चालू घडामोडी आणि दिनविशेष - 10 ऑगस्ट 2023

Date : 10 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पृथ्वी शॉने १२९ चेंडूत झळकावले द्विशतक, लिस्ट ए क्रिकेटमध्ये लावली विक्रमांची रांग
  • भारतीय फलंदाज पृथ्वी शॉने बुधवारी, ९ ऑगस्ट २०२३ रोजी नॉर्थहॅम्प्टनमधील काउंटी ग्राउंडवर सॉमरसेटविरुद्ध वनडे कप स्पर्धेत नॉर्थहॅम्प्टनशायरसाठी द्विशतक ठोकले. नॉर्थम्प्टनशायरसाठी तिसऱ्या सामन्यात सलामी देताना पृथ्वी शॉने ८१ चेंडूंमध्ये (१४ चौकार, २ षटकार) शतक झळकावले. पृथ्वी शॉने १२९व्या चेंडूवर द्विशतक पूर्ण केले. त्याने आपल्या द्विशतकात २४ चौकार आणि ८ षटकार लगावले. पृथ्वी शॉने या द्विशतकाच्या जोरावर लिस्ट ए क्रिकेटमध्ये विक्रमांची रांग लावली आहे.
  • पृथ्वी शॉचे मागील द्विशतक २०२०-२१ विजय हजारे ट्रॉफीमध्ये झळकावले होते. त्याने पुद्दुचेरीविरुद्ध मुंबईसाठी नाबाद २२७ धावांची खेळी केली होती. त्यावेळी स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या होती. आता पृथ्वी शॉ नॉर्थहॅम्प्टनशायरच्या डावाच्या ५० व्या षटकात १५१ चेंडूत २८ चौकार आणि ११ षटकारांसह २४४ धावा केल्यानंतर बाद झाला. पृथ्वी शॉच्या खेळीमुळे नॉर्थहॅम्प्टनशायरला वन डे चषकात त्यांची दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात मदत झाली. नॉर्थहॅम्प्टनशायरने ५० षटकांत ८ गडी गमावून ४१५ धावा केल्या.

पृथ्वी शॉने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५०+ च्या सरासरीने २९०० हून अधिक धावा केल्या आहेत -

