चालू घडामोडी आणि दिनविशेष - 16 नोव्हेंबर 2023

Date : 16 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आदिवासी कल्याणासाठी २४ हजार कोटी; पंतप्रधान मोदींची घोषणा
  • केंद्र सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी २४ हजार कोटी रुपयांची योजना लवकरच सुरू करणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात एका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.
  • मोदी यांनी मंगळवारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत देशात आदिवासींसाठी २४ हजार कोटींची योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, येथे उपस्थित असलेली प्रचंड गर्दी हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणार याचे संकेत आहेत. मध्यप्रदेशातील जनतेत प्रचंड उत्साह आणि विश्वास दिसून येत आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारला आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस संतांकडे वळली आहे. कांग्रेसला माहिती आहे की मोदींच्या हमीपुढे त्यांचे खोटे आश्वासन टिकणार नाही.
  • निवडणुका जशा जवळ येत आहेत  तशी काँग्रेसच्या दाव्यांमधील फोलपणा उघड होत चालला आहे.  बुधवारी आदिवासी गौरव दिवस आहे. मी भगवान बिरसा मुंडा यांचा सन्मान करण्यासाठी झारखंडला जाणार आहे. यानिमित्त केंद्र सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी २४ हजार कोटी रुपयांची योजना जाहीर करणार आहे.

