चालू घडामोडी आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2023

Date : 23 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा अंतिम लढत: प्रज्ञानंद-कार्लसन पहिला डाव बरोबरीत
  • भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने मंगळवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनविरुद्धचा पहिला डाव झटपट बरोबरीत सोडवला. भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंदने स्वत:च्याच वेगळय़ा शैलीच्या खेळाने आपल्यापेक्षा सरस असलेल्या अव्वल मानांकित कार्लसनला ३५ चालीतच डाव बरोबरीत सोडविण्यास भाग पाडले.
  • पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना प्रज्ञानंदने भक्कम खेळ केला. लढत बरोबरीत सोडवणे त्याला फारसे कठिण गेले नाही. पूर्ण डावात मी कधी अडचणीत आलो होते, असे वाटले नाही, अशी प्रतिक्रिया प्रज्ञानंदने दिली. पारंपरिक पद्धतीतील दुसरा डाव बुधवारी खेळला जाईल, तेव्हा कार्लसनकडे पांढरे मोहरे असल्यामुळे त्याचे पारडे जड राहिल असे जाणकारांना वाटते.
  • ‘फिडे’च्या ‘ट्विटर’ अकाऊंडवर दिलेल्या प्रतिक्रियेत प्रज्ञानंदने एकवेळ हत्तीच्या चालीला मला काही तरी करणे अपेक्षित होते. मात्र, कार्लसनची ही चाल भक्कम असल्यामुळे मला फार काही करता आले नाही, असे सांगितले. दुसऱ्या डावाविषयी बोलताना प्रज्ञानंदने, माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले जातील. पांढरे मोहरे कार्लसनकडे असल्याने तो जोरात खेळेल यात शंका नाही. पण, आता विश्रांती घेऊन दुसऱ्या डावात पूर्ण शांतपणे उतरण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सांगितले.
  • कार्लसन पहिला डाव पूर्ण शारीरिक ताकदीने खेळू शकला नाही. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे कार्लसन पूर्ण क्षमतेने त्याला खेळण्यास अडथळा येत होता. ‘‘अंतिम फेरीपूर्वी मला विश्रांती मिळाली होती. पण, प्रज्ञानंदला ‘टायब्रेकर’ खेळावा लागल्याने त्याला पुरेश विश्रांती मिळाली नव्हती. मी पहिला डाव पूर्ण क्षमतेने खेळू शकलो नाही,’’ असे कार्लसन म्हणाला. ‘‘प्रज्ञानंदकडून इंग्लिश ओपिनगची अपेक्षा मी बाळगली नव्हती. त्यामुळे मला नियोजन बदलावे लागले. त्यानंतरही पहिल्या डावात अडचणींवर मात करून लढत बरोबरीत सोडवू शकलो यात मी समाधानी आहे,’’ असेही कार्लसनने सांगितले.
तलाठी भरतीसाठीच्या परीक्षा केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी; अन्यथा उमेदवारांवर थेट फौजदारी कारवाई
  • Talathi recruitment 2023 तलाठी भरती परीक्षेसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही परीक्षा घेताना प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांना परीक्षेसाठी जाताना कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर जाताना करण्यात येणाऱ्या तपासणीत इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्यास तातडीने संबंधित उमेदवारांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा भूमी अभिलेख विभागाने दिला आहे.
  •  राज्यभरात तलाठी पदासाठी चार हजार ४६६ जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. त्याकरिता दहा लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज छाननीअंती दाखल झाले. १७ ऑगस्टला सुरू झालेली ही १४ सप्टेंबपर्यंत होणार आहे. आतापर्यंत १७, १८, १९, २०, २१ आणि मंगळवारी २२ ऑगस्ट असे सहा दिवस तीन सत्रांत राज्यभरात परीक्षा झाली. त्यामध्ये राज्यात काही ठिकाणी पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सोमवारी (२१ ऑगस्ट) तांत्रिक कारणांमुळे परीक्षा दोन तास विलंबाने सुरू झाली. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून काटेकोर नियोजन करत उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी घातली आहे.
  • अप्पर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते म्हणाले, की तलाठी भरतीची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी केली आहे. त्याबाबत उमेदवारांना यापूर्वीच कळवण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी परीक्षा केंद्रांवर तपासणीदेखील करण्यात येत आहे. या तपासणीत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू निदर्शनास आल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • दरम्यान, ऑनलाइन परीक्षा नको असणाऱ्या घटकांकडून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, टीसीएस कंपनीचा अधिकारी यांची समिती केली आहे. अनुचित घटना घडल्यास थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही रायते यांनी सांगितले.

