चालू घडामोडी आणि दिनविशेष - 13 जानेवारी 2024

Date : 13 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताचा विजयी प्रारंभाचा प्रयत्न! आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान
  • भारतीय संघाची ’एएफसी’ आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठणे कठीण दिसत असले, तरीही अशक्य नाही. भारत आपल्या साखळी सामन्यात जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करणार आहे. भारतीय संघ २०११ आणि २०१९ मध्ये साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. यावेळीही त्यांना ‘ब’ गटात आस्ट्रेलिया, उझबेकिस्तान व सीरिया संघांसोबत ठेवण्यात आले आहे.
  • स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठायची झाल्यास २३ जानेवारीला सीरियाविरुद्ध होणाऱ्या सामन्याकडे भारताचे लक्ष असेल. कारण, ऑस्ट्रेलिया व उझबेकिस्तान (१८ जानेवारी) संघ कामगिरीच्या बाबतीत भारताहून सरस आहेत. सीरियाविरुद्ध विजय मिळवल्यास भारतीय संघ गटात तिसऱ्या स्थानावर पोहचू शकतो. यामुळे भारताच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या शक्यता वाढतील. कारण, प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ पुढची फेरी गाठतील. यासह सहा गटांतील सर्वोत्तम तिसऱ्या स्थानी राहणारे संघ पुढच्या फेरीत स्थान मिळवतील. ऑस्ट्रेलिया (२५ व्या स्थानी) व उझबेकिस्तान (६८ व्या स्थानी) यांना नमवणे कठीण असल्याचे संकेत मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच व कर्णधार सुनील छेत्री यांनी यापूर्वीच दिले आहेत.
  • भारताने २००७ व २००९ मध्ये नेहरू चषक स्पर्धेत सीरिया संघाला नमवले होते. त्यामुळे छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारताला सीरियाविरुद्ध चांगल्या कामगिरीची आशा आहे. भारताने बाद फेरी गाठल्यास ही अखेरची स्पर्धा खेळणाऱ्या छेत्रीसाठी मोठी गोष्ट असेल. पाच आशिया चषक स्पर्धेत सहभाग नोंदवणारा भारत २०१९ मध्ये बाद फेरी गाठण्याच्या जवळ होता. छेत्रीची ही तिसरी स्पर्धा आहे. छेत्रीने २०११ व २०१९मध्ये या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता व त्याने सहा सामन्यांत चार गोल झळकावले होते.
  • भारत अहमद बिन अली स्टेडियममध्ये २०१५च्या विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलिया येथे जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने आला आहे आणि दोन्ही संघ स्पर्धेत एकमेकांविरुद्ध केवळ एकदाच खेळले आहेत. ज्यामध्ये २०११च्या साखळी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ०-४ असे पराभूत व्हावे लागले. ऑस्ट्रेलियन संघ ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत नियमितपणे सहभागी होता. त्यांनी गेल्या सत्रात उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते. २०१९मध्ये त्यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले होते. यावेळी भारत सर्वोत्तम संघासह स्पर्धेत उतरला आहे. बचावपटू अन्वर अली, मध्यरक्षक जॅकसन सिंह व आशिक कुरूनियान हे खेळाडू दुखापतीमुळे संघात सहभागी नाहीत. भारतीय पुरुष संघ प्रथमच ‘वीएआर’ तंत्राअंतर्गत हा सामना खेळणार आहे. या सामन्यादरम्यान जपानची योशिमी यामाशिता आशिया चषकात प्रथमच महिला पंच म्हणून पाहायला मिळेल.
एक दौरा अन् पाच विकासकामांना गती! नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन झालेल्या कार्यांची माहिती एका क्लिकवर!
  • पाच बोईंग विमाने, १७ आयफेल टॉवर यांच्या वजनाइतके पोलाद वापरून तसेच ८४ हजार टन वजनाचे ७० ‘स्टील डेक’ बसवून अवघ्या पाच वर्षांत उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब सागरी सेतूचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आधुनिक अभियांत्रिकी जगतातील तंत्रकौशल्याचा देखणा आविष्कार समजला जाणारा हा सागरी सेतू मुंबई आणि नवी मुंबई या शहरांतील प्रवासाचे अंतर कमी करणार असून मुंबईहून पुणे, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वाहनांसाठी वेगवान पर्याय ठरणार आहे. सागरी सेतूसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. नाशिक येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी नाशिकमध्ये भव्य रोडशोही केला. या रोड शोला नाशिककरांनी तुफान प्रतिसाद दिला. त्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. गोदावरी तिरावर रामकुंडावर जाऊन जलपूजन केलं. तसंच, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याकरता त्यांनी काळाराम मंदिरात हाती झाडू घाऊन स्वच्छताही केली. तसंच, तिथं त्यांच्यासाठी खास किर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तल्लीन होऊन किर्तनाचा आस्वाद घेतला.
