चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ जानेवारी २०२3

Date : 12 January, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

नागपूर विद्यापीठाच्या पुढील परीक्षा होणार नाही 

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अट्टाहासामुळे परीक्षेचे काम ‘एमकेसीएल’ला देण्यात आले. मात्र, आता प्रशासन तोंडघशी पडले असून, ‘एमकेसीएल’कडून विद्यार्थ्यांची माहिती न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील परीक्षाच होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
  • ‘एमकेसीएल’ने वित्त विभागाकडे ३३ लाखांची देयके सादर केली आहेत. परंतु, संंबंधित कंपनीशी झालेला करारच अवैध असल्याने त्यांना पैसे कुठल्या आधारावर देणार, असा काहींचा आक्षेप आहे. त्यामुळे, कुलगुरूंच्या चुकीच्या निर्णयाचा फटका प्रशासनासह विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागणार आहे.
  • कुलगुरू डॉ. चौधरी यांनी ‘एमकेसीएल’सोबत विद्यापीठाचा करार रद्द झालेला असतानाही संबंधित कंपनीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून त्यांना परीक्षेचे काम देण्याचा निर्णय घेतला. ‘एमकेसीएल’ने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती संकलित करून परीक्षा घेतल्या. मात्र, या परीक्षांचा निकाल सहा महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटूनही जाहीर करता आला नाही. यासंदर्भात राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे अनेक तक्रारी झाल्या. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूर विद्यापीठामध्ये संबंधित विषयावर बैठक घेऊन ‘एमकेसीएल’सोबतचा करार रद्द करण्याच्या सूचना दिल्या.
  •  विद्यापीठाने काही महिन्यांनी करार रद्द केला. मात्र, आता ‘एमकेसीएल’ परीक्षेचे काम केल्यामुळे विद्यापीठाकडे ८६ लाख रुपयांची मागणी करत आहे. ‘एमकेसीएल’ला पैसे न दिल्यास ते विद्यार्थ्यांची त्यांच्याकडे असलेली संपूर्ण माहिती देणार नाही. माहिती न मिळाल्यास विद्यापीठाला पुढील परीक्षा घेता येणार नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या पुढील परीक्षांना आडकाठी निर्माण होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा, केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी ७५ टक्के गुण अनिवार्यतेबाबत एनटीएकडून अंशतः बदल

  • केंद्रीय संस्थांतील अभियांत्रिकी-तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी यंदा लागू करण्यात आलेली बारावीला ७५ टक्के अनिवार्यतेच्या अटीमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार (एनटीए) सर्व मंडळांच्या बारावीच्या परीक्षेत पहिल्या २० पर्सेंटाइलमधील विद्यार्थी त्यांच्या जेईई मुख्यतील गुणांसह प्रवेशासाठी पात्र ठरू शकणार आहेत.
  • एनटीएने करोना काळात केंद्रीय संस्थांतील प्रवेश पात्रतेमध्ये बदल करून बारावीला ७५ टक्के गुणांच्या अनिवार्यतेची अट स्थगित केली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी बारावीला ७५ टक्के गुणांची अट पुन्हा लागू करण्याचा निर्णय एनटीएने घेतला. या निर्णयावर विद्यार्थी-पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. एनटीएसह केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे ही अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, न्यायालयात याचिकाही दाखल झाली. या पार्श्वभूमीवर एनटीएने घेतलेल्या निर्णयाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
  • एनआयटी, आयआयआयटी आणि केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जेईई मुख्यच्या गुणांसह बारावीला किमान ७५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे किंवा संबंधित परीक्षा मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे गुण पहिल्या २० पर्सेंटाइलमध्ये असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीला ६५ टक्के गुण अनिवार्य आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

नदीतील सर्वाधिक लांब क्रूझचे उद्या उद्घाटन

  • ‘एमव्ही गंगा विलास’ या जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझचे, तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ‘टेंट सिटी’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत.
  • याच कार्यक्रमात पंतप्रधान १ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या इतर अनेक अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांचे उद्घाटन करणार असून, काहींचा शिलान्यासही करणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. 
  • ५१ दिवसांची ही जलयात्रा देशाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याची व त्याच्या विविधतेच्या सुंदर पैलूंचा शोध लावण्याची अद्वितीय संधी देईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.

