चालू घडामोडी आणि दिनविशेष - 27 मे 2023

Date : 27 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठांनी भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर घातली बंदी, ‘हे’ आहे कारण
  • ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियातल्या विद्यापीठांनी बंदी घातली आहे. पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरचा समावेश आहे. व्हिसा फ्रॉडची प्रकरणं वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हिक्टोरिया या ठिकाणी असलेली फेडरेशन युनिव्हर्सिटी आणि वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीने भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे.
  • ऑस्ट्रेलियाच्या गृह विभागाने व्हिसा फ्रॉडसंबंधीची माहिती दिली आहे. या विभागाने दिलेल्या अहवालानुसार भारतातून येणाऱ्या प्रत्येक चार विद्यार्थ्यांपैकी एकाचा व्हिसा अर्ज हा फ्रॉड, बनावट असतो. वेस्टर्न सिडनी विद्यापीठ आणि फेडरशेन विद्यापीठाने याच अहवालानंतर भारतातील सहा राज्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे. या सहा राज्यांमधून जर व्हिसाचे अर्ज आले तर त्यांचा विचार होऊ नये असे निर्देश या दोन्ही विद्यापीठांनी दिले आहेत. १९ मे रोजी जारी केलेल्या एका पत्रात या विद्यापीठांनी हे म्हटलं आहे बनवाट व्हिसा प्रकरणं समोर येत आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांना व्हिसा देऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे.
  • महत्त्वाची बाब ही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसीय ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधीच या दोन्ही विद्यापीठांनी भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे.ऑस्ट्रेलियामधल्या इतरही काही विद्यापीठांनी भारतातील काही राज्यांमधील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ प्रवेशावर बंदी घातली आहे. कोवेन विद्यापीठ, टॉरेंस विद्यापीठ आणि साऊदर्न क्रॉस या विद्यापीठांनीही अशाच प्रकारे बंदी घातली आहे.
आयपीएल समारोप समारंभात कलाकारांची असणार मांदियाळी, चाहत्यांना मिळणार रंगारंग कार्यक्रमांची खास मेजवानी
  • आयपीएल २०२३ हळूहळू त्याच्या समारोपाला जात आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर-२ सामना होणार आहे. विजयी संघ २८ मे रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. चेन्नईचा संघ आधीच फायनलमध्ये पोहोचला आहे. अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभ होईल, ज्यांच्या कामगिरीची यादी आयपीएलने अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली आहे.
  • आयपीएल २०२३च्या समारोप समारंभात रॅपर किंग आणि संगीत दिग्दर्शक आणि गायक न्यूक्लेया (NUCLEYA) सादर करताना दिसतील. त्याच वेळी, रॅपर डिवाइन आणि गायिका जोनिता गांधी देखील रंगारंग कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहेत. याआधी, गायक अरिजित सिंग आणि एपी. ढिल्लोन उद्घाटन समारंभात परफॉर्म करताना दिसले होते. त्याचबरोबर अभिनेत्री तमन्ना आणि रश्मिका मंदान्ना यांनीही आपल्या नृत्याने रसिकांची मने जिंकतील. चला जाणून घेऊया समारोप समारंभात कोणकोणते कलाकार आहेत…
  • किंगला किंग रोको असेही म्हणतात. MTV हसल २०१९च्या पहिल्या पाच अंतिम स्पर्धकांमध्ये तो होता. तर, न्यूक्लिया संगीत निर्माता आहे. जोनिता गांधी यांनी बॉलिवूडमध्ये काही सुपरहिट गाणी गायली आहेत. यामध्ये ‘ब्रेकअप साँग’, ‘करंट लगा रे’ अशा काही गाण्यांचा समावेश आहे. दिव्य देखील एक रॅपर/गायक आहे. रणवीर सिंगचा ‘गली बॉय’ हा चित्रपट डिव्हाईनच्या आयुष्यावर आधारित आहे. आयपीएलच्या मिड शोमध्ये दिव्य आणि जोनिताही परफॉर्म करताना दिसणार आहेत.
  • माहितीसाठी की, आयपीएल २०२२च्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये रणवीर सिंग आणि एआर रहमान यांनी परफॉर्मन्स केला होता. त्याचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता. बीसीसीआयने अद्याप या दोन स्टार्सबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही, मात्र, ते उपस्थित राहू शकतात. त्याचवेळी, यावेळी अरिजित सिंग, तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना आयपीएलच्या उद्घाटन समारंभात दिसले. हे तिन्ही स्टार अंतिम फेरीत परफॉर्म करतील अशी माहिती समोर येत आहे.
