लोकसेवा आयोगाने पात्र ठरविलेल्या अभियंत्याच्या नियुक्त्या अद्याप रखडलेल्याच
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभियांत्रिकीपदाची परीक्षा २०२० साली घेतली होती. त्याचा निकाल लावत पाचशे पात्र विद्यार्थ्यांची शिफारस शासनाकडे केली. बांधकाम व जलसंपदा खात्यात या नियुक्त्या अपेक्षित होत्या. आता प्रक्रिया होऊन दीड वर्ष लोटले. मात्र या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाली नाही.
मंत्रालयात पाठपुरावा घेवून ते थकले. पण दाद लागली नाही. उच्च न्यायालयाने आयोगाच्या परीक्षेत आर्थिक दुर्बल घटकाचे दहा टक्के विद्यार्थी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बाजूला ठेवावे व इतर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करीत नियुक्तीचा मार्ग मोकळा केल्याचे या बाबत पाठपुरावा करणारे प्रा. दिवाकर गमे निदर्शनास आणतात. याच आधारे पोलीस उपनिरीक्षक पदाचा मार्ग मोकळा झाला, असे स्पष्ट करण्यात आले.
या वंचित विद्यार्थ्यांची बाजू मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मांडण्यात आल्यावर त्यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश देण्याची हमी दिली आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत या नियुक्त्या व्हाव्यात, असे पत्र सचिवांना देण्यात आल्याची माहिती प्रा. गमे यांनी दिली.
विराट कोहलीने ५००व्या सामन्यात केला मोठा विक्रम, ‘हा’ कारनामा करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज
त्रिनिदाद येथे गुरुवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा दोन्ही संघांतील १००वा कसोटी आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ५००वा सामना आहे. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. तसेच विराटच्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही विक्रमांची ही मालिका थांबली नाही. विराटने या खास सामन्यात असा पराक्रम केला आहे, जो जगातील कोणताही फलंदाज करू शकला नाही.
विराटने जगात कोणालाही न जमलेला केला कारनामा -
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले. विराटने १६१ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट आपल्या ५०० व्या सामन्यात अर्धशतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराटपूर्वी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या जगातील एकाही खेळाडूला अर्धशतक झळकवता आले नाही. विराटच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३० वे अर्धशतक आहे.
२०११ मध्ये विराटने कसोटी पदार्पण केले होते -
विराट कोहलीने ऑगस्ट २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर २०१० मध्ये त्याने टी-२० आणि २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले. त्यानंतर पुढचे दशकभर क्रिकेट जगतात त्याने राज्य केले. महत्त्वाच्या प्रसंगी त्याने मोठ्या खेळी खेळून चाहत्यांची मने जिंकली आहेत. आशिया कप २०१२ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध १८३ धावांची खेळी केली होती.
सचिननंतर विराट कोहलीच्या नावावर आहे हा विक्रम -
भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० हून अधिक सामने खेळणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरनंतर क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू आहे. त्याने ७५ शतके ठोकली आहेत. कोहलीने भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ७ द्विशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर कर्णधार म्हणून तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामना जिंकणारा खेळाडू आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४० कसोटी सामने जिंकले आहेत.
तलाठी नक्की काय करतात? त्यांच्या पदाला इतकी मागणी असते?
राज्यात ४ हजार ६४४ तलाठी पदांसाठी ११ लाखांहून अधिक अर्ज आले. महसूल यंत्रणेतील तलाठी पदाची प्रतिमा तशी नकारार्थीपणे रुजलेली. ‘जे लिहिले लल्लाटी तेही बदले तलाठी’ अशी ओळख असली तरी तलाठी नक्की काय काम करतात, डिजिटल युगात या पदाची गरज, कार्यशैली बदलली आहे काय, या पदांना इतकी मागणी आजही का असते याविषयी…
तलाठी पदाची निर्मिती कधीची आणि ते पद का महत्त्वाचे?
ऐतिहासिक पुस्तकांमध्ये ‘पट्टकिन’ असा शब्द वापरला जात असे. पुढे त्याचे नामकरण ‘पटवारी’ झाले. सध्याची अनेक आडनावे इतिहासातील महसूल यंत्रणेशी संबंधित आहेत. आजही भारतीय प्रशासन सेवेत इतिहासातील मौर्य आणि चोल साम्राज्यातील महसूल यंत्रणेचा अभ्यास केला जातो. गावातील जमिनींचा, पिकांचा हिशेब ठेवणारा हिशेबनीस म्हणजे तलाठी. महसूल अधिनियमाच्या १९६६ च्या कायद्यान्वये सध्याची तलाठी ही व्यवस्था काम करते. तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रास साझा किंवा सज्जा असे म्हटले जाते. गावातील इंचन् इंच जमिनीच्या तसेच जलस्रोतांच्या नोंदी ठेवणे हे तलाठी पदाचे मुख्य काम. त्यामुळे हे पद महत्त्वाचे.