  • नाशिकमधील नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईतही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक म्हणजे अटल सेतूचे उद्घाटन. बहुप्रतिक्षित आणि अतिमहत्त्वाकांक्षी असलेल्या या सागरी सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी अटल सेतूवरून प्रवासही केला. अटल सेतूच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विामनतळ येथे अटलसेतू लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर सभामंडपात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. दुतर्फा असलेल्या लोकांची गर्दी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हात उंचावून अभिवादन केले. त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आराखड्यानुसार हा मार्ग ३.५ किमीचा असणार असणार आहे. अशा या प्रकल्पाच्या कामाचे कंत्राट एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. तर या प्रकल्पाचा खर्च पुन्हा फुगला असून आता तो ९१५८ कोटींवर गेला आहे.
‘खड्ड्यामुळे मिळाले जीवदान’, अंतयात्रेसाठी नेत असताना ८० वर्षीय व्यक्ती झाला जिवंत
  • रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीवघेणे ठरलेले आहेत. पण हरियाणामधील एका ८० वर्षीय व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर रुग्णालयातून घरी अंतयात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचे कळले. हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील निसिंग शहरातील रहिवासी दर्शन सिंग ब्रार यांना पटियाला मधील रुग्णालयाने मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना कर्नाल येथे त्यांच्या घरी आणण्यात येत होते. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला.
  • ब्रार यांच्या नातूने माहिती दिल्यानुसार, रुग्णवाहिका रुग्णालयातून घरी जात असताना रस्त्यात एका खड्ड्यावर आदळली. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आजोबा ब्रार यांच्या हाताची हालचाल होत आहे. त्याने आजोबांच्या हृदयाचे ठोके तपासले असता ते धडधडत असल्याचे लक्षात आले. नातवाने लगेचच रुग्णवाहिका जवळच्या रुग्णालयात वळविण्यासाठी सांगितले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर ब्रार जिवंत असल्याचे सांगितले. दर्शन सिंग ब्रार यांची प्रकृती अजूनही नाजूक आहे, मात्र त्यांच्यावर आता पुन्हा उपचार सुरू झाले आहेत.
  • एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ब्रार यांचा दुसरा नातू बलवान सिंग याने सांगितले की, ८० वर्षांचे आजोबा गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे मोठ्या भावाने त्यांना पटियाला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चार दिवसांपासून आजोबा व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे हृदयाचे ठोके बंद पडल्यामुळे डॉक्टरांनी व्हेंटिलेटर हटवून त्यांना मृत घोषित केले.
  • बलवान सिंग यांनी पुढे सांगितले, रुग्णालयातून माझ्या भावाने फोन करून आजोबांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णालयापासून १०० किमींवर असलेल्या रुग्णालयात त्यांना नेण्यात येत होते. तोपर्यंत आम्ही नातेवाईकांशी संपर्क साधून अंत्यसंस्कारासाठी जमण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे अनेक लोकही जमले. आम्ही घरासमोर मंडप आणि लोकांना बसण्यासाठीची व्यवस्था केली. तसेच पार्थिवाचे दहन करण्यासाठी लाकूड आणि इतर वस्तूंची जमवाजमव केली.
  • मात्र निसिंग येथे असताना धांद गावानजीक रुग्णवाहिका खड्ड्यावर आदळली. त्यानंतर बलवान यांच्या भावाच्या लक्षात आले की, आजोबा हात हलवत आहेत. त्यांचे हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले आहेत. जेव्हा त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, तेव्हा डॉक्टरांनीही ते जिवंत असल्याचे सांगितले. बलवान सिंग यानंतर म्हणाले की, हा एक चमत्कारच आहे. खड्ड्यामुळे आजोबांना जीवदान मिळाले. आता आजोबांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशी आमची इच्छा आहे. जे लोक अंत्यसंस्कारासाठी जमले होते, त्या सर्वांनादेखील याचा आनंद झाला. आम्ही यासाठी देवाचे आभार मानतो, त्यांच्यामुळेच आजोबांचे हृदय पुन्हा धडधड करायला लागले.
…आणि सात वर्षांनंतर भारतीय वायूदलाच्या ‘त्या’ बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले!
  • भारतीय वायूदलाचं AN-32 हे विमान जवळपास सात वर्षांपूर्वी सर्वच रडारवरून गायब झालं होतं. या विमानाचा शोध घेण्यासाठी तेव्हा जवळपास २८ जहाज आणि एक मोठी पाणबुडी काम करत होते. पण या विमानाचा काहीच थांगपत्ता लागला नाही. पण अखेर सात वर्षांनंतर या विमानाचे अवशेष चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यापासून तब्बल ३०० किलोमीटर आत समुद्राच्या अगदी तळाशी सापडले आहेत. ही भारताच्या सर्वात मोठ्या ठरलेल्या शोधमोहिमांपैकी एक मानली जाते. पण तेव्हा या शोधमोहिमेला पूर्ण अपयश आलं होतं. आता हे अवशेष सापडल्यानंतर या विमानाचा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नेमकं घडलं काय?