सर्व आश्वासने पूर्ण करू

  • जम्मू-कश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, तीन तलाकविरुद्ध कायदा आणि राम मंदिर निर्माण हे कधीच वास्तवात उतरणार नाही, असे वाटत होते. पण हे सर्व भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने करून दाखवले आहे. आम्ही मतदारांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू, असे म्हणत मोदी यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली.
सायप्रसच्या ‘सुवर्ण पारपत्र’धारकांमध्ये विनोद अदानी, पंकज ओस्वाल
  • उद्योजक गौतम अदानी यांचे मोठे भाऊ विनोद अदानी, व्यावसायिक पंकज ओस्वाल आणि बांधकाम क्षेत्रातील मोठे व्यावसायिक सुरेंद्र हिरानंदानी ही सायप्रसचा सुवर्ण पारपत्रह्ण मिळवलेल्या ६६ धनाढय़ भारतीयांपैकी काही महत्त्वाची नावे आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या हाती लागलेल्या माहितीनुसार, २०१४ ते २०२० या कालावधीत या ६६ श्रीमंत भारतीयांनी सायप्रसचे नागरिकत्व मिळवले.
  • या योजनेअंतर्गत सुरुवातीला सायप्रसचे नागरिकत्व घेणाऱ्यांमध्ये विनोद शांतीलाल अदानी यांचा समावेश आहे. ते १९९०च्या दशकापासून दुबईमध्ये राहत असले तरी त्यांनी ३ ऑगस्ट २०१६ रोजी सुवर्ण पारपत्रासाठी अर्ज केला होता. त्यांना अवघ्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे २५ नोव्हेंबर २०१६ रोजी सायप्रसचे नागरिकत्व मिळाले. विनोद अदानी यांच्या परदेशातील कंपन्यांचा तपशील हिंडनबर्गच्या जानेवारी २०२३मधील अहवालात प्रसिद्ध केला आहे. इंडियन एक्सप्रेस- आयसीजेआयच्या शोधवृत्तांमध्येही त्यांचा उल्लेख होता. २०१६च्या पनामा पेपरमध्ये आणि २०२१च्या पँडोरा पेपरमध्ये त्यांचे नाव ‘हिबिस्कस आरई होल्डिंग लिमिटेड’संदर्भात आले होते.
  • या वर्षांच्या सुरुवातीला हिंडनबर्ग अहवालात नाव आल्यानंतर सायप्रसच्या ‘सुवर्ण पारपत्र’धारकांध्ये विनोद अदानी यांचा समावेश असल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सायप्रस सरकारकडे असलेल्या अहवालात विनोद अदानी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडून नियंत्रण केल्या जाणाऱ्या मॉरिशसमधील ३८ बनावट (शेल) कंपन्यांचा उल्लेख आहे. त्याशिवाय सायप्रस, संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर आणि कॅरेबियन बेटांवरील अनेक ठिकाणी त्यांच्या नियंत्रणाखाली बनावट (शेल) कंपन्या आहेत. हिंडनबर्ग अहवालानंतर विनोद अदानी यांचे नाव प्रकाशात आले. तोपर्यंत ते पडद्याआड राहून काम करत होते. ते अदानी समूहाच्या अनेक सूचिबद्ध कंपन्यांच्या प्रवर्तक गटाचा भाग असले तरी ते  व्यवस्थापकीय पदावर नाहीत, अशी भूमिका अदानी समूहाने घेतली आहे.
  • परदेशात कंपन्या स्थापन करण्यासाठी पसंतीचा देश असलेल्या सायप्रसच्या नागरिकत्वाला धनाढय़ भारतीय आणि अनिवासी भारतीय प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. रशियातील राजकारणी, सिरीया येथील लष्करी अधिकारी, ब्रिटनचे फुटबॉल क्लब, भारतीय धनाढय़ यांचा गुंतवणूकदारांमध्ये समावेश आहे. सायप्रस सरकारने २०२२ मध्ये केलेल्या लेखापरीक्षणामध्ये असे आढळले की, तेथील पारपत्र मिळवण्यासाठी एकूण सात हजार ३२७ व्यक्ती पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी तीन हजार ५१७ जण गुंतवणूकदार होते आणि उर्वरित व्यक्तींमध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोहम्मद शमीसाठी खास पोस्ट, म्हणाले…
  • मुंबईतल्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या जुगलबंदीत भारतीय संघाने न्यूझीलंडचं आव्हान मोडून काढत ७० धावांनी विजय मिळवला आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. या लढतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सात विकेट्स पटकावत भारताला विजय मिळवून दिला. रनमशीन विराट कोहलीचं विक्रमी ५०वं शतक, श्रेयस अय्यरचं सलग दुसरं शतक यांच्या बळावर भारतीय संघाने ३९७ धावांचा डोंगर उभारला. डॅरेल मिचेलच्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दमदार प्रत्युत्तर दिलं पण दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स पडत गेल्याने न्यूझीलंडचा प्रतिकार अपुराच ठरला. सेमी फायनलची दुसरी लढत आज कोलकाता येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. त्यांच्यातील विजेत्याशी भारताचा रविवारी मुकाबला होणार आहे. दरम्यान, वानखेडेतील सामन्यावरून खुद्द नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शमीचं कौतुक केलं आहे.