वर्षभरात ‘बीएसएनएल’चे ‘५-जी’ गावागावात! ;‘सी डॉट, ‘टीसीएस’द्वारे विकसित तंत्रज्ञानावर आधारित सेवा

  • दिल्ली, मुंबई या महानगरांमध्ये जीओ, एअरटेल या खासगी भ्रमणध्वनी सेवा कंपन्यांनी ‘५ जी’ सेवा पुरविण्यास सुरूवात केली असताना सरकारी कंपनी ‘बीएसएनएल’देखील आता या स्पर्धेत उतरणार आहे. येत्या तीन-चार महिन्यांत देशभरात ‘४-जी’ सेवा सुरू होणार असून वर्षभरात ‘५-जी’ सेवा गावागावात पोहोचण्याची शक्यता आहे.
  • देशी बनावटीचे दूरसंचार तंत्रज्ञान विकसित करून ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (बीएसएनएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीद्वारे सेवा पुरवण्याचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. दूरसंचार तंत्रज्ञान विकसित करणारी सरकारी संस्था, ‘सेंटर फॉर डेव्हेलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स’ (सी डॉट) आणि टाटा समूहाच्या ‘टीसीएस’ कंपनीने एकत्रितपणे हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त प्रकल्पाअंतर्गत ५०० दिवसांमध्ये देशभर २५ हजार मोबाइल टॉवर उभे केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने केली होती. टॉवर उभारण्याचे काम अजून पूर्ण झाले नसले तरी, एप्रिल २०२३ मध्ये ‘बीएसएनएल’ची ‘४-जी’ सेवा देशभर कार्यान्वित होऊ शकेल, असे दूरसंचार मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.
  • मोबाइल टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले नसल्याने देशी तंत्रज्ञानाची सेवा ग्राहकांना मिळण्यास विलंब होत आहे. ‘सी डॉट’ आणि ‘टीसीएस’च्या या संयुक्त उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ‘४ जी’ तंत्रज्ञानाच्या श्रेणीत सुधारणा करून ‘५ जी’ सेवाही पुरवली जाणार आहे. पुढील वर्षी एप्रिल २०२४ पर्यंत म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत ‘बीएसएनएल’ची ५ जी सेवाही ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल. 
  • सध्या जीओ, एअरटेल आणि व्होडाफोन या तीन खासगी कंपन्यांकडून सेवा घेण्याशिवाय ग्राहकांना पर्याय नाही. मात्र ‘बीएसएनएल’ची ‘४ जी’ सेवा ग्रामीण भागांतही पोहोचू शकेल व तिथे उच्चगतीची ब्रॉडबॅण्डसेवाही मिळू शकेल. ‘बीएसएनएल’मुळे ग्राहकांना नवा पर्याय उपलब्ध होऊ शकेल. शिवाय, खासगी कंपन्यांवरील सेवा पुरवठय़ाचा ताणही कमी होण्यास मदत होईल, असे दूरसंचार मंत्रालयातील उच्चपदस्थांचे म्हणणे आहे.

‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ला गोल्डन ग्लोब ; देशभरातून शुभेच्छांचा वर्षांव; सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान मात्र हुकला

  • एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला. टेलर स्विफ्ट, रिहाना, लेडी गागा यांच्यासारखे दिग्गजांची गाणी स्पर्धेत असताना ‘सर्वोत्तम चित्रपट संगीत’ या प्रकारात ‘आरआरआर’ने बाजी मारली. सर्वोत्तम बिगर-इंग्रजी चित्रपट पुरस्काराने मात्र आरआरआला हुलकावणी दिली.
  • मंगळवारी रात्री हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशनने आयोजित केलेला गोल्डन ग्लोब पुरस्कार पार पडला. यामध्ये आरआरआरला दोन नामांकने मिळाली होती. ज्येष्ठ संगीतकार एम. एम. कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेले, कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला पुरस्कार मिळाल्याची घोषणा जेना ओर्टेगा हिने व्यासपीठावरून केली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला.
  • किरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारताना राजामौली यांचे आभार मानले. सर्वोत्तम बिगर इंग्रजी प्रकारात अर्जेटिनामध्ये बनलेल्या ‘अर्जेटिना १९८५’ या चित्रपटाने आरआरआरला मात दिली. असे असले तरी एका भारतीय चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • शुभेच्छांचा वर्षांव - ‘आरआरआरने पटकाविलेल्या पुरस्काराचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. ही खूप मोठी कामगिरी आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या चमूचे अभिनंदन केले. चित्रपटाच्या या यशावर बॉलिवूडमधील अनेकांनीही शुभेच्छांचा वर्षांव केला. अभिनेते अमिताभ बच्चन, शहारूख खान, चिरंजीवी, प्रभास यांनी राजामौली आणि चित्रपटाच्या चमूचे ट्विटरद्वारे अभिनंदन केले.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ जानेवारी २०२२
टाटा समूह दोन वर्षांसाठी ‘आयपीएल’चे शीर्षक प्रायोजक :

देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या टाटा समूहाने येत्या हंगामापासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचे शीर्षक प्रायोजकत्व येत्या हंगामापासून दोन वर्षांसाठी मिळवले आहेत. चायनीज मोबाइल निर्मिती कंपनी व्हिवो यांच्या जागी टाटा समूहाकडे हे अधिकार देण्यात आल्याचे मंगळवारी ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूह दोन वर्षांसाठी सुमारे ६७० कोटी रुपये (वर्षांसाठी प्रत्येकी ३३५ रुपये) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) देणार आहे. या करारातील ३०१ कोटी रुपये शीर्षक प्रायोजकत्वाचे आहेत, तर अतिरिक्त ३४ कोटी रुपये संघविस्तारामुळे सामन्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल नमूद करण्यात आले आहेत.