प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट! अहमदाबादमध्ये शुबमन गिलचे वादळी शतक, आयपीएल २०२३मध्ये शतकाची हॅटट्रिक
  • अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी (२६ मे) आयपीएलचा दुसरा क्वालिफायर खेळला जात आहे. या सामन्यात पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना गतविजेता गुजरात टायटन्ससमोर आहे. पावसामुळे टॉसला ४५ मिनिटे उशीर झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यात भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलने तुफानी शतक झळकावले. सध्या सुरु असलेल्या हंगामात त्याचे हे तिसरे शतक आहे.
  • शुबमन गिलच्या बॅटने यावर्षी सातत्याने धावा काढल्या आहेत आणि आयपीएल २०२३च्या मोसमात त्याने सर्व फलंदाजांना मागे टाकले आहे. गुजरात टायटन्सच्या युवा सलामीवीराने क्वालिफायर-२ मध्येही मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली कामगिरी केली आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट शतक झळकावले. गिलचे या मोसमातील हे तिसरे शतक आहे. या डावात त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीचे योगदान जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याला साथ देणाऱ्या मुंबईच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचे देखील आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात संघाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. पावसामुळे सामना अर्धा तास उशिराने सुरू झाला आणि अशा स्थितीत प्रथम फलंदाजी करताना गुजरातला मुंबईच्या वेगवान गोलंदाजांसमोर अडचणीचा सामना करावा लागेल, असे वाटत होते. असे घडले नाही आणि त्याचे कारण होते शुबमन गिल, ज्याने पुन्हा गोलंदाजांची कोंडी केली.
  • मुंबईने केलेली एक चूक पडणार महागात
  • या मोसमात ७०० हून अधिक धावा करणाऱ्या गिलने या सामन्यातही चांगली सुरुवात केली आणि पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर सहाव्या षटकात ख्रिस जॉर्डन गोलंदाजीला आला आणि गिलने सुरुवातीलाच एक षटकार आणि एक चौकार लगावला. जॉर्डनने अशी सुरुवात करून संधी निर्माण केली. मिडऑनला गिलने ओव्हरचा पाचवा चेंडू मारला. तिथे तैनात असलेल्या टीम डेव्हिडला कॅच घेण्याची संधी होती पण डेव्हिडने उजवीकडे डायव्हिंग करूनही ही संधी सोडली. त्याच्या हातातून चेंडू बाहेर आला. त्यावेळी गिलची धावसंख्या २० चेंडूत केवळ ३० धावा केल्या होत्या. शेवटी त्याच डेव्हिडने मधवालच्या गोलंदाजीवर झेल पकडला. ६० चेंडूत १२९ धावा केल्या. त्याच्या अफलातून, अविश्वसनीय खेळीत १० उत्तुंग षटकार आणि ७ चौकार मारत २१५च्या स्ट्राईक रेटने शतक झळकावले.
‘समृद्धी’चा शेवटचा टप्पा डिसेंबरअखेर पूर्ण : मुख्यमंत्री, शिर्डी-भरवीर ८० किमीचा टप्पा सेवेत
  • समृद्धी हा शेतकऱ्यांना समृद्ध करणारा महामार्ग आहे. शेतकऱ्यांसह राज्याला समृद्ध करणाऱ्या या महामार्गाचा शेवटचा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. समृद्धी महामार्गावरील शिर्डी -भरवीर ८० किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळय़ात मुख्यमंत्री बोलत होते.
  • शिर्डी पथकर नाका येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर काही तासांतच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे आता शिर्डी-भरवीर अंतर ४० ते ४५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. नागपूर-भरवीर हे अंतर सहा तासांत पार करता येणार आहे. सध्या भरवीर – इगतपुरी या तिसऱ्या आणि इगतपुरी -आमणे (ठाणे) या शेवटच्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. शेवटचा टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे नियोजन आहे. त्यानंतर तात्काळ हा टप्पा सेवेत दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दुसरा टप्पा असा..

