चालू घडामोडी आणि दिनविशेष - 08 जानेवारी 2024

Date : 8 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्मृती मंधानाने केला मोठा पराक्रम, रोहित-विराटच्या ‘या’ खास क्लबमध्ये झाली सामील
  • भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. मंधानाने ५२ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. पहिल्या सामन्यात संघाला नऊ गडी राखून विजय मिळवून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मंधानाने तिच्या या खेळीने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये तीन हजार धावाही पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडू खेळून हा आकडा गाठणारी ती महिला क्रिकेटपटू ठरली. या बाबतीत तिने न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनचा विक्रम मोडला.
  • स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये अवघ्या २४६१ चेंडूत तीन हजार धावा पूर्ण केल्या. यासाठी सोफी डिव्हाईनने २४७० चेंडूंचा सामना केला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग तिसऱ्या स्थानावर तर न्यूझीलंडची सुझी बेट्स चौथ्या स्थानावर आहे. लॅनिंगने २५९७ चेंडूंत तीन हजार धावा पूर्ण केल्या होत्या, तर बेट्सने २६७९ चेंडूंत तीन हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

मंधाना रोहित-कोहलीच्या क्लबमध्ये सामील -

  • आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारी मंधाना ही चौथी भारतीय खेळाडू आहे. तिच्या आधी विराट कोहली, रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्या नावावर ही कामगिरी नोंदवली गेली आहे. कोहलीने १०७ डावात ४००८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहितच्या नावावर १४० डावांमध्ये ३८५३ धावा आहेत. हरमनप्रीत कौरने १४३ डावात ३१९५ धावा केल्या आहेत. आता मंधाना या यादीत सामील झाली आहे. तिने १२२ डावात ३०५२ धावा केल्या आहेत.

शफालीबरोबर तिसरी शतकी भागीदारी -

  • स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शफाली वर्माबरोबर पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. शफालीबरोबर तिने तिसऱ्यांदा टी-२० मध्ये शतकी भागीदारी केली आहे. भारतासाठी सर्वाधिक शतकी भागीदारी करणारी ही जोडी ठरली. मंधाना आणि शेफालीने हा पराक्र तीनदा केला आहे. यापूर्वी मंधानाने माजी कर्णधार मिताली राजसोबत दोनदा शतकी भागीदारी केली होती.
मोदी आजपासून तीन दिवस गुजरातमध्ये
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ते १० जानेवारी दरम्यान गुजरातचा दौरा करणार आहेत. या काळात ते ‘व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद-२०२४’चे उद्घाटन करतील. या शिखर परिषदेदरम्यान मोदी जागतिक नेते, सर्वोच्च जागतिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
  • ‘व्हायब्रंट गुजरात’ विश्व परिषदेचे हे दहावे पर्व गुजरातमधील गांधीनगर येथे १० ते १२ जानेवारी २०१४ दरम्यान होणार आहे. ‘भविष्याचे प्रवेशद्वार’ (गेट वे टू द फ्युचर) असा त्याचा यंदाचा मुख्य विषय आहे. या वर्षी ३४ सहभागी देश आणि १६ भागीदार संस्था या परिषदेत सहभागी होत आहेत.
  • तंत्रज्ञान आणि नवकल्पना, शाश्वत उत्पादन, हरित हायड्रोजन ऊर्जा विनियोग, विजेवरील वाहने आणि अक्षय ऊर्जा आणि शाश्वतता यासारख्या जागतिक स्तरीय विषयांवर चर्चासत्र आणि परिषदांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन या शिखर परिषदेत केले जाईल. ‘व्हीजीजीएस’मध्ये कंपन्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन करतील. ई-वाहतूक, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, सागरी अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा आणि स्मार्ट पायाभूत सुविधा यावर प्रामुख्याने भर दिला जाईल.
  • या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये मोदी यांचा भरगच्च कार्यक्रम आहे. त्यात जागतिक नेत्यांबरोबर चर्चा, अग्रगण्य जागतिक कंपन्यांच्या सीईओंबरोबर बैठक, ‘व्हायब्रंट गुजरात’ जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन, ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४’चे उद्घाटन, ‘गिफ्ट सिटी’मध्ये उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी चर्चा अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.
Boycott Maldives का होतेय ट्रेंड? पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर भारतीयांनी का रद्द केला मालदीव दौरा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तेथील सुंदर बेटाची भ्रमंती केली. त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आहे तेव्हापासून मालदीवमध्ये मोठा गदारोळ माजला आहे. मालदीवच्या काही सर्वोच्च मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काही अपमानास्पद टीका केल्या आहेत.

