सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत ‘टीसीएस’ कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत ‘टीसीएस’च्याच एका कर्मचाऱ्याच्या जवळच्या नातलगांची नावे असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते.
लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत गोंधळ उजेडात आला होता. लातूर पोलिसांनी याचा तपास करून प्राथमिक तपासणी अहवाल सादर केला आहे. याच्या आधारे टीसीएस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांकडून परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण उजेडात आले आहे. तलाठी भरतीमध्येही लातूर येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाला दिलेल्या निवेदनात केला होता. या प्रकारांमुळे संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सर्व परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत व्हाव्यात, अशी मागणी होत आहे. ‘टीसीएस’च्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
तलाठी भरतीच्या यादीतील घोळ
’तलाठी भरती परीक्षेच्या निकालामधील कथित गोंधळात टीसीएसच्या एका कर्मचाऱ्याचे नाव घेतले जात आहे.
’या परीक्षेत परीक्षेशी कोणताही संबंध नसलेला एक टॅक्सीचालक आणि एक गृहिणी यांना अनुक्रमे २०८ आणि १९८ गुण कसे मिळाले, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे.
’ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून ते टीसीएसमधील कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याचा आरोप समितीने ‘एक्स’वरील संदेशाद्वारे केला आहे.
नकाशा झाला ‘श्रीराम’मय….देशातील प्रमुख श्रीराम मंदिरे आली एका नकाशावर!
अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशातील प्रमुख श्रीराम मंदिरे एका नकाशावर आणण्याची किमया भूगोलतज्ज्ञ डाॅ. सुरेश गरसोळे यांनी साधली आहे. महाराष्ट्र भूगोल समितीतर्फे भूगोल दिनानिमित्त देशातील प्रमुख श्रीराम मंदिरांचा नकाशा समाजार्पण करण्यात आला.
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधून हा नकाशा खास तयार करण्यात आला आहे. यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून महाराष्ट्रातील नाशिक येथील काळाराम मंदिर, रामटेक येथील श्रीराम मंदिर त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर येथील रघुनाथ मंदिर, मध्य प्रदेशातील ओरछा येथील राम राजा मंदिर, कर्नाटकातील चिकमंगळूर येथील कोदंड राम मंदिर, केरळ येथील त्रिशूरमधील त्रिपायर श्रीराम मंदिर, आंध्र प्रदेशच्या हैदराबाद येथील सीता रामचंद्र स्वामी मंदिर, ओरिसा येथील भुवनेश्वर राम मंदिर या निवडक श्रीराम मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे.
शतायुषी भूगोलमित्र आणि ज्येष्ठ समीक्षक मा. कृ. पारधी यांच्या हस्ते या नकाशाबरोबरच भूगोल संदेश देणाऱ्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले. डाॅ. सुरेश गरसोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये नकाशानिर्मितीची प्रक्रिया उलगडली. प्रा. मुक्ता कुलकर्णी, अमृत गरसोळे, अभिनेत्री गात या वेळी उपस्थित होते.
भारताने १५ मार्चपर्यंत मालदीवमधून सैन्य हटवावे; अध्यक्ष मोइझू यांच्याकडून दोन महिन्यांची मुदत
भारताने १५ मार्चपर्यंत मालदीवमध्ये तैनात केलेले लष्कर हटवण्यास सांगितले. मालदीवचे अध्यक्ष मोइझू यांनी ही दोन महिन्यांची मुदत दिली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारत सरकारने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही किंवा त्यावर भाष्यही केलेले नाही.
ताज्या सरकारी आकडेवारीनुसार मालदीवमध्ये ८८ भारतीय लष्करी कर्मचारी आहेत. ‘सन ऑनलाइन’च्या वृत्तानुसार, मालदीवच्या अध्यक्षांच्या कार्यालयातील सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्रपती मोइझू यांनी अधिकृतरित्या भारताला १५ मार्चपर्यंत लष्करी कर्मचारी माघारी घेण्यास सांगितले आहे. मोईझू सरकारच्या धोरणानुसार भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये राहू शकत नाहीत.
