Best Decision for women in 2022 Flashback २०२२ मधील काही महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे महिलांची उमेद तर वाढली आहेच शिवाय आजवर पुरूषप्रधान समजल्या गेलेल्या क्षेत्रांचे दालनही त्यांच्यासाठी याच वर्षात खुले झाले आहे. वर्षभरात झालेले हे सकारात्मक बदल पुढल्या पिढ्यांसाठी नक्कीच ऐतिहासिक आणि संस्मरणीय असणार आहेत. हे बदल घडावेत यासाठी आजवर कित्येक महिलांनी अनेक पातळ्यांवर आपापल्यापरीने संघर्ष केला. देशामध्ये समता केवळ तात्त्विक पातळीवर न राहता त्याचा मुक्त मनाने स्वीकार व्हावा, त्याची अमलबजावणी व्हावी यासाठी महिलांनी आपले लढे सुरू ठेवले आणि हे सकारात्मक निर्णय म्हणजे त्या संघर्षाची फलश्रुती आहे, असे म्हणता येईल.
स्त्री ही अपत्याची एकमेव नैसर्गिक पालक असल्याने त्या मातेला अपत्याचे आडनाव ठरविण्याचा कायदेशीर अधिकार आणि स्वातंत्र्य देणारा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०२२ मध्ये दिला. तर २० ते २४ आठवडे गर्भार असलेल्या महिलेला सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार सप्टेंबर २०२२ मध्ये मिळाला. त्यासंदर्भातील निवाडा देताना सर्वोच्च न्यायालय म्हणते की, गर्भ धारण करणारी महिला विवाहित आहे वा नाही याहीपेक्षा तिला हा गर्भ ठेवण्याची इच्छा आहे अथवा नाही, हे महत्त्वाचे आहे. गर्भाची वाढ स्त्रीच्या पोटी होत असल्याने त्यासंबंधीचा निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य तिला असल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने याप्रसंगी व्यक्त केले.
वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याचा दर्जा दिला जावा यासाठी भारतीय महिला अजूनही संघर्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यादरम्यान केलेल्या विधानामुळे महिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खंडपीठासमोर एका अविवाहित महिलेने गर्भपाताच्या परवानगीसाठी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सुरू होती. गर्भधारणेला २० ते २४ आठवडे उलटून गेल्यानंतर तिने ही याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भातील सुनावणीमधे न्यायालयाने महिलांवर अनेकदा त्यांच्या जोडीदाराकडूनच लैंगिक अत्याचार केले जातात आणि त्यामुळे गर्भधारणा होते, असे म्हणत वैवाहिक बलात्कार हा बलात्कारच आहे, हे स्पष्ट केले. बलात्काराच्या व्याख्येमध्ये यापुढे वैवाहिक बलात्काराचाही समावेश होईल, असे महत्त्वपूर्ण विधान न्यायालयाने केले. देशातील महिला विवाहित असो वा अविवाहित, ती सुरक्षित आणि कायदेशीर पद्धतीने गर्भपात करू शकते, असा निर्णय न्यायालयाने दिला.
आयर्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांची पुन्हा निवड झाली आहे. मूळचे कोकणातील असलेल्या वराडकर यांनी २०१७मध्ये आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर २०२०च्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र अडीच वर्षांनंतर वराडकर पुन्हा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून आले आहेत. वराडकर यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांना आलेले यश यांचा धांडोळा.
लिओ वराडकर यांची पंतप्रधानपदी निवड कशी - आयर्लंडमध्ये ताओइसेच हे पद महत्त्वाचे मानले जाते. ताओइसेच हा पंतप्रधानपदासाठीचा आयरिश शब्द आहे. ४३ वर्षीय वराडकर यांचा ‘फाइन गाएल’ हा पक्ष आणि मायकल मार्टिन यांचा ‘फियाना फेल’ या पक्षांत परस्परसामंजस्याने सत्तेचे आवर्तन झाले आहे. २०२०च्या निवडणुकीत आयर्लंडमधील ग्रीन्स पक्षासह या दोन्ही पक्षांनी आघाडी केली. त्यांच्यातील समझोत्यानुसार पंतप्रधानपदाची सूत्रे आलटून- पालटून येतात. २०१७ मध्ये फाइन गाएल पक्षाची सूत्रे हाती घेतलेल्या वराडकर यांना पंतप्रधानपद मिळाले. एक नवीन आणि आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले.
आयर्लंडच्या इतिहासात सर्वात तरुण पंतप्रधान असलेल्या वराडकर यांना २०२० मध्ये पंतप्रधानपद गमवावे लागले. २०२०च्या आघाडीच्य अटीनुसार फियाना फेलचे मायकल मार्टिन यांना पंतप्रधानपद मिळाले, वराडकर यांना उपपंतप्रधानपद मिळाले. अडीच वर्षांनंतर अटीनुसार पुन्हा पंतप्रधानपदी लिओ वराडकर विराजमान झाले.
