जी-२० च्या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये (दृकश्राव्य माध्यमातून होणारी बैठक) एकमेकांसमोर येणार आहेत. या बैठकीपूर्वी भारताने कॅनेडियन नागरिकांना दिलासा दिला आहे. उभय देशांमधील संबंध रुळावर आणण्यासाठी भारताने पहिलं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
  • भारत सरकारने कॅनेडियन नागरिकांना व्हिसा देणं थांबवल्यामुळे भारतात येण्याची इच्छा असणाऱ्या, पण अद्याप व्हिसा नसणाऱ्या कॅनडाच्या नागरिकांना या निर्णयाचा फटका बसला होता. यामध्ये भारतात येण्याची इच्छा असणारे उद्योजक, कॅनडाचे पर्यटक, कॅनडाचे विद्यार्थी, तसेच भारतीय नागरिकांचे कॅनडातील नातेवाईक यांनादेखील या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता.
युद्धग्रस्त गाझाला एलॉन मस्क यांचा मदतीचा हात, ‘एक्स’चा महसूल दान करणार
  • इस्रायल आणि हमासमध्ये ७ ऑक्टोबरपासून चालू असलेल्या युद्धामध्ये तह आणि ओलिसांची सुटका होण्याची शक्यता दृष्टीपथात आली आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांच्या बाबतीत एक चांगली बातमी समोर आली आहे. इस्रायल्या मंत्रिमंडळाने गाझामधील ओलिसांच्या सुटकेसाठी हमासबरोबरच्या एका कराराला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता हमासही काही ओलिसांना मुक्त करण्यास तयार झाली आहे. या करारानुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हमास ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांपैकी ३० हून अधिक लहान मुलं आणि त्यांच्या माता मिळून ५० जणांची सुटका करणार आहे. त्या बदल्यात इस्रायलचं सरकार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. ओलिसांची आणि कैद्यांची सुटका करण्यासाठी चार दिवसांच्या युद्धविरामाला मंजुरी देण्यात आली आहे.
  • युद्ध सुरू झाल्यापासून शांततेसाठी आतापर्यंत मिळालेले हे सर्वात सकारात्मक संकेत असल्याचे सांगितले जात आहे. युद्धामध्ये आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त सामान्य पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये साडेपाच हजारांपेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. युद्धामुळे गाझा पट्टीत भंयकर विध्वंस झाला आहे. इथल्या पॅलेस्टिनी नागरिकांची मदत करण्यासाठी जगभरातील अनेक देश धावून आले आहेत. अशातच जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ख्याती असलेल्या एलॉन मस्क यांनी गाझासाठी मदत जाहीर केली आहे.
  • एलॉन मस्क यांनी घोषणा केली आहे की, एक्स (पूर्वीचं ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींमधून मिळणारा महसूल युद्धग्रस्त गाझा आणि इस्रायलमधील रुग्णालयांना दान केला जाईल. मस्क यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एक्स कॉर्पोरेशन जाहिराती आणि सदस्यतेच्या (मेंबरशिप) माध्यमातून मिळणारा महसूल गाझा पट्टीतल्या युद्धग्रस्त जनतेच्या सहाय्यतेसाठी, गाझातील आणि इस्रायलमधील रुग्णालयांना दान करेल.
  • गाझामधील सर्वात मोठं अल-शिफा रुग्णालय आणि इतर काही रुग्णालयांमध्ये गरजेच्या वस्तू नसल्याने ही रुग्णालये सध्या बंद आहेत. या पार्श्वभूमीवर मस्क यांची मदत मिळाल्यानंतर ही रुग्णालये पुन्हा सुरू होऊ शकतात.
युद्धात आतापर्यंत १२ हजार ७०० पॅलेस्टिनींचा मृत्यू; रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले…
  • इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत १२ हजार ७०० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टिन आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दुसरीकडे इस्रायलनेही हमासच्या हल्ल्यात १ हजार २०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धविराम होण्यासाठी जागतिक प्रयत्न होण्यावर भर दिला आहे. ते ब्रिक्सच्या व्हर्च्युअल अधिवेशनात बोलत होते. रशियाच्या सरकारी माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे.
  • व्लादिमीर पुतिन म्हणाले, “इस्रायल हमास युद्धावर रशियाच्या भूमिकेत सातत्य आहे. परिस्थितीत बदलेल तशी रशियाने भूमिका बदललेली नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करतो की, तणाव कमी करण्यासाठी, युद्धविराम व्हावा म्हणून आणि या युद्धावर राजकीय उत्तर शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत.”
  • “युद्धावर तोडगा काढण्याच्या कामात ब्रिक्स देश महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. त्यामुळेच या बैठकीत मध्य पूर्वेतील देशांचा सहभाग महत्त्वाचं आहे,” असं पुतिन यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी दीर्घकाळ चालू असलेल्या इस्रायल हमास युद्धावर दूरगामी शाश्वत उपाय शोधण्यात ब्रिक्स देशांनी एकसारखी भूमिका घेण्यावर भर दिला.