  • “अनेकांच्या वैयक्तिक कामगिरीमुळे सेमी फायनल हा आणखी खास ठरला आहे. या खेळातील आणि संपूर्ण वर्ल्ड कपमधील शमीची गोलंदाजी क्रिकेटप्रेमी कायमस्वरुपी स्मरणात ठेवतील . शमी चांगला खेळला!”, अशी पोस्ट नरेंद्र मोदींनी X वर केली आहे.
  • शुबनम गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीने न्यूझीलंडची अवस्था ३९/२ अशी झाली. न्यूझीलंडचे डेव्हॉन कॉनवे आणि रचीन रवींद्र झटपट माघारी परतले. पण यानंतर केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ चेंडूत १८१ धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या. मोहम्मद शमीने केनला बाद करत ही जोडी फोडली. केनने ६९ धावांची चांगली खेळी केली. शमीने त्याच षटकात टॉम लॅथमला बाद करत न्यूझीलंडला आणखी धक्का दिला. यानंतर मिचेलला ग्लेन फिलीप्सची साथ लाभली. मिचेलने यादरम्यान शतकही साजरं केलं. शमीने फिलीप्सला बाद करताच न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा मावळल्या. मिचेलने ९ चौकार आणि ७ षटकारांसह १३४ धावांची एकाकी झुंज दिली. भारताकडून मोहम्मद शमीने ७ विकेट्स पटकावल्या.
चांद्रयान ३ बाबत इस्रोकडून मोठी अपडेट, यानातील ‘हा’ महत्त्वाचा भाग पृथ्वीच्या कक्षेत परतला!
  • चांद्रयान ३ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या LVM3 M4 प्रक्षेपण वाहनाचा ‘क्रायोजेनिक अप्पर स्टेज बुधवारी अनियंत्रिपणे पृथ्वीच्या कक्षेत परतला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) याबाबत माहिती दिली. उत्तर प्रशांत महासागरावर संभाव्य प्रभाव बिंदूचा अंदाज लावला गेला आहे. म्हणजेच ही रॉकेट बॉडी प्रशांत महासागरावर उतरेल. परंतु, हे रॉकेट भारतावरून गेलेले नाही, असं इस्रोने निवेदनात म्हटलं आहे.
  • इस्रोने सांगितले की ही रॉकेट बॉडी LVM-3 M4 प्रक्षेपण वाहनाचा भाग होती. बुधवारी, आंतरराष्ट्रीय वेळेनुसार दुपारी २.२४२ च्या सुमारास ते पृथ्वीच्या कक्षेत परतले. प्रक्षेपणानंतर १२४ दिवसांच्या आत रॉकेट बॉडीने पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश केला.
  • एक्सिडेंटल एक्सप्लोजनचा धोका कमी करण्यासाठी क्रायोजेनिक अप्पर स्टेजचा वापर केला जातो. १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चं उड्डाण करण्यात आलं. २ वाजून ४८ मिनिटे ३० सेकंदाने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण तिसऱ्या टप्प्यात पोहोचलं. त्यानंतर क्रायोजेनिक इंजिन सुरू होऊन ते चांद्रयानासोबत पुढे गेलं. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अंतराळात पाठवलेल्या रॉकेट्सना निष्क्रिय करून त्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावली गेली पाहिजे. या नियमानुसारच भारताने हे रॉकेट पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत परतले असल्याचं स्पष्ट केलं आहे.
पश्चिम विदर्भात दहा महिन्यांत १९२७ शेतकरी आत्महत्या; शासकीय लाभ पोहचतच नसल्याची ओरड
  • सतरा वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘पॅकेज’अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध योजना आणि अलीकडच्या काळातील अन्न सुरक्षा ते कृषी समृद्धी योजनेपर्यंत उपायांची जंत्री असूनही पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या दहा महिन्यांत अमरावती विभागात १९२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या दहा महिन्यात राज्यात सर्वाधिक २६८ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत.