अॅशले गार्डनरची (३२ चेंडूंत नाबाद ६६ आणि २० धावांत २ बळी) अष्टपैलू कामगिरी आणि हिदर ग्रॅहमच्या (८ धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने मालिकेतील अखेरच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ५४ धावांनी पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिका ४-१ अशी जिंकली. अॅशले गार्डनर सामन्यासह मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची स्थिती १० षटकांत ४ बाद ६७ अशी बिकट झाली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. गार्डनर आणि हॅरिस जोडीने पाचव्या गडय़ासाठी नाबाद १२९ धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ४ बाद १९६ अशी भक्कम मजल मारून दिली. गार्डनरने आपल्या खेळीत ११ चौकार, तर हॅरिस ३५ चेंडूत सहा चौकार, चार षटकारांसह ६४ धावा करून नाबाद राहिली.
आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचे गडी ठराविक अंतराने गडी बाद झाले. दीप्ती शर्माची ३४ चेंडूतील ५३ धावांची खेळी हाच काय तो भारताला मिळालेला दिलासा होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात अखेरचा बदल म्हणून संधी मिळालेल्या हिदर ग्रॅहमने चमकदार कामगिरी करत भारताचा डाव अखेरच्या चेंडूवर १४२ धावांत संपुष्टात आला.
गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर कंपनीचे कार्यकारी अधिकारी अर्थात CEO एलॉन मस्क यांनी घेतलेल्या एका पोलची जोरदार चर्चा आहे. या पोलमध्ये एलॉन मस्क यांनी आपण ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावं का? असा प्रश्न विचारला होता. त्यापुढे एक पाऊल जात जो काही निर्णय नेटिझन्स या पोलमधून देतील, तो मला मान्य असेल, असंही मस्क यांनी म्हटलं होतं. जवळपास ५७.५ टक्के ट्विटर युजर्सनं यावर ‘हो’चा कौल दिला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे आता एलॉन मस्क खरंच सीईओपदावरून पायउतार होणार का? अशी चर्चा सुरू झालेली असतानाच मस्क यांनी मोठं विधान केलं आहे. यासंदर्भात त्यांनी केलेलं ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमका काय होता हा पोल?
एलॉन मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी, अर्थात १९ डिसेंबर रोजी एलॉन मस्क यांनी एक पोल ट्विटरवर सुरू केला होता. अशा प्रकारचे पोल मस्क यांनी याआधीही अनेकदा घेतले आहेत. त्या त्या वेळी आलेल्या निकालांवर मस्क यांनी लगेच किंवा कालांतराने अंमलबजावणीही केली आहे. त्यामुळेच या पोलवर जोरदार चर्चा सुरू झाली होती. कारण या पोलमध्ये मस्क यांनी आपण पायउतार व्हावं का? असा प्रश्न विचारला होता. “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हायला हवं का? या पोलचा येणारा निकाल मला मान्य असेल, मी तो पाळेन”, असं एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
कदाचित एलॉन मस्क यांच्याही अपेक्षेच्या उलट जाऊन ट्विटर युजर्सनं कौल दिला. तब्बल ५७.५ टक्के युजर्सनं पदावरून पायउतार होण्याच्या बाजूने मत दिलं. त्यामुळे हे निकाल मान्य करून एलॉन मस्क पदावरून पायउतार होतील का? अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली. त्यावर काल दिवसभर मस्क यांच्याकडून कोणतंही ट्वीट करण्यात आलं नाही. अखेर आज भारतीय वेळेनुसार सकाळी सातच्या सुमारास मस्क यांनी ट्वीट करत सूचक विधान केलं आहे.
“ट्विटरच्या CEO पदाची जबाबदारी घेणारी कुणी मूर्ख व्यक्ती मला सापडली, की मी लगेच या पदावरून पायउतार होईन. त्यानंतर मी कंपनीच्या सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचं काम पाहीन”, असं मस्क यांनी म्हटलं आहे. आता मस्क यांच्या या ट्वीटचा नेमका अर्थ काय? याची चर्चा सुरू झाली आहे. याचा अर्थ एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा मिश्किलपणे युजर्सचा कौल उडवून लावला की भावी वाटचालीसंदर्भात संकेत दिलेत, यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणुतील नव्या उत्परिवर्तनाची माहिती मिळवण्यासाठी दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंगळवारी केली.
याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की असे र्सवकष जनुकीय क्रमनिर्धारण केल्यास देशात उत्परिवर्तित करोना विषाणूंच्या नवीन प्रकारांचा वेळेवर मागोवा व शोध घेणे शक्य होईल. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी विषाणूचा प्रतिबंध करणे आवश्यक असून त्यासाठी उपाययोजना करणे सोपे जाईल. या पत्रात भूषण यांनी अधोरेखित केले, की विषाणू चाचणी, करोना प्रकरणांचा मागोवा, उपचार, लसीकरण व कोविड प्रतिबंधक वर्तन या पाच स्तरांवर धोरणात भर देण्यात येणार आहे. देशात सध्या आठवडाभरात १२०० रुग्ण आढळत आहेत. अजूनही जगभरात कोविड-१९ चे आव्हान कायम आहे. कारण जगभरात अजूनही ३५ लाख रुग्णांची दर आठवडय़ाला नोंद होत आहे.
या वर्षी जूनमध्ये आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या करोना प्रतिबंधक वर्तणुकीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ या पत्रात देण्यात आला असून, या विषाणूंच्या नवीन उत्परिवर्तित प्रकारांचा प्रादुर्भाव शोधण्यासाठी संशयित व बाधित प्रकरणांचा लवकर मागोवा, विलगीकरण, चाचणी आणि वेळेवर उपचारांचे व्यवस्थापन आवश्यक आहे. या संदर्भात सध्या जागतिक परिस्थितीचे निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
आज आढावा बैठक जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता आरोग्य मंत्री अन्य देशांमधील करोनाची स्थिती आणि साथ रोखण्यासाठी भारताने केलेल्या तयारीचा आढावा घेतील, अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ डिसेंबर २०२१
भारताने सोमवारी २० युट्यूब चॅनेल्स आणि दोन वेबसाईटवर बंदी घातली आहे. भारतविरोधी प्रचार करणारी ही चॅनेल्स आणि वेबसाईट्स पाकिस्तानमधून हाताळल्या जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुधारित माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील बदलांनुसार हा बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं इकॉनमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी यूट्यूब आणि टेलिकॉम विभागाला पाठवलेल्या पत्रामध्ये देशाच्या एकतेला आणि सर्वभौमत्वाला धोका पोहचवणारा कंटेंट आणि अशा माध्यमांना तातडीने ब्लॉक करण्यात यावं असे आदेश दिले होते. या प्रकरणाशीसंबधित सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा खुलासा केला आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने इंटरनेटवरुन भारताविरोधी प्रचारकी साहित्याचं प्रसारण केलं जात होतं. अशापद्धतीने चुकीची माहिती पसरवणाऱ्या गटांपैकी एका गटाचं नाव ‘नया पाकिस्तान’ असं असल्याचं माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. या युट्यूब चॅनेलला दोन मिलियन सबस्क्रायबर आहेत. काश्मीर, शेतकरी आंदोलन, अयोध्या प्रकरण यासारख्या गोष्टींबद्दल या चॅनेलवरुन खोटी माहिती दिली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. हेच कारण देत या चॅनेलवर बंदी घालण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.
ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी प्रदीप कुमार रावत यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विक्रम मिस्री यांची जागा घेणार आहेत.
भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) १९९० सालच्या तुकडीचे अधिकारी असलेले रावत हे सध्या नेदरलॅण्ड्समध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत. ‘ते नव्या नियुक्तीची सूत्रे लवकरच स्वीकारतील,’ असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका संक्षिप्त निवेदनात सांगितले.
पूर्व लडाखच्या सीमेवरील तिढा रेंगाळत असतानाच रावत यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी हाँगकाँग व बीजिंगमध्ये काम केलेले आहे. सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०२० या काळात ते इंडोनेशिया व तिमोर-लेस्ते या देशांमध्ये भारताचे राजदूत होते. ते चीनमधील मँडरीन भाषा अस्खलितपणे बोलू शकतात.
करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव डेल्टापेक्षा अधिक वेगाने होत असल्याची माहिती सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिली आहे. इतकच नाही तर लसीकरण पूर्ण झालेल्या किंवा यापूर्वी करोना होऊन गेलेल्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
डब्ल्यूएओचे महानिर्देशक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी जिनेवामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सध्याच्या करोना परिस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रेडोस यांनी, “आता समोर आलेल्या पुराव्यांनुसार करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत फारच वेगाने पसरत आहे,” असं म्हटलंय.
ट्रेडोस यांनी करोना प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेतलेल्यांना किंवा यापूर्वी करोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केलीय. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगामधील ८९ देशांमध्ये करोनाच्या या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केलाय.
कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका असणाऱ्या भागांमध्ये रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांमध्ये दुप्पटीने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होत आहे.
अभ्यासू कलाशिक्षक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत दत्तात्रय जोशी(वय-७७) यांचे आज (सोमवार) ब्रेन हॅमरेजने निधन झाले.
१७ डिसेंबरपासून शाहू स्मारक भवन येथे सुमित्रा भावे स्मृती महोत्सव सुरु झाला. दुसर्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे आज निधन झाले.
कोल्हापूरातील कला क्षेत्राबरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान होते. नाना पाटेकर आणि स्मिता पाटील अभिनीत सूत्रधार या हिंदी चित्रपटापासून त्यांनी आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीस सुरूवात केली. टक्कर, निर्मला मच्छिंद्र कांबळी, जगज्जनी श्री महालक्ष्मी असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. आकाशवाणीवर अनेक कार्यक्रमांंच्या संहितांचे लेखन केले.
जीवनसंध्या दृष्ट यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. येथील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचे ते संचालक होते. येथे झालेल्या ६३ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.