  • चेन्नईतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशियन टेक्नोलॉजी अर्थात NIOT ही संस्था समुद्रातील अनेक संशोधन प्रकल्प राबवत असते. अशाच एका अंडरवॉटर वेहिकल अर्थात एयूव्हीची चाचणी करत असताना त्यांना एएन-३२ चे काही अवशेष सापडले. नॉर्वेहून आयात करण्यात आलेली ही एयूव्ही यांनी पहिल्यांदाच चाचणी करण्याच्या हेतूने समुद्रात जवळपास ३४०० मीटरपर्यंत खोलपर्यंत नेली होती. सुरुवातीला तिधे काही धातूचे तुकडे आढळून आले. त्यावरून त्यांना वाटलं की हे एखाद्या जहाजाचे अवशेष असावेत. पण हळूहळू गोष्टींचा सविस्तर उलगडा होत गेला.
  • “या AUV ला सर्वात पहिली गोष्ट दिसली ती म्हणदे एक गोलाकार पत्र्याचा तुकडा, त्यावर तीन रंगांचं चिन्ह दिसत होतं. NIOT च्या लोकांनी जेव्हा पहिल्यांदा ते पाहिलं, तेव्हा त्यांना वाटलं हे एखाद्या जहादाचे अवशेष असावेत. आसपासच्या भागाचंही निरीक्षण करण्यात आलं. आणखी काही धातूचे तुकडे आढळून आले. आम्ही त्याची छायाचित्रं भारतीय नौदल व भारतीय वायूदलाला पाठवली. शेवटी वायूदलानं ते त्यांच्याच विमानाचे अवशेष असल्याची पुष्टी केली”, अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रवीचंद्रन यांनी दिली.
  • “ही AUV काही त्या विमानाचे अवशेष शोधण्यासाठी तिथे पाठवण्यात आली नव्हती. याआधीही ही AUV अशा प्रकारच्या काही चाचण्यांसाठी समुद्रात खोलवर पाठवण्यात आली होती. पण यावेळी ती ३४०० मीटरपर्यंत खोल गेल्यानंतर हे अवशेष आढळून आले”, असंही रवीचंद्रन यांनी नमूद केलं.
पंतप्रधानांचे विशेष धार्मिक अनुष्ठान; मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळय़ापूर्वी  ११ दिवसांचे कठोर व्रत पाळणार
  • अयोध्येतील राम मंदिरात शुक्रवारी, २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून विशेष ११ दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केले. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावनांचा अनुभव आपण घेत असल्याचे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. नाशिकमधील पंचवटी येथून मोदींनी या धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली आहे.
  • ‘एक्स’वर मोदींनी नमूद केले, की मी भावनांनी ओथंबून गेलो आहे. आयुष्यात प्रथमच मी अशा भावना अनुभवत आहे. जे स्वप्न अनेक पिढय़ांनी संकल्पाप्रमाणे आपल्या हृदयात जपले ते स्वप्न जसेच्या तसे साकारताना पाहण्याचे सौभाग्य मला प्राप्त होत आहे. पंतप्रधानांनी एका धनिमुद्रित संदेशात म्हटले आहे. की हा आंतरिक प्रवास फक्त अनुभवता येतो, व्यक्त केला जाऊ शकत नाही. या भावनांची खोली, विस्तार आणि तीव्रता शब्दबद्ध करण्यास मी असमर्थ आहे. हा माझ्यासह सर्व भारतीयांसाठी आणि प्रभू रामचंद्रांच्या भक्तांसाठी एक पवित्र प्रसंग आहे. प्रत्येकजण २२ जानेवारी रोजी त्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. रामजन्मभूमीवर रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल, त्या पवित्र सोहळय़ाचे आपण साक्षीदार होणार, हे आपले भाग्यच आहे.
  • पंतप्रधानांनी नमूद केले, की आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. स्वामी विवेकानंदांनीच भारताच्या आत्म्याला साद घातली होती. आज तोच आत्मविश्वास भव्य राम मंदिराच्या रूपाने आपल्याला मिळणार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांचीही जयंती आहे. यावेळी आयुष्याच्या अखेपर्यंत जपमाळेने सीता-रामाचे नामस्मरण करणाऱ्या आपल्या आईची आठवण येणे स्वाभाविक असल्याचे मोदी म्हणाले.
  • आपण जेव्हा आयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र क्षणाचे साक्षीदार होऊ, तेव्हा मनात राममंदिराच्या पूर्ततेचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य भारतीयांच्या भावना असतील. जनताही देवाचेच रूप आहे आणि त्यांची ऊर्जा घेऊन ते मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतील. त्यांनी जनतेला आशीर्वाद देण्याची विनंतीही केली.