 

आयफोन अनलॉक करणाऱ्या पहिल्या हॅकरला मिळाली ट्विटरमध्ये १२ आठवड्यांची इंटर्नशिप :
  • आयफोन हे सर्वात सुरक्षित उपकरण मानले जाते. इतर मोबाइल फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो अनलॉक करून वापरण्याची सुविधा बाजारात उपलब्ध आहे. मात्र आयफोनमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न केल्यास तसे होत नाही, ही बाब अशक्य कोटीतील होती आणि त्याबद्दल अॅपलला रास्त अभिमानही होता. मात्र त्याला छेद दिला जॉर्ज हॉट्झ याने. २००७ साली त्याने आयफोन यशस्वरित्या अनलॉक करून दाखवला आणि त्यानंतर सॉफ्टवेअरसह हार्डवेअरमध्येही बदल करण्याची वेळ अॅपलवर आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामुळेच अॅपल आयफोनचे पुढचे व्हर्जन वेळेआधीच बाजारात आणण्याची नामुष्कीही अॅपलवर ओढवली. त्याच हॉट्झ याला आता ट्विटरच्या इलॉन मस्क यांनी आगळीवेगळी ऑफर दिली…

  • ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर इलॉन मस्क यांनी सुरुवातीस कंपनीतील अतिवरिष्ठांना घरचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर लगेचच अर्ध्याहून अधिक कर्मचारी वर्ग घरी पाठवला. त्याचा फटकाही कंपनीला बसला आणि ट्विटरचे अनेक ग्राहक सोडून गेले, सेवा संथ झाली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना परतण्याचा आग्रहही ट्विटरने करून झाला. अनेकांनी त्यास सपशेल नकार दिला. आता ट्विटरचे रुतलेले चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न मस्क यांनी सुरू केला असून त्याचसाठी हॉट्झ याला ही ऑफर दिली आहे.

  • ट्विटरचे मुख्यालय असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये १२ आठवड्यांची इंटर्नशिप हॉट्झला दिली आहे. या इंटर्नशिपदरम्यान जॉर्ज ट्विटर सर्चवर काम कऱणार आहे. त्याने त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये याचा थेट उल्लेखच केला आहे. गुगल सर्चसारखा ट्विटर सर्चचा वापर लोक करू लागतील, अशा प्रकारचे बदल त्यात करणे हे आपले लक्ष्य असल्याचे त्याने म्हटले आहे. दरम्यान , या ऑफर संदर्भातील पोस्ट जॉर्जने केल्यानंतर अनेकांनी विविध समस्याच त्याच्याकडे मांडल्या असून त्याच्या इंटर्नशिप दरम्यान त्याने त्या समस्यांची सोडवणूक करावी, अशी गळ त्याला घातली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७१ हजार उमेदवारांना दिली नोकरीची नियुक्तीपत्रे :
  • एकीकडे विरोधकांकडून देशातील बेरोजगारीच्या समस्येवरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात असताना दुसरीकडे मोदी सरकारनं रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रोजगार मेळावा’ योजनेचा भाग म्हणून तब्बल ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्र दिली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला. शिक्षक, प्राध्यापक, नर्स, नर्सिंग ऑफिसर, डॉक्टर, फार्मासिस्ट्स, रेडिओग्राफर्स अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

  • बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने ‘रोजगार मेळावा’ या नावाने हा उपक्रम सुरू केला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारकडून ७५ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. या सर्व नियुक्त्यांमध्ये सर्वाधिक नियुक्त्या या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये अर्थात सीएपीएफमध्ये करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहविभागाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रोजगारासाठी प्राधान्य दिलं जात असून त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

  • काय म्हणाले पंतप्रधान मोदी? दरम्यान, यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या संवादातून मोदींनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हे स्पष्ट होतंय की केंद्र सरकारनं तरुणांना सरकारी नोकरी देण्याची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. तरुण या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. देशाच्या उभारणीमध्ये त्यांचं कौशल्य वापरलं जावं, याला सरकारकडून प्राधान्य दिलं जात आहे. देशाच्या विकासामध्ये तरुणांचा हातभार लागावा यासाठी रोजगार मेळाव्याची मदत होईल”, असं मोदी यावेळी म्हणाले.

नासाचे ओरियन यान चंद्रालगत :
  • नासाचे ओरियन यान (कॅप्सुल) सोमवारी चंद्रापासून १३५ किलोमीटरवर  पोहोचले. या यानात अंतराळविरांऐवजी चाचणीसाठी तीन मानवी प्रतिकृती ठेवल्या आहेत. हे यान चंद्राच्या पृथ्वीवरून दिसू न शकणाऱ्या विरुद्ध बाजूला पाठविण्यात आले आहे.

  • नासाने ५० वर्षांपूर्वी अपोलो मोहीम राबविली होती. त्यानंतर प्रथमच हे यान चंद्रावर पोहोचले आहे. बुधवारी सुरू केलेल्या चाचणी मोहिमेचे हे मोठे यश आहे. या मोहिमेवर ४१० कोटी डॉलर खर्च केले जात आहेत.

  • चंद्रानजीक यान पोहोचल्यावर सुमारे अर्धा तास त्याचा ह्युस्टनमधील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. या यानाने पृथ्वीचे एक छायाचित्रही पाठविले आहे.

भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका - भारताचा मालिका विजय :
  • पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-न्यूझीलंडमधील मंगळवारी तिसरा आणि अखेरचा ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार बरोबरीत राहिला. त्यामुळे हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील भारताने १-० अशी मालिका जिंकली. जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग (३७ धावांत ४ बळी) आणि मोहम्मद सिराजच्या (१७ धावांत ४ बळी) यांच्या गोलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडला १९.४ षटकांत १६० धावांवर रोखले.

  • आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताने नऊ षटकांत ४ बाद ७५ धावा केल्या होत्या. तेव्हा पावसामुळे खेळ थांबवावा लागला. त्यावेळी कर्णधार पंडय़ा (३०)आणि दीपक हुडा (९) मैदानावर होते. यानंतर पंचांनी सामना पुढे न खेळवण्याचा निर्णय घेतला.

  • भारताची नऊ षटकानंतरची धावसंख्या ही डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार बरोबरीत राहिली. या संपूर्ण मालिकेत पावसाने विघ्न आणले. पहिला ट्वेन्टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, तर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय मिळवला होता.

23 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.