तथापि, व्हिवोला दोन वर्षे आधी करार स्थगित करण्यासाठी एकूण ४५४ कोटी रुपयांचा (२०२२साठी १८३ कोटी रुपये आणि २०२३साठी २११ कोटी रुपये) भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ला २०२२ आणि २०२३ या दोन हंगामांमध्ये एकूण ११२४ कोटी रुपये महसूल मिळणार आहे. व्हिवो २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांच्या शीर्षक प्रायोजकत्वासाठी ९९६ कोटी रुपयांना बांधिल होते. २०२२मध्ये ४८४ कोटी आणि पुढील वर्षी ५१२ कोटी रुपये यात नमूद करण्यात आले होते.

२०१८ ते २०२२ या कालावधीत व्हिवोकडे शीर्षक प्रायोजकत्व असताना हा करार २२०० कोटी रुपयांचा होता. परंतु २०२०मध्ये भारत-चीन सैन्यात गढवाल खोऱ्यात झालेल्या चकमकीमुळे व्हिवोचा करार एक वर्षांसाठी स्थगित करण्यात आला होता. त्या वेळी ड्रीम११ने २२२ कोटी रुपये मोजून त्यांची जागा घेतली होती.

२०२१मध्ये व्हिवो कंपनी आपले शीर्षक प्रायोजकत्व अधिकार अन्य कंपनीकडे सुपूर्द करील आणि ‘बीसीसीआय’ची त्याला मान्यता असेल, अशी चर्चा ऐरणीवर होती. परंतु प्रत्यक्षात व्हिवोचे पुनरागमन झाले. ‘बीसीसीआय’ शीर्षक प्रायोजक रकमेतील ५० टक्के रक्कम स्वत:कडे ठेवते, तर उर्वरित रक्कम १० संघांमध्ये समान वाटप करते.

हिरकणीचा वारसा! १८ महिन्यांच्या उर्वीने आईसोबत फक्त साडे तीन तासात सर केला ‘कळसूबाई शिखर’ :

महाराष्ट्र वीरांची भूमी म्हणून का ओळखली जाते याचा प्रत्यय आजची पिढीही वारंवार आपल्या कृतींमधून दाखवून देत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे अनेक मावळे आणि हिरकणी आजही या मातीत आहेत.

संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा आपला इतिहास आपल्या कृतींमधून जिवंत करत पुन्हा एकदा आपली नोंद घेण्यास ते भाग पाडत आहेत. सोलापूरच्या श्रुती गांधीने आपल्या १८ महिन्यांच्या लेकीसोबत राज्यातील सर्वोच्च शिखर सर करत हे दाखवून दिलं आहे.

फक्त १८ महिन्याच्या उर्वी प्रितेश गांधी या सोलापूरच्या चिमुरडीने आपल्या आईसोबत अवघ्या साडेतीन तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केलं आहे. अवघ्या साडेतीन तासात उर्वी आणि तिची आई श्रुती यांनी कळसूबाईचा अवघड शिखर सर करत जबरदस्त कामगिरी केली.

सोलापुरातील गांधी कुटुंबीय हे शिवविचारांवार श्रद्धा ठेऊन गडकिल्यांच्या भ्रमंतीची मोहीम मागच्या वर्षभरापासून राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज पहाटे शिखर सर करत तिरंगा फडकवला. पहाटे साडे चार वाजता त्यांनी चढाईला सुरुवात केली होती. ८ वाजण्याच्या सुमारास या मायलेकींनी शिखर सर केला होता.

ओमायक्रॉनची लागण प्रत्येकालाच होणार, बूस्टर डोसही संसर्ग थांबवू शकणार नाही; आरोग्य तज्ज्ञांची माहिती :

गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर, करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत १५-१८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला.

शिवाय आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली. मात्र, हा बूस्टर डोस देखील लोकांना ओमायक्रॉनची लागण होण्यापासून रोखू शकणार नाही, असं एका आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलंय.

आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीमधील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलायल एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, “करोना हा आता भयानक आजार राहिलेला नाही.

नवीन स्ट्रेनचा प्रभाव खूपच कमी आहे आणि खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमायक्रॉन हा एक असा आजार आहे, ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही. कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्याला कधी ओमायक्रॉनची लागण झाली,” असं त्यांनी सांगितलं.

दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद ; कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा आदेश ; रेस्ताराँ-बारही बंद, घरपोच सेवांना मुभा "

 दिल्लीतील करोनाचा संसर्गदर २५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे राजधानीत निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व अपवाद केलेल्या खासगी सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारने दिले असून कर्मचाऱ्यांनी घरातून कार्यालयीन कामे करण्याची सूचना करण्यात आली आहे.

खासगी बँका, रिझव्‍‌र्ह बँकेशी संबंधित कार्यालये, बिगर बँक वित्तीय संस्था, सूक्ष्मवित्तीय पुरवठादार संस्था, वकिलांची कार्यालये, कुरिअर सेवा तसेच, अत्यावश्यक सेवांमध्ये औषधपुरवठासंदर्भातील कार्यालये-दुकाने, दूरध्वनी सेवा, मालवाहतूक व विमान सेवा यांची कार्यालये मात्र खुली राहतील. या सेवांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये जाण्याची मुभा देण्यात आली आहे.

राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरातील रेस्ताराँ व बार बंद राहतील. रेस्ताराँची घरपोच सेवा मात्र सुरू राहणार आहे. मॉल व बाजार सम-विषय तारखांनुसार खुली राहतील. रात्रीची संचारबंदी तसेच, शनिवार-रविवारची ४८ तासांची संचारबंदीही कायम राहणार आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती असून उर्वरित कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

अश्मिताचा धक्कादायक विजय :

युवा बॅडिमटनटू अश्मिता छलिहाने इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत मंगळवारी पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद करताना पाचव्या मानांकित एव्हगेनिया कोसेत्सकायाला पराभूत केले. अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत विश्वविजेत्या लो कीन येवला पहिल्या विजयासाठी तीन गेमपर्यंत झगडावे लागले, तर किदम्बी श्रीकांतने दिमाखदार विजय नोंदवला.

लो याने कॅनडाच्या शिओडाँग शेंगला १६-२१, २१-४, २१-१३ असे नमवले. श्रीकांतने सिरी वर्मावर २१-१७, २१-१० असा विजय मिळवला. चिराग सेनचे आव्हान मात्र सलामीलाच संपुष्टात आले. त्याने ८-२१, ७-२१ असा मलेशियाच्या सूंग जू व्हेनकडून पराभव पत्करला. बिगरमानांकित छलिहाने फक्त ३१ मिनिटांत जागतिक क्रमवारीत २८व्या क्रमांकावरील रशियाच्या कोसेत्सकायाला २४-२२, २१-१६ असे नामोहरम केले. याचप्रमाणे दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने श्रीकृष्णा प्रिया कुदारावल्लीवर २१-५, २१-१६ असा विजय मिळवला.

मिश्र दुहेरीत के. साईप्रतीक आणि गायत्री गोपीचंद जोडीने इशान भटनागर आणि तनिशा कॅस्ट्रो जोडीचा २१-१६, १६-२१, २१-१७ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत अग्रमानांकित मोहम्मद एहसान आणि हेंड्रा सेटियावान या इंडोनेशियाच्या जोडीने भारताच्या प्रेम सिंह चौहान आणि राजेश वर्मा जोडीला २१-१८, २१-१० असे हरवले.

आयपीएलनं VIVOला म्हटलं ‘टाटा’..! लीगला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर :

आयपीएल २०२२ मध्ये मोठे बदल होणार आहेत. टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी विवोने (VIVO) लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक आहेत, परंतु या काळात टाटा मुख्य प्रायोजक राहील. या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असेल. विवोने २०१८ मध्ये वार्षिक ४४० कोटी रुपये खर्चून टायटल हक्क विकत घेतले होते. चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी २०२० मध्ये भारत-चीन राजनैतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबवला. तेव्हा हे अधिकार Dream11 ला हस्तांतरित केले गेले.

बोर्ड आणि विवो यांच्यातील पाच वर्षांचा करार २०२० हंगामापर्यंत होता आणि एका वर्षाच्या ब्रेकमुळे २०२३ पर्यंत वाढवण्यात आला होता. मंगळवारच्या बैठकीनंतर, टाटा समूह २०२२ आणि २०२३ हंगामासाठी शीर्षक प्रायोजक म्हणून कायम राहील, असा निर्णय घेण्यात आला.

विवोने आता आयपीएलचे अधिकार टाटाकडे हस्तांतरित केले आहेत. २०२२च्या हंगामासाठी Dream11 ही कंपनी आयपीएलची टायटल स्पॉन्सर होती. त्याला २२२ कोटी रुपयांचे प्रायोजकत्व अधिकार मिळाले. आयपीएल २०२० करोनामुळे यूएईमध्ये खेळवण्यात आले.

१२ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.