हे लष्कर मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी मालदीव आणि भारताने उच्चस्तरीय गट तयार केला आहे. रविवारी सकाळी माले येथील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयात या गटाची पहिली बैठक झाली. या बैठकीला भारतीय उच्चायुक्त मुनु महावर उपस्थित होते. नाझिम यांनी अशी बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत सांगितले, की १५ मार्चपर्यंत सैन्य मागे घेण्याची विनंती हा बैठकीचा मुख्य विषय होता. गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी मालदीवचे अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच मोईझू यांनी मालदीवमधून भारतीय लष्करी कर्मचारी माघारी बोलावण्याची औपचारिक विनंती भारताकडे केली होती.
नाझिम यांनी सांगितले, की मालदीवच्या जनतेने भारताला हे लष्कर हटवण्याची विनंती करण्यासाठी नव्या सरकारला भक्कम बहुमत दिले आहे. मालदीवचे नवे सरकार आता भारतासह झालेल्या शंभरहून अधिक द्विपक्षीय करारांचा आढावा घेत आहेत. मोइझू सरकारच्या तीन उपमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात समाजमाध्यमांवर केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या माघारीची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी ?
आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याचीच देशात आता उत्सुकता आहे. पुढील सोमवारी होणारा राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि १ तारखेला लेखानुदान सादर झाल्यावर कधीही लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याचा अंदाज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी संपुष्टात येत आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा १० मार्चला झाली होती. तसेच ११ एप्रिल ते १९ मे या काळात सात टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान झाले होते. यामुळे नियोजित वेळेनुसार निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. पण यंदा लोकसभा निवडणूक मार्च – एप्रिलमध्येच घेतल्या जातील, अशी चिन्हे आहेत.
पुढील सोमवारी अयोध्येत राममंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त देशभर वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. भाजपने राम मंदिराच्या मुद्दयावर जनतेची मने आणि मते जिंकण्यावर भर दिला आहे. राम मंदिराचा राजकीय लाभ उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राम मंदिरावर वातावरणनिर्मिती झाली असतानाच लोकसभेची निवडणूक झाल्यास त्याचा भाजपला मतांमध्ये फायदा होऊ शकतो. यातूनच अयोध्येतील राममंदिर जनतेसाठी खुले झाल्यावर लगेचच निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येते.
राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यावर लगेचच १ फेब्रुवारीला लोकसभेत लेखानुदान सादर केले जाईल. आगामी निवडणुकीत मतपेरणीसाठी याचा फायदा घेतला जाईल. शेतकरी व विविध घटकांना खुश करण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे. चार महिन्यांच्या खर्चाचे लेखानुदान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मंजूर झाल्यावर लोकसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
भारतात जेएन.१ उपप्रकाराचे १,२०० रुग्ण
भारतामध्ये आतापर्यंत कोविड-१९ चा उपप्रकार असलेल्या जेएन.१ चे एकूण १,२०० रुग्ण नोंदवण्यात आले आहेत अशी माहिती ‘इंडियन सार्स सीओव्ही-२ जिनॉमिक्स कन्सॉर्टियम’ (इन्साकॉग) या संस्थेने शनिवारी दिली. देशातील १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
‘इन्साकॉग’च्या आकडेवारीनुसार जेएन.१ चे कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे २१५ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशात १८९, महाराष्ट्रात १७० तर केरळमध्ये १५४ रुग्णसंख्या आहे. पश्चिम बंगाल, गोवा, तमिळनाडू आणि गुजरातमध्येही जेएन.१ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. तेलंगण, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, नागालँड या राज्यांमध्येही जेएन.१चे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.
तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव; दक्षिण अफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली :
तिसऱ्या आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेनं ७ गडी राखून जिंकला. भारतानं दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेनं ३ गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दक्षिण अफ्रिकेनं ही मालिका २-१ ने जिंकली आहे.
भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचं दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २२३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्वबाद २१० धावा केल्या.
भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं.
देशामधील परदेशी मुद्रा म्हणजेच परकीय चलन गंगाजळीमध्ये मोठी घट झाली आहे. सात जानेवारी २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारतामधील परकीय चलनामध्ये ८७.८ कोटी डॉलर्सने घट झालीय. आता भारतामध्ये ६३२.७३६ अब्ज डॉलर एवढं परकीय चलन शिल्लक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. परदेशी गंगाजळीमध्ये सातत्याने होणारी घट ही केंद्र सरकारसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे.
