चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 नोव्हेंबर 2023

Date : 18 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
योगी सरकारने घेतला मोठा निर्णय! मोहम्मद शमीच्या गावात बांधले जाणार स्टेडियम
  • एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत मोहम्मद शमी भारतीय क्रिकेट संघाची सर्वात मोठी आशा आहे. उपांत्य फेरी गाठेपर्यंत तो गोलंदाजीचा कणा बनला होता. शमीने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ७ विकेट घेतल्या होत्या. तेव्हापासून देशात आणि जगात सर्वत्र शमी-शमीचा आवाज घुमत आहे. आता त्याचे मूळ गाव अमरोहाला शमीच्या कारनाम्यांचा फायदा होणार आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने त्याच्या गावी सहसपूर अलीनगरमध्ये क्रिकेट स्टेडियम बांधण्याची घोषणा केली आहे.

मोहम्मद शमीच्या गावात बांधले जाणार मिनी क्रिकेट स्टेडियम -

  • अमरोहाच्या गल्ल्यांमधून बाहेर पडून आंतरराष्ट्रीय जगतात प्रसिद्ध झालेले नाव म्हणजे मोहम्मद शमी. विश्वचषकातील त्याच्या कामगिरीने देशवासीयांना अभिमान वाटला. आता अमरोहाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शमीच्या गावात सहसपूर अलीनगरमध्ये मिनी स्टेडियम आणि ओपन जिम बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
  • अमरोहाचे जिल्हा दंडाधिकारी राजेश त्यागी म्हणाले, “आम्ही मोहम्मद शमीच्या गावात मिनी स्टेडियम बांधण्याचा प्रस्ताव पाठवत आहोत. या प्रस्तावात खुली व्यायामशाळाही असणार आहे. शमीच्या गावात यासाठी पुरेशी जमीन आहे.”
  • जिल्हा दंडाधिकारी राजेश त्यागी आणि मुख्य विकास अधिकारी अमरोहा यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा प्रशासनाच्या पथकाने शमीच्या सहसपूर अलीनगर गावाला भेट दिली होती. मिनी स्टेडियम आणि ओपन जीम बांधण्यासाठी जमिनीच्या शोधात टीम तिथे पोहोचली होती. मोहम्मह शमीप्रमाणे खेळात प्रगती करण्यासाठी त्यांच्या भागातील तरुणांना मदत करणे हा यामागचा उद्देश आहे.
  • अमरोहाचे जिल्हा दंडाधिकारी राजेश त्यागी पुढे म्हणाले, “यूपी सरकारने राज्यभरात २० स्टेडियम बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या संदर्भात अमरोहा जिल्ह्यातील मोहम्मद शमीच्या गावाची स्टेडियम बांधण्यासाठी निवड करण्यात आली आहे.”
कला इतिहासकार बी. एन. गोस्वामी यांचे निधन
  • विख्यात कला इतिहासकार आणि लेखक ब्रिजेंदर नाथ गोस्वामी यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांना फुप्फुसाच्या संसर्गावर उपचारासाठी चंडीगड येथील रुग्णालयात दाखल केले होते. बी एन गोस्वामी यांच्या पश्चात मुलगी मालविका आहे. त्यांची पत्नी करुणा याही कला इतिहासकार होत्या. 
  • गोस्वामी यांनी पहाडी शैलीच्या चित्रकलेवर विपुल प्रमाणात संशोधन केले होते. या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. १९५८ मध्ये सनदी सेवेतील प्रतिष्ठेची नोकरी सोडून त्यांनी संशोधन आणि लेखनासाठी कारकीर्द घडवली.
  • पहाडी चित्रे, लघुचित्रे, दरबारी चित्रे आणि भारतीय चित्रे या विषयाला वाहिलेली २६ पेक्षा जास्त पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. कला, साहित्य आणि भाषणांमध्ये मांजरांनी विविध प्रकारे पटकावलेले स्थान या विषयावरील ‘द इंडियन कॅट : स्टोरीज, पेंटिग्ज, पोएट्री अँड प्रोव्हर्ब’ हे त्यांचे सर्वात अलिकडील पुस्तक २०२३ मध्ये प्रकाशित झाले होते.
मुलींच्या लग्नात सोनं, एक लाख रुपये, उच्चशिक्षित तरुणींना मोफत स्कूटी, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस
  • तेलंगणात येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यातले स्थानिक पक्ष तसेच काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीनेही तेंलगणात प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात काँग्रेसने तेलंगणातील जनतेला अशी काही आश्वासनं दिली आहेत, ज्याची देशभर चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत तेलंगणा काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा सादर केला.
  • काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात अवघ्या ५०० रुपयांमध्ये एलपीजी सिलेंडर (स्वयंपाकाचा गॅस) आणि मोफत वीज देऊ अशी घोषणा केली आहे. तसेच मुलींच्या लग्नात सोनं आणि रोख पैसे देण्याचं आश्वासनही दिलं आहे. दरम्यान, यावेळी केलेल्या भाषणात मल्लिकार्जुन खरगे यांनी तेलंगणाला वेगळं राज्य बनवण्यासाठी काँग्रेसने आणि पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेल्या भूमिकांचा पुनरुच्चार केला.
  • मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्ही कर्नाटकातल्या जनतेला पाच मोठी आश्वासनं दिली आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्या लोकांनी रामाच्या नावाने मतं मागितली, त्यांनी राज्यासाठी काहीच केलेलं नाही. काँग्रेस महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा देत आहे. त्यामुळे महिला दररोज बसने प्रवास करू लागल्या आहेत. बसने मंदिरात जाऊ लागल्या आहेत.

काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा

  • ५०० रुपयांमध्ये स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर दिला जाईल
  • महिला बसने मोफत प्रवास करू शकतील.
  • २०० युनिटपर्यंतची वीज मोफत
  • इंदिरम्मा उपहार योजनेअंतर्गत हिंदूंना त्यांच्या मुलीच्या लग्नात १ लाख रुपये इतकी रक्कम आणि १० ग्रॅम (एक तोळा) सोनं दिलं जाणार. तर अल्पसंख्यांकांना त्यांच्या मुलींच्या लग्नाच्या वेळी १,६०,००० रुपये दिले जातील.
  • प्रत्येक उच्च शिक्षित तरुणीला मोफत स्कूटी दिली जाईल.
  • शेतकऱ्यांचं एक लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ केलं जाईल. तसेच त्यांना २० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाईल.
गाझा पट्टीमधील निरपराधांच्या मृत्यूंचा पंतप्रधानांकडून निषेध; जागतिक हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन 
  • इस्रायल-हमास संघर्षांत हजारो नागरिकांचा बळी गेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसेच या संघर्षांमुळे पश्चिम आशियात नवी आव्हाने उभी राहिली असून ‘ग्लोबल साउथ’ देशांनी जागतिक हितासाठी आता एकमुखी आवाज उठवण्याची वेळ आल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
  • दूरस्थ दृक्-श्राव्य पद्धतीने झालेल्या ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ’ परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी हमास-इस्रायलमधील संघर्षांमुळे आशियात उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केले. पश्चिम आशियातील घटनांमुळे उद्भवत असलेली नवी आव्हाने आपण पाहतच आहोत. पश्चिम आशियातील सद्य परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारत ‘संवाद आणि मुत्सद्देगिरी’वर भर देत असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. जागतिक समृद्धीसाठी ‘सबका साथ, सबका विकास’ या सूत्राची गरज आहे, असेही ते म्हणाले.
  • इस्रायलवर ७ ऑक्टोबरला करण्यात आलेल्या भयानक हल्ल्याचा आणि हमास-इस्रायल संघर्षांत नागरिकांचा बळी गेल्याबद्दल भारत तीव्र निषेध व्यक्त करतो, असे  मोदी म्हणाले. मोदी यांनी पॅलेस्टिनी प्रशासनाचे अध्यक्ष महमौद अब्बास यांच्याशी गेल्या महिन्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणाचा संदर्भही या वेळी दिला. अब्बास यांच्याशी चर्चा झाल्यानंतर भारताने पॅलेस्टिनी नागरिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत पाठवल्याचेही त्यांनी सांगितले. कन्सल्टेशन, कोऑपरेशन, कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी आणि कपॅसिटी या ‘फाइव्ह सी’च्या रचनेनुसार  ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ यासाठी आपण एकत्रित पुढे जाऊया, असे आवाहन मोदी यांनी केले. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १४०० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यांत सुमारे ११,५०० लोकांचा बळी गेला आहे.
राज्याचे १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा, नेमकं काय ठरलं?
  • राज्याची मंत्रिमंडळ बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयांवर चर्चा झाली. तसंच, राज्याची अर्थव्यवस्थेचे १ ट्रिलिअन डॉलर्सचे उद्दीष्ट्य गाठण्याच्या उद्देशानेही आजची बैठक महत्त्वाची ठरली.
  • बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X वर पोस्टद्वारे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबाबत माहिती दिली. मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता देण्यात आली असून १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. तर, राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवण्यात आला आहे. तसंच, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
  • आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकणार आहेत. याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिक्षण विभागासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलिअन करणार असल्याचं आश्वासन देण्यात येत होतं. त्यानिमित्ताने पुढचं पाऊल पडलं आहे.
  • राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे आज सादरीकरण करण्यात आले. १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी समोर आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या शिफारशींचा सरकारकडून अभ्यास केला जाईल, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.
Ind vs Aus Final चं भाकित व्हायरल, मार्शनं स्कोअरकार्डच सांगितलं; म्हणे, “ऑस्ट्रेलिया ४५०…!”
  • रविवारी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यातील शक्य त्या सर्व मुद्द्यांवर सध्या क्रिकेट चाहते, जाणकार व तज्ज्ञांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे. मग ती दोन्ही संघांच्या जमेच्या बाजूंची असे किंवा कमकुवत दुव्यांची! पण याचबरोबर अशा मोठ्या सामन्यांच्या आधी वर्तवण्यात येणाऱ्या भाकितांचीही जोरदार चर्चा होत असते. अनेक आजी-माजी खेळाडूंनी या सामन्याबद्दल त्यांची भाकितं वर्तवली आहेत. पण त्यातलं एक भाकित सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिचेल मार्शनं तब्बल सहा महिन्यांपूर्वी हे भाकित केलं होतं!