 

जगातील सर्वात लांब नदी क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ प्रवासासाठी सज्ज; आज पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १०.३० वाजता जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला हा हिरवा झेंडा दाखवणार आहेत. वाराणसीच्या रामनगर बंदरावरून ही क्रूझ प्रवासाला सुरूवात करेल. तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ‘टेंट सिटी’चे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
  • ‘ही’ आहेत क्रूझची वैशिष्टे - ‘एमव्ही गंगा विलास’ही क्रूझ ५१ दिवसांत ३२ प्रवाशांसह वाराणसीहून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत तीन हजार २०० किमीचा प्रवास करणार आहे. या क्रूझमध्ये ५ स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. यामध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजचा समावेश आहे.तसेच मेन डेकवरील ४० सीटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांसह बुफे काउंटर आहे. तर वरच्या डेकच्या बाहेर स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबल ठेवण्यात आले आहे. याबरोबच एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम देखील या क्रूझमध्ये बनवण्यात आली आहे.
  • १ मार्चला आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता - ‘एमव्ही गंगा विलास’ ही क्रूझ ६२.५ मीटर लांब आणि १२.८ मीटर रुंद आहे. तसेच या क्रूझमध्ये ४० हजार लिटरची इंधन टाकी आणि ६० हजार लिटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. ही क्रूझ नदीतून १० ते १२ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करेन. १३ जानेवारी रोजी वाराणसीवरून निघालेली ही क्रूझ १ मार्च रोजी आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान ती गंगा, हुगळी, विद्यावती, भागीरथी, मातला, पद्मा, जमुना आणि ब्रह्मपुत्रा या नदीतून प्रवास करणार आहे.
  • याबाबत बोलताना ५१ दिवसांची ही जलयात्रा देशाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याची व त्याच्या विविधतेच्या सुंदर पैलूंचा शोध लावण्याची अद्वितीय संधी देईल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या महासंग्रामाला आजपासून प्रारंभ
  • गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यकमाई करणारा भारतीय पुरुष संघ आता विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ४८ वर्षांपासूनचा पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. भारताला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला असून या स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतापुढे सलामीला तुल्यबळ स्पेनचे आव्हान असेल.
  • ऑलिम्पिकमध्ये तब्बल आठ सुवर्णपदके पटकावणारा भारतीय संघ गेल्या जवळपास पाच दशकांपासून विश्वचषकात मात्र पदकापासून वंचित आहे. १९७१च्या पहिल्या विश्वचषकात भारताने कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर १९७३च्या पुढील पर्वात भारताने रौप्यपदक जिंकले. त्यानंतर १९७५च्या विश्वचषकात भारताने एक पाऊल पुढे जात जेतेपदावर मोहोर उमटवली होती. परंतु, १९७८ ते २०१८ या कालावधीत भारताला विश्वचषकात साखळी फेरीचा टप्पाही ओलांडता आला नाही. यंदा मात्र भारताकडून अधिक दर्जेदार कामगिरीची अपेक्षा केली जाते आहे.
  • जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारतीय संघाला विश्वचषकाच्या जेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. बचावपटू आणि ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळताना चाहत्यांचाही भरघोस पाठिंबा लाभेल. भारतीय संघाने विश्वचषकापूर्वी झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका १-४ अशी गमावली. मात्र, भारताने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. त्यांना सहा वर्षांत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यातही यश आले. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे.