अशी होईल परीक्षा

  • पहिल्या टप्प्यातील १७ ते २२ ऑगस्टपर्यंत परीक्षा पार पडली आहे. आता परीक्षेचा दुसरा टप्पा २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत, तर तिसरा टप्प्यात ४ ते १४ सप्टेंबर या कालावधीत राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षा होणार आहे. २३, २४, २५ ऑगस्ट, तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या दिवशी परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले नाही, असेही भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत; आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा होणार
  • दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या १५ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष पॉल माशातिले यांनी विमानतळावर त्यांचे सन्मानाने स्वागत केले आणि त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी विमानतळावर मोदी यांच्या स्वागतासाठी मोठय़ा प्रमाणात भारतीय वंशाचे लोक उपस्थित होते. त्यामध्ये प्रिटोरिया हिंदू समाज संस्थेच्या कार्यकर्त्यांचा आणि स्वामीनारायण संस्थेच्या सदस्यांचा समावेश होता.
  • करोना महासाथीनंतर ‘ब्रिक्स’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची प्रथमच प्रत्यक्ष समोरासमोर शिखर परिषद होत आहे. ही परिषद मंगळवार ते गुरुवार अशी तीन दिवस चालणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्सच्या रशिया वगळता इतर सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान मोदी यांची भेट होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले असल्यामुळे ते दक्षिण आफ्रिकेला न जाता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
  • त्यापूर्वी, शिखर परिषदेसाठी निघताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील मोठय़ा लोकसंख्येच्या समस्यांवर चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी ब्रिक्स हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामध्ये अनेक स्तरांवर विकास आणि सुधारणा यांचा समावेश आहे. या शिखर परिषदेमध्ये सदस्य देशांना भविष्यात सहकार्याचे क्षेत्र ओळखणे आणि संस्थात्मक विकासांचा आढावा घेणे यासाठी उपयुक्त संधी मिळणार आहे. या परिषदेसाठी आफ्रिका खंडातील आणि पश्चिम आशियामधील २० पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. मंगळवारी आणि गुरुवारी होणाऱ्या विविध चर्चामध्ये हे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. तर बुधवारी होणाऱ्या शिखर परिषदेत केवळ ‘ब्रिक्स’चे सदस्य देश सहभागी होणार आहेत.

जगात ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांचे स्थान

  • ‘ब्रिक्स’ गटामधील ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये जगातील ४१ टक्के लोकसंख्या राहते आणि या पाच देशांचा जागतिक जीडीपीचा वाटा २४ टक्के आहे. तसेच या पाच देशांमध्ये होणारा व्यापार हा जागतिक व्यापाराच्या १६ टक्के आहे.
इतिहास घडविण्यास ‘इस्रो’ सज्ज; ‘चंद्रयान-३’ मोहिमेतील विक्रम लँडरचे आज चंद्र पृष्ठावर अवतरण
  • ISRO Chandrayaan-3 Moon Mission Landing ४१ दिवसांचा अंतराळ प्रवास केल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर आज, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यासाठी इस्रोचे संशोधक सज्ज झाले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश बनणार आहे.
  • बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडरचे चंद्रपृष्ठावर अवतरण करण्यात येणार असल्याचे इस्रोच्या संशोधकांनी सांगितले. ‘चंद्रयान-३’ ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरण करणारा भारत चौथा देश बनणार आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशिया या देशांच्या अंतराळ यानाचे चंद्रपृष्ठावर अवतरण करण्यात आले आहे. २०१९ मध्ये अपयशी ठरलेल्या ‘चंद्रयान-२’चीच पुढील मोहीम म्हणून ‘चंद्रयान-३’ मोहीम आखण्यात आली होती.
  • चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि अलगद अवतरण, चंद्राचा अभ्यास आणि वैज्ञानिक प्रयोग करणे ही या मोहिमेची वैशिष्टय़े आहेत. अवतरणापूर्वी विक्रम मॉडय़ूलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त अवतरण स्थळी सूर्योदयाची प्रतीक्षा केली जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण करण्यापूर्वी ५.४५ वाजता अवतरणाची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे, असे इस्रोच्या संशोधकांनी सांगितले.

