गडकरींची भूमिका महत्त्वाची
राष्ट्रपतींकडून प्रचंड यांचे स्वागत
नव्याने काय वगळलं NCERT ने?
NCERT म्हणते…
भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने मंगळवारी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पारंपरिक (क्लासिकल) विभागातील पहिल्या फेरीत मॅक्झिमे वाशिये-लॅग्रेव्हला ४० चालींत पराभूत केले. भारतीय ग्रँडमास्टर आनंदने या विजयाद्वारे तीन गुणाची कमाई केली. याचप्रमाणे अमेरिकेच्या वेस्टली सो याने तैमूर राजाबोव्हला नमवून आनंदसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले आहे.
मॅग्नस कार्लसनने (१.५ गुण) चीनच्या वांग हाओशी (१ गुण) बरोबरी साधली. याचप्रमाणे अनिश गिरी (१.५ गुण) आणि व्हेसेलिन टोपालोव्ह (१ गुण) तसेच शाखरियार मॅमेडायारोव्ह (१.५ गुण) आणि आर्यन तारी (१ गुण) यांच्यातील सामनेसुद्धा बरोबरीत सुटले. पारंपरिक प्रकारात बरोबरीचा निकाल लागल्यास अर्मेगेडोन (सडन डेथ) डाव खेळवण्यात येतो.
पारंपरिक स्पर्धेआधी खेळवण्यात आलेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकारात आनंदने सातव्या फेरीत कार्लसनवर विजय मिळवून चौथा क्रमांक मिळवला. आनंदने अनिश गिरी (नेदरलँड्स) आणि व्हॅचिएर-लॅग्रेव्ह यांच्याकडून अनुक्रमे चौथ्या व नवव्या फेरीत हार पत्करली होती.
युवकांचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष संघाने बुधवारी दिमाखदार कामगिरी करीत जपानला १-० असे नमवून आशिया चषक हॉकी स्पर्धेचे कांस्यपदक पटकावले. ‘अव्वल-४’ फेरीच्या मंगळवारी झालेल्या अखेरच्या लढतीत दक्षिण कोरियाने ४-४ असे बरोबरीत रोखल्यामुळे भारताला जेतेपद टिकवण्यात अपयश आले. परंतु जपानविरुद्धच्या लढतीत राजकुमार पालने सातव्या मिनिटाला झळकावलेला एकमेव मैदानी गोल निर्णायक ठरला. त्यानंतर उर्वरित सामन्यात भारतीय बचावपटूंनी प्रतिस्पध्र्याना गोल करण्याची कोणतीच संधी दिली नाही.
भारतीय संघाने पहिल्या पाच मिनिटांत आक्रमक खेळ दाखवला, परंतु जपानच्या बचावाने त्यांना रोखले. सातव्या मिनिटाला उजवीकडून उत्तम सिंगने त्वेषाने प्रतिहल्ला करीत राजकुमारला गोलसाहाय्य केले. राजकुमारने जपानचा गोलरक्षक ताकाशी योशिकावाला चकवत भारताचे खाते उघडले. तीन मिनिटांनी भारताला दोन सलग पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण ते दोन्ही वाया गेले. अखेरच्या पाच मिनिटांत जपानने बरोबरीसाठी कसून प्रयत्न केले. पण भारतीय संरक्षण फळीने आघाडी टिकवून ठेवली.
दुसऱ्या सत्रात जपानने आक्रमकतेवर भर देत २०व्या मिनिटाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण जपान आणि भारताला गोल करण्याच्या आणखी काही संधी चालून आल्या, परंतु दोन्ही संघ अपयशी ठरले. मध्यांतरानंतर जपानने बरोबरीच्या निर्धाराने आणखी दोन लागोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळवले. परंतु भारतीय बचाव भेदण्यात ते अयशस्वी ठरले. त्यानंतर भारताला आघाडी वाढवण्याची सुवर्णसंधी चालून आली. परंतु एसव्ही सुनीलच्या पासवर राजकुमारला गोल साकारता आला नाही.
गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. याच गरजेतून तळा तालुक्यातील एका तरुणाने चक्क बॅटरीवर चालणारी जीप तयार केली आहे. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली ही जीप सध्या सर्वाच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.
तळा येथील विराज टिळक हे केबल व्यवसाय करतात. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना सतत प्रवास करावा लागतो; पण इंधनाच्या वाढत्या दरामुळे त्यांना हा प्रवास खर्चीक ठरू लागला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलशिवाय चालणारे एखादे वाहन आपल्याकडे असवा अशी गरज त्याला सातत्याने भासू लागली; पण बाजारात बॅटरीवर चालणाऱ्या गाडय़ांचा पर्याय उपलब्ध होता. पण त्या गाडय़ा महागडय़ा होत्या. हा खर्च परवडणारा नसल्याने त्याने स्वत:च बॅटरीवर चालणारी गाडी बनविण्याचा निर्णय त्याने घेतला.
गावातील भंगारवाल्यांकडून टाकाऊ सामान गोळा केले. वेिल्डग मशिन, ड्रिल मशीन, कटर आणि रिबिट मशीन मित्रांकडून आणले. काही मित्रांनी या कामात लागेल ते सहकार्य देण्याचे मान्य केले. जुन्या मोडलेल्या गाडय़ांच्या सामानाची जुळवाजुळव केली. सात दिवसांनी गाडी बनविण्याचे काम सुरू केले. दोन-तीन प्रयत्न फसले; पण जिद्द सोडली नाही. पुन्हा जोमाने काम सुरू केले. मग मात्र यश मिळाले. स्टीअरिंग, सस्पेन्शन, पिक-अप, रिव्हर्स गिअरची चाचणी केली. ती यशस्वी झाली.
या गाडीसाठी चार बॅटरींचा वापर करण्यात आला आहे. एकदा चार्ज केलेली गाडी साधारणपणे ७० ते ८० किलोमीटर धावते आहे. ३० किलोमीटर ताशी वेगाने ही गाडी प्रवास करू शकते आहे. गाडी चार्जिगसाठी दिवसाला २५ ते ३० रुपयांचा खर्च येतो आहे.
युक्रेनला अत्याधुनिक मध्यम श्रेणी रॉकेट प्रणाली पाठवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने मंगळवारी हा निर्णय जाहीर केला.
युक्रेनच्या दोन्बस प्रदेश ताब्यात घेण्याचे रशियाचे प्रयत्न रोखण्यासाठी युक्रेनची धडपड सुरू आहे. अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे ‘आगीत तेल ओतण्या’चा प्रकार असल्याची टीका रशियाने केली आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की युक्रेनच्या संरक्षण सहाय्यासाठी अमेरिकेने मंजूर केलेल्या ७० कोटी डॉलरच्या मदतीचा भाग म्हणून हेलिकॉप्टर, रणगाडाविरोधी शस्त्र प्रणाली, अत्याधुनिक क्षेपणास्त्र-रॉकेट प्रणाली पुरवली जाणार आहे.
प्रशासनाकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. अध्यक्ष बायडेन यांनी सोमवारी सांगितले होते, की आम्ही युक्रेनला रशियाला लक्ष्य करणारी लांब पल्ल्याची रॉकेट यंत्रणा पाठवत नाही. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव यानी या निर्णयाचे स्वागत केले होते.
युक्रेनला आधुनिक विमानविरोधी क्षेपणास्त्रे व रडार यंत्रणा देण्याची घोषणा जर्मनीने बुधवारी केली. युक्रेनला भरीव मदतीसाठी जर्मनी काही करत नाही अशा देशांतर्गत व मित्रराष्ट्रांच्या टीकेस जर्मन सरकारला तोंड द्यावे लागले होते. चान्सलर ओलाफ शोल्त्स यांनी जर्मनीच्या लोकप्रतिनिधींना सांगितले, की जर्मनीची अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा ‘आयआरआयएस-टी एसएलएम’ क्षेपणास्त्रे युक्रेनला पाठवण्यात येतील. यामुळे युक्रेनला रशियाच्या हवाई हल्ल्यापासून अवघ्या शहराचे संरक्षण करता येईल.