  • ग्रॅहम रीड यांची २०१९ मध्ये प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून भारतीय हॉकी संघाची कामगिरी उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासह भारताने प्रो लीग हॉकीच्या २०२१-२२च्या हंगामात तिसरे स्थान मिळवले होते. रीड यांनी खेळाडूंना आत्मविश्वास देताना त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतली आहे. तसेच भारतीय संघ आक्रमक शैलीत खेळत असून तांत्रिकदृष्टय़ा खेळाडूंमध्ये सुधारणा झाली आहे.
  • यंदाच्या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना शुक्रवारी स्पेनशी राउरकेला येथे रंगणार आहे. त्यानंतर भारताचे पुढील साखळी सामने इंग्लंड (रविवार, १५ जानेवारी) आणि वेल्स (गुरुवार, १९ जानेवारी) यांच्याविरुद्ध भुवनेश्वर येथील किलगा स्टेडियमवर होतील. भारताला साखळी फेरीचा अडथळा पार करण्यात यश आल्यास अंतिम आठमध्ये त्यांच्यापुढे गतविजेत्या बेल्जियमचे आव्हान असू शकेल.
जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन
  • जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झालं आहे. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शरद यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. समाजवादी राजकारणामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांचं निधन झाल्याची माहिती समजत आहे.
  • शरद यादव यांची कन्या सुभाषिनी यादव याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकद्वारे वडील शरद यादव यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ‘पापा नहीं रहे’ असं हिंदी भाषेतून लिहिलं आहे.
  • ७० च्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील चळवळीतून शरद यादव यांनी भारतीय राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांनी जनता दलापासून फारकत घेत १९९७मध्ये जनता दल (युनायटेड) ची स्थापना केली. २०१७ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर शरद यादव यांनी जेडीयूवरील आपला दावा गमावला. 
  • पुढे नितीश कुमार यांनी शरद यादव यांच्यावर पक्षाविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे त्यांना राज्यसभेतून अपात्र ठरवण्यात आले. २०१८ मध्ये, जेडी (यू) पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एलजेडीमध्ये प्रवेश केला होता.
जगासमोरील संकटांना विकसनशील देशांनी एकजुटीने सामोरे जावे : मोदी‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ’ परिषदेतील संबोधन
  • ‘‘जग सध्या संकटात आहे आणि ही अस्थिरता किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत विषमता दूर करण्यासाठी व संधी निर्माण करण्यासाठी विकसनशील देशांनी जागतिक, राजकीय व आर्थिक शासनप्रणालीच्या पुनर्रचनेसाठी एकत्र आले पाहिजे. जगाच्या दक्षिण क्षेत्रातील देशांनी (ग्लोबल साउथ) त्यांना अनुकूल नसलेल्या प्रणाली व परिस्थितींवर अवलंबून राहण्याचे दुष्टचक्र टाळले पाहिजे,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सांगितले.
  • ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ’ परिषदेस दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना मोदींनी अन्न, इंधन आणि खतांच्या वाढत्या किमती, करोना महासाथीचा आर्थिक परिणाम तसेच हवामान बदलामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तींबद्दल चिंता व्यक्त केली. विविध विकसनशील देशांतील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन करताना मोदी म्हणाले, की आम्ही नवीन वर्षांरंभी भेटत आहोत. हे वर्ष नवीन आशा आणि नवी ऊर्जा घेऊन आले आहे. आपण मागील वर्षांचे पान आता उलटले आहे. या सरलेल्या वर्षांत आम्ही युद्धे, संघर्ष, दहशतवाद आणि भू-राजकीय तणाव अनुभवला. 
