‘ब्रह्मोस’ या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची भारताने गुरुवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ यशस्वी चाचणी केली.
‘कंट्रोल सिस्टीम’सह नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या या क्षेपणास्त्राचे चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून सकाळी १०.४५च्या सुमारास चाचणी प्रक्षेपण करण्यात आले, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) एका सूत्राने दिली. या चाचणीच्या तपशिलांचे विश्लेषण करण्यात येत असल्याचेही तो म्हणाला.
ज्याचे विचार आणि दृष्टिकोन हे नावीन्यपूर्ण आणि निर्णय पुरोगामी आहेत, असा भारत उदयाला येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. ज्यात कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला स्थान नाही अशी रचना देशात निर्माण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
व्यक्तीची प्रगती ही राष्ट्राच्या प्रगतीशी जोडली गेली असल्याचे मोदी यांनी ‘आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’च्या उद्घाटन समारंभात दूरसंवादाद्वारे केलेल्या प्रमुख भाषणात सांगितले आणि देशाच्या उत्थानासाठी प्रत्येकाच्या कर्तव्याला महत्त्व देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगतानाच, अशा प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्याची आणि देशाचे योग्य चित्र उभे करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
कर्तव्यावर भर देताना पंतप्रधांनांनी सांगितले की, ‘‘आपल्याला हे मान्य करायला हवे, की स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये आपला समाज, आपला देश आणि आपणा सर्वांना एक प्रकारच्या अस्वस्थतेने ग्रासले आहे. आपण आपल्या कर्तव्यांपासून दूर गेलो आणि त्यांना प्राधान्य दिले नाही, याची ही अस्वस्थता आहे.’’
‘बोईंग बी ७७७’ प्रकारातील भारतातून अमेरिकेला जाणारी सहा विमाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एअर इंडियाकडून घेण्यात आला. या विमानांच्या निर्मात्याने ही विमाने चालवण्यास कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर एअर इंडियाकडून हा निर्णय घेण्यात आला.
भारत-अमेरिका मार्गावरील आठ विमाने रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियाने बुधवारी घेतला होता. उत्तर अमेरिकेत ५जी इंटरनेटमुळे या विमानांच्या रेडिओ अल्टिमीटरमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
अमेरिकेच्या केंद्रीय विमान वाहतूक प्रशासनाने गुरुवारी सांगितले की, ‘बोईंग बी ७७७’सह काही प्रकारच्या विमानांमध्ये विशिष्ट प्रकारचे रेडिओ अल्टिमीटर बसवण्यात आले असून ५जी सेवेमुळे त्यांच्यावर परिणाम होणार नाही.
अमेरिकेच्या स्पष्टीकरणानंतर एअर इंडियाने विमाने रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला. ‘बोईंग बी ७७७’प्रकारातील पहिले विमान गुरुवारी सकाळी न्यूयॉर्कला रवाना झाले. त्यानंतर शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्कोला विमाने रवाना झाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या यंदाच्या T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर 12 मध्ये आहे. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यास पात्र ठरण्यासाठी आमनेसामने असतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
तर, भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी एमसीजी येथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. T20 विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत.
संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध, २७ ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्यासह दुसरा, ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा, त्यानंतर चौथा सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशशी आणि पाचवा सामना ६ नोव्हेंबर रोजी गट ब विजेत्यासह होईल.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.