राज्यासह देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात मे महिन्यात घट नोंदविण्यात आली़ राज्यात मे महिन्यात २०,३१३ कोटींचे संकलन झाले असून, एप्रिलच्या तुलनेत ते २५ टक्के कमी आह़े देशात या महिन्यात जीएसटी संकलनाने १.४० लाख कोटींच्या पुढे मजल मारली असली तरी एप्रिलच्या तुलनेत त्यात १६ टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आह़े
देशात चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाने नवा विक्रम करत प्रथमच दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. एप्रिल २०२२ मध्ये देशभरात एकूण १ लाख ६७ हजार ५४० कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून गोळा झाला होता. त्या तुलनेत मे महिन्यात जीएसटी संकलन १६ टक्क्यांनी आटले आहे. मात्र, आर्थिक वर्षांतील पहिल्या महिन्याच्या तुलनेत दुसऱ्या महिन्यातील संकलन नेहमी कमीच असते, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी मासिक संकलनाची आकडेवारी जाहीर करताना सांगितले. गेल्या सलग ११ महिन्यांत जीएसटी संकलनाने मासिक एक लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.
राज्यात मे महिन्यात २०,३१३ कोटींचे जीएसटी संकलन झाले. एप्रिल महिन्यात राज्यात २७,४९५ कोटींचे संकलन झाले होते. त्या तुलनेत राज्यातील संकलनात सुमारे २५ टक्क्यांनी घट झाली.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राज्यात २२ हजार कोटींचे संकलन झाले तर मे महिन्यात १३,३९९ कोटींचे संकलन झाले होते. अर्थात तेव्हा करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्बंध लागू करण्यात आले होते. २०२१च्या मे महिन्यातील संकलनाच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यातील संकलनात मात्र ५० टक्क्यांची वाढ झाली आहे.
जैविक व रासायनिक घटकांचा शस्त्रे म्हणून गैरवापर होण्याचा धोका असल्याचा इशारा भारताने जगाला दिला आहे. कोविड- १९ महासाथीच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला. आंतरराष्ट्रीय समुदायाला या धोक्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कारण या क्षेत्रात झपाटय़ाने विनाशकारी प्रगती झाली आहे.
‘‘नवनवीन तंत्रज्ञानामुळे दहशतवादी संघटनांकडून मोठय़ा प्रमाणावर अशी सर्वंकष विनाशकारी शस्त्रे मिळवून वापरण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होऊ शकतो,’’ असा इशारा भारताच्या संयुक्त राष्ट्र संघटनेतील प्रतिनिधी ए. अमरनाथ यांनी मंगळवारी दिला. अण्वस्त्र, रासायनिक आणि जैविक शस्त्रांच्या प्रसारावरील ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद १५४० समिती’च्या खुल्या सत्रात अमरनाथ म्हणाले, की या अस्त्रांच्या प्रसाराच्या वाढणाऱ्या धोक्यांबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेणे आवश्यक आहे.
क्षेपणास्त्रे आणि ‘ड्रोन’सारख्या मानवरहित हवाई प्रणाली मिळवण्याची दहशतवादी आणि प्रस्थापित सरकारविरोधी गटांची क्षमता वाढत आहे. त्यामुळे या अपारंपरिक अस्त्र-शस्त्रांच्या गैरवापराचा धोका वाढल्याचे
सांगून अमरनाथ म्हणाले, की ‘कोविड-१९’ महासाथीचा काळ व या काळात रसायन आणि जीवशास्त्रातील प्रगतीमुळे, जैविक घटक आणि रसायनांचा शस्त्रे म्हणून गैरवापर होण्याचा धोका वाढला आहे.
या मुद्दय़ांवर समिती संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य राष्ट्रांना कशी मदत करू शकते, यावर विचारमंथन करण्यासाठी हे खुले विचारविनिमिय व्यासपीठ उपयोगी ठरेल, असेही अमरनाथ यांनी नमूद केले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.