शनिवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी ‘रालोआ’चे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांना मिळालेली ५१६ मते ही गेल्या ३३ वर्षांत या पदावर विजयी झालेल्या कोणत्याही उमेदवाराहून सर्वाधिक मते आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘राओला’चे रामनाथ कोविंद यांना मिळालेल्या खासदारांच्या ५२२ मतांच्या तुलनेत नायडू यांना सहा मते कमी मिळाली असली तरी विरोधी पक्षांची मते फुटल्याने नायडू यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली, असा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला.
नायडू यांचे निवडणूक एजंट व या निवडणुकीसाठी प्रमुख म्हणून नेमलेले भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव म्हणाले की, काटेकोर नियोजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ निर्धार यामुळे पक्षाच्या सर्व खासदारांची मते वैध ठरली व ती नायडू यांच्या बाजूने दिली गेली.
ज्या १४ खासदारांनी मतदान केले नाही त्यापैकी १२ विरोधी पक्षांचे होते, भाजपाचे दोन खासदार इस्पितळात असल्याने मतदानास येऊ शकले नाहीत.
गुजरातमध्ये आपल्या वाहनांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला त्यामागे भाजप आणि आरएसएसचे लोक आहेत, असा आरोप शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात धनेरा भागात झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी जयेश दर्जी उर्फ अनिल राठोड या व्यक्तीला अटक केली आहे, काँग्रेस नेत्यांनी असा दावा केला आहे की, जयेश हा भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सचिव आहे.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी गुजरातच्या पूरग्रस्त भागाला भेट दिली, त्यावेळी त्यांच्या कारवर एक वीट फेकली आणि काळे झेंडे दाखविले, या हल्ल्यात राहुलयांच्या कारच्या काचा फुटल्या होत्या. त्यामुळे सभा लवकर आटोपून ते तेथून निघून गेले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा हल्ला म्हणजे ‘पूर्वनियोजित षड्यंत्र’ असल्याचे सांगत या हल्ल्याचा निषेध केला.
मल्लिकार्जुन खरगे, आनंद शर्मा, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत गुलाम नबी आझाद यांनी या हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, अशा घटना राहुल यांना लोकांना भेटण्यापासून रोखू शकत नाहीत.
ट्रॅक्टरच्या काही सुट्या भागांवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे, तसेच कपड्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या जॉब वर्कवरील जीएसटी दरही १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. सर्व राज्यांचे वित्तमंत्री जीएसटी परिषदेचे सदस्य आहेत.
आजच्या बैठकीत ई-वे बिलालाही अंतिम स्वरूप देण्यात आले. ई-वे बिलानुसार, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची विक्रीच्या उद्देशाने १० किमीपेक्षा जास्त अंतरावर वाहतूक करायची असल्यास त्याची नोंदणी करणे बंधनकारक असेल.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जेटली यांनी सांगितले की, ई-वे बिल लवकरच अधिसूचित केले जाईल, जीएसटीमधून सूट असलेल्या वस्तूंना मात्र ई-वे बिलाचा नियम लागू होणार नाही. जीएसटीअंतर्गत वर्क कॉन्ट्रक्टस्वर १२ टक्के कर लागेल.
या करदात्यांनी जीएसटी नोंदणी पूर्ण केली आहे. आणखी १५.६७ लाख नवे नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत.
भारतीय सैन्याला डोकलाम भागातून हटविण्यासाठी चीन तिथे छोटे युद्ध पुकारू शकते, असा इशारा चीनमधील तज्ज्ञांनी दिला आहे, सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे ही कारवाई असेल, असे सांगण्यात येते.
मोदी सरकार देशाला युद्धाच्या खाईत लोटत आहे, असा आरोपही चीनी वृत्तपत्रांनी केला आहे, डोकलाममध्ये चीनने रस्ता बांधण्याचे प्रयत्न केल्यापासून भारतीय सैन्य तिथे आहे, ते हटविण्यासाठी चीनी सैन्य दोन आठवड्यांत कारवाई करू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
भारताविरोधात चीन लष्करी आॅपरेशन करू शकते, असे शांघाय अकॅडमी आॅफ सोशल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विषयांचे संशोधक यांचे म्हणणे आहे.
डोकलाममध्ये चीनी लष्कर शस्त्रास्त्रांचा वापरू शकतो,असे त्यांच्या युद्धाभ्यासावरून स्पष्ट होते. भारताची उक्ती व कृतीमध्ये खूपच अंतर आहे, असे सेंटर फॉर एशिया-पॅसिफिक स्टडी सेंटरचे संचालक जाओ गेनचेंग यांनीही म्हटले आहे.
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात हिंदू धर्मीय दर्शन लाल यांचाही समावेश आहे. पाकिस्तानात तब्बल २० वर्षांनंतर हिंदू धर्मीयाला मंत्रिमंडळात सहभागी करुन घेण्यात आले आहे.
राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी ४७ मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यात १९ राज्यमंत्री आहेत.
एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, दर्शन लाल यांना पाकिस्तानच्या चार प्रांतांमधील समन्वयाचे प्रभारी बनवण्यात आले आहे, ६५ वर्षीय दर्शन लाल हे पेशाने डॉक्टर आहेत आणि सध्या ते सिंध प्रांतातील मीरपूर मथेलो शहरात प्रॅक्टिस करतात.
२०१३ मध्ये दर्शन लाल पीएमएल-एन पक्षाच्या तिकिटावर अल्पसंख्यांक प्रवर्गातून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
जागतिक दिवस
स्वातंत्र्य दिन : बॉलिव्हिया, जमैका.
जन्म, वाढदिवस
अलेक्झांडर फ्लेमिंग, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ : ०६ ऑगस्ट १८८१
एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक : ०६ ऑगस्ट १९७०
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ : ०६ ऑगस्ट २००२
ठळक घटना
श्री. अरविंद घोष यांनी ‘वंदे मातरम’ हे नियतकालीक सुरु केले : ०६ ऑगस्ट १९०६
पहिले अखाती युद्ध - कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली : ०६ ऑगस्ट १९९०
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.