  • पृथ्वी शॉने आतापर्यंत ५६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५०पेक्षा जास्त सरासरीने २९०० हून अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २० वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ गेल्या आठवड्यात पदार्पणाच्या सामन्यात ग्लॉस्टरशायरविरुद्ध ३४ धावांवर आऊट झाला होता.
ई-मेलमुळे आपल्या आयुष्याचा दर्जा खालावत आहे का? कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन काय सांगते?
  • फ्रान्समध्ये २०१७ च्या सुरुवातीला ‘राइट टू डिसकनेक्ट’ जपण्याचा प्रयत्न करणारा एक कामगार कायदा लागू झाला. या कायद्यातील तरतुदीनुसार ज्या कंपनीमध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असतील त्यांनी, कामाच्या तासांनंतर ई-मेलचा वापर करण्यासंबंधी विशिष्ट धोरणांसंबंधी वाटाघाटी करणे आवश्यक करण्यात आले. आता याच विषयावर कॅलिफोर्निया विद्यापीठानेही संशोधन केले आहे. संबंधित कायद्याची गरज का भासली आणि इतक्या वर्षांनंतरही परिस्थितीत काही बदल झाला आहे का, याचा आढावा.
  • ‘राइट टू डिसकनेक्ट’ कायदा का करण्यात आला?
  • कर्मचारी कामावरून परतल्यानंतर संध्याकाळी किंवा शनिवार-रविवारीसुद्धा, म्हणजेच त्यांच्या खासगी वेळेत त्यांना कार्यालयीन कामकाजासंबंधी ई-मेल तपासायला लागतात. त्यासाठी त्यांचा वैयक्तिक वेळ फार खर्च होऊ नये या उद्देशाने हा कायदा लागू करण्यात आला. त्या वेळच्या मंत्री मायरियम एल खमरी यांनी नवीन कायद्याचे समर्थन करताना, कर्मचाऱ्यांचा थकवा कमी करण्यासाठी आवश्यक पाऊल असे त्याचे वर्णन केले होते. हा कायदा काहीसा अव्यवहार्य वाटतो, पण तो सार्वत्रिक समस्या दर्शवतो. अलीकडील काळात कामाविषयी बदललेला, काहीसा आक्रमक आणि सुधारणात्मक दृष्टिकोन बाळगताना हा थकवा टाळणे कठीण झाले आहे.
  • ई-मेल आणि मानसिक ताण यासंबंधी संशोधन काय सांगते?
  • ई-मेलच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी, कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी ४० कार्यालयीन कर्मचाऱ्यांना साधारण १२ दिवस हार्ट-रेट मॉनिटर जोडले. त्याद्वारे या कर्मचाऱ्यांची हृदय गती परिवर्तनशीलता नोंदवण्यात आली. हे मानसिक ताण मोजण्याचे एक सामान्य तंत्र आहे. हृदय गती परिवर्तनशीलता मोजण्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या संगणकाच्या वापरावरदेखील लक्ष ठेवण्यात आले. याद्वारे ई-मेल तपासणी आणि तणावाची पातळी यांचा संबंध जोडून पाहता आला. यामध्ये जी निरीक्षणे आढळली त्यामुळे कोणालाही आश्चर्य वाटले नाही. या अभ्यासानंतर अहवालात असे नमूद करण्यात आले की ‘कर्मचारी एका तासात ई-मेलवर जितका वेळ घालवतो तितका त्या तासामध्ये त्याचा ताण जास्त असतो’.

ई-मेल आणि मानसिक त्रास यासंबंधी संशोधन काय सांगते?

  • अन्य एका अभ्यासामध्ये, अभ्यासकांनी या ४० कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येकाच्या संगणक मॉनिटरच्या खाली थर्मल कॅमेरे ठेवले. या कॅमेराच्या माध्यमातून व्यक्तीच्या चेहऱ्यावरील ‘हीट ब्लूम’ मोजता येतात. या हीट ब्लूमद्वारे मानसिक त्रास दर्शवला जातो. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांना वारंवार ई-मेल तपासण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हा उपाय रामबाण नाही असे अभ्यासकांच्या लक्षात आले. जे कर्मचारी आधीच तणावात होते, त्यांचा ताण ई-मेलमुळे अधिक वाढला. त्याचा परिणाम अभ्यासकांना असा आढळला की, लोक तणावात असताना ई-मेलला नेहमीपेक्षा जास्त लवकर पण अधिक बेफिकिरीने उत्तर देतात. अशा ई-मेलमध्ये संताप व्यक्त करणाऱ्या नकारात्मक शब्दांचा वापर केला जात असल्याचेही आढळले.

यासंबंधी अन्यत्र झालेल्या संशोधनातून काय दिसले?