महसुली यंत्रणेत सध्या २१ प्रकारचे नमुने त्यासाठी आहेत. त्यातील ७ क्रमांकाचा नमुना जमिनीचा अधिकार दाखविणारा आणि १२ क्रमांकाचा नमुना पिकांची नोंद सांगणारा. या दोन्ही नमुन्यांच्या तपशिलांचा मिळून तयार होतो ‘सातबारा’. त्याच्या नोंदी घेणारी व्यक्ती म्हणजे तलाठी. खरे तर घेतलेल्या नोंदी मंजूर करण्याचे अधिकार तलाठ्यांकडे नाही, तर ते मंडळ अधिकाऱ्यांकडे असतात. पण लोकांचा संपर्क आणि गावातील अनेक प्रकारची कामे करणारा असल्याने तोच सारे काही करतो, असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे.
गावस्तरावरचा कोणता तपशील महसूल यंत्रणेत कसा ठेवला जातो?
तलाठ्यांनी जमिनीच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवण्यासाठी २१ प्रकारचे नमुने होते. त्यातील पहिला नमुना हा गावाच्या क्षेत्राचा तपशील असणारा. त्यात अनेक उपनमुने आहेत. म्हणजे गावातील सरकारी जमीन किती, खासगी आणि अतिक्रमित जमिनीच्या नोंदी तलाठ्यास स्वतंत्रपणे घ्याव्या लागतात. यात देवस्थानाच्या जमिनी, इनामी जमिनी, त्यातून मिळणारा महसूल, त्याच्या पावत्या यासह लागवडीखालील जमीन आणि अकृषी म्हणजे नॉन ॲग्रीकल्चर जमीन याचे नमुने येतात. गावातील कोणत्या जमिनीतून उपकर किंवा सेस मिळतो याचा नमुना ठराव बंद या नावाने असतो. यामध्ये गौण खनिजांची नोंद असते. म्हणजे मुरूम किती होता, किती काढला गेला, डोंगर कोणी खणले का, किती खडक उचलण्यास परवानगी देण्यात आली होती, प्रत्यक्षात किती उचलली अशा नोंदीही तलाठ्यांनाच घ्याव्या लागतात. त्याचे २१ नमुने भरणे हे तलाठ्याचे काम. यातील १२ क्रमांकाचा नमुना हा पिकांच्या नोंदीचा असतो.
त्या इमर्जन्सी अलर्ट मेसेजला घाबरू नका, बघा आणि दुर्लक्ष करा, जिओकडून ग्राहकांना सूचना
अनेकांच्या स्मार्टफोनवर सकाळी एक अलर्ट मेसेज आला. भारत सरकारच्या नावाने आलेला हा मेसेज नेमका काय आहे? हे न कळाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु यात चिंता वाटून घेण्याचे काही कारण नाही.
केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने या अलर्टच्या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेतली. त्याचा हा मेसेज होता, असे जिओकडून कळवण्यात आले आहे.
तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल तर काळजी करू नका. यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या स्मार्टफोनला कोणताही धोका नाही. भारत सरकारच्या विभागाकडून करण्यात आलेली ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता.
टेलिकम्युनिकेशन विभागाने पाठवलेल्या या चाचणी संदेशात मराठी भाषेतही अलर्ट आला होता. सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळात म्हणजे १०.३१ वाजता मराठीमध्ये एक अलर्ट आला. पण घाबरून जाऊ नका, मसेज बघा आणि दुर्लक्ष करा, असे जिओने कळवले आहे.
स्टुअर्ट ब्रॉडने रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पाचवा गोलंदाज
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात ॲशेस मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ बुधवारी पार पडला. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक मोठा विक्रम केला आहे. ट्रॅव्हिस हेडची विकेट घेत ब्रॉडने कसोटी क्रिकेटमधील ६०० विकेट्स पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा ब्रॉड हा इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी केवळ महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इंग्लंडसाठी हा पराक्रम केला आहे.
स्टुअर्ट ब्रॉड जगातील पाचवा गोलंदाज ठरला -
स्टुअर्ट ब्रॉडच्या आधी जेम्स अँडरसनने हा विक्रम आपल्या नावावर केला असून सध्या त्याच्या नावावर ६८८ कसोटी विकेट्स आहेत. याशिवाय हा टप्पा गाठणारा ब्रॉड हा जागतिक क्रिकेटमधील पाचवा गोलंदाज ठरला. यासह ब्रॉड हा पराक्रम करणाऱ्या जगातील निवडक गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे.
