परदेशातील नामांकित किंवा जागतिक क्रमवारीनुसार अव्वल ५०० विद्यापीठांसाठी भारतातील शैक्षणिक बाजारपेठेची दारे आता पूर्णपणे उघडली आहेत. भारतातील विद्यापीठांसाठी असलेले नियम, आरक्षण, शुल्कनियमन परदेशी विद्यापीठांना लागू होणार नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावलीचा अंतरिम मसुदा तयार केला असून, त्यावर आलेल्या सूचना, हरकतींचा विचार करून तो या महिनाअखेरीस अंतिम केला जाणार आहे. आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
सध्या साधारण १८ लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत. परदेशांतील विद्यापीठांकडे धाव घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात राहूनच परदेशी विद्यापीठांत शिकण्याची मुभा येत्या काळात मिळू शकेल. विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या ५०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यापीठांना भारतात केंद्र किंवा शाखा सुरू करता येईल. सर्वसाधारण क्रमवारी, विद्याशाखानिहाय किंवा विषयनिहाय क्रमवारी यापैकी कोणत्याही क्रमवारीत पहिल्या ५०० विद्यापीठांमध्ये स्थान असलेली विद्यापीठे त्यासाठी पात्र असतील. त्याचप्रमाणे क्रमवारीत सहभागी न होणारी नामांकित विद्यापीठेही पात्र ठरतील. प्रवेश प्रक्रिया, शुल्क ठरवण्याचे अधिकार विद्यापीठांकडेच राहतील. त्यावर आयोगाचे किंवा इतर अधिकार मंडळांचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही. मात्र, भारतात विद्यापीठांना प्रत्यक्ष वर्ग भरवावे लागतील.
ऑनलाइन किंवा दूरशिक्षण वर्ग सुरू करण्यास आयोगाने मज्जाव केला आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवृत्ती, योजना आखण्याची मुभा विद्यापीठांना असेल. मात्र, त्याची आर्थिक तरतूदही विद्यापीठांनीच करायची आहे. सुरुवातीला दहा वर्षांसाठी परवानगी देण्यात येईल. त्यानंतर परवान्याचे नूतनीकरणही करता येऊ शकेल.
त्रिपुरा येथे भाजपाची जन विश्वास यात्रा सुरु आहे. या सभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्या येथे निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी सांगितले की, १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर तयार होईल.त्रिपुरामधील लोकांनी आताच तिकीट बुक करुन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. अमित शाह म्हणाले की, २०१९ साली मी भाजपाचा अध्यक्ष होतो. तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे की, “मंदिर वहीं बनाएंगे, तिथि नहीं बताएंगे”. तर राहुल गांधी आता कान उघडून ऐका, १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये गगनचुंबी राम मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल.”
अमित शाह यावेळी म्हणाले की, “फक्त राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्ष जाऊद्या माँ त्रिपुरी सुंदरी देवीचेही भव्य असे मंदिर बनवू. ते पाहण्यासाठी जगभरातून लोक इथे येतील. आम्ही काशी विश्वनाथ कॉरिडोर बनवला. महाकाल कॉरिडोर बनवला. सोमनाथ आणि अंबा मातेचे मंदिर सोन्याचे होत आहे. माँ विंध्यवासिनीचे नवीन मंदिर बनत आहे.”
अनेक वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराच्या उभारणीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले आणि मंदिराची पायाभरणी केली. आता १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
पणजी येथील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी पहिले प्रवासी विमान उतरले. याबरोबरच गोव्यातील या नव्या विमानतळाचे औपचारिक कामकाज सुरू झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, ‘राज्य आणि केंद्र सरकारचे हे मोठे यश आहे.’
हैदराबाद येथून १७९ प्रवाशांना घेऊन आलेले इंडिगोचे विमान उत्तर गोव्यातील मोपा येथील नव्या विमानतळावर सकाळी नऊ वाजता पोहोचले. केंद्रीय मंत्री आणि उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री सावंत आणि गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खौंटे यांनी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत प्रवाशांचे स्वागत केले. गोव्यात आता दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले.
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, ‘‘राज्य आणि केंद्र सरकारचे हे मोठे यश आहे. आता गोव्यात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. ’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नव्या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या विमानतळाला माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नाव देण्यात आले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी २ हजार ८७० कोटी रुपये खर्च झाला आहे. या विमानतळावरून दरवर्षी सुमारे ४४ लाख जण प्रवास करू शकतात.
४८ व्या राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी नागपूरची सतरा वर्षाची तिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने साडेनऊ गुणासह सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकाविला. तिला चषक व सहा लाख रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
दिव्याने आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ति कुलकर्णीला चुरशीच्या सामन्यात दिमाखात विजय मिळवीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या भक्तीला अडीच लाख रुपयाचे पारितोषिक मिळाले.
महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स हिने कोल्हापूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारीला उत्कृष्ट डावपेच आखत पराभूत करून उपविजेतेपदासह रोख पाच लाख रुपयाची कमाई केली. अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवालने महिला ग्रँडमास्टर निशा मोहोता हिला ५८ व्या चालीला पराभूत करून तिसऱ्या क्रमांकाचे चार लाखाचे बक्षिस मिळवले. उद्योगपती संजय घोडावत व ध्यानचंद पुरस्कार विजेते व भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अनुप देशमुख, शशिकांत कुलकर्णी, प्राचार्य विराट गिरी, विलास म्हात्रे भरत चौगुले, उपस्थित होते.
चीनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून बीजिंगमध्ये रुग्णशय्याच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. अनेक वृद्ध रुग्ण रुग्णालयाच्या आवारात स्ट्रेचरवर उपचार घेत आहेत, तर काही जणांना व्हीलचेअरवरच प्राणवायू लावण्यात आलेला आहे.
बीजिंग शहराच्या पूर्वेकडील चुईयांगलीयू रुग्णालय गुरुवारी नव्याने आलेल्या रुग्णांनी खचाखच भरले होते. गुरुवारी सकाळीच रुग्णशय्या संपल्या होत्या तरीही रुग्णवाहिका रुग्णांना आणत होत्या. डॉक्टर आणि परिचारिकांकडून अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णांचीच तपासणी करण्यात येत होती. चीनमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक देशांनी चिनी प्रवाशांवर निर्बंध लादले असून चीनमधून प्रवास करणाऱ्यांना करोना चाचणीचा अहवाल उपलब्ध करणे सक्तीचे केले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये ओमायक्रॉनचे ११ उपप्रकार
नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार सापडल्यानंतर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येत असून २४ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान करोनाबाधित असलेल्या १२४ आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये ११ ओमायक्रॉनचे उपप्रकार आढळले आहेत. सरकारी सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली.
या कालावधीत विमानतळे व सागरी बंदरे या ठिकाणी १९,२२७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी १२४ करोनाबाधित आढळले असून त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. १२४ करोनाबाधित नमुन्यांपैकी ४० जणांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात आले. त्यापैकी १४ नुमन्यांमध्ये ‘एक्सबीबी’ आणि एका नमुन्यात ‘बीएफ ७.४.१’ हा उपप्रकार आढळला आहे.
२४ डिसेंबरपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांसाठी सरकारने यादृच्छिक करोना चाचण्या अनिवार्य केल्या आहेत. याशिवाय चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना १ जानेवारीपासून करोना निगेटिव्ह अहवाल देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय वंशाचे अल्लाउद्दीन पालेकर मुख्य पंचांची भूमिका बजावत आहेत. तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पालेकर यांना प्रथमच कसोटी सामन्यात पंचगिरी करण्याची संधी मिळाली.
पालेकर आफ्रिकेचे ५७वे आणि विश्वातील ४९७वे पंच आहेत. मरायस इरास्मस यांना गुरू मानणारे पालेकर आज त्यांच्याच साथीने पंचगिरी करत आहेत. त्यांचे वडील आणि काकासुद्धा पंच असून रत्नागिरीत खेड तालुक्यात पालेकर यांचे गाव आहे.
१५ वर्षांपूर्वी पंच कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या पालेकर यांनी २०१८मध्ये भारत-आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत मैदानावरील पंचाची धुरा वाहिली. १ जानेवारी रोजी पालेकर यांनी वयाची ४४ वर्षे पूर्ण केली. २००६पर्यंत आफ्रिकेतील टायटन्स संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी पंचगिरीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
‘‘जेव्हा मी पंचाची भूमिका बजावण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून एकदा तरी कसोटी सामन्यात पंच म्हणून कार्य करण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले होते. त्यामुळे हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. आज मी ज्या ठिकाणी पोहोचलो, त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली,’’ असे पालेकर म्हणाले.
करोना, विशेषत: ओमायक्रॉन उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच स्वयंअर्थसहित, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. या काळात वर्ग आणि परीक्षा फक्त ऑनलाइन पद्धतीने सुरू राहतील.
महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्केच राहील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. करोनाचा उद्रेक आणि विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील परीक्षांबाबतही चार दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून जनतेश संवाद साधताना स्पष्ट केले.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळांपाठोपाठ महाविद्यालये बंद करण्याबाबत मंगळवारी कुलगुरू व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केल्यावर सामंत यांनी निर्णय जाहीर केला. विद्यार्थी हा केंद्रिबदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
राज्यात आता गृहविलगीकरणाचा कालावधी फक्त सात दिवस करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच प्रतिजन (अँटीजेन) चाचण्यांवर अधिक भर देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी जाहीर केले. सध्या टाळेबंदीची गरज नसून, रुग्णसंख्येनुसार निर्बंध लागू केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात करोनाचा उद्रेक झाला असून, तीन-चार दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णवाढ दुप्पट होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून गृहविलगीकरण, आरटीपीसीआर चाचण्या, प्रतिजन चाचण्या व अन्य बाबींसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली.
गृहविलगीकरणाचा दहा दिवसांचा कालावधी कमी करून सात दिवसांवर आणण्यात आला़ सात दिवसांनंतर पुन्हा रुग्णाला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी ९० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत किंवा फारसा त्रासही नाही.
एक-दोन टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक असल्याचे टोपे यांनी सांगितले.
देशभरातील विविध शहरांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून नव्या बाधितांमध्ये ओमायक्रॉनचे प्रमाण अधिक असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सांगितले. मात्र नागरिकांनी भयग्रस्त होऊ नये आणि करोना नियम आणि प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे, अशा सूचनाही केंद्राकडून देण्यात आल्या.
अनेक शहरांमध्ये करोनाचा उद्रेक झाला असून दैनंदिन रुग्णसंख्या दुपटीने वाढत असल्याचे चित्र आहे. करोनाबाधितांच्या नव्या नोंदींमध्ये ओमायक्रॉनचेच अधिक रुग्ण असून ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्बंधांसदंभातील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी मोठय़ा संख्येने गर्दी करणे आणि सामूहिक मेळावे यांवर निर्बंध घातले पाहिजे, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
जगभरात मंगळवारी २५.२ लाख नागरिकांना करोनाची लागण झाली असून एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णवाढ असून ओमायक्रॉनचा प्रसार किती वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे, असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.