अडचणी आल्यास अवतरण लांबणीवर

  • ‘चंद्रयान-३’चे अवतरण बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता करणार असले, तरी काही अडचणी आल्यास अवतरणाची वेळ बदण्यात येऊ शकते, अशी माहिती इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश एम. देसाई यांनी दिली. बुधवारी अलगद अवतरणात काही समस्या अथवा अडथळे आल्यास चंद्रपृष्ठावर यान उतरण्याची प्रक्रिया २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते, असे देसाई यांनी सांगितले. ‘इस्रो’कडून यंत्रणेची नियमित तपासणी सुरू असून सर्व काही सुरळीत सुरू आहे. बुधवारी वेळापत्रकानुसारच अलगद अवतरण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही देसाई म्हणाले.
भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूने एकाच दिवशी ठोकले २ शतक, आजपर्यंत मोडला नाही १२५ वर्षांपूर्वीचा हा विक्रम
  • क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम रचले गेले आहेत. परंतु, १२७ वर्षांपूर्वी म्हणजे आजच्याच दिवशी २२ ऑगस्टला भारताच्या एका दिग्गज खेळाडूनं मैदानात धावांचा पाऊस पाडून एकाच दिवशी दोन शतक ठोकले होते. या खेळाडूच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद असून आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटरने हा विक्रम मोडला नाहीय. कुमार श्री रणजीत सिंहजी असं या स्टार खेळाडूचं नाव असून त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये या विक्रमाला गवसणी घातली होती. एक दिवसात दोनवेळा शतक ठोकण्याचा कारनामा त्यांनी केला होता.
  • रणजीत सिंहजीने वर्ष १८९६ मध्ये ससेक्ससाठी खेळत असताना ही चमकदार कामगिरी केली होती. इंग्लडच्या होव शहरात खेळलेल्या त्या सामन्यात यॉर्कशायरने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात ससेक्सच्या टीमने तिसऱ्या दिवशी रणजीत सिंहजी यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात १९१ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना फॉलोऑनचा सामना करावा लागला. त्यानंतर रणजीत सिंहजीने तिसऱ्या दिवशी पुन्हा शतकी खेळी करून ससेक्सला दोन विकेट्स गमावल्यानंतर २६० धावांपर्यंत पोहोचवलं आणि सामना रद्द झाला.
  • रणजीत सिंहजी यांच्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने दोन शतक ठोकले नाहीत. विक्टोरियासाठी खेळताना मॅथ्यू एलियटने ३१ डिसेंबर १९९५ ला १०४ धावा केल्या आणि त्यानंतर फॉलोऑन इनिंग्समध्ये १३५ धावा केल्या. परंतु, एलियटने पहिल्या डावात केलेल्या धावांमधून ९८ धावा ३० डिसेंबरलाच केल्या होत्या. मात्र, एलियटची तुलना रणजीत सिंहजी यांच्या विक्रमाशी करता येऊ शकत नाही.
  • स्पेनचा फलंदाज तारिक अली अवानने यूरोपियन चॅम्पियनशिपच्या डिव्हिजन २ मध्ये ४ सप्टेंबर २०१२ ला दोन शतक केले होते. पहिल्यांदा तरिकने एस्टोनिया विरोधात ६६ चेंडूत नाबाद १५० धावांची खेळी केली होती. पुन्हा त्याच दिवशी पोर्तुगालविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमध्ये १४८ धावा केल्या. तारिक अली अवानने टी-२० क्रिकेटमध्ये हे दोन्ही शतक ठोकले होते.

 

लक्ष्य, प्रणॉयवर भारताची भिस्त ; जागतिक बॅडिमटन स्पर्धेला आजपासून सुरुवात :
  • दुखापतीमुळे माघार घ्यावी लागलेल्या पी. व्ही. सिंधूच्या अनुपस्थितीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेत युवा लक्ष्य सेन आणि अनुभवी एचएस प्रणॉयवर भारताची भिस्त असणार आहे.

  • जागतिक स्पर्धेत एका सुवर्णपदकासह एकूण पाच पदके जिंकणाऱ्या सिंधूला घोटय़ाच्या दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. तिच्या अनुपस्थितीत प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत आणि प्रामुख्याने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्यच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांची नजर असेल.

  • भारतीय खेळाडू २०११ पासून जागतिक स्पर्धेत रिकाम्या हाताने परतलेले नाहीत. गेल्या वर्षी पुरुष विभागात श्रीकांत आणि लक्ष्य यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळविले होते. परंतु यंदा त्यांना अधिक अवघड आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. गेल्या वर्षी केंटो मोमोटा, तसेच इंडोनेशियाचे जोनाथन क्रिस्टी आणि अँथनी गिंटिंग यांनी जागतिक स्पर्धेतून माघार घेतली होती. या वेळी मात्र सर्व प्रमुख खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. असे असले तरी भारतीय पुरुष खेळाडूंना सुवर्णपदकासाठी दावेदार मानले जात आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी आपली छाप पाडली आहे. लक्ष्यने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पणात सुवर्णपदकाला गवसणी घातली. ऑल इंग्लंड स्पर्धेचे उपविजेतेपदही त्याच्या गाठीशी आहे. तसेच थॉमस चषक विजेतेपदातही लक्ष्यचा मोलाचा वाटा होता.