मे महिन्यात म्हणाला होता, भारत ऑस्ट्रेलिया अंतिम सामना होईल!

  • मे महिन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या एका पॉडकास्टमध्ये मिचेल मार्शला विश्वचषक स्पर्धा व अंतिम सामन्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर बोलताना मार्शनं यंदाच्या स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल, असं भाकित वर्तवलं होतं. त्याचं हे भाकित अगदी तंतोतंत खरं ठरलं आहे. त्यामुळेच यावेळी त्यानं सांगितलेल्या इतर अंदाजांचीही चर्चा होऊ लागली आहे. पण स्पर्धेत दोन्ही संघांची आत्तापर्यंतची कामगिरी पाहाता मिचेल मार्शनं वर्तवलेलं हे भाकित उलटच होण्याची शक्यता चाहते व्यक्त करत आहेत!

काय आहे मार्षचं अंतिम सामन्यासाठीचं भाकित?

  • मार्शनं भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल असं म्हटलं होतं. पण त्याचबरोबर या सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिली फलंदाजी करताना फक्त २ गड्यांच्या मोबदल्यात ४५० धावा फटकावेल असंही तो म्हणाला होता. उत्तरात आख्खा भारतीय संघ ६५ धावांवर सर्वबाद होईल आणि ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत अजेय राहून विश्वचषक जिंकेल, असं मार्शनं म्हटलं होतं!

आता जरा दोन्ही संघांच्या कामगिरीकडे पाहू…

  • खरंतर मार्शनं सहा महिन्यांपूर्वीच भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचं केलेलं भाकित चर्चेचा विषय ठरलं यात नवल नाही. पण त्याच्या इतर मुद्द्यांचा विचार करता हे भाकित उलट सिद्ध होण्याची शक्यताच सध्या अधिक वाटतेय. ऑस्ट्रेलियाऐवजी भारतीय संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अजेय राहिला आहे. उलट भारतानं पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला आहे. शिवाय भारतीय फलंदाजांची व गोलंदाजांची कामगिरी पाहाता भारताच्या २ बाद ४५० धावा व ऑस्ट्रेलिया ६५ वर सर्वबाद होण्याची शक्यता अधिक असल्याचं चाहते सोशल मीडियावर सांगू लागले आहेत. त्यामुळे रविवारच्या सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

 

मेल्टवॉटर बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानंद विजयी, एरिगेसीचा पुन्हा पराभव :
  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने गुरुवारी मेल्टवॉटर चॅम्पियन्स टूरच्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. अर्जुन एरिगेसीला मात्र सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पराभूत होणाऱ्या प्रज्ञानंदने तिसऱ्या फेरीच्या लढतीत व्हिएतनामच्या लिएम क्वांग ली याच्यावर ३-० अशा फरकाने विजय मिळवला.

  • दुसरीकडे एरिगेसीने अमेरिकेच्या वेस्ली सोकडून ०.५-२.५ अशी हार पत्करली. विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने विजयी घोडदौड कायम ठेवताना अझरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्हवर ३-० अशी मात केली. पोलंडचा आघाडीचा खेळाडू यान ख्रिस्टोफ डुडाने नेदरलँड्सच्या अनिश गिरीचा २.५-०.५ असा पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

  • १७ वर्षीय प्रज्ञानंदने लिएमवर सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. या लढतीत प्रज्ञानंदने पहिला डाव ४१ चालींत, दुसरा डाव ४६ चालींत आणि तिसरा डाव ५३ चालींत जिंकला. या विजयासह प्रज्ञानंदने (४ गुण) गुणतालिकेत चौथ्या स्थानी आगेकूच केली. कार्लसन आणि डुडा (दोघांचेही ९ गुण) संयुक्तरीत्या अग्रस्थानी असून गिरी (४ गुण) तिसऱ्या स्थानी आहे.