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केली टीका

  • मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मरियम शिउन (Mariyam Shiuna) यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोंवर कमेट्स करीत त्यांना ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे संबोधले आहे. हे पोस्ट डिलीट करण्यात आली असून त्याचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहे. हमासविरुद्ध चालू असलेल्या युद्धात इस्रायल गुंतलेला असतानाही भारताने त्या देशाशी चांगले संबंध राखल्याने त्यांनी अशी टीका केली आहे. पण, भारताने संघर्ष सुरू झाल्यापासून मानवता म्हणून पॅलेस्टाइनला मदत केली आहे.

पतंप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला दिली भेट

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जानेवारी रोजी लक्षद्वीपला दिलेल्या भेटीचे काही फोटो शेअर केले होते. मालदीवबाबत एकाही शब्दाचा उल्लेख न करता, पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “अलीकडेच मला लक्षद्वीपच्या लोकांसह राहण्याची संधी मिळाली. मी अजूनही येथील बेटांचे अविश्वसनीय सौंदर्य पाहून थक्क आहे. मला आगत्ती, बंगाराम व कवरत्ती येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी बेटावरील लोकांनी आदरातिथ्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. लक्षद्वीपच्या हवाई दृश्यांसंह येथील सोंदर्याची झलक दाखवणारे फोटो येथे आहेत.”
Rich Dad, Poor Dad : श्रीमंत होण्याचे सल्ले देणाऱ्या लेखकाच्या डोक्यावर १.२ अब्ज डॉलर्सचं कर्ज
  • कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात, रस्त्याकडेला असलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर एक पुस्तक आपल्याला हमखास पाहायला मिळतं, ते म्हणजे ‘रिच डॅड, पुअर डॅड’. श्रीमंत कसं व्हायचं? किंवा अधिक पैसे कसे कमवायचे? कुठे गुंतवणूक करायची? यासंबंधीचे सल्ले देणारं ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक जगभरातल्या बेस्ट सेलिंग (सर्वाधिक विकलं गेलेलं) पुस्तकांपैकी एक आहे. परंतु, जगाला श्रीमंत कसं व्हायचं याबाबत सल्ले देणारं पुस्तक लिहिणारा लेखक मात्र प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली आहे. ‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर सध्या १.२ अब्ज डॉलर्सचं (९ हजार ९८२ कोटी रुपये)कर्ज आहे. परंतु, त्यांना या कर्जाची चिंता नाही. उलट रॉबर्ट कियोसाकी लोकांना कर्ज घेण्याचा सल्ला देत आहेत.
  • प्रसिद्ध लेखक आणि उद्योगपती रॉबर्ट कियोसाकी यांचं एक इन्स्टाग्राम रील व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणत आहे की, माझं कर्ज १ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलंय. परंतु, मी दिवाळखोर झालो तर बँकही दिवाळखोर होईल. त्यामुळे मला फार काही अडचण नाही. त्याचबरोबर मला या कर्जाची चिंतादेखील नाही.
  • कियोसाकी म्हणाले, बहुसंख्य लोक कर्ज घेऊन त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढवतात. मुळात त्यांनी कर्ज घेऊन संपत्ती वाढवलेली असते. मला नेहमी वाटतं की, फेरारी आणि रोल्स रॉयससाख्या आलिशान गाड्या म्हणजे तुमची संपत्ती नव्हे. यांना जबाबदाऱ्या मानायला हवं.

रॉबर्ट कियोसाकी यांची संपत्ती किती?

  • रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलं की ते रोख पैसे साठवून ठेवत नाहीत. ते म्हणाले, मी सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतो. मी कर्जाला अजिबात घाबरत नाही. कारण कर्ज म्हणजेच पैसे. चांगल्या कर्जातून पैसे निर्माण करता येतात आणि चुकीच्या कर्जातून कमी कामाई होते. मला वाटतं, लोकांनी कर्ज घ्यावीत आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी. माझ्याकडे सध्या १०० मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. सुरुवातीच्या काळात मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मीसुद्धा दिवाळखोरी पाहिली आहे. परंतु, हळूहळू मी त्या समस्येतून बाहेर पडलो आणि यशस्वी झालो.
ऐतिहासिक कामगिरी; पाच महिन्यानंतर ‘आदित्य एल १’ पोहोचले निश्चित स्थळी; पंतप्रधान मोदी म्हणाले..
  • देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाने सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक बिंदू- ‘लँगरेंज पॉइंट १’ (एल-१) वर यशस्वीरित्या पोहोचण्याचा विक्रम केला आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान ११० दिवसांनी पोहोचले आहे. ‘आदित्य-एल १’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे. हा यशस्वी टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचे अभिनंदन व्यक्त केले आहे.
  • भारताने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. “भारताने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य एल१ हे उपग्रह निश्चितस्थळी पोहोचले आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले. त्याचेच हे यश आहे. संपूर्ण देश या कामगिरीसाठी शास्त्रज्ञांचे अभिनंदन व्यक्त करत असताना मीदेखील त्यात सामील होत आहे. मानवतेच्या विकासासाठी विज्ञानाचे नवे नवे क्षितीज गाठण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
  • सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आदित्य एल-१ हे अवकाशयान २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केले. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवले आहे. यासाठी आदित्य एल-१ मध्ये वेगवेगळी उपकरणे (पेलोड) बसवण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे.

‘एल-१’ म्हणजे काय?

  • अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये (तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते. इटालियन संशोधक जोसेफ लुई लँगरेंज यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे. सूर्य आणि पृथ्वीदरम्यान आतापर्यंत असे पाच बिंदूू खगोल अभ्यासकांना सापडले असून त्यांना एल-१, एल-२, एल-३, एल-४ आणि एल-५ अशी नावे देण्यात आली आहेत. ‘आदित्य’ हे अंतराळयान एल-१ या बिंदूवरून सूर्याचा अभ्यास करणार असल्याने मोहिमेचे नाव ‘आदित्य एल-१’ असे ठेवण्यात आले आहे. अलीकडेच ‘नासा’ आणि ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ने (ईएसए) संयुक्तपणे काढलेल्या ‘सोलर ऑर्बिटर’ मोहिमेतून तुलनेने लहान सौरवाऱ्यांचा शोध लागला होता. आदित्यच्या निरीक्षणांमधून यावर अधिक प्रकाश पडेल, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.

 

महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा लांबणीवर :
  • करोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे ६८वी महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर नवीन तारखा जाहीर केल्या जातील, असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या यजमानपदाखाली परभणी जिल्हा कबड्डी संघटना आणि परभणी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ जानेवारी महिला गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार होती. दोन दिवसांपूर्वीच क्रीडांगणांच्या तयारीला जोरदार प्रारंभ झाला होता. या स्पर्धेकरिता देशातील जवळपास ३० राज्यांचे संघ सहभागी होणार होते.

  • पण सध्या देशात करोनाचे रुग्ण वाढीस लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कोरोनाचे नियम अधिक कठोर केले असून, याची दखल घेत व खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर विचार करून राज्य संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी, सरचिटणीस आस्वाद पाटील व संयोजन समितीचे प्रमुख आमदार सुरेश वरपूडकर यांनी संपर्क करून स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

  • कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर लवकरच स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी म्हटले आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांनी स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे.

सिडनी पॉइटिए यांचे निधन :
  • श्वेतवर्णीय कलाकारांचे वर्चस्व असणाऱ्या हॉलीवूडमध्ये १९५० आणि ६०च्या दशकात मुख्य भूमिकांना गाजविणारे  कृष्णवर्णीय अभिनेते सिडनी पॉइटिए यांचे वृद्धापकालाने बहामास येथे निधन झाले.

  • सिनेजगतातील परमोच्च पुरस्कार ऑस्करवर मोहर उमटविणारे ते पहिले कृष्णवर्णीय अभिनेते होत. त्यांच्या प्रेरणेतून कसदार कृष्णवर्णीय कलाकारांची फळी नंतरच्या दशकांत उभी राहिली.

  •  ‘लिलिज ऑफ द फिल्ड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना १९६३ साली ऑस्कर पुरस्कार मिळाला  होता. अमेरिकेत जन्मलेले आणि कॅरेबियन बेटांवर शेतकरी कुटुंबात वाढलेले पॉइटिए यांनी तरुणपणी अमिरिकी कृष्णवर्णीयांच्या रंगभूमीपासून अभिनयाचा आरंभ केला.