  • इतर संशोधकांनाही ई-मेल आणि आनंदाच्या अभावामध्ये अशाच प्रकारचे संबंध आढळून आले. २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये, जवळपास पाच हजार स्वीडिश कर्मचाऱ्यांच्या आरोग्यामध्ये दीर्घकालीन कल दिसून आले. सातत्याने कार्यालयाशी ‘कनेक्टेड’ राहण्याच्या गरजेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असे या अभ्यासात आढळले. कर्मचाऱ्यांचे वय, लिंग, सामाजिक-आर्थिक स्थिती, आरोग्य वर्तन, बॉडी-मास इंडेक्स, नोकरीचा तणाव आणि सामाजिक आधार यांसारख्या विविध घटकांशी त्याचा काही संबंध नाही असेही दिसून आले.
सरकारमध्ये खासगी कंपन्यांमार्फतच कर्मचारी नियुक्ती; सेवा शुल्क कमी करून २० टक्क्यांवर, ठेकेदार मात्र जुनेच
  • राज्यातील विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयांत आवश्यक मनुष्यबळ (अधिकारी-कर्मचारी) बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून भरण्यासाठी नऊ संस्थांची नेमणूक करण्याचा कामगार विभागाचा निर्णय रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतरही आता या संस्थांना कायम ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपच्या एका आमदाराचे ‘लाड’ पुरविण्यासाठीच हा सारा खटाटोप सुरू असल्याची चर्चा आहे.  
  • नोकरभरतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील कामांसाठी बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा निर्णय कामगार विभागाने १४ मार्चला घेतला होता. त्यासाठी मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या ‘अ‍ॅक्सेंट टेक सव्‍‌र्हिसेस लि.’, ‘सी. एम. एस. आयटी सव्‍‌र्हिसेस लि.’, ‘सीएससी ई- गव्हर्नन्स सव्‍‌र्हिसेस इंडिया लि.’, ‘इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि.’, ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सव्‍‌र्हिसेस प्रा. लि.’, ‘सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सव्‍‌र्हिसेस प्रा. लि.’, ‘उर्मिला इंटरनॅशनल सव्‍‌र्हिसेस प्रा. लि.’ या नऊ संस्थाची पाच वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली. या संस्थांकडून प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सल्लागार, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापरीक्षक, जिल्हा समन्वय विधि अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, माहिती अधिकारी अशा विविध ७४ संवर्गातील अतिकुशल पदांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • केवळ सरकारसाठी नव्हे, तर निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांनाही या नऊ संस्थांकडूनच आवश्यक मनुष्यबळ घेण्याचे बंधनकारक करण्यात आले. मात्र, कामगार विभागाच्या या निर्णयामुळे बेरोजगार तरुणांची पिळवणूक होणार असल्याचा आक्षेप घेत राज्यभरातून या निर्णयास विरोध झाला. तसेच या निर्णयामुळे शासनाचे पैसे वाचणार नसून, ठेकेदारांचे भले होणार असल्याचा आक्षेप घेत काही विभागाच्या सचिवांनीही या निर्णयास आक्षेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयात सुधारणा करण्यासाठी सदरचा निर्णय रद्द करून मंत्रिमंडळासमोर नव्याने प्रस्ताव आणण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या निर्णयात कामगारांना किती रक्कम मिळणार आणि सेवापुरवठादार संस्थेला किती पैसे मिळणार आहेत, याचा उलघडा होत नाही. तसेच यात ठेकेदारांना अधिक लाभ देण्यात आल्याचे फडणवीस यांनी उदाहरणासह मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते.
घरी बसून नव्हे तर मैदानात विश्वचषकाचे सामने पाहायचे आहेत तर, प्रत्येक चाहत्याने ‘ही’ तारीख लक्षात ठेवलीच पाहिजे
  • एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे सुधारित वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी जाहीर केले आहे. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सह नऊ सामन्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. विश्वचषकाची तिकिटे २५ ऑगस्टपासून विक्रीसाठी ठेवली जातील. ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मागच्या विश्वचषकातील अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांशी भिडतील आणि स्पर्धेला सुरुवात होईल.
  • ICCने पुढे घोषणा केली की चाहत्यांमध्ये गोंधळ टाळण्यासाठी भारताच्या सामन्यांसाठी टप्प्याटप्प्याने तिकिटांची विक्री केली जाईल. २५ ऑगस्ट रोजी, सर्व भारत सोडून इतर मुख्य सामने आणि सराव सामन्यांची तिकीटविक्री सुरू होईल. याचा अर्थ भारत वगळता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेदरलँड या नऊ संघांच्या सर्व सामन्यांची तिकिटे २५ ऑगस्टपासून बुक करता येतील.
  • ICCने तिकीट विक्री सामन्यांच्या ठिकाणांच्या आधारे विभाजित करण्याचा निर्णय घेतल्याने भारताच्या सामन्यांसाठी गोष्टी थोड्या अवघड होतात. भारताच्या सराव सामन्यांची तिकिटे ३० ऑगस्टपासून सुरू होतील. मुख्य फेरीची तिकिटे ३१ ऑगस्टपासून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तिकिटे आता ३ सप्टेंबर पासून मिळतील कारण सामन्याची तारीख ही १५ ऑक्टोबर ऐवजी १४ ऑक्टोबर करण्यात आली आहे.
  • तिकिटांच्या घोषणांबद्दल नियमित माहिती मिळवण्यासाठी ICC ने चाहत्यांना त्यांच्या वेबसाइटवर नोंदणी करण्याचा सल्ला दिला आहे, ज्याची लिंक १५ ऑगस्टपासून सक्रिय होईल. तिकिटांची अपेक्षित मागणी व्यवस्थापित करण्यासाठी आणि शक्य तितक्या चाहत्यांना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना पाहण्याची सर्वोत्तम संधी देण्यासाठी, पुढील तारखांना तिकिटांची टप्प्याटप्प्याने विक्री केली जाईल:
मध्य रेल्वेच्या ९ ते २३ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द; वाचा कारण काय ते….
  • मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या चौथ्या मार्गाला सक्ती रेल्वे स्थानकाशी जोडण्याचा आणि या स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. हे पूर्ण करण्यासाठी गाड्यांचे संचालन थांबवावे लागणार आहे. ९ ते २३ ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द राहतील. रेल्वेने प्रभावित गाड्यांसंबंधी माहिती प्रसिद्ध केली आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