  • मुंबई-नागपूर अशा ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावरील शिर्डी-भरवीरदरम्यानचा ८० किमीचा दुसरा टप्पा आहे. या टप्प्यात सात मोठे पूल, १८ छोटे पूल, ३० वाहन भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, तीन पथकर नाके, तीन प्रवेश निर्गमन मार्ग आदींचा समावेश आहे.

शिंदेंची ठाकरेंवर टीका

  • विरोधकांनी समृद्धी महामार्गाला कसा विरोध केला, हे सांगताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘‘आम्ही दिलेला शब्द पाळतो. आम्ही शब्दाला जागतो, आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो. घरात बसून आम्ही चर्चा करत नाही’’, अशा शब्दांत शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने आमच्या सरकारचा मार्ग मोकळा केला आणि आज समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले.

नागपूर -भरवीर प्रवासासाठी पथकर किती?

  • समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना पथकर मोजावा लागतो. त्यानुसार नागपूर-शिर्डी प्रवासासाठी हलक्या वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांना ८९९ रुपये पथकर भरावा लागतो. आता शिर्डी-भरवीर साठी १४० रुपये पथकर असून एकूण, पथकराची रक्कम १०३९ रुपये आहे.

शिर्डीची विकासाच्या दिशेने वाटचाल

  • शिर्डी देवस्थानामुळे दररोज मोठय़ा संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शिर्डीत येतात. त्यामुळे आजघडीला शिर्डी विमानतळ हे सर्वाधिक गजबजलेले विमानतळ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. समृद्धी महामार्ग शिर्डीतून जात असून शिर्डी – भरवीर महामार्ग सुरु झाला आहे. आता शिर्डी, तसेच सिन्नर – वैजापूर भागाची समृद्धी होईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी सांगितले.

महामार्गादरम्यान १८ नवनगरे

  • समृद्धीदरम्यान अनेक ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्राचा विकास करतानाच ७०१ किमीदरम्यान १८ नवनगरे उभारण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. १८ पैकी ३ नवनगरे ही शिर्डी परिसरादरम्यान असणार आहेत. या केंद्रांच्या कामाला लवकरच सुरूवात होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंद पिछाडीवर; अंतिम फेरीच्या पहिल्या लढतीत लिरेनचा विजय :
  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. बुधवारी मध्यरात्री झालेल्या चार डावांमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या डिंग लिरेनने २.५-१.५ अशा आघाडीसह पहिल्या लढतीत विजयाची नोंद केली. 

  • १६ वर्षीय प्रज्ञानंदने पहिला डाव गमावल्यानंतर दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. त्याने हा डाव जिंकत लढतीत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर चीनच्या लिरेनने आपला अनुभव पणाला लावताना तिसऱ्या डावात बाजी मारत पुन्हा आघाडी मिळवली. चौथ्या डावात प्रज्ञानंद आणि लिरेन या दोघांनीही झुंजार खेळ केला.

  • अखेर ३९ चालींअंती दोन्ही खेळाडूंनी हा डाव बरोबरीवर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लिरेनने चार डावांची पहिली लढत जिंकत अंतिम फेरीत महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. आता अंतिम फेरीच्या दुसऱ्या दिवशीही चार डाव खेळवले जातील. प्रज्ञानंदला ही चार डावांची दुसरी लढत जिंकण्यात यश आल्यास या स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकर खेळवण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा - श्रीशंकरला सुवर्णपदक :
  • भारताचा आघाडीचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने कॅलिथिआ (ग्रीस) येथे झालेल्या १२व्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ८.३१ मीटर विक्रमी अंतरासह सुवर्णपदकाची कमाई केली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या श्रीशंकरने गेल्या महिन्यात ८.३६ मीटरचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. तो या वेळी मोडीत काढला.

