चालू घडामोडी आणि दिनविशेष - 11 डिसेंबर 2023

Date : 11 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत-दक्षिण आफ्रिकेतील पहिला सामना रद्द, ‘या’ तारखेला होणार दुसरी लढत
  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे या सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत हवामान आणि मैदानाची स्थिती लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामन्याची नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होणार होती. त्यानंतर सामना साडेसात वाजता सुरू होणार होता. मात्र, बराच वेळ पाऊस पडत होता. त्यामुळे नाणेफेक वेळेवर होऊ शकली नाही. यानंतर पाऊस थांबण्याची खूप वेळ प्रतीक्षा पाहण्यात आली, मात्र पाऊस थांबला नाही. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

प्रेक्षक निराश होऊन परतले -

  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये आले होते. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती. मात्र, आता चाहत्यांना निराश होऊन घरी परतावे लागले. सामन्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहिली असली, तरी तब्बल अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता उभय संघांमधला दुसरा सामना १२ डिसेंबरला गेबेरहा येथे होणार आहे. तिसरा आणि शेवटचा सामना १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे.

टी-२० विश्वचषकापूर्वी भारताचे फक्त ५ सामने शिल्लक -

  • आयसीसी टी-२० विश्वचषका २०२४ यावेळी परदेशी भूमीवर खेळवला जाईल. या विश्वचषकापूर्वी भारताला फक्त ५ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. यापैकी भारतीय संघ अफगाणिस्तानसोबत मायदेशात तीन सामने खेळणार आहे. अफगाणिस्तानचा संघ जानेवारी २०२४ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. जिथे उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.
‘एमपीएससी’मार्फत पदभरती शक्यता धूसरच! – शासनाची घोषणा हवेत, अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीनंतरच?
  • शासकीय सेवेत ‘गट-क’ची पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी झाला आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर हालचाली होत नसल्याने याची अंमलबजावणी लांबली आहे. प्रक्रिया सुरू होण्यास अद्याप सहा महिने लागणार असल्यामुळे आता लोकसभा निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी शक्य नसल्याचे चित्र आहे.
  • विविध खात्यांतील वर्ग दोन व तीनची पदे पूर्वी ‘महापरीक्षा पोर्टल’मार्फत भरली जात होती.  परंतु, तोतया उमेदवार, गुणांमध्ये फेरफार अशा प्रकारांमुळे पोर्टल बंद करून ‘महाआयटी’तर्फे कंपन्यांना काम देण्यात येऊ लागले. त्यालाही विरोध झाला व ‘एमपीएससी’मार्फत परीक्षा घेण्याची मागणी झाली. त्यामुळे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा निर्णय २ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आला. लिपिक-टंकलेखक पदे वगळून उर्वरित पदे ‘एमपीएससी’च्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही शासनाने ७५ हजार पदांच्या भरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांना कंत्राट दिले.
  • अनेक विभागांच्या परीक्षा या दोन कंपन्यांकडून सुरू असून यात गैरप्रकाराचे आरोप झाले असतानाही ‘एमपीएससी’कडून भरतीप्रक्रियेची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी झालेली नाही. सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यास आणखी सहा महिने लागणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी दिली. मात्र साधारणत: त्याच काळात लोकसभा व पाठोपाठ विधानसभा निवडणूक असेल. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात सरळसेवा भरती घेणाऱ्या ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या कंपन्यांवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे सेवा प्रवेश नियमात लवकर सुधारणा करून सर्व भरती परीक्षा ‘एमपीएसी’च्या कक्षेत आणाव्यात, अशी मागणी स्टुडंट्स राइट असोसिएशनच्या महेश बडे यांनी केली.

खासगी कंपन्यांना विरोध का?