अकोला मार्गे धावणाऱ्या या रद्द गाड्या

१४ ऑगस्ट १२८८० भुवनेश्वर – कुर्ला एक्सप्रेस. (बडनेरा थांबा नाही)

१६ ऑगस्ट १२८७९ कुर्ला भुवनेश्वर – एक्सप्रेस. (बडनेरा थांबा नाही)

१२ ऑगस्ट २०८२२ संत्रागाछी – पुणे एक्सप्रेस. (अकोला, बडनेरा थांबा नाही)

१४ ऑगस्ट २०८२१ पुणे-संत्रागाछी एक्सप्रेस. (अकोला, बडनेरा थांबा नाही)

या गाड्या रद्द

१० ते २२ ऑगस्ट ०८७३८ बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल

१० ते २२ ऑगस्ट ०८७३७ रायगड-बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल.

०९ ते २२ ऑगस्ट ०८७३६ बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल.

१० ते २३ ऑगस्ट ०८७३५ रायगड – बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल.

०९ ते २१ ऑगस्ट १८११३ टाटानगर – बिलासपूर एक्सप्रेस.

१० ते २२ ऑगस्ट १८११४ बिलासपूर-टाटानगर एक्सप्रेस.

०९ ते २१ ऑगस्ट १८१०९ टाटानगर – इतवारी एक्सप्रेस.

०९ ते २१ ऑगस्ट १८११० इतवारी – टाटानगर – एक्सप्रेस.

०९ ऑगस्ट २०८२८  संत्रागाछी-जबलपूर एक्सप्रेस.

१० ऑगस्ट २०८२७ जबलपूर-संत्रागाछी एक्सप्रेस.

१० ऑगस्ट १७००५ हैदराबाद-रक्सौल एक्सप्रेस.

१३ ऑगस्ट १७००६ रक्सौल-हैदराबाद एक्सप्रेस.

११ ऑगस्ट २२८४३ बिलासपूर-पाटणा एक्सप्रेस.

१३ ऑगस्ट २२८४४ पाटणा-बिलासपूर एक्सप्रेस.

१० ते २२ ऑगस्ट ०८८६१/०८८६२ गोंदिया - झारसुगुडा मेमू पॅसेंजर स्पेशल बिलासपूर आणि झारसुगुडा दरम्यान.