  • हवामानातील बदलांचा सामना शेतकरी करीत आहेत. दर दोन ते तीन वर्षांनी शेतकऱ्यांना दुष्काळाशी दोन हात करावे लागतात. एखाद्या वर्षी अतिवृष्टी कहर करते. अवकाळी पाऊस, गारपीट हातातोंडाशी आलेली उभी पिके हिरावून नेते.  यातूनच अमरावती विभागात २००१ पासून १८ हजार ८९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी केवळ ८ हजार ८६४ प्रकरणे सरकारी मदतीसाठी पात्र ठरू शकली.
  • आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून एक लाख रुपयांची मदत केली जाते. नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांसाठीच मदत मिळते. आजवर अनेक समित्यांचे अहवाल सादर झाले. मात्र, शिफारशी, उपाययोजनांची अंमलबजावणी होत नाही.  बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून सामाजिक सहाय्य व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू असून समुपदेशनाचीही व्यवस्था आहे. मात्र, उपक्रमाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही, अशीच ओरड कायम आहे.
  • सरकारी ‘पॅकेज’ निरुपयोगी अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा हे सहा जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे मानले गेले. या जिल्ह्यांसाठी २००६ मध्ये केंद्र सरकारने ३ हजार ७८५ कोटींचे तर राज्य सरकारने १ हजार ०७५ कोटींचे पॅकेज दिले होते. योजनांच्या अंमलबजावणीसाठी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना करण्यात आली. सावकारी कायद्याचे स्वरूप बदलण्यात आले. कर्जमाफी देण्यात आली. पीककर्जाचे पुनर्गठन, पीक विमा, बियाण्यांचे वाटप, समुपदेशन, अन्न सुरक्षा योजना, आरोग्य सुविधा, बळीराजा चेतना अभियान यासारख्या अनेक योजना राबवण्यात येत आहेत. पण आत्महत्यांचा आलेख अजूनही चढताच आहे.
अद्भुत, अद्वितीय, अप्रतिम..
  • विराट खेळाडू म्हणून किती मोठा आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. फलंदाज म्हणून विराटची कामगिरी आणि त्याची तंदुरुस्ती यामुळे तो अनेकांचा आदर्श आहे. त्याने ५० एकदिवसीय शतकांचा विक्रम रचला यात नवल नाही. मुंबईतील दमट वातावरणाने विराटच्या तंदुरुस्तीची कसोटी पाहिली, पण त्यानेही जिद्द सोडली नाही.
  • विराटने संपूर्ण विश्वचषकात अप्रतिम खेळ केला आहे. न्यूझीलंडविरुद्धचे त्याचे शतकही उत्कृष्ट होते. रोहितने सुरुवातीला आक्रमक खेळ करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा मारा बोथट केला आणि त्याने रचलेल्या पायावर विराटने कळस चढवला. विराटची तंदुरुस्ती आणि फलंदाजी या दोन्ही बाबी अप्रतिम होत्या. मुंबईतील वातावरणात फलंदाजाला मोठी खेळी करणे सोपे नव्हते. मात्र, परिस्थिती आणि खेळपट्टी ओळखूनच विराटने फलंदाजी केली. शतकी खेळी करताना कोणत्याही फलंदाजाला चांगल्या सहकार्याची अपेक्षा असते, ती साथ त्याला श्रेयस अय्यरने दिली.
  • विराट हा सामन्याच्या अतिशय निर्णायक क्षणी खेळण्यास मैदानात उतरला. १५ ते ४० षटके ही सामन्याचे चित्र स्पष्ट करणारी असतात. विराटने आपल्या खेळीदरम्यान चांगला संयम दाखवला. शतकही त्याने कमी चेंडू खेळताना पूर्ण केले. त्याने धोका न पत्करताही शतक झळकावता येऊ शकते, हे दाखवून दिले. माझ्या मते, विराटची ही खेळी पाहून युवा क्रिकेटपटूंना खूप काही शिकता येऊ शकते. त्याने आपल्या खेळीमध्ये कोणत्याही क्षणी चुकीचे फटके मारले नाहीत. तो कधीही दडपणाखाली दिसला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजी कशी करावी याचे हे एक उत्तम उदाहरण होते.
  • विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. प्रत्येक विक्रम आज ना उद्या मोडला जाणार आहे. मी लॉर्ड्सवर तीन शतके झळकावली आहेत. तो विक्रमही कधीतरी मोडला जाईल. मात्र, विक्रम रचण्यासोबत तुम्ही खेळाडू म्हणून संघाला सामने जिंकवून देणे महत्त्वाचे असते. तुमच्या विक्रमाचा संघाला किती फायदा झाला, याने खेळाडूचे वेगळेपण ठरते. विराटला हीच गोष्ट अद्भुत आणि अद्वितीय बनवते.
श्रेयस अय्यरने बाद फेरीत ६७ चेंडूत शतक झळकावून केला खास पराक्रम, मोडला वीरेंद्र सेहवागचा १६ वर्ष जुना विक्रम

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध शानदार फलंदाजी केली. भारताने ५० षटकांत ४ गडी गमावून ३९७ धावा केल्या. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांचा भारताला या धावसंख्येपर्यंत नेण्यात मोठे योगदान होते. या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी खेळली. श्रेयस अय्यरने या सामन्यात शतक झळकावत वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला.

या सामन्यात शुबमन गिल दुखापत झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर मैदानात आला आणि त्याने जबरदस्त शैलीत फलंदाजी केली. त्याने अवघ्या ६७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ७० चेंडूत ८ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने १०५ धावांची उत्कृष्ट खेळी करत वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत काढला. या सामन्यात श्रेयसने अवघ्या ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि विराट कोहलीसोबत शतकी भागीदारीही केली.

विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत)

६२ - केएल राहुल विरुद्ध नेदरलँड्स, बेंगळुरू, २०२३
६३ - रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, २०२३
६७ - श्रेयस अय्यर वि. न्यूझीलंड, मुंबई, २०२३
८१ - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, २००७
८३ - विराट कोहली विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, २०११


 

मेल्टवॉटर चॅम्पियन्स बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानंद, एरिगेसी पराभूत :
  • भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी यांना मंगळवारी मेल्टवॉटर चॅम्पियन्स टूर बुद्धिबळ फायनल्सच्या पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले. १७ वर्षीय प्रज्ञानंदने अजरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्हकडून १.५-२.५ अशी हार पत्करली, तर पोलंडच्या यान क्रिस्तोफ डुडाने एरिगेसीला २.५-०.५ असे पराभूत केले. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या वेस्ली सो याला २.५-१.५ अशा फरकाने नमवत आपल्या मोहिमेला विजयी सुरुवात केली.

  • प्रज्ञानंद आणि मामेदेरोव्ह यांच्यातील सामन्यात सुरुवातीला अजरबैजानच्या खेळाडूने आघाडी मिळवली. यानंतर प्रज्ञानंदने दुसऱ्या डावात बरोबरीची नोंद केली. यानंतर तिसऱ्या डावात प्रज्ञानंदने विजय नोंदवत चुरस निर्माण केली.

  • मात्र, चौथ्या डावात मामेदेरोव्हने खेळ उंचावत विजय साकारला. कार्लसनचा सामना दुसऱ्या दिवशी एरिगेसीशी होईल, तर लियेम सो चा सामना करेल. मामेदेरोव्हची लढत डुडाशी तर, प्रज्ञानंदची गाठ गिरीशी पडेल. आठ खेळाडूंच्या या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू विजयी होईल.

रशियाकडून पोलंडवर क्षेपणास्त्र हल्ला? जो बायडेन यांनी बोलावली तातडीची बैठक :
  • एकीकडे जागतिक पातळीवर जी-२० परिषदेत भारत, अमेरिका, फ्रान्स यांच्यासारखे देश परस्पर सहकार्य, शास्वत विकास, पर्यावरण संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने उग्र रुप धारण केले आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष आता नाटो देशांपर्यंत पोहोचला आहे. आज (१६ नोव्हेंबर) रशियाने डागलेले क्षेपणास्त्र पोलंड देशात पडले आहे. या घटनेत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नाटो सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. रशियाच्या या कृतीमुळे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आतापर्यंत फक्त या दोनच देशांपर्यंत सीमित होते. आता मात्र रशियाने डागलेले क्षेपणास्त्र नाटोचा सदस्य असलेल्या पोलंड देशावर पडले आहे. यामध्ये पोलंडमधील दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या या कृतीचा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी निषेध केला आहे.