  • करोना महासाथ, अन्न, खते, इंधन यांच्या वाढत्या किमती, हवामान बदलामुळे उद्भवलेल्या आपत्ती आणि त्याचा दूरगामी आर्थिक परिणामांनाही आपण गेल्या वर्षी सामोरे गेलो. समावेश आहे. जग अजूनही संकटाच्या स्थितीत आहे. ही अस्थिरता किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे.
  • सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्यासाठी कायद्याचे राज्य, मतभेद आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण आणि अधिक कालसुसंगत राहण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्याचा सल्लाही यावेळी मोदींनी दिला.
हिवाळ्यात नेहमी थकल्यासारखं वाटतं का? तर आजपासून ‘हे’ पदार्थां खा आणि फ्रेश राहा
  • अनेकांना बदलत्या हवामानाचा त्रास होत असतो. कारण अशा लोकांच्या शरीरावर हवामान बदलेलं तसे काही फरक जाणवतात. सध्या हिवाळा सुरु असल्याने थंडी मोठ्या प्रमाणात पडत आहे. अशा दिवसांमध्ये काही लोकांना रात्रभर झोपूनही शरीरात थकवा जाणवतो आणि त्यांच्या शरीरातील सुस्तीही जात नाही. त्यामुळे अशा लोकांना सतत अंथरुणावर झोपायला आवडतं. शिवाय ते हिवाळ्यात कामं करण्याची, स्वयंपाक करण्याची किंवा घराबाहेर पडण्याचं धाडही ते लोक करत नाहीत. त्यांना फक्त अंथरुणावर झोपायला, उबदार कपडे घालून निवांत पडायला आवडतं. मात्र, या थकवा आणि सुस्तीचा तुमच्या दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम होत असतो.
  • जेपी हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. ए. झीनत यांच्या मते, अनेक लोकांना सतत थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. थकवा आणि सुस्ती येण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये काही लोक आरामदायी जीवन आणि लठ्ठपणामुळे सुस्त असतात. तर शरीरात लोह आणि व्हिटॅमिन बी 12 ( vitamin b12)च्या कमतरतेमुळेही थकवा येऊ शकतो. महिलांमध्ये थायरॉईड हार्मोनच्या कमतरतेमुळेही अशा प्रकारची समस्या उद्भवते.
  • हिवाळ्यात अनेकांची चयापचय क्रिया (मेटाबॉलिज्म) कमकुवत होते, त्यामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता भासते. शरीरातील अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होण्याला चयापचय म्हणतात. शरीराला काम करण्यासाठी, अन्न पचवण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी, हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते, त्यामुळे चयापचय वाढवणे आवश्यक असते. मेटाबॉलिज्म कमी असताना थकवा आणि सुस्ती जाणवते. तुम्हालाही हिवाळ्यात एनर्जीने परिपूर्ण राहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आहारात काही बदल करणं आवश्यक आहे. शिवाय तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा लागेल ज्यामुळे ऊर्जा वाढेल आणि आणि शरीराती सुस्ती निघून जाईल.
  • कानपूरच्या गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे डॉ विनोद मिश्रा यांच्या मते, मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घ्यायला पाहिजे. जेवणामध्ये प्रथिनांचे स्रोत समाविष्ट केले पाहिजेत. शरीराच्या प्रत्येक अवयवाची देखभाल करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. यासाठी तुम्ही हिवाळ्यात शेंगदाणे, हिरवी मूग डाळ, हरभरा आणि पनीर या पदार्थांचे सेवन करायला हवं.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जानेवारी २०२२
 