ख्वाजाची विकेट घेत खाते उघडले -
ब्रॉडने चौथ्या ॲशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाची तीन धावांवर विकेट घेत आपले खाते उघडले. या अनुभवी वेगवान गोलंदाजाने दिवसाच्या खेळाच्या पहिल्या तासातच फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियन सलामीवीरला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर ब्रॉडने हेडला बाद करून हा विशेष विक्रम गाठला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज -
मुथय्या मुरलीधरन - १३३ कसोटीत ८०० विकेट्स
शेन वॉर्न - १४५ कसोटीत ७०८ विकेट्स
जेम्स अँडरसन - १८२ कसोटीत ६८८* विकेट्स
अनिल कुंबळे - १३२ कसोटीत ६१९ विकेट्स
स्टुअर्ट ब्रॉड - १६६ कसोटीत ६००* विकेट्स
Emergency Alert Serve : … आणि अचानक नागरिकांच्या मोबाईलवर भारत सरकारच्या नावाने अलर्ट
देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. तसेच मोबाईलवर हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा असल्याचं सांगण्यात आलं.
विशेष म्हणजे अशाप्रकारच्या आपतकालीन संदेश सेवेच्या चाचणीचा अलर्ट देण्यात येणार असल्याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या अलर्टबाबत नागरिक अनेक शक्यता व्यक्त करत आहेत. या अलर्टनंतरही केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीच्या ट्विटर हँडलवरही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
नेमकं काय घडलं?
सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाईलधारकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला. यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचं सांगण्यात आलं. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला.
आपतकालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं. तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले. आधी हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत आला.
विशेष म्हणजे सर्व अँड्रॉईड मोबाईलवर हा संदेश आला असला, तरी अॅपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही.
आता आफ्रिकेतही वाजणार आयपीएल फ्रँचायझींचा डंका; टी २० लीगमधील सर्व संघ केले खरेदी :
‘इंडियन प्रीमियर लीग’ या क्रिकेट स्पर्धेची लोकप्रियता बघता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने स्वत:ची स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षीपासून ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पहिल्या हंगामामध्ये एकूण सहा संघ खेळवण्याची तयारी झाली आहे. या संघांची लिलाव प्रक्रिया संपली आहे. हे सर्वच्या सर्व सहा संघ आयपीएलमधील संघ मालकांनी विकत घेतले आहेत.
मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांनी दक्षिण आफ्रिकेतील टी २० लीगमधील संघ विकत घेतले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी या लीगला ‘मिनी आयपीएल’ असे संबोधण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई इंडियन्सच्या मालकांनी केपटाऊन, चैन्नई सुपर किंग्जच्या मालकांनी जोहान्सबर्ग, लखनऊ सुपर जायंट्सच्या मालकांनी डरबन, दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांनी प्रिटोरिया, राजस्थान रॉयल्सच्या मालकांनी पार्ल आणि सनरायझर्स हैदराबादच्या मालकांनी पोर्ट एलिझाबेथ फ्रँचायझी खरेदी केली आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने सर्व फ्रँचायझींचे अभिनंदन आणि स्वागत केले आहे. “जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकन लीगमध्ये आमच्या नवीन फ्रँचायझी मालकांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी हा खरोखरच रोमांचक काळ आहे”, असे स्मिथ म्हणाला.
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती :
श्रीलंकेमध्ये आज नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत. मागील ४४ वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.
काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. २२५ सदस्य असणाऱ्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची आवश्यकता होती. रानिल विक्रमसिंघे यांना स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांना १३४ मतं मिळाली आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी १४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. राजपक्षे यांनी १३ जुलै रोजी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर १४ जुलै रोजी ते सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांच्याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. परिणामी राजपक्षे यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे. यानंतर आता गोताबया यांच्या जागी नवीन राष्ट्रपती म्हणून रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत.
आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकेसमोर कर्जाचा डोंगर असून यासंदर्भात नवीन राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करून, मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या देशातील दोन कोटी २० लाख लोक इंधन, गॅस, दुधाची पावडर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड देत आहेत.
ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय :
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या बांठिया आयोगानं इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रीपल टेस्टची पूर्तता देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.
खरंतर, महाराष्ट्रात अनेक महानगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर व्हाव्यात, अशी भूमिका तत्कालीन राज्य सरकारने घेतली होती. तसेच ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून न्यायालयीन लढाई लढली जात होती. आज यावर सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत. यात आता आणखी विलंब करू नका. पुढील दोन आठवड्याच्या आत निवडणुका जाहीर करा, अशा सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. याच्याआधीही न्यायालयाने पाऊस कमी असलेल्या ठिकाणी निवडणुका घेण्यास सांगितलं होतं.
आज मतमोजणी; द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? भारताला मिळणार नवीन राष्ट्रपती :
देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय होणार की विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदी विराजमान होणार हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. देशाचे १६ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला. त्यामुळे आज या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.
मुर्मू विजयी झाल्यास त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या म्हणून २५ तारखेला सर्वोच्च पदावर विराजमान होतील. मूळच्या ओदिशाच्या असलेल्या मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला तर आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती होणार आहेत. प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. आपल्या निवडीमुळे आदिवासी समाजाला आनंदच होईल, अशा प्रतिक्रिया द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली.