चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ ऑगस्ट २०२१

Date : 16 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ‘ती’ चूक? तृणमूलनं केली माफीची मागणी :
  • ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करत रविवारी भाषण केलं. यावेळी त्यांनी देशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची आठवण करुन दिली. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य सेनानी मातंगिनी हाजरा या आसामच्या असल्याचा उल्लेख केला होता. मातंगिनी हाजरा या पश्चिम बंगालच्या मेदिनापूर येथील आहे. यावरुन तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही आणि त्यांनी या चुकीच्या उल्लेखाबाबत माफी मागितली पाहिजे असे तृणमूलने म्हटले आहे.

  • पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही आणि त्यांनी बंगालचे स्वातंत्र्य सेनानी मातंगिनी हाजराचे आसामचे रहिवासी म्हणून वर्णन केल्याबद्दल माफी मागितली पाहिजे असे म्हटले आहे. त्याचवेळी तृणमूल स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान झालेल्या चुकीबद्दल अनावश्यक वाद निर्माण करत असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

  • भाजपाने दावा केला आहे की बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पूर्वी त्यांच्या भाषणांमध्ये अनेक चुका केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले की, पंतप्रधानांना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही आणि केवळ नाट्यमय पद्धतीने लिखित भाषण वाचले. कुणाल घोष यांनी ट्विट करत, भाजपा, मातंगिनी हाजरा आसामच्या होत्या का? तुम्हाला इतिहासाचे ज्ञान नाही. तुमच्यात भावना नाही. तुम्ही फक्त एक लिहिलेले भाषण (तेही इतरांनी लिहिलेले) नाट्यमय पद्धतीने वाचले,” असे म्हटले आहे.

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा : भारतीय तिरंदाजांना पाच सुवर्ण :
  • वॉरक्लॉ येथे सुरू असलेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विुगणित करताना पाच सुवर्णपदकांवर नाव कोरले. रविवारी भारताच्या रीकव्‍‌र्ह संघांनी एकूण आठ पदकांची कमाई केली.

  • पुरुषांच्या १८ वर्षांखालील कॅडेट गटात अमित कुमार, विकी रुहाल आणि बिशाल चेंगमय यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने फ्रान्सवर ५-३ अशी मात केली. तर मिश्र दुहेरीतील अंतिम फेरीत कोमलिका बारी आणि पार्थ साळुंखे यांच्या जोडीने जपानच्या जोडीवर ६-२ असा विजय मिळवला. त्याशिवाय २१ वर्षांखालील गटात पार्थ साळुंखे, आदित्य चौधरी आणि धीरज बोमादेवारा या भारतीय रीकव्‍‌र्ह संघाने सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या कॅडेट गटात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • कंपाऊंड आणि रीकव्‍‌र्ह अशा दोन विभागांत खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण आठ सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली. भारताची ही या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

PM Modi’s Independence Day 2021 Address : विकासाला ‘गतिशक्ती’ :
  • देशाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी र्सवकष पायाभूत विकासाकरिता पुढील दोन वर्षांत १०० लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान गतिशक्ती योजना’ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. मोठय़ा आणि नव्या टप्प्यातील आíथक सुधारणांसाठी देशाकडे राजकीय इच्छाशक्ती असून, कमीत कमी सरकारी हस्तक्षेपाचे पर्व सुरू होत असल्याची ग्वाही मोदींनी दिली.

  • देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदींनी देशवासीयांना शुभेच्छा देत अनेक योजनांची घोषणा केली. स्वातंत्र्याचा शतक महोत्सव ‘आत्मनिर्भर भारता’त साजरा करण्यासाठी सर्वानी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन करताना पंतप्रधानांनी ‘सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वासा’ला  ‘सब का प्रयास’ची जोड दिली. १०० टक्के गावांमध्ये रस्ते असतील, १०० टक्के कुटुंबांचे बँकेत खाते असेल.

  • उज्ज्वला योजना, आयुष्मान योजनेसारख्या सर्व सरकारी योजना १०० टक्के लाभार्थीपर्यंत पोहोचतील, हे स्पष्ट करत मोदींनी देशाला ‘शत प्रतिशत’ म्हणजे शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य दिले. २१ व्या शतकातील मोठी स्वप्ने पाहणाऱ्या नव्या भारताला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचेही मोदींनी आवाहन केले. कुठलाही वर्ग, क्षेत्र मागास राहणार नाही. दलित, आदिवासी, मागास, गरिबांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचवल्या जातील. ऑप्टिक फायबरच्या साह्याने गावागावांत इंटरनेटची सुविधा मिळेल. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी ‘ई-कॉमर्स’ची सुविधा उपलब्ध असेल, असे मोदी म्हणाले.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता?; राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सोडला देश :
  • अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला असून ते ताजिकिस्तानला रवाना झाले आहेत, अशी माहिती टोलो न्यूजने दिली आहे. उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडला आहे. अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर तालिबान सक्रिय झालं होतं.

  • अवघ्या १०० दिवसात तालिबाननं अफगाणिस्तानवर सत्ता मिळवली आहे. शांततापूर्वक मार्गाने सत्तांतरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सत्ता मिळवल्यानंतर तालिबानं जनतेला घाबरण्याची आवश्यकता नाही असा संदेश दिला आहे. आता अली अहमद जलाली अफगाणिस्तानचे पुढचे राष्ट्रपती असतील, असं बोललं जात आहे. “काबुलमधील लूट आणि गोंधळ रोखण्यासठी तालिबान काबुलमध्ये प्रवेश करणार आहे. पोलिसांनी घाबरण्याची गरज नाही”, असं तालिबानी प्रवक्त्याने सांगितलं आहे.

  • शनिवारी तालिबाननं जलालाबादवर ताबा मिळवला होता. यानंतर काबुल शहरच उरलं होतं. काबुल हे शहर तालिबान दहशतवाद्यांपासून सुरक्षित मानलं जातं होतं. मात्र आता या शहरावरही तालिबानने कुच केली आहे. जलालाबादवर ताबा मिळवत तालिबानने राजधानी काबुलला देशाच्या पूर्व भागापासून वेगळं केलं होतं. जलालाबादच्या राज्यपालांना कोणताही संघर्ष न करता आत्मसमर्पण केलं होतं. सामान्य नागरिकांचं नुकसान टाळण्यासाठी त्यांनी असं केलं आहे.

“आपला अभिमान, आपले राष्ट्रगीत”; उपक्रमाला विक्रमी प्रतिसाद :
  • स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीय जोमाने आणि उत्साहाने तयारी करत आहे. राष्ट्रगीताचे गायन करून संपूर्ण देशाने “आजादी का अमृतमहोत्सव” मध्ये आपल्या उत्साही सहभागाचा नारा दिला आहे. भारतातील आणि जगभरातील १.५ कोटीपेक्षा जास्त भारतीयांनी आपले व्हिडिओ रेकॉर्ड करून आणि अपलोड करून या विशेष प्रसंगी एका अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली आहे.

  • भारताची एकता, बळ आणि सद्भावना यांच्या वारशाचा हा सर्वात मोठा दाखला आहे. २५ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये भारताच्या जनतेला एकत्र राष्ट्रगीत गाण्याचा नारा दिला होता.

  • भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने लोकांना १५ ऑगस्टपर्यंत राष्ट्रगीताचे गायन करता यावे आणि ते वेबसाईटवर अपलोड करता यावे म्हणून एक प्रोग्राम तयार केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात देशाच्या सर्व भागातील, सर्व स्तरातील जनतेने उत्साहाने विक्रमी संख्येने सहभाग घेतला आहे आणि त्यांनी एका सुरात राष्ट्रगीताचे गायन केले. काश्मीरपासून कन्याकुमारी, अरुणाचल प्रदेशपासून कच्छपर्यंत सर्वत्र सर्व दिशांना एका सुरात ‘जन गण मन’ चा आवाज घुमत आहे.

देशात कायदे मंजुरीबाबत खेदजनक स्थिती :
  • सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी रविवारी कायदे मंजूर करण्याच्या प्रक्रियेबाबत देशात खेदजनक स्थिती असल्याचे भाष्य करीत संसदेतील चर्चेच्या अभावावर बोट ठेवले.

  • संसदेत मांडलेल्या विधेयकांवर योग्य प्रकारे चर्चा होत नसल्याने कायद्यांमध्ये क्लिष्टता आणि संदिग्धता राहते, परिणामी खटल्यांचे प्रमाण वाढते, सरकारचे नुकसान होते आणि नागरिकांची गैरसोय होते. कायदा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सविस्तर चर्चा केल्यामुळे खटल्यांचे प्रमाण कमी होते, असे सरन्यायाधीश रमण म्हणाले. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (एससीबीए) आयोजित केलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते.

  • संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पण्या महत्त्वाच्या आहेत. विरोधकांनी पेगॅसस पाळत प्रकरण, नवी कृषी कायदे महागाई इत्यादी विषय लावून धरल्याने झालेल्या गोंधळात अनेक विधेयक चर्चेविना मंजूर झाली. गोंधळामुळे संसदेचे कामकाजही अनेकदा संस्थगित करण्यात आले.

  • न्या. रमण म्हणाले की, देशाच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व वकिलांनी केले. महात्मा गांधी असोत किंवा बाबू राजेंद्र प्रसाद, ते कायदेतज्ज्ञ होते. त्यांनी आपली संपत्ती, कुटुंबाचा त्याग केला आणि चळवळीचे नेतृत्व केले. पहिल्या लोकसभा आणि राज्यसभेचे बहुतेक सदस्य वकील आणि कायद्याशी संबंधित होते. दुर्दैवाने, सध्या संसदेत कायद्यांवरील चर्चेच्या बाबतीत काय घडते आहे, हे आपल्याला माहीतच आहे.

  • मी पूर्वी औद्योगिक तंटय़ांबाबतच्या अधिनियमावरील एक चर्चा ऐकली होती. तमिळनाडूमधील एक सदस्य कायद्याची विस्तृत चर्चा करायचे. संबंधित कायद्याचा कामगार वर्गावर कसा परिणाम होईल, याचे ते विश्लेषण करीत असत. अशा चर्चेमुळे कायद्याचा अर्थ लावताना न्यायालयांवरील भार कमी होतो, असेही सरन्यायाधीशांनी नमूद केले.

काबूलमधून १२९ भारतीय मायदेशी :
  • तालिबान रविवारी काबूलमध्ये  पोहोचताच   काबूलमधून आपले शेकडो अधिकारी व नागरिक यांना हलवण्यासाठी भारताने  आकस्मिक योजना तयार ठेवली. त्यानुसार काबूलहून सायंकाळी दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून १२९ भारतीय नागरिक मायदेशी रवाना झाले.

  • भारतीय दूतावासातील आपले कर्मचारी आणि काबूलमधील भारतीय नागरिक यांच्या जिवाला सरकार कुठलाही धोका उद्भवू देणार नाही आणि त्यांनी तातडीने हलवणे भाग पडल्यास त्यासाठीच्या योजनेला आधीच अंतिम रूप देण्यात आले आहे, असे या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • ‘अफगाणिस्तानातील वेगवान घडामोडींवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. दूतावासातील आमच्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका पोहचणार नाही याची आम्ही काळजी घेऊ’, असे एक अधिकारी म्हणाला. मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर लष्करी वाहतूक विमानांचा ताफा तयार ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

  • दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानच्या पाकिस्तानलगतच्या सीमाभागावर कब्जा मिळवल्यानंतर, पाकिस्तानने तोरखाम सीमा नाका (बॉर्डर पॉइंट) बंद केला आहे.

१६ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.