यापूर्वी ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या आटवड्यामध्ये परदेशी चलन हे १.४६६ अब्ज डॉलर्सचे कमी होऊन ६३३.६१४ अब्ज डॉलर्सवर आलं होतं. तर २४ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परदेशी चलनामध्ये ५८.७ कोटी डॉलरर्सची घट झाली होती. त्यावेळी परकीय चलन ६३५.०८ अब्ज डॉलर्सपर्यंत आलेलं. १७ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा १६ कोटी डॉलर्सने घसरुन ६३५.६६७ अब्ज डॉलर्स वर आला होता.
आरबीआयने शुक्रवारी जारी केलेल्या साप्ताहिक आठडेवारीनुसार सात जानेवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये परदेशी चलन साठ्यात मोठी घट झाली. ही घट प्रामुख्याने फॉरेन करन्सी अॅसेट (एफसीए) म्हणजेच परदेशी चलनामधून होणारी कमाई मंदावल्याने झाल्याचं सांगण्यात आलंय. एकूण परदेशी चलनाच्या साठ्यामध्ये एफसीएचा महत्वाचा वाटा असतो. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालानुसार सात जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या एफसीएमध्ये ४९.७ कोटी डॉलर्सची घसरण झाली.
नव्या वर्षातील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर :
नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात ८ एप्रिल पर्यंत चालणार आहे.
पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत अधिवेशन चालणार आहे. तर दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिल पर्यंतचा असणार आहे. याशिवाय १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
याआधी सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षित संचालनसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष या दोघांनी सेक्रेटरी-जनरल यांना सद्य परिस्थितीत मागील हिवाळी अधिवेशनातील कोविड प्रोटोकॉलचा आढावा घेण्याचे आणि या संदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.
ओमायक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट येणार? संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली भिती :
गेल्या दोन वर्षांपासून भारतात करोना ठाण मांडून बसला आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत पहिल्या वर्षी देशाला या विषाणूमुळे मोठा फटका बसला. लाखो जीव गमवावे लागले. मात्र, त्यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील या संकटाचा वाईट परिणाम झाला.
लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळंच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली. मात्र, पहिली लाट ओसरल्यानंतर देशानं अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून काहीसं यश मिळतं न मिळतं, तोच पुन्हा डेल्टा व्हेरिएंटनं अर्थव्यवस्थेवर हल्ला केला! आता पुन्हा एकदा ओमायक्रॉनमुळे तेच संकट भारतावर येऊ शकतं, अशी भिती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.
पहिल्या लाटेमध्ये बसलेला आर्थिक फटका भरून काढण्याचा भारताचा प्रयत्न डेल्टा व्हेरिएंटमुळे अडचणीत आला. त्यानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था काहीशी सावरू लागल्याचं चित्र निर्माण झालेलं असतानाच आता ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचं संकट भारतासमोर उभं ठाकलं आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने यासंदर्भात भारताला इशारा दिला आहे.
इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा ; सिंधू, लक्ष्य उपांत्य फेरीत :
दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत शानदार विजयांची नोंद करीत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
महिला एकेरीत अग्रमानांकित आणि माजी विश्वविजेत्या सिंधूने ३६ मिनिटांत २१ वर्षीय अश्मिताला २१-७, २१-१८ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत हैदराबादच्या २६ वर्षीय सिंधूचा थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपानिडा कॅटरथाँगशी सामना होणार आहे. सिंगापूरच्या तिसऱ्या मानांकित येओ मिनने आजारपणामुळे माघार घेतल्याने सुपानिडाला पुढे चाल मिळाली. याआधी २०१९च्या राष्ट्रीय स्पर्धेत सिंधूने आसामच्या अश्मिताला नामोहरम केले होते.
आकर्षी कश्यपने मालविका बनसोडची झंझावाती वाटचाल २१-१२, २१-१५ अशी रोखली. तिची उपांत्य फेरीत थायलंडच्या द्वितीय मानांकित बुसानन ओंगबामरुंगफानशी गाठ पडणार आहे. पुरुष एकेरीत एक तास चाललेल्या उपांत्यपूर्व लढतीत तिसऱ्या मानांकित लक्ष्यने आठव्या मानांकित एचएस प्रणॉयवर १४-२१, २१-९, २१-१४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
लक्ष्यचा उपांत्य फेरीत मलेशियाच्या एनजी झे यंगशी सामना होईल. पुरुष दुहेरीत भारताच्या द्वितीय मानांकित सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने सिंगापूरच्या ही यंग काय टटेरी आणि लो कीन हीन जोडीचा ३९ मिनिटांत २१-१८, २१-१८ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.