अमेरिकेच्या ‘हाऊस’वर रिपब्लिकनांचे वर्चस्व; बायडेन यांच्यासाठी पुढली दोन वर्षे अडचणीची :
  • अमेरिकेतील कायदेमंडळाचे कनिष्ठ प्रतिनिधिगृह असलेल्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’वर रिपब्लिकन पक्षाने निसटते बहुमत मिळवले आहे.

  • ४३५ सदस्यांच्या सभागृहात बहुमताचा २१८ आकडा ट्रम्प यांच्या पक्षाने गाठला असून सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्ष २११ जागांवर विजयी झाला आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची धोरणे ‘हाऊस’मध्ये अडकण्याची शक्यता आहे.

  • नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी हाऊस आणि सेनेट या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत प्रस्थापित करेल, ही अपेक्षा पूर्ण झाली नसली तरी एका सभागृहात बायडेन यांची विधेयके अडवली जाऊ शकतात.

  • हाऊस स्पीकर म्हणून रिपब्लिकन पार्टीने केविन मॅकार्थी यांची बुधवारी निवड केली. डेमोक्रेटिक पक्षाच्या नॅन्सी पेलोसी यांची जागा ते घेतील. ‘अमेरिका नव्या दिशेसाठी सज्ज असून हाऊसमधील रिपब्लिकन त्यासाठी तयार आहेत’ असे ट्विट करून मॅकार्थी यांनी आगामी संघर्षांचे संकेत दिले आहेत.

हे युद्धाचे युग नाही!; जी-२० जाहीरनाम्यात नरेंद्र मोदींच्या विधानाचा पुनरुच्चार :
  • जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेमध्ये जारी करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्यात ‘हे युद्धाचे युग नाही’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा पुनरुच्चार करण्यात आला. येथे झालेल्या दोन दिवसीय परिषदेवर रशिया-युक्रेन युद्धाचे सावट राहिले. या युद्धाबाबत जी-२० सदस्यांमध्ये मतभेद असल्याची कबुलीही जाहीरनाम्यात देण्यात आली.

  • सप्टेंबरमध्ये समरकंद येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वाक्य उच्चारले होते. त्यानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी या भूमिकेचे स्वागत केले होते. आता जी-२० राष्ट्रगटाच्या संयुक्त जाहीरनाम्यातही या वाक्याने स्थान मिळवले आहे. ‘युद्धात अडकलेल्या नागरिकांच्या संरक्षणासह आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे,’ असे आवाहन जाहीरनाम्यात एकमताने करण्यात आले आहे.

  • युक्रेन युद्धाबाबत ‘जी-२०’मध्ये दोन गट पडल्याचे प्रतिबिंब उमटले.  शिखर परिषदेच्या समारोपातील जाहीरनाम्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये घेतलेलीच भूमिका बहुतांश राष्ट्रांनी कायम ठेवली. अमेरिकेसह पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियाचा निषेध केला. मात्र त्याच वेळी आपापल्या संदर्भात परिस्थिती समजून घेऊन काही राष्ट्रांची ‘वेगळी मते’ असल्याचेही या राष्ट्रांना मान्य करावे लागले.  

  • शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणारे इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यासह पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आदी  राष्ट्रांचे प्रमुख सहभागी झाले.

८०० कोटी..! : जागतिक लोकसंख्येचा नवा उच्चांक; भारत पुढील वर्षी चीनला मागे टाकण्याचा अंदाज :
  • मंगळवारी जगाच्या लोकसंख्येने ८०० कोटींचा नवा ‘मैलाचा दगड’ पार केला. विशेष म्हणजे यातील १०० कोटी लोकसंख्येची भर ही गेल्या १२ वर्षांमध्ये पडली आहे. पुढल्या वर्षी भारत लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकण्याची शक्यता असली तरी भारताचा लोकसंख्या वाढीचा दर स्थिरावत असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांनी नोंदवले आहे.

  • ‘८०० कोटी आशा. ८०० कोटी स्वप्ने. ८०० कोटी शक्यता. आपली वसुंधरा आता ८०० कोटी नागरिकांचे घर आहे,’ अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांनी ट्विट करून हा नवा पल्ला गाठल्याची घोषणा केली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत झालेल्या सुधारणांमुळे मृत्यूचे घटलेले प्रमाण यामुळे लोकसंख्येने हा टप्पा गाठला असताना त्याच वेळी या आकडय़ापलिकडे बघून मानवतेच्या पातळीवर सामायिक जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

  • भारताच्या लोकसंख्येबाबत संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (यूएनएफपीए)ने म्हटले की, भारताच्या लोकसंख्यावाढीचा वेग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रजनन दर २.२ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे नमूद करून ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रजनन दरावर नियंत्रण मिळवल्याचे यूएनएफपीएने स्पष्ट केले.

18 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.