  • लक्ष्यला नववे मानांकन मिळाले असून तिसऱ्या फेरीत त्याची गाठ प्रणॉयशी पडू शकते. त्यापूर्वी दुसऱ्या फेरीत प्रणॉयला अग्रमानांकित मोमोटाचे आव्हान परतवून लावावे लागेल. श्रीकांतला १२वे मानांकन मिळाले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील अपयश मागे सारण्यासाठी तो उत्सुक असेल.

१७ वर्षीय प्रज्ञानंदने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला केलं पराभूत; ठरला स्पर्धेचा उपविजेता :
  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पुन्हा एकदा विश्वविजेता ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनला पराभूत केलं आहे. आजच त्याने एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये हा पराक्रम केला आहे. मियामी येथे सुरु असणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रज्ञानंदने मॅग्नसवर विजय मिळवला. हा मागील सहा महिन्यांच्या कालावधीमधील मॅग्नसविरुद्धचा तिसरा विजय ठरला आहे. या विजयासहित प्रज्ञानंद या स्पर्धेचा उपविजेता ठरला आहे.

  • आर. प्रज्ञानंदची एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेतील विजयाची मालिका शनिवारी खंडित झाली. पाचव्या फेरीच्या लढतीत चीनच्या क्वँग लिएम लीने प्रज्ञानंदला २.५-०.५ अशा फरकाने पराभूत केले. प्रज्ञानंदने या स्पर्धेची अप्रतिम सुरुवात करताना पहिल्या चार फेऱ्यांमध्ये अनुक्रमे अलिरझा फिरौझा, अनिश गिरी, हान्स निमन आणि लेव्हॉन अरोनियन यांच्यावर मात केली होती. पाचव्या फेरीत मात्र त्याला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. या लढतीतील पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर लिएमने दुसऱ्या आणि तिसऱ्या डावात विजयांची नोंद केली.

  • कार्लसन प्रज्ञानंदविरुद्धचा सामना जिंकेल असं वाटत होतं. मात्र त्याने या सामन्याच्या शेवटाकडे बऱ्याच चुका केल्या. सर्वाधिक गुणांच्या पार्श्वभूमीवर त्याला स्पर्धेचा विजेता जाहीर करण्यात आलं. प्रज्ञानंदने या विजयासहित दुसरं स्थान मिळवलं. या स्पर्धेमध्ये मॅग्नस कार्लसनने जेतेपद पटकावलं असून अवघ्या एका गुणानं प्रज्ञानंदला जेतेपदानं हुलकावणी दिली आहे. प्रज्ञानंदचे १५ तर विजेता ठरलेल्या कार्लसनचे १६ गुण आहेत.

  • मात्र या पराभवानंतरही खचून न जाता आर. प्रज्ञानंदने दमदार पुनरागमन करत मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनचा यान-क्रिस्टोफ डुडाने चार डावांमधील २-२ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये २-४ असा पराभव केला होता.

प्रशासकीय समितीचे अधिकार संपविण्याची तयारी :
  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) ‘फिफा’कडून लादण्यात आलेली बंदी उठविण्यासंदर्भात केंद्र सरकारने तातडीची भूमिका घेत प्रशासकीय समितीचा कार्यकाळ संपविण्याबाबत रविवारी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.

  • ‘एआयएफएफ’चे निलंबन आणि कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद वाचविण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि ‘फिफा’ यांच्यात चर्चा सुरू होती. त्याच वेळी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या याचिकेवर सोमवारी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच केंद्र सरकारने ‘फिफा’च्या सर्व अटी मान्य करत ‘एआयएफएफ’ वरील प्रशासकीय समितीचा कार्यकाळ संपविण्याची तयारी दर्शवली असून तसा प्रस्ताव एका अर्जाद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केला.

  • केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अर्जात ‘फिफा’च्या सर्व अटी स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये प्रशासकीय समितीचा कार्यकाळ संपुष्टात आणणे आणि वैयक्तिक सदस्यांना निवडणूक प्रक्रियेत सामावून न घेणे या अटींचा समावेश आहे. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीला ‘एआयएफएफ’च्या कारभारापासून दूरच ठेवण्यात येईल, असेही या अर्जात म्हणण्यात आले आहे. अशा वेळी ‘एआयएफएफ’चा कारभार हंगामी सचिवाकडून बघितला जाईल आणि यात प्रशासकीय समितीची कुठलीही भूमिका नसेल, असे या अर्जात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई अर्ध-मॅरेथॉन स्पर्धा - छगन, कविताला जेतेपद :
  • महाराष्ट्राच्या छगन बोंबले आणि आंध्र प्रदेशच्या कविता रेड्डीने रविवारी झालेल्या मुंबई अर्ध-मॅरेथॉनमध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे जेतेपद मिळवले.

  • छगनने २१ किमीची शर्यत १ तास आणि १६.११ सेकंद अशा वेळेत पूर्ण केली. या शर्यतीत भगतसिंग वळवीने (१:१७.५१ सेकंद) दुसरे, तर अनिल जिंदलने (१:१८.२० सेकंद) तिसरे स्थान मिळवले. महिलांमध्ये कविताने १ तास आणि ३७.०३ सेकंद अशी वेळ नोंदवत अग्रस्थान मिळवले. तन्मया करमरकर (१:४०.१८ सेकंद) आणि केतकी साठे (१:४४:५५ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या शर्यतीच्या सुरुवातीला झेंडा दाखवला.

  • पुरुषांच्या १० किमी शर्यतीत अमित माळीने ३३ मिनिटे आणि ४२ सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. करण शर्मा (३३:४४ सेकंद) दुसऱ्या आणि संजय झाकणे (३३:५० सेकंद) तिसऱ्या स्थानी राहिले. महिलांच्या शर्यतीत रोहिनी पाटीलने ४१ मिनिटे, ३२ सेकंद अशा वेळेसह अग्रस्थान पटकावले. प्रियंका पैकाराव (४२:२६ सेकंद) आणि प्रियंका कैलाशने (४३:५१ सेकंद ) अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले.

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड २० सप्टेंबपर्यंत ; प्रक्रिया सुरू, कार्य समिती अंतिम तारीख ठरवणार :
  • काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडप्रक्रियेस रविवारी सुरुवात झाली. २० सप्टेंबपर्यंत ही निवडप्रक्रिया कुठल्याही स्थितीत पूर्ण करणार, असा निर्धार पक्षाच्या निवडणूक यंत्रणेने व्यक्त केला.

  • काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले, की पक्षाध्यक्ष निवडणुकीची अंतिम तारीख काँग्रेस कार्य समिती (सीडब्ल्यूसी) निश्चित करेल. २० सप्टेंबपर्यंत कोणत्याही दिवशी ही निवड करण्यात येईल.

  • ‘सीडब्ल्यूसी’ने १६ एप्रिल ते ३१ मे २०२२ दरम्यान ब्लॉक समिती आणि प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यांची निवडणूक, जिल्हा समिती अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड १ जून ते २० जुलैदरम्यान व प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्यांची निवडणूक २१ जुलैपासून २० ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतला होता. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) अध्यक्षांची निवड २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबरदरम्यान होईल.

  • मिस्त्री यांनी निर्धार व्यक्त करताना सांगितले, की या निवडणूक कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. आम्ही पक्षनेतृत्वाला हा निवडणूक कार्यक्रम पाठवला आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणुकीची अंतिम तारीख ‘सीडब्ल्यूसी’ निश्चित करणार आहे. त्याची आता प्रतीक्षा सुरू आहे. ब्लॉक, जिल्हा, प्रदेश काँग्रेस समिती स्तरावर संघटनात्मक निवडणुका झाल्या आहेत का, असे विचारल्यावर मिस्त्री यांनी सांगितले, की या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ‘एआयसीसी’ प्रतिनिधींच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे प्रतिनिधी पक्षाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत मतदान करतील. ‘सीडब्ल्यूसी’ ही अंतिम तारीख जाहीर करेल. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मते २० सप्टेंबपर्यंत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड पूर्ण होईल.

  • जी-२३चे लक्ष : दरम्यान, काँग्रेसमधील ‘जी-२३’ गट या निवडणूक प्रक्रिया आणि त्याच्या पारदर्शकतेवर बारकाईने लक्ष ठेवेल. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपेंद्रसिंह हुड्डा आणि मनीष तिवारींसह ‘जी-२३’ गटातील नेत्यांनी ‘सीडब्ल्यूसी’पासून ब्लॉक स्तरापर्यंतच्या निवडणुका योग्य रीत्या घेण्याचा आग्रह धरला आहे.

23 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.