रत्नागिरीत आढळला सुमारे ४०० वर्षांचा आफ्रिकन ‘बाओबाब’ वृक्ष, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये :

रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ४०० वर्षांहून अधिक जुना महाकाय आफ्रिकन बाओबाब वृक्ष आढळला आहे. या वृक्षाला भारतामध्ये गोरख चिंचेचे झाड म्हणून ओळखले जाते. हे वृक्ष आढळल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी त्याचे महत्त्व ओळखून तात्काळ त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यटनदृष्ट्या ‘हेरिटेज ट्री’चा वापर करून तेथे उत्तम पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच खासगी कंपनीच्या सीआरपीएस फंडातून हेरिटेज ट्री म्हणून पर्यटन सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येईल. या झाडाचे महत्व काय, झाड किती वर्षांपूर्वीचे आहे ही माहिती देखील तिथे लावली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

बाओबाब म्हणजेच गोरख चिंच मूलतः आफ्रिका खंडातला, मादागास्कर, अरबी द्वीपकल्प तसेच ऑस्ट्रेलिया येथे आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा वृक्ष आहे. याच्या ९ प्रजातींपैकी ६ प्रजाती केवळ मादागास्करमध्ये आढळतात. त्याची उंची ५० फुटांपर्यंत होते. हा पानगळी वृक्षात मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो.

कोवॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा आणि Omicron विषाणूला उदासिन करतो; भारत बायोटेकचा दावा :

देशातला करोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र दिसत असतानाच अचानक ओमायक्रॉन नावाच्या नव्या करोनाप्रकाराने डोकं वर काढलं. त्याच्या दहशतीखाली सगळं जग असतानाच आत्ता उपलब्ध असलेल्या लसी ओमायक्रॉनविरुद्ध प्रभावी आहेत की नाही, याबाबत चर्चा सुरू आहेत.

अशातच आता भारत बायोटेकने एक चांगली बातमी दिली आहे. कोवॅक्सिन लसीचा बूस्टर डोस हा डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्ही विषाणूप्रकारांशी लढण्यास समर्थ असल्याचं भारत बायोटेकचं म्हणणं आहे.