  • अनेक वर्षे नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी हॉलीवूडची वाट धरली. ‘नो वे आऊट’, ‘इन द हीट ऑफ द नाईट’, ‘गेस हूज र्कंमग टू डिनर’, ‘टू सर विथ लव्ह’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका सर्वाधिक गाजल्या.

भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा;अभिनंदनासोबतच पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन, म्हणाले :
  • करोना आला, त्याने मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचं नुकसान केलं, अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अनेकांना त्रास झाला, काही जण अगदी मरणाच्या दारातून परत आले. करोनाचं भयंकर रुप देशाने पाहिलं. आता या करोनाचं करायचं काय? असा प्रश्न प्रशासनासह सर्वांनाच पडला.

  • काही काळ करोनाशी निःशस्त्र लढल्यानंतर लसीकरणाचं प्रभावी शस्त्र देशाच्या हातात पडलं आणि या शस्त्राने करोनाला हरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. या लढाईतला एक मोठा टप्पा देशाने आता पार केला आहे.

  • देशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पार केला. प्रभावी लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार तर मानलेच पण त्यांना एक आवाहनही केलं आहे.

  • पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, लसीकरण आघाडीवर एक उल्लेखनीय दिवस! १५० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल आमच्या देशवासीयांचे अभिनंदन. आमच्या लसीकरण मोहिमेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याच्या नोंदी जतनाचे आदेश; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात याचिका :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ जानेवारीच्या पंजाब दौऱ्याशी संबंधित सर्व नोंदी त्वरित सुरक्षित जतन करून ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांना शुक्रवारी दिले.

  • पंजाब सरकार, पंजाब पोलीस, एसपीजी आणि अन्य केंद्रीय तसेच राज्यस्तरीय संस्थांनी संबंधित नोंदी जतन करण्यासाठी महानिबंधकांना सहकार्य करून आवश्यक ती मदत करावी, असे निर्देश सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले.

  • या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीला होणार असून तोपर्यंत पंतप्रधानांच्या भेटीशी संबंधित सुरक्षा उपायांमध्ये राहिलेल्या त्रुटींबाबत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समित्यांचे काम थांबवण्यात यावे, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि पंजाब सरकारला दिले. मोदी यांच्या पंजाब.

  • दौऱ्यात मोठ्या प्रमाणात आढळलेल्या कथित सुरक्षा त्रुटींबाबत सखोल चौकशीच्या मागणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुरक्षा त्रुटीच्या या प्रकरणात केंद्राने ‘‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’’ असण्याची शंका व्यक्त करून तपासात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सहभागी करण्याचीही मागणी केली आहे.

‘नीट-पीजी’ला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; ओबीसींसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण कायम :
  • सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी इतर मागासवर्गासाठी २७ टक्के आणि आर्थिक दुर्बल वर्गासाठी (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण कायम ठेवत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या (नीट-पीजी २०२१) समुपदेशनास (काऊन्र्सिंलग) अंतरिम परवानगी दिली. प्रवेश प्रक्रियेसाठी ‘तातडीची गरज’ म्हणून हा निर्णय देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पदव्युत्तर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. ‘नीट-पीजी’मध्ये ओबीसींना २७ टक्के, आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला १० टक्के आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण देण्याच्या आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाच्या निकषाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. आर्थिक दुर्बल घटक निश्चित करण्यासाठी आठ लाख रुपये वार्षिक  उत्पन्नाचा निकष लागू करण्याबाबतच्या मुद्द्यावर खंडपीठाने गेले दोन दिवस सुनावणी घेतली. त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीची बाब म्हणून शुक्रवारी न्यायालयाने अंतरिम आदेश दिला.

  • २९ जुलै २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिशीनुसार अखिल भारतीय जागांमध्ये (कोटा) ओबीसींसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाच्या आधारावर नीट-पीजी २०२१ आणि नीट-यूजी २०२१ (पदवीपूर्व)बाबत समुपदेशन करण्यात यावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्या, याचिकांची अंतिम सुनावणी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.

  • सन २०२१-२२च्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी केंद्र सरकार आणि वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) २९ जुलै २०२१ रोजी नोटीस प्रसिद्ध केली होती. तीत ओबीसींसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद केली होती. या नोटिशीला दोन डॉक्टरांनी आव्हान दिले आहे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण द्यायचे असेल तर अडीच लाखांची उत्पन्नमर्यादा घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

08 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.