  • या स्पर्धेत स्वीडनच्या थोबियास माँटलरने (८.२७ मीटर) रौप्यपदक आणि फ्रान्सच्या ज्युलीस पॉमेरीने (८.१७ मीटर) कांस्यपदकाची कमाई केली. १० खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत फक्त तीन स्पर्धकांना आठ मीटरचे अंतर ओलांडता आले. जेसविन एल्डरिनला (७.६९ मीटर) पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

  • ऑलिम्पिकनंतर पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या श्रीशंकरने बुधवारी सायंकाळी सरावाप्रसंगी ७.८८ मीटर आणि ७.७१ मीटर अंतराच्या उडय़ा घेतल्या होत्या. परंतु देशांतर्गत स्पर्धामध्ये श्रीशंकरने सातत्याने आठ मीटरचे अंतर अनेकदा ओलांडले होते. केरळच्या श्रीशंकरने तिरुवनंतपूरम येथे हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या.

  • इंडियन खुल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत - ८.१४ मीटर आणि ८.१७ मीटर असे अंतर गाठले होते. त्यानंतर कोळीकोडे येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत तमिळनाडूच्या जेसविन एल्ड्रिनवर निसटती मात करीत नवा राष्ट्रीय विक्रम निर्माण केला होता.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : प्लिस्कोव्हा, हालेपचे आव्हान संपुष्टात; पुरुषांमध्ये मेदवेदेव, नदाल, तर महिलांमध्ये श्वीऑनटेक तिसऱ्या फेरीत :
  • फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत गुरुवारी धक्कादायक निकालांची नोंद झाली. कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि डॅनिएले कॉलिन्स या अनुक्रमे आठव्या आणि नवव्या मानांकित खेळाडूंसह दोन ग्रँडस्लॅम विजेत्या सिमोना हालेपचे आव्हान संपुष्टात आले. पुरुषांमध्ये डॅनिल मेदवेदेव आणि राफेल नदाल, तर महिलांमध्ये अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक यांना मात्र तिसरी फेरी गाठण्यात यश आले.

  • चेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोव्हाने बिगरमानांकित लिओलिया जिनजिनकडून २-६, २-६ अशा फरकाने पराभव पत्करला. चीनच्या १९ वर्षीय क्विन्वेन झेंगने माजी विजेत्या हालेपला २-६, ६-२, ६-१ असे पराभूत केले. तसेच  बिगरमानांकित शेल्बी रॉजर्सने कॉलिन्सला ६-४, ६-३ अशी धूळ चारली. श्वीऑनटेकने अमेरिकेच्या अ‍ॅलिसन रिस्केचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला.      

  • पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत मेदवेदेवने सर्बियाच्या लास्लो देरेवर ६-३, ६-४, ६-३ अशी मात केली. २१ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने कॉरेंटीन मॉटेटला ६-३, ६-१, ६-४ असे पराभूत केले. सहाव्या मानांकित कार्लोस अल्कराझने मॅरेथॉन लढतीत स्पेनच्या अल्बर्ट रामोस-व्हिनोलासला ६-१, ६-७ (७), ५-७, ७-६ (२), ६-४ असे हरवले.

जागतिक मंदी कशी टाळायची हे पाहणे आता कठीण; जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली चिंता :
  • जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी जागतिक मंदीची शक्यता व्यक्त केली आहे. युक्रेन- रशियाचे युद्धाचा अन्न आणि उर्जेच्या किमतींवर तसेच खत पुरवठ्यावर परिणाम होत आहेत. जगातील चौथ्या क्रमांकावर असणारी जर्मनीची अर्थव्यवस्था, ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे आधीच मंदावली असल्याचे ते म्हणाले.

  • रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम - रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या परिणामांमुळे, जागतिक बँकेने २०२२ साठीचा जागतिक वाढीचा अंदाज एप्रिलमध्ये ४.१ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आला आहे. “आम्ही जागतिक जीडीपीकडे पाहत असताना मंदी कशी टाळता येईल हे पाहणे आत्ता कठीण आहे.” मालपासने कोणताही विशिष्ट अंदाज न देता सांगितले.

  • चीनच्या वाढीचा वेग मंदावला - मालपास म्हणाले, “उर्जेच्या किंमती दुप्पट करण्याची कल्पना स्वतःच मंदीला चालना देण्यासाठी पुरेशी आहे.” कोविड-१९ चा उद्रेक, चलनवाढ आणि देशाच्या पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रिअल इस्टेटच्या समस्येमुळे चीनच्या वाढीचा वेग कमी झाला आहे. दुसरीकडे, मालपासने जागतिक मंदी कधी सुरू होईल याचे कोणतेही संकेत दिले नाहीत.

  • उर्जा स्त्रोतांच्या कमतरतेमुळे आणखी मोठा फटका - जागतिक बँकेच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, युक्रेन आणि रशियाची अर्थव्यवस्था आकुंचन पावण्याची शक्यता आहे, तर युरोप, चीन आणि युनायटेड स्टेट्सची अर्थव्यवस्था हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. विकसनशील देशांना खत, अन्नधान्याचे भांडार आणि उर्जा स्त्रोतांच्या कमतरतेमुळे आणखी मोठा फटका बसत असल्याचा दावा त्यांनी केला.

निवडणुका जाहीर करण्यासाठी इम्रान खान यांची सरकारला ६ दिवसांची मुदत :
  • प्रांतिक विधानसभा बरखास्त करून नव्याने सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यासाठी पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी शहबाझ शरीफ सरकारला सहा दिवसांची अंतिम मुदत दिली. ‘‘आयातीत सरकार असे करू शकले नाही, तर मी ‘संपूर्ण देशासह’ पुन्हा राजधानी इस्लामाबादमध्ये येईन’’, असा इशारा त्यांनी दिला.

  • आपल्या पक्षाचा मोर्चा रोखण्यासाठी छापे व अटकसत्र यांसारख्या ‘क्लृप्तय़ा’ वापरल्याबद्दल खान यांनी येथील जिन्ना अ‍ॅव्हेन्यू येथे ‘आझादी मार्च’च्या हजारो निदर्शकांना संबोधित करताना सरकारवर सडकून टीका केली. या मुद्दय़ाची दखल घेतल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले.

  • ‘आमचा आझादी मार्च चिरडून टाकण्यासाठी सरकारने प्रत्येक उपायाचा अवलंब केला. त्यांनी शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध अश्रुधूर वापरला, आमच्या घरांवर छापे घालण्यात येऊन आमच्या खासगीपणाचे उल्लंघन करण्यात आले. पण देश स्वत:ला गुलामीच्या भयातून मुक्त करून घेत असल्याचे मी पाहिले’, असे इम्राम म्हणाले.

  •  ‘प्रांतिक विधानसभा बरखास्त करा आणि सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करा असा माझा या आयातीत सरकारला संदेश आहे. अन्यथा, सहा दिवसांनंतर मी पुन्हा इस्लामाबादला येईन’, असे इम्रान यांनी म्हटल्याचे वृत्त ‘जिओ न्यूज’ ने दिले आहे.  कुठल्या लोकशाहीत शांततामय निदर्शनांना परवानगी दिली जात नाही आणि निदर्शकांना अश्रुधुराचा मारा, पोलिसांचे छापे आणि अटक यांना सामोरे जावे लागते असा प्रश्न विचारतानाच, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर ‘प्रचंड जबाबदारी’ आहे, असे वक्तव्य इम्रान खान यांनी केले.

२७ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.