 

राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंना पाचच पदके :
  • बर्मिगहॅमला नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विविध राज्यांच्या क्रीडापटूंनी आपले कौशल्य पणाला लावत भारताला ६१ पदकांसह चौथ्या स्थानापर्यंत नेले. यात पुन्हा एकदा हरयाणाच्या खेळाडूंचा 

  • २३ पदकांसह वरचष्मा राहिला असून, आवश्यक सुविधा आणि सर्वाधिक खर्च करूनही महाराष्ट्राच्या क्रीडापटूंना फक्त पाचच पदके जिंकता आली आहेत.

  • राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तरेकडील खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत वाजवले. यातही ईशान्येकडील खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले, मात्र महाराष्ट्राचे खेळाडू मागेच राहिले. अ‍ॅथलेटिक्समधील ३,००० मीटर स्टिपलचेस शर्यतीत अविनाश साबळे आणि वेटलिफ्टिंगमध्ये संकेत सरगर यांनी रौप्यपदकांची कामगिरी केली. क्रिकेटमध्ये रौप्यपदक मिळवलेल्या भारतीय संघात जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मानधना आणि राधा यादव यांचा समावेश होता. टेबल टेनिसच्या सांघिक सुवर्णपदक विजेत्या पुरुष संघात सनिल शेट्टीचा समावेश होता, तर चिराग शेट्टीने सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीच्या साथीने बॅडिमटन दुहेरीत सोनेरी यश मिळवले.

  • राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे १४ खेळाडू सहभागी झाले होते. यामधून केवळ पाच पदके मिळाली. महाराष्ट्रात खेळाडूंना मिळत असलेल्या सुविधा आणि खेळाडूंवर होणारा खर्च बघता हे यश तुटपुंजे असल्याची भावना क्रीडावर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राला यश मिळवून देणारे अविनाश आणि संकेत हे दोन्ही खेळाडू ग्रामीण भागांतून आले आहेत, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

राष्ट्रकुल स्पर्धेतील राज्यांचे यश - हरयाणा २३, तेलंगणा ६, पंजाब ५, उत्तर प्रदेश ५, महाराष्ट्र ५, तमिळनाडू ५, बंगाल ४, मणिपूर ३, आंध्र प्रदेश ३, कर्नाटक ३, दिल्ली ३, राजस्थान २, गुजरात २, चंडिगड १, केरळ १

नवनिर्वाचित मंत्र्यांना पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा; वाचा नेमकं काय म्हणाले :
  • गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना ट्वीटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

  • काय म्हणाले पंतप्रधान मोदी - “महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली, त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा”, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

  • एकूण १८ मंत्र्यांनी घेतली शपथ : नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यावेळी पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे एकाही महिला नेत्याला संधी न देण्यात आल्याने सरकारवर टीका होत आहे.

आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव नाही, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांची संसदेत माहिती :
  • केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी सध्या कोणतीही योजना नसल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिली आहे. आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना अशाप्रकारचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे चौधरी यांनी लोकसभेत बोलताना सांगितले.

  • महागाईमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. महागाईच्या दरानुसार प्रत्येक सहा महिन्यांनी महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात येत असल्याची माहिती चौधरी यांनी संसदेत दिली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक निर्देशांकानुसार हा भत्ता ठरवण्यात येत असल्याचे अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत सांगितले.

  • या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई भत्त्यामधील वाढीची केंद्रीय कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. महागाईचा दर स्थिरावल्यानंतर सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेंशन धारकांना वाढीव महागाई भत्ता देण्यासंदर्भात लवकरच मंत्रिमंडळाकडून निर्णय घेतला जाणार आहे. ही वाढ तीन ते चार टक्क्यांपर्यंत असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशातला महागाई दर सध्या सात टक्क्यांवर आहे.

  • सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार जुलै २०२१ मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये १७ ते २८ टक्क्यांची भरघोस वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर २०२१ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला होता. ही वाढ १ जुलै २०२१ पासून लागू करण्यात आली होती. जानेवारी २०२२ मध्ये परत एकदा केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली होती. सध्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकुण ३४ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख पेंशन धारकांना याचा लाभ मिळत आहे. २८ फेब्रुवारी २०१४ मध्ये सरकारने सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करण्यासाठी वेतन आयोग स्थापन करण्यात आला आहे.

खातेदारांचे Savings धोक्यात टाकणाऱ्या ‘या’ 8 बँकांना RBI चा दणका; तुमचे अकाउंट तर नाही ना? पहा यादी :
  • भारतीय रिझर्व्ह बँकने आठ भारतीय बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. या डिफ़ॉल्टर यादीत महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश आहे. या कारवाईत गुजरातच्या मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव बँक वर ४० लाख रुपयांचा सर्वात जास्त दंड लगावण्यात आला असून इतर बँकांना तब्बल १- ४०लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय, आरबीआय ने स्पंदना स्फूर्ती फायनान्शियल या NBFC ला आर्थिक दंड लगावला आहे. खाली दिलेल्या यादी पैकी कोणत्याही बँकेत आपले सुद्धा अकाउंट असल्यास वेळीच सावध व्हा.

  • महाराष्ट्रातील दोन बँकांना आरबीआय कडून दंड लगावण्यात आला आहे. यामध्ये वरुद अर्बन को ऑपरेटिव्ह बँक व द यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा समावेश आहे. नागरी सहकारी बँकांना केव्हायसी जारी केलेल्या आरबीआयच्या ‘Know Your Customer’ निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल द यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ३.५० लाख रुपयांचा तर वरुद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला १ लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकने दंड ठोठावलेल्या बँक

  1. छत्तीसगड राज्य सहकारी बँक
  2. गोवा राज्य सहकारी बँक
  3. गराहा सहकारी बँक
  4. द यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
  5. जिल्हा सहकारी केंद्रीय बँक,छिंदवाडा
  6. वरुद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
  7. इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
  8. मेहसाणा अर्बन आठ बँकांमध्ये सहकारी बँक
करोनानंतर चीनमध्ये आढळला आणखी एक जीवघेणा व्हायरस; ३५ जणांना लागण, जाणून घ्या काय आहे लक्षणे :
  • करोना आणि मंकिपॉक्सनंतर आता चीनमध्ये आणखी एक जीवघेणा व्हायरस आढळून आला आहे. झुनोटिक लंग्या (Zoonotic Langya) असे त्या व्हायरसचे नाव असून चीनमध्ये आत्तापर्यंत ३५ जणांना याची लागण झाली आहे. करोनामुळे मोठ्या प्रमाणात अनेक देशांची हानी झाली होती. त्यानंतर आता या भलत्याच आजारामुळे चीनच्या आरोग्य प्रशासनासमोर नवे संकट उभे राहिले आहे.

  • पाळीव प्राणी असणाऱ्या व्यक्तींनी सतर्क राहण्याची गरज : आत्तायपर्यंत पाच टक्के कुत्री आणि दोन टक्के शेळ्यांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे पाळीव प्राणी असणाऱ्या व्यक्तींनी सतर्क राहण्याची गरज आहे. या विषाणूची लागण झालेल्या ३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे रुग्ण एकमेकांच्या संपर्कात नव्हते. एवढचं नाही तर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील इतर लोकांनाही या व्हायरसची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा विषाणू एका माणसातून दुसऱ्या माणसात पसरण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.

  • या विषाणूची नेमकी लक्षणे कोणती - लंग्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, मळमळणे, डोके दुखणे उलट्या होण्यासारखी लक्षणे आढळून येतात. तसेच त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. एवढचं नाही तर हा आजार बळावला तर रुग्णाचे यकृत आणि किडनी निकामी होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

10 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.