भारत बायोटेकने सांगितलं की कोवॅक्सिन लसीचा बूस्टर डोस हा या दोन्ही प्रकारच्या व्हेरिएंटला उदासिन करतो. यासंदर्भात केलेल्या चाचण्यांचे परिणाम सांगतात की प्रयोगासाठी घेतलेल्या नमुन्यांपैकी डेल्टा विषाणू असलेल्या १०० टक्के नमुन्यांमध्ये हा विषाणू उदासिन झालेला दिसला. तर ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या ९० टक्के नमुन्यांमध्ये हा विषाणूप्रकार उदासिन झाल्याचं दिसून आलं.

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - सायना, प्रणॉय, लक्ष्य दुसऱ्या फेरीत :

माजी विजेती सायना नेहवाल, जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुनरागमन करणारा एचएस प्रणॉय यांनी दिमाखदार विजयांसह इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेची बुधवारी दुसरी फेरी गाठली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेही पुरुष दुहेरीत विजयी अभियान सुरू केले आहे.

महिला एकेरीत दुखापतींमुळे गतवर्षी अनेक स्पर्धामध्ये सहभागी होऊ न शकलेली माजी जागतिक अग्रस्थानावरील बॅडिमटनपटू सायनाने चेक प्रजासत्ताकच्या तेरेझा स्व्हाबिकोव्हाविरुद्ध सरशी साधली. या सामन्यात २०-२२, ०-१ अशा पिछाडीवर असलेल्या तेरेझाने पाठीच्या दुखापतीमुळे हा सामना अर्धवट सोडला.

चौथ्या मानांकित सायनाची दुसऱ्या फेरीत मालविका बनसोडशी गाठ पडणार आहे. मालविकाने समिया इमान फारूखीचा २१-१८, २१-९ असा पाडाव केला. आकर्षी कश्यपने अनुरा प्रभुदेसाईविरुद्ध २१-१४, २१-१४ असा विजय मिळवला.

सर्व दुकानांना मराठीत नामफलक बंधनकारक ; अन्य भाषांनाही मुभा, पण अक्षरांचा आकार मराठीपेक्षा मोठा नको :

राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल.

परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा दुकानास, बार, रेस्टॉरंटला महापुरुष किंवा आदरणीय महिलांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

“TRP रेटिंग्ज पुन्हा सुरू करा”, केंद्र सरकारचे BARC ला आदेश; वृत्तवाहिन्यांना दिलासा :

जवळपास १५ महिन्यांपासून बंद असलेले TRP रेटिंग्ज पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बार्कला त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. तसेच, गेल्या ३ महिन्यांचे रेटिंग्ज तातडीने जाहीर करण्याचे देखील निर्देश केंद्र सरकारने BARC ला दिले आहेत.

त्यामुळे लवकरच वृत्तवाहिन्यांसाठीचे टीआरपी रेटिंग्ज जाहीर केले जाणार आहेत. यासंदर्भात ऑक्टोबर २०२०मध्ये उघड झालेल्या टीआरपी घोटाळ्यामुळे या आकडेवारीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे वृत्तवाहिन्यांसाठी पुन्हा एकदा टीआरपी रेटिंग्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऑक्टोबर २०२०मध्ये उघड झालेल्या टीआरपी घोटाळ्यानंतर वृत्तवाहिन्यांसाठीचे टीआरपी रेटिंग्ज थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. BARC अर्थात Broadcast Audience Research Council ला केंद्र सरकारने तसे आदेश दिले होते.

मुंबई पोलिसांनी दावा केला होता की बार्क आणि हस्ना या ग्राहक संशोधन कंपनीकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर टीआरपीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं. यानुसार टीआरपी मापन करण्यासाठी निवडण्यात आलेल्या विशिष्ट घरांमध्ये विशिष्ट वृत्तवाहिनी सुरू ठेवण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं वादात सापडली होती.

१३ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.