  • तर रशियाच्या या कृतीची पोलंड सरकारनेदेखील दखल घेतली आहे. पोलंडचे पंतप्रधान मॅथ्यूझ मोरविकी यांनी ‘प्राथमिक अंदाजानुसार डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशिय बनावटीचे आहे. मात्र आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. हे क्षेपणास्त्र नेमके कोणी डागले, हे अद्याप निश्चितपणे समजलेले नाही. आमची यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. आम्ही आमची लष्करी तयारी करत आहोत,’ असे सांगितले आहे. तर पोलंडच्या परराष्ट्र खात्यानेदेखील डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशियान बनावटीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारताची ऊर्जासुरक्षा जगासाठी महत्त्वाची; जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ठाम प्रतिपादन :
  • भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे आपल्या देशाची ऊर्जासुरक्षा जागतिक विकासासाठी महत्त्वाची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. येथे सुरू झालेल्या जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेत ‘अन्न व ऊर्जासुरक्षा’ या विषयावरील सत्रात ते बोलत होते. ऊर्जा व इंधन पुरवठय़ावर कोणतेही निर्बंध असू नयेत आणि अशा प्रकारांना प्रोत्साहनही देऊ नये, असे आवाहनही त्यांनी जागतिक समुदायाला केले. 

  • रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात ऊर्जेची टंचाई निर्माण झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘इंधन व ऊर्जा पुरवठय़ासंदर्भात जागतिक स्तरावर स्थैर्य आणि सातत्य राखले गेले पाहिजे’ असे  पंतप्रधान म्हणाले. प्रदूषणमुक्त ऊर्जा व पर्यावरण रक्षणासाठी भारत वचनबद्ध असून २०३०पर्यंत देशाची ५० टक्के गरज ही अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांमधून भागवली जाईल, असे आश्वासन त्यांनी जी-२० राष्ट्रगटाला दिले.

  • युद्धामुळे जागतिक स्तरावर अन्नसुरक्षेचे आव्हान आहे. गव्हाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या युक्रेनमधून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर टंचाईची परिस्थिती आहे. यासंदर्भात मोदी म्हणाले, की सध्या भासत असलेला खतांचा तुटवडा हे एक मोठे संकट आहे. आजच्या खत टंचाईतून उद्याच्या अन्नटंचाईचे संकट निर्माण होण्याचा धोका आहे. त्या वेळी जगाकडे कोणतीही उपाययोजना असणार नाही.

  • खत व अन्नधान्य या दोन्हींची पुरवठा साखळी स्थिर आणि खात्रीशीर राखण्यासाठी आपण सामंजस्य करार केले पाहिजेत, असा आग्रहदेखील पंतप्रधानांनी धरला. शाश्वत अन्नसुरक्षेसाठी भारतात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. तृणधान्यांसारख्या (मिलेट्स) पौष्टिक व पारंपरिक धान्यास प्रोत्साहन देऊन ते पुन्हा लोकप्रिय करत असल्याचेही मोदी म्हणाले. पुढच्या वर्षी येणारे ‘जागतिक तृणधान्य वर्ष’ आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्साहात साजरे झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

२०३० पर्यंत भारतातील ५० टक्के वीजनिर्मिती अक्षय उर्जास्त्रोतांपासून- नरेंद्र मोदी :
  • ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाच्या पूजनाची परवानगी मागणाऱ्या याचिकेवरील निकाल १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जलदगती न्यायालयाने सोमवारी हा निकाल गुरुवापर्यंत स्थगित केला आहे. हे शिविलग ज्ञानवापी मशिदीच्या संकुलात कथितरित्या सापडले आहे.

  • वरिष्ठ स्तर सत्र न्यायाधीश महेंद्र पांडे यांनी या प्रकरणाचा निकाल स्थगित केल्याची माहिती जिल्हा सहायक सरकारी वकील सुलभ प्रकाश यानी दिली. २७ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ८ नोव्हेंबपर्यंत हा निकाल राखून ठेवला होता. त्या दिवशी न्यायाधीश रजेवर असल्याने हे प्रकरण सोमवापर्यंत (१४ नोव्हेंबर) स्थगित झाले होते.

  • २४ मे रोजी विश्व वैदिक सनातन संघाचे सरचिटणीस किरण सिंह यांनी या प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असून, ‘ज्ञानवापी’ संकुलात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात यावी, संकुल सनातन संघाकडे सोपवावे आणि येथील शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. २५ मे रोजी जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

16 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.