  • खासगी कंपन्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षांमध्ये पेपरफुटी, तोतया उमेदवार बसवणे, केंद्रावर कॉपी पुरवणे असे विविध गैरप्रकार समोर आले आहेत. कंपन्यांचे स्वत:चे परीक्षा केंद्र नसल्यामुळे हा गोंधळ होत असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो.
समृद्धी महामार्गावरून वर्षभरात ५८ लाख वाहनांचा प्रवास; ४२२ कोटींची पथकर वसुली
  • मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नागपूर – शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते.  वर्षभरात या मार्गावरून ५८ लाख १ हजार १५४ वाहनांनी प्रवास केला आहे. तर, या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लाख ७९ हजार ३९९ रुपये पथकर वसूल करण्यात आला आहे.
  • राज्याची राजधानी आणि उपराजधानी यामधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ७०१ किमीचा समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा महामार्ग आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी कामास विलंब झाला असून एमएसआरडीसीने टप्प्याटप्प्यात हा मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. तर, मे २०२३ मध्ये शिर्डी – भरवीर अशा ८० किमीच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते.

७३ अपघातात १४२ जणांचा बळी.. 

  • समृद्धी महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्यापासून  हा मार्ग अपघातांमुळे वादात सापडला आहे. वर्षभरात या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आतापर्यंत (डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३) या महामार्गावर ७३ अपघात झाले.  यात १४२ प्रवाशांचा बळी गेला. सर्वाधिक २० अपघात हे वाहनांवरील नियंत्रणामुळे झाले.
ठरलं, ‘इंडिया’ आघाडीची चौथी बैठक ‘या’ दिवशी होणार, लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता
  • राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ही राज्ये हातातून गेल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ६ डिसेंबरला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. पण, ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी बैठकीला येण्याचं टाळलं होतं. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता, १९ डिसेंबरला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
  • राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेशाच्या मतमोजणीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ६ डिसेंबरला ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली होती. पण, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नियोजित कार्यक्रमामुळे तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी मिचाँक चक्रीवादळामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला येणं टाळलं होतं. यामुळे बैठक पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
  • आता काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट करत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. ‘एक्स’वर जयराम रमेश म्हणाले, “इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी १९ डिसेंबर २०२३ ला दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत पार पडेल. जुडेगा भारत, जितेंगा इंडिया!”
  • दरम्यान, काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यामुळे या बैठकीत समान किमान कार्यक्रम आणि लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
चिंता वाढली! करोनाने पुन्हा डोकं वर काढलं, २४ तासांत आढळले १४८ नवे रुग्ण, ८०८ रुग्णांवर उपचार
  • देशात पुन्हा एकदा करोनाचा विस्फोट झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अनेक महिन्यांनंतर देशात मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १४८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून ८०८ करोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. याचाच अर्थ देशात सातत्याने करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. चीनमध्ये एका गूढ आजाराने तिथल्या आरोग्य विभागाची चिंता वाढवलेली असताना भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
  • चीनमध्ये न्यूमोनियाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याने तिथला आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तिथल्या अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना हा न्यूमोनिया झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. एका बाजूला चीनमधील वैज्ञानिक या नव्या न्यूमोनियावर संशोधन करत असताना भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भारताचं आरोग्य मंत्रालय सतर्क झालं आहे. सध्या तरी या गोष्टीची अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं म्हटलं जात आहे. कारण भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेलं आहे. परंतु, लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
  • हिवाळा सुरू झाल्यानंतर देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. गेल्या तीन वर्षांमध्ये आरोग्य विभागाला असा अनुभव आला आहे. गेल्या वर्षीदेखील हिवाळा सुरू होताच अचानक करोनाबाधित रुग्ण आढळू लागले होते. पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाचं या वाढत्या आकडेवारीवर लक्ष आहे. तसेच कोणीही चिंता करू नये असं म्हटलं आहे.

चीनमधल्या गूढ आजाराचा भारतात प्रवेश?

  • चीनमधील एका गूढ विषाणूने तिथल्या आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, हा गूढ विषाणू भारतात सापडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चीनमधील न्यूमोनिया विषाणूने भारतात प्रवेश केला असून सात भारतीयांना या आजाराची लागण झाल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंकेतस्थळांनी प्रसिद्ध केलं होतं. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात या गूढ आजाराने ग्रस्त रुग्ण उपचार घेत असल्याचा दावा वेगवेगळ्या वृत्तांमध्ये करण्यात आला होता. परंतु, हे वृत्त खोटं असल्याचं एम्स रुग्णालयाने